( आदेश पारित द्वारा : श्रीमती जयश्री यंगल, मा.सदस्या ) आदेश ( पारित दिनांक : 20 नोव्हेंबर, 2010 ) तक्रारकर्ते श्री. मधुकर रामराव कळंबे, रा.वडेगाव, (उमरी), तह.नरखेड, जि. नागपूर यांची तक्रार विरुध्दपक्ष क्रं. 1 , अवस्थी सिड्स (पी) लिमीटेड मार्फत संचालक/व्यवस्थापक 486/2, पोखारपूर, कानपूर व विरुध्द पक्ष क्रं. 2 विजय श्री.जेमनी सतनाम कृषी सेवा केंद्र, मेन रोड, तार बाजार, काटोल, तह.काटोल,जि.नागपूर यांचे विरुध्द ग्राहक सरंक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत मंचात दाखल करुन मागणी केली आहे की, त्यांनी तक्रारदाराला निकृष्ट दर्जाचे बियाणे विकल्यामुळे उगवण कमी झाल्यामुळे तक्रारदाराला नुकसान सोसावे लागल्यामुळे मनस्तापापोटी नुकसान भरपाई मिळावी याकरिता सदरची तक्रार दाखल केली आहे. तक्रारीचा तपशील खालीलप्रमाणे - तक्रारदार व्यवसायाने शेतकरी असुन तो दरवर्षी कोथिंबीर व इतर हंगामी पिक घेत असतो. दिनांक 2.7.2009 रोजी तक्रारदाराने त्यांचे मुलासोबत विरुध्द पक्ष क्रं.2 यांचेकडुन कोथिंबीर कलमी (स्पेशल ) बियाणे विकत घेतले. तकारदाराने विरुध्द पक्ष क्रं.2 कडुन बियाणाच्या 13 पिशव्या प्रत्येकी 1 कीलो, प्रति पिशवी दर 140/- प्रमाणे 1820/- रुपयाच्या विकत घेतल्या व त्याचा पावती क्रमांक 111 असुन सदर पावती तक्रारदाराचा मुलगा श्री नरेंन्द्र कळंबे यांचे नावे आहे.
- दिनांक 4.7.2009 रोजी वर नमुद बियाणांची तक्रारदाराने 1 एकर आराजीत अनुभवी मजुराकडुन शास्त्रोक्त पध्दतीने पेरणी करुन घेतली. विरुध्द पक्ष क्रं.2 यांनी त्यांचे कडुन घेतलेले बियाणे उत्कृष्ट दर्जाचे आहे अशी हमी दिली होती. पेरणी केल्यानंतर तक्रारदाराने 10 ते 15 दिवस उगवणी करिता वाट बघीतली होती. परंतु एकुण पेरणीपैकी 10 टक्के बियाणे उगवले ते ही निकृष्ट दर्जाची होती. उर्वरित 90 टक्के बियाणे उगवले नाही. त्यामुळे तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्रं. 2 विजय श्री जेमनी सतनाम कृषी सेवा केंद्र, यांचे कडे भेटण्याकरिता गेले असता. विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी तक्रारदाराकडुन बियाणे विकत घेतल्याबद्दल दिलेले पावती क्रमांक 111 परत घेतली व सांगीतले की ते सदरची पावती कंपनीकडे म्हणजे विरुध्द पक्ष क्रं.1 कडे पाठवतील आणि त्यानंतर कंपनीकडुन शेतीची पाहणीकरता येतील असे तक्रारदारास आश्वासन दिले होते. परंतु आजपावेतो कपंनीकडुन कोणीही पाहणीकरिता आले नाही.
- तक्रारदाराने दिनांक 21.7.2009 रोजी कृषी अधिकारी पंचायत समिती, नरखेड यांचेकडे अवस्थी सिड्स विरुध्द पक्ष क्रं.1 व 2 यांच्या बद्दल तक्रार अर्ज केला जो कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर, यांना पाठविण्यात आला. त्यानंतर दिनाक 24.9.2009 रोजी आवश्यक कारवाई केल्याचे व दिनांक 17.9.2009 रोजी पेरणी आणि उगवणी बाबत पंचनामा केला. आणि त्याचा अहवाल दिनांक 24.9.2009 रोजी तक्रारदाराकडे पाठविला. सदरच्या अहवालात असे स्पष्ट नमुद केले आहे की, बियाणात दोष असल्यामुळे उगवण झाली नाही. तसेच दिनांक 4.8.2009 ला खंड विकास अधिकारी पंचायत समिती नरखेड यांना कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांना पत्र पाठविले.
- तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे विरुध्द पक्ष क्रं. 2 कडुन खरेदी केलेले बियाणात दोष असल्यामुळे बियाणे उगवण झाली नाही त्यामुळे तक्रारदाराचे एकंदरीत रुपये 1,50,000/- नुकसान झाले. त्याकरिता तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांना दिनांक 13.1.2010 रोजी वकीला मार्फत नोटीस पाठविली.
- विरुध्द पक्षाने नोटीस मिळताच त्यांना आपसी समझोता करण्याकरिता दिनांक 4.2.2010 रोजी तक्रारदाराकडे आले आणि तक्रारदाराचे म्हणण्याप्रमाणे आपसी समझोत्यात ठरलेल्या रक्कमेपैकी फक्त 50,000/- रुपयेच आणले म्हणुन तक्रारदाराने ही रक्कम स्विकारली नाही आणि त्यामुळे उभयपक्षांत आपसी समझोता शक्य झाला नाही.
- दिनांक 17.2.2010 रोजी तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांना बियाणे निकृष्ट असल्याने त्यावर आलेल्या नुकसानीबद्दल वकीलामार्फत नोटीस पाठविली. मात्र यावेळी विरुध्द पक्षाने दिनांक 23.2.2010 रोजी नोटीसला उत्तर देऊन त्यात सर्व खोटा मजकूर नमुद केला.
- तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे विरुध्द पक्षाने त्यांना निकृष्ट दर्जाचे बियाणे पुरवुन तक्रारदास झालेल्या नुकसानीची दखल न घेतल्यामुळे तक्रारदाराने ही तक्रार मंचात दाखल करुन वरील प्रमाणे मागणी केली आहे.
- तक्रारदाराने तक्रारीसोबत एकुण 15 कागदपत्रे दाखल केली त्यात 7/12 चा उतारा ,सतनाम कृषी केंद्राचे बिल, अवस्थी सिड्स कंपनीच्या कोथींबीरीच्या 11 पिशव्या कृषी अधिकारी प.स.नरखेड यांना केलेल्या अर्जाची प्रत, त्यावर केलेल्या कार्यवाहीचे पत्र, पंचनामा अहवालाची प्रत, कृषी अधिकारी जि.प.नागपूर यांना पाठविलेले पत्र, वकीला मार्फत पाठविलेली नोटीस, इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे.
- तक्रार दाखल झाल्यावर मंचाने विरुध्द पक्षास नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविण्यात आली. नोटीस मिळुन विरुध्द पक्ष हजर झाले व त्यांनी दिनांक 28.04.2010 रोजी आपला लेखी जवाब दाखल केला.
- विरुध्द पक्ष क्रं.1 व 2 यांनी त्यांचे उत्तरात प्राथमिक आक्षेप घेतला की, तक्रारदार ग्राहक या व्याख्येत बसत नाही. त्यामुळे सदर तक्रार ग्राहक वाद नाही. त्यामुळे या कारणास्तव तक्रार खारीज करण्यात यावी. विरुध्द पक्षाचा पुढील आक्षेप असा आहे की, तक्रारदाराचे नावे शेती नाही व त्यांनी विकलेले बियाणे सुध्दा तक्रारदाराने वापरलेले नसुन श्री डोमा तुकाराम कळंबे यांनी ते बियाणे वापरलेले आहे. त्यामुळे सदर तक्रार चालविण्यायोग्य नाही. त्यामुळे तक्रार खर्चासह खारीज व्हावी. विरुध्द पक्षाचा पुढील आक्षेप असा आहे की, तक्रारदाराने स्वत शेती न वाहता व कोथींबीरीचे पिक स्वतःचे उपयोगात न आणण्याकरिता उत्पन्न मिळविण्याकरिता मोठया प्रमाणात कोथींबीरीची लागवण केली होती. हे कोथींबीरीचे पिक त्यांचे फायद्याकरिता, व्यवसायाकरिता केली होती त्यामुळे तक्रार ग्राहक तक्रार या सज्ञेत मोडत नाही. त्यामुळे खारीज करण्यात यावी.
- विरुध्द पक्षाने त्यांचे उत्तरात पुढे नमुद केले आहे की, बियाणे उगवणीकरिता अनेक गोष्टी कारणभुत असतात. शेती करण्याची पध्दत वातावरण व इतर अनेक गोष्टींवर अवलंबुन असते व त्यामुळे बियाणे उगवणीवर फरक पडु शकतो. फक्त तक्रारदाराचे म्हणण्यावरुन उगवण कमी झाली म्हणुन बियाणे निकृष्ट दर्जाचे आहे असा निष्कर्ष काढता येणार नाही. तक्रारदाराची ही तक्रार खरी असती तर खबरदारी म्हणुन त्यांनी इतर उपाययोजना केली असती. परंतु तक्रारदाराने बियाणे खराब असल्याबद्दलचा निष्कर्ष काढुन इतर काहीच उपाय योजना केल्या नाहीत म्हणुन तक्रार पुराव्या अभावी खारीज करण्यात यावी असा विरुध्द पक्षाने उजर घेतला आहे.
- विरुध्द पक्ष क्रं.1 व 2 यांनी त्यांचे उत्तरात तक्रारदाची सर्व विपरीत विधाने नाकबुल केली आहेत.
- विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी आपल्या उत्तरासोबत 3 कागदपत्रे दाखल केली आहे त्यात दोन शासन परिपत्रक व दोन स्टेटमेंन्टचा यांचा समावेश आहे.
- तक्रारदाराने प्रतिउत्तर दाखल केल्यावर विरुध्द पक्ष क्रं.1 ने कृषी अधिकारी यांचे प्रतिपरिक्षण करण्याबाबत विनंती अर्ज केला. त्यावर मंचाने पुढील प्रमाणे दिनांक 23.6.2010 रोजी आदेश पारित केला. “ गैरअर्जदार गैरहजर. तक्रारदार हजर.उलट तपासणी घेण्याचे प्रयोजन व अती आवश्यकता दिसुन येत नाही. विरुध्द पक्षाला वाटलयास प्रश्नावली दाखल करावी ”. विरुध्द पक्षाने त्या अनुषंगाने दिनांक 14.7.2010 रोजी मंचात प्रश्नावली दाखल केली. त्यावर कृषी अधिकारी, पंचायत समिती, नरखेड यांनी दिनांक 14.10.2010 रोजी प्रश्नावलीचे उत्तर शपथपत्रावर दाखल केले.
- उभयपक्षकारांचे वकीलांचा दिनांक 29.10.2010 रोजी युक्तिवाद ऐकला व कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले असता मंचाचे निरिक्षण व निष्कर्ष खालीलप्रमाणे.
//-//-//- निरिक्षणे व निष्कर्ष -//-//-// - तक्रारीत दाखल कृषी विकास अधिकारी यांनी दाखल केलेल्या शपथपत्रावर दाखल अहवालात नमुद केले आहे की, त्यांनी दिनांक 21.7.2009 चे तक्रारी अन्वये दिनांक 3.8.2010 रोजी 4 वाजताच्या दरम्यान त्यांच्या शेताला भेट दिली असता त्यांनी सांबार पेरलेल्या शेतात वखरणे सूरु असल्याचे दिसुन आले. त्यावेळेस जवळपास 95 टक्के शेत वखरुन झाले होते. उर्वरित 5 टक्के शेत जिल्हास्तरीय समिती येईपर्यत वखरु नये असे त्यांना सांगीतले. त्या शेतात वखरीण सुरु असलेल्या जागी त्यांनी अवस्थी कंपनीचे 13 पॅकेट बियाणे पेरणी केली होती. त्या जागेची पाहणी केली असता फक्त 10 टक्के
सांबार पिकाची उगवण झाल्याची दिसुन आले. त्याचे बाजुला सनग्रो सीड कंपनीचे कारगील 2 कि.ग्रॅम. बियाणे याच दिवशी दि.4/7/2009 ला लागवण केलेली होती. त्याची 90 टक्के उगवण झालेली असल्याचे दिसुन आले. पंचनाम्याच्या वेळेस श्री पाटील कृषी पर्यवेक्षक, नरखेड मंडळ व तक्रारदार शेतकरी उपस्थित होते. 17. विरुध्द पक्षाचा प्राथमिक आक्षेप की, बियाणाची उगवणीकरिता पाऊस व इतर ब-याच गोष्टी कारणीभुत असतात जसे की शेती करण्याची पध्दत, वातावरण, पाऊस आणि इतर ब-याच गोष्टीमुळे बियाणाच्या उगवण शक्तीवर फरक पडु शकतो. विरुध्द पक्षाच्या या म्हणण्यात मंचाला तथ्य वाटत नाही. कृषी अधिकारी यांचे अहवालात नमुद कारणावरुन दुस-या कंपनीचे बियाणांची त्याच कालावधीत पेरणी केली असता त्याची उगवण 95 टक्के झाल्याचे दिसुन येते. यावरुन विरुध्द पक्षाने तक्रारदारास दोषयुक्त बियाणे विकले या निष्कर्षाप्रत हे मंच येते. 18. विरुध्द पक्षाचा पुढील आक्षेप असा आहे की, तक्रारदार हा शेताचा मालक नसुन त्यांनी बियाणे व्यवसायारिता खरेदी केली होती आणि त्यामुळे ते ग्राहक या संज्ञेत बसत नाही. विरुध्द पक्षाच्या या आक्षेपात सुध्दा मंचाला तथ्य वाटत नाही कारण तक्रारदाराने दाखल केलेल्या 7/12 चे उता-यावर शेत जमीन कुटुंबाचे संयुक्त नावावर आहे आणि त्यात तक्रारदाराचा सुध्दा समावेश आहे हे दाखल कागदपत्रावरुन सिध्द होते. 19. उभय पक्षांनी दाखल केलेल्या मा. सर्वोच्च न्यायालय, मा.राष्ट्रीय आयोग व मा.राज्य आयोग यांनी पारित केलेले निकाल दाखल केले आहेत. परंतु सदर निकाल या प्रकरणात लागु होत नाही. 20. यावरुन हे मंच या निष्कर्षाप्रत येते की, तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडुन घेतलेले बियाणे निकृष्ट दर्जाचे होते आणि त्यामुळे तक्रारदारास नुकसान व मनस्ताप सोसावा लागला. परंतु तक्रारदाराची रुपये 1,50,000/- नुकसान भरपाईची मागणी मंचाला मान्य करता येणार नाही कारण दाखल कागदपत्रावरुन तक्रारदाराने तपासणी आधीच शेत जमीनीची वखरणी केली होती व दुसरी पेरणी केली होती. सबब आदेश. 20. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रार अंशतः मंजूर. 2. गैरअर्जदार क्रं.2 यांनी तक्रारदाराने खरेदी केलेल्या बियाणांच्या 13 बॅग्ज प्रत्येकी 1 किलो, दर 140/- प्रमाणे एकुण रक्कम रुपये 1820/-तक्रारदारास परत करावी. सदर रक्कमेवर 10 टक्के द.सा. द.शे.दराने सरळ व्याज रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द्यावे. 3. विरुध्द पक्ष क्रं. 2 ने तक्रारदाराला त्यांचे पिकाचे मशागती व खतांकरिता लागलेल्या खर्चापोटी नूकसानीदाखल रुपये 25,000/- द्यावे. 4. गैरअर्जदार क्रं.2 ने तक्रारदारास शारिरिक व मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/-(रुपये दहा हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/-(रुपये पाच हजार फक्त) असे एकुण रुपये 15,000/- (रुपये पंधरा हजार फक्त) द्यावे. 5. सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्रं 2 यांनी त्यांना आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आत करावे. ( जयश्री येंडे ) (जयश्री यंगल) (विजयसिंह ना. राणे ) सदस्या सदस्या अध्यक्ष अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर
| [HONABLE MRS. Jayashree Yangal] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT[HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER | |