(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार- सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 14/12/2010) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दिनांक 06.02.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांकडून त्यांचे आऊट हाऊस करता विद्युत पुरवठा घेतलेला आहे, त्याचा ग्राहक क्रमांक 410017227592 असा आहे. तक्रारकर्त्याचे म्हणण्यानुसार सदर आऊट हाऊस मध्ये विद्युत वापर अत्यंत कमी आहे. गैरअर्जदारांनी अनेक महिन्यांपासुन अतिरिक्त विजेची बिले पाठविलेली त्याबाबतची तक्रार सुध्दा तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांकडे तोंडी व लेखी स्वरुपात केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 3. तक्रारकर्त्याचे पुढे असे म्हणणे आहे की, एप्रिल-2009 मध्ये 100 युनिट एवढा विजेचा वापर दाखविला, त्यानंतर मे-2009 मध्ये 36 युनिट, जुन-2009 मध्ये 44 युनिट विज वापर होता. परंतु जुलै-2009 ते नोव्हेंबर-2009 पर्यंत अनुक्रमे 456, 384, 321, 307 व 267 युनिट इतका विजेचा वापर केल्याचे दाखविले आहे. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, देयक कालावधी दि.25.11.2009 पासुन 25.12.2009 पर्यंतचे देयक दि.08.01.2010 नुसार गैरअर्जदारांनी विजेचा वापराचे रु.13,300/- चे 1708 युनिटचे देयक दिलेले आहे. त्यांनी पुढे असेही नमुद केले आहे की, सदर देयकामध्ये काहीतरी चुक झालेली आहे व ते दुरुस्त करुन देण्याबद्दल सुध्दा गैरअर्जदारांना विनंती केली आणि गैरअर्जदारांनी तसे केले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे व जुलै-2009 ते डिसेंबर-2009 या कालावधीतील विज आकारणीचे देयके रद्द करावीत व पूर्ण विज वापराबद्दलचे देयके दयावी तसेच गैरअर्जदारांकडून तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक, शारीरिक त्रासाबद्दल रु.50,000/- व नुकसान भरपाईचे रु.25,000/- ची मागणी केली आहे. 4. प्रस्तुत प्रकरणी मंचामार्फत गैरअर्जदारावर नोटीस बजावण्यांत आली असता, त्यांना नोटीस मिळाल्यानंतर ते मंचात हजर झाले असुन त्यांनी आपला लेखी जबाब खालिल प्रमाणे दाखल केलेला आहे. 5. गैरअर्जदाराने आपल्या उत्तरात मीटरचे रिडीग नुसारच तक्रारकतर्याला देयके देण्यांत आल्याचे म्हटले आहे. त्यांनी तक्रारकर्त्याचे इतर सर्व विपरीत विधान नाकबुल केले असुन पुढे असेही नमुद केले आहे की, सदर ग्राहक हा वाणिज्य वर्गवारीचा आहे. तसेच तक्रारकर्त्याचे सदर तक्रार खोटी असुन ती खारिज करण्यांची मंचास विनंती केली आहे. 6. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.31.11.2010 रोजी आली असता तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांचे तर्फे वकील हजर. उभय पक्षांचा युक्तिवाद व दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 7. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तोवेज व दोन्ही पक्षांचे कथन यावरुन ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांकडून विद्युत पुरवठा घेतला होता व त्याचा ग्राहक क्रमांक 410017227592 असा आहे, त्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदारांचा ‘ग्राहक’, ठरतो असे मंचाचे मत आहे. 8. तक्रारकर्त्याने तक्रारीत नमुद केले आहे की, त्याला जुलै-2009 ते नोव्हेंबर-2009 पर्यंत विजेच्या वापरापेक्षा जास्त युनिटचे देयक देण्यांत आले. तत्पूर्वी प्रत्यक्षात 30 ते 45 युनिट एवढाच वापर तक्रारकर्त्याचा होता. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेजांचे व गैरअर्जदारांनी दाखल केलेल्या दस्तावेजांवरुन हे स्पष्ट होते की, अनुक्रमे मे-2009 मध्ये विज वापर हा 36 युनिट, जून-2009 मध्ये 44 युनिट व त्यानंतर जुलै-2009 मध्ये 456 युनिट, ऑगष्ट- मध्ये 384 युनिट, सप्टेंबर-2009 मध्ये 321 युनिट, ऑक्टोबर-2009 मध्ये 307 युनिट व नोव्हेंबर-2009 मध्ये 267 युनिट एवढा होता. तसेच डिसेंबर-2009 मध्ये 1708 युनिट एवढा होता ही बाब विचारात घेता विजेच्या वापरामध्ये एवढया मोठया प्रमाणात तफावत होणे अशक्य आहे, असे मंचाचे मत आहे. त्यामुळे सदर प्रकरणात मंचाचे असे मत झाले आहे की, गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याचे विद्युत वापराचे योग्य वाचन, योग्य मीटर व्दारा करणे गरजेचे आहे व त्याकरीता गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास सद्यस्थितीत असलेले मीटर बदलवुन नवीन निर्दोष मीटर लावावे व त्या मीटरच्या रिडींगनुसार जे वाचन येईल त्यानुसारच तक्रारकर्त्यास देयक द्यावे व सदर नवीन मीटर लावल्यापासुन 3 महीन्यांचे सरासरी वाचन लक्षात घेऊन विवादीत कालावधीतील जुलै-2009 ते डिसेंबर-2009 पर्यंतची देयके दुरुस्त करुन द्यावीत. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याकडून अतिरिक्त वसुल केलेली रक्कम देयकात समायोजीत करावी असे मंचाचे मत आहे. 9. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच वरील निष्कर्षांवरुन खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याकडे असलेले विद्युत मीटर बदलवुन नवीन निर्दोष मीटर लावावे त्यानुसार देयके द्यावीत व सदर मीटरचे 3 महिन्यांचे वाचनाच्या सरासरीनुसार विवादीत कालावधीतील जुलै-2009 ते डिसेंबर-2009 पर्यंतची विद्युत देयके दुरुस्त करुन द्यावीत. 3. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तकारकर्त्यास मानसिक, शारीरिक व तक्रारीच्या खर्चाबद्दल रु.2,000/- अदा करावे. 4. वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी .
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |