( आदेश पारित द्वारा : श्री. विजयसिंह ना. राणे, अध्यक्ष )
आ दे श
( पारित दिनांक : 16 मार्च 2012 )
तक्रारदार ह्यांनी प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये मंचासमक्ष दाखल केली आहे.
यातील तक्रारदार श्री निर्मल सुखदेव रणदिवे यांची गैरअर्जदार यांचे विरुध्द
थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार हे लाभार्थी असुन त्यांचेकडे गैरअर्जदाराने नळ कनेक्शन दिलेले आहे ते त्यांची आई श्रीमती शशीकला रणदिवे यांचे नावे असुन त्याचा ग्राहक क्रमांक 133601 ईडेक्स नं.18/15670, मिटर नं.206108, पुस्तक नं.5 याप्रमाणे दिनांक 25/8/1989 दिले आहे. सदर नळातुन मार्च 2000 पर्यत नियमित पाणी पुरवठा होत होता व तक्रारदार त्यापोटी आलेले देयक वेळोवेळी भरत होते. परंतु अचानक एप्रिल 2000 ला पाणी पुरवठा बंद झाला म्हणुन तक्रारदाराने 19/4/2000 रोजी गैरअर्जदार क्रं.2 ला एक पत्र देऊन पाणी पुरवठा चालु करण्याची विनंती केली असता आधी पाण्याचे देयकाचा भरणा करा नंतर पाणी पुरवठा चालू करु असे सांगीतल्याने, तक्रारदाराने देयकाचा भरणा करुनही पाणीपुरवठा सुरु झाला नाही म्हणुन दिनांक 11/2/2003 ला पुन्हा अर्ज केला व पाणीपुरवठा सुरु करण्याची विनंती केली व मिटर वाचनाप्रमाणे देयक देण्याची विनंती केली परंतु गैरअर्जदाराने पाणीपुरवठा चालु न करता अवाजवी देयक पाठविले. म्हणुन तक्रारदाराने दिनांक 31/12/2003 रोजी देयकाची रक्कम कमी करुन देण्याची व वाजवी देयक देण्याची तक्रार गैरअर्जदाराकडे केली. तक्रारदाराने वारंवार अनेक अर्ज करुनही गैरअर्जदाराने त्यांचे अर्जाची दखल घेतली नाही व दिनांक 7/3/2010 रोजी मिटर चार्जेस रुपये 6505/- व नोटीस फि म्हणुन रुपये 100/- अशी एक डिमांड नोटीस पाठविली. तसेच गैरअर्जदाराचे शेवटचे देयक रुपये 7,012/- दिनांक 11/3/2010 चे पाठविले. तक्रारदाराचे नळाला एप्रिल 2000 पासुन पाणी पुरवठा होत नसतांना गैरअर्जदाराने अवाजवी देयक पाठविले. पाणीपुरवठा चालु न करणे हे गैरअर्जदाराचे कृत्य सेवेतील त्रुटी आहे म्हणुन तक्रारदाराने दिनांक 15/1/2011 रोजी गैरअर्जदारास कायदेशीर नोटीस दिली. परंतु गैरअर्जदाराने त्यांची दखल घेतली नाही व नोटीसला उत्तर देखिल दिले नाही. तक्रारदाराकडे नळाचे कनेक्शन असुनही त्यास विहीरचे पाणी पिण्यास गैरअर्जदाराने भाग पाडले म्हणुन तक्रारदाराने ही तक्रार दाखल करुन गैरअर्जदाराने तक्रारदाराचे नळाला पाणी पुरवठा करावा. मिटर वाचनाप्रमाणे देयक देण्यात यावे. तसेच माहे एप्रिल 2000 ते फरवरी 2011 या कालावधीत पाणीपुरवठा न झाल्याने तक्रारदाराचे परिवारास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 25,000/- मिळावे. तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- मिळावा अशी मागणी केली.
सदर प्रकरणात गैरअर्जदार 1 ते 2 यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्यात आली. नोटीस प्राप्त होऊन गैरअर्जदार हजर झाले नाही व आपला जवाब दाखल केला म्हणुन प्रकरण त्यांचे विरुध्द एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 30/8/2011 रोजी पारित करण्यात आला.
तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असुन, दस्तऐवज यादीनुसार एकुण 19 कागदपत्रे दाखल केलीत. त्यात गैरअर्जदारास वेळोवेळी केलेले तक्रार अर्ज, पाणी कर भरल्याची पावती, पाणी देयक, डिमांड नोटीस , पैसे भरल्याची नोटीस इत्यादी कागदपत्रे दाखल केली.
तक्रारदारातर्फे वकील जी व्ही धुंडे यांनी लेखी युक्तिवाद दाखल केला. गैरअर्जदार गैरहजर.
###- का र ण मि मां सा -###
यात गैरअर्जदार नोटीस पाठवुनही हजर झाले नाही म्हणुन त्याचे विरुध्द मंचाने प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 30/8/2011 रोजी पारीत केला. त्यामधे गैरअर्जदाराने या प्रकरणात उत्तर दाखल करुन आपला कोणताही बचाव केला नाही व तक्रारदाराचे म्हणणे खोडुन काढले नाही.
तक्रारीतील दस्तऐवजावरुन असे दिसुन येते की, तक्रारदाराने वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत. गैरअर्जदाराने जी देयके दिलेली आहेत त्यात कोणतेही मिटर वाचन देण्यात आलेले नाही. अंदाजे देण्यात आलेली ती देयके आहेत. तक्रारदाराचे कोणत्याही तक्रारीस गैरअर्जदाराने उत्तर दिले नाही. शेवटी तक्रारदाराने गैरअर्जदारास आपले वकीलामार्फत दिनांक 15/1/2011 रोजी नोटीस दिली आणि त्या नोटीसीद्वारे पाणीपुरवठा सुरु करुन देण्यात यावा व दिनांक 11.3.2010 चे देयक कमी करुन देण्यात यावे. मिटर वाचनाप्रमाणे देयके देण्यात यावे. अशी मागणी केलेली आहे. ही नोटीस गैरअर्जदारास प्राप्त झाली मात्र गैरअर्जदाराने त्या नोटीसला उत्तर दिले नाही व नोटीसमधील विधाने खोडुन काढले नाही. या पुर्वीची देयके खोटी व मिटर वाचनाप्रमाणे ती दिलेली नाही, तक्रारदारास योग्य पाणीपुरवठा केला नाही,या बाबी स्वयंस्पष्ट आहे आणि ही गैरअर्जदाराच्या सेवेतील सर्वात मोठी त्रुटी आहे. मात्र गैरअर्जदाराने तक्रारदारास 2000 पासुन पाणीपुरवठा केला नसला तरी एवढा कालावधी विचारात घेतला जाऊ शकत नाही आणि तक्रारदाराने ही तक्रार दिनांक 1.3.2011 रोजी दाखल केली आहे त्यापुर्वीचे दोन वर्ष कालावधीचा विचार करता ती विचारात घेण्यात येते. सबब आदेश.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदाराने तक्रारदारास दिलेले दिनांक 11.3.2010 चे पाण्याचे देयक रद्द ठरविण्यात येते. गैरअर्जदाराने तक्रारदाराकडे नविन मिटर लावुन द्यावे आणि त्यामिटरचा पुढील 6 महिन्यांच्या कालावधीकरिता ते तक्रारदाराने वापरले असेल त्या वापराप्रमाणे तक्रारदारास मागील 2 वर्ष कालावधीचे म्हणजे दिनांक 1.3.2009 ते 1.3.2011 या कालावधीचे देयक द्यावे. त्यावर व्याज, दंड व अतिरिक्त आकारणी करु नये.
3. गैरअर्जदाराने तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 2000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 1000/- असे एकुण 3000/- (तीन हजार रुपये फक्त ) द्यावे.
4. गैरअर्जदार सदरची रक्कम तक्रारदाराकडुन येणार असलेल्या देयकात समायोजीत करु शकतील.
सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसाचे आत करावे.