(मंचाचा निर्णय: श्री. नरेश बनसोड - सदस्य यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 25/01/2012)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दि.27.05.2011 रोजी विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 विरुध्द दाखल करुन मागणी केली आहे की, विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकडे रु.4,66,250/- जमा केले व त्यास 2 ½ वर्षांनंतर दुप्पट रक्कम रु.9,32,500/- प्राप्त होणार होती. सदर रक्कम परत न मिळाल्यामुळे ती मिळण्याबाबत मागणी केली, तसेच तक्रारीच्या खर्चाबाबत मागणी केलेली आहे.
2. तक्रारकर्त्यानुसार विरुध्द पक्षाने दि.12.04.2006 रोजी क्षेत्रीय टि.व्ही., रेडिओ व नवभारत वर्तमानपत्रात जाहीरात केली की, त्यांची संस्था 2 ½ वर्षात दुप्पट रक्कम देईल व अटींनुसार कालावधी पूर्ण झाल्यानंतर पैसे परत केल्या जाईल. सदर रक्कम परत न केल्यामुळे कार्यकारी संचालक श्री. प्रमोद कजोडीमल अग्रवाल यांचेकडे बरेचदा तक्रारकर्ता व त्याचे वडील गेले, परंतु गैरअर्जदारांनी पैसे परत न केल्यामुळे तक्रारकर्त्याचे वडिलांना धक्का बसला व त्यात त्यांचा मृत्यू झाला. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे जमा केलेल्या रकमेचे विवरण खालिल प्रमाणे आहे...
दिनांक | सर्टीफीकेट क्र. | जमा केलेली रक्कम | वर्षे | महिने | दिवस | परिपक्व रक्कम |
08.09.2008 | 11214 | 42,000/- | 2 | 8 | 15 | 84,000/- |
08.09.2008 | 11272 | 21,500/- | 2 | 8 | 15 | 43,000/- |
14.10.2008 | 15802 | 28,000/- | 2 | 8 | 09 | 56,000/- |
15.09.2008 | 11839 | 62,500/- | 2 | 8 | 08 | 1,25श्000/- |
18.09.2008 | 12101 | 29,000/- | 2 | 8 | 05 | 58,000/- |
01.11.2008 | 19588 | 1,12,250/- | 2 | 6 | 22 | 2,24,500/- |
05.11.2008 | 20258 | 5,000/- | 2 | 6 | 18 | 10,000/- |
06.12.2008 | 23954 | 20,000/- | 2 | 5 | 17 | 40,000/- |
20.01.2009 | 30022 | 7,000/- | 2 | 4 | 03 | 14,000/- |
04.02.2009 | 33648 | 36,000/- | 2 | 3 | 19 | 72,000/- |
07.02.2009 | 33434 | 10,000/- | 2 | 3 | 16 | 20,000/- |
19.02.2009 | 38644 | 32,000/- | 2 | 3 | 04 | 64,000/- |
03.03.2009 | 39054 | 51,000/- | 2 | 2 | 20 | 1,20,000/- |
14.03.2009 | 40657 | 10,000/- | 2 | 2 | 09 | 20,000/- |
| एकूणः- | 4,66,250/- | | | | 9,32,500/- |
3. तक्रारकर्त्यानुसार विरुध्द पक्षाकडे गुंतविलेला पैसा हा त्याचे श्रमाचा पैसा होता व तो परत मिळण्याकरीता प्रस्तुत तक्रार दाखल केलेली असुन तक्रारीचा खर्च तसेच पैसे परत न मिळाल्यामुळे त्याचे वडिलांचा मृत्यू झाला त्यामुळे कुटूंबीयांना मानसिक त्रास झाला असुन कुटूंबातल्या लहान गरजांना मुकावे लागत आहे व मुलांच्या शिक्षणात अडथळा निर्माण झालेला आहे.
4. तक्रारकर्त्याने आपल्या म्हणण्याचे पृष्ठयर्थ एकूण 6 दस्तावेज पृष्ठ क्र.7 ते 31 वर दाखल केलेले आहेत.
5. मंचामार्फत विरुध्द पक्षांना नोटीस बजावण्यांत आली असता ती त्यांना प्राप्त झाली असुन विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी आपले उत्तर खालिल प्रमाणे दाखल केलेले आहे.
विरुध्द पक्षांनी म्हटले आहे की, तक्रारकर्त्यासोबत त्यानी कुठलाही करार केलेला नाही व इतर सर्व म्हणणे नाकारले. विरुध्द पक्षांनी नमुद केले आहे की, संस्थेचा कारभार जोपर्यंत सुरळीत सुरु होता तोपर्यंत त्यांनी लाभार्थ रक्कम दिलेली आहे. परंत मार्च – 2009 नंतर आयकर विभागाचे आदेशामुळे व संबंधीत विभागाने केलेल्या कारवाईनुसार संस्थेचा कारभार ठप्प झालेला असुन यात विरुध्द पक्षांची कुठलीही चुक नसल्याचे नमुद केले आहे. तसेच तक्रारकर्त्याने गुंतवणूक केलेल्या रकमेस 2 ½ वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला नाही व त्या अगोदरच तक्रार दाखल केल्यामुळे ती खारिज करण्यांत यावी, अशी मंचास विनंती केलेली आहे.
6. विरुध्द पक्षाने आपल्या परिच्छेद निहाय उत्तरात तक्रारकर्त्याचे म्हणणे पूर्णतः नाकारले असुन तक्रारकर्त्याने ज्या पैसे भरल्याबाबतच्या पावत्या दाखल केलेल्या आहेत त्यावर रक्कम 2 ½ वर्षात दाम दुप्पट करण्यांत येईल याबाबत उल्लेख नाही असे नमुद करुन सदर बाब नाकारली आहे. तसेच सदर तक्रार दाखल करण्यांस कुठलेही वादाचे कारण घडलेले नाही, त्यामुळे ती खारिज करण्यांत यावी, अशी मंचास विनंती केलेली आहे. विरुध्द पक्षाने आपल्या उत्तरासोबत आयकर विभागाचे आदेशाची प्रत दाखल केलेली आहे.
7. तक्रारकर्त्याने आपल्या शपथेवरील प्रतिउत्तरात विरुध्द पक्षांचे म्हणणे खोटे व खोडसाळ स्वरुपाचे कसे आहे याचे संपूर्ण विवरण केले, त्यामधे विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास सांगितले की, पूर्णपणे हिशोब हा नंतर पुरविण्यांत येईल व तुमची रक्कम ही 100% सुरक्षीत आहे. तक्रारकर्त्याने आपल्या प्रतिउत्तरासोबत पुन्हा 20 दस्तावेज दाखल केले ते अनुक्रमे पृष्ठ क्र.55 ते 81 वर आहेत.
8. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.31.12.2011 रोजी आली असता तक्रारकर्ता स्वतः हजर, गैरअर्जदारातर्फे अन्य वकीलांचा अर्ज दाखल, अर्ज नामंजूर, गैरअर्जदारांना युक्तिवादाकरीता अंतिम संधी दिली होती. मंचाने तक्रारकर्त्याचा युक्तिवाद ऐकला, तसेच मंचाने दस्तावेजांचे सुक्ष्म अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले.
-// नि ष्क र्ष //-
9. तक्रारकर्त्याने तक्रारीच्या परिच्छेद क्र.2 मधे नमुद केल्याप्रमाणे एकूण रक्कम रु.4,66,250/- दि.08.09.2008 ते 14.03.2009 पर्यंत गुंतविलेली होती. तसेच दाखल रकमेच्या पावत्यांवरुन हे स्पष्ट होते की, तक्रारकर्त्यास मुदतीनंतर रु.9,32,500/- मिळणार होते, त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षांचा ‘ग्राहक’ ठरतो, असे मंचाचे मत आहे.
10. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत अनुक्रमे पृष्ठ क्र.25 वर विरुध्द पक्षांनी वर्तमानपत्रात दिलेल्या जाहीरातीची प्रत दाखल केलेली आहे. सदर जाहीरातीचे अवलोकन केले असता विरुध्द पक्ष क्र.1 ने सामान्य नागरीकांना अवाढव्य व्याजाचे प्रलोभन देऊन तसेच 2 ½ वर्षात रक्कम दुप्पट होईल असे सांगितल्यामुळे तक्रारकर्त्याने आकर्षीत होऊन विरुध्द पक्षाकडे रक्कम गुंतविली. त्यामुळे विरुध्द पक्षांचे संपूर्ण कथन हे खोटे व खोडसाळ स्वरुपाचे आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. विरुध्द पक्षाने आपल्या म्हणण्याचे पृष्ठयर्थ आयकर विभगाचे आदेशा व्यतिरिक्त वस्तुस्थिती स्पष्ट करणारा एकही दस्तावेज दाखल केलेला नाही. त्यामुळे विरुध्द पक्षांचे संपूर्ण कथन हे पूर्णतः अविश्वसनीय स्वरुपाचे असल्यामुळे मंचाने नाकारले. विरुध्द पक्षाने पुन्हा म्हटले आहे की, तक्रारकर्त्याने मुदतीच्या अगोदर सदर तक्रार मंचात दाखल केल्यामुळे ती खारिज करावी. परंतु तक्रारीच्या परिच्छेद क्र.2 मधे दाखल तक्त्यानुसार पहील्या 8 जमा पावत्या दि.23.05.2011 ला परिपक्व झालेल्या होत्या व उर्वरित जमा पावत्या आदेशीत दिनांकापर्यंत परिपक्व झालेल्या आहेत. त्यामुळे गैरअर्जदारांचे संपूर्ण कथन हे असंयुक्तिक असल्यामुळे मंचाने नाकारले. विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याची जमा रक्कम परिपक्व तारखेनंतर मागणीनुसार परत न करणे ही विरुध्द पक्षांचे ग्राहक सेवेतील त्रुटी आहे, असे मंचाचे मत आहे. तसेच विरुध्द पक्षांच्या सदर कृतिमुळे साहजिकच तक्रारकर्त्यास व त्याचे कुटूंबीयास निश्चितच शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला, या म्हणण्याशी मंच सहमत आहे मात्र याबाबत तक्रारकर्त्याची मागणी नाही.
11. विरुध्द पक्ष संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती झालेली असल्यामुळे मंचाने प्रशासकास नोटीस बजावली असता त्याची पोच मंचास प्राप्त झाली असुन दि.26.08.2011 रोजी पुकारा केला असता विरुध्द पक्ष क्र.2 गैरहजर असल्यामुळे त्यांचे विरुध्दची तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित करण्यांत आला.
12. विरुध्द पक्ष क्र.2 हे शासकीय नियुक्त प्रशासक आहे व ही त्यांची नैतीक जबाबदारी होती की त्यांनी मंचासमक्ष उपस्थित राहून संस्थेच्या संपूर्ण कारभाराबाबत व तक्रारकर्त्याची जमा रक्कम परत करण्याबाबतची वस्तुस्थिती मंचासमोर ठेवणे बंधनकारक असतांना विरुध्द पक्ष क्र.2 ने मंचासमक्ष उपस्थित न होता मंचाचे कारवाईत सहभाग न घेतल्यामुळे विरुध्द पक्ष क्र.2 ची कृति पूर्णतः गैरकायदेशिर स्वरुपाची असुन मंचासमक्ष सुरु असलेल्या प्रकरणाकडे पूर्णतः दूर्लक्ष केलेले आहे, असे मंचाचे स्पष्ट मत आहे. प्रशासक हा एक जबाबदार अधिकारी असल्यामुळे तो तक्रारकर्त्याची रक्कम परत करण्याचे जबाबदारीतुन मुक्त होऊ शकत नाही. करीता मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. विरुध्द पक्षांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याची परिपक्व रक्कम रु.9,32,500/- परिपक्व दिनांकापासुन रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9% व्याजासह अदा करावी.
3. विरुध्द पक्षांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- अदा करावे.
4. वरील आदेशाचे पालन विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आत संयुक्तपणे अथवा पृथकपणे करावी.