मंचाचे निर्णयान्वये सौ. जयश्री येंडे, सदस्या.
- आदेश -
(पारित दिनांक – 09/04/2012)
1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. प्रस्तुत प्रकरणातील तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार, त्यांनी वाहन टाटा टी.एसी.एच. दि.08.02.2008 रु.11,48,582/- एवढया मोबदल्यात गैरअर्जदार क्र. 3 कडून खरेदी केले व त्यापैकी रु.57,582/- एवढी रक्कम तक्रारकर्त्याने डाऊन पेमेंटपोटी गैरअर्जदार क्र. 3 यांना अदा केलेले होते व सदर रकमेपैकी रु.10,91,000/- एवढी रक्कम कर्जापोटी गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडून घेतलेले होती. रु.34,987/- विमापोटी गैरअर्जदार क्र. 2 यांना अदा केलेले होते. दि.08.12.2008 पर्यंत रु.32,072/- प्रमाणे 10 हप्ते तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र. 2 यांना अदा केलेले होते. दि.08.12.2008 रोजी सदर वाहन सकळी, जिल्हा धुळे येथे अपघातग्रस्त झाले. त्यासंबंधी पोलिस स्टेशनला एफ आय आर नोंदवून संबंधित बाबीची सुचना तक्रारकर्त्याने गैरअर्जदार विमा कंपनीला दिली व सदर वाहनाचे स्पॉट व्हेरीफिकेशन श्री. मिलिंद वर्मा कडून करुन घेतले आणि त्याकरीता रु.1710/- फी दिली. सदर वाहन गैरअर्जदार क्र. 3 कडे दुरुस्तीकरीता दिले. त्यांनी रु.11,35,784/- इतक्या रकमेचे स्टेटमेंट दिले. त्यांनी सदर गाडी टोटल लॉसमध्ये गेल्यामुळे वाहनाचा पूर्ण दावा गैरअर्जदार क्र. 2 कडून घेण्याविषयी तक्राकर्त्याला सांगितले. तक्रारकर्त्याने वारंवार गैरअर्जदार क्र. 2 कडे संपर्क साधून दाव्याची माहिती दिली. परंतू त्यांनी दावा रक्कम देण्याविषयी टाळाटाळ करुन वारंवार दस्तऐवजांची मागणी केली. दावा मंजूर करण्याचे आश्वासन देऊनही गैरअर्जदारांनी दावा मंजूरीबाबत सुचित केले नाही. सदर कृती गैरअर्जदाराच्या सेवेतील कमतरता आहे. तक्रारकर्त्याने त्यांना कायदेशीर नोटीस पाठविला असता त्यांनी नोटीसला प्रतिसाद दिला नाही. म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन, गैरअर्जदार क्र. 3 ने दाव्याची प्रत, दावा मंजूरीची रक्कम याबाबत माहिती मिळावी, कर्जामध्ये दाव्याची रक्कम समायोजित केल्यावर उर्वरित रक्कम रु.4,00,000/- व्याजासह परत मिळावी, सर्व्हेयर अहवाल मिळावा, मानसिक शारिरीक त्रासाबाबत भरपाई व कार्यवाहीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत.
2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांना पाठविली असता त्यांनी तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले.
3. गैरअर्जदार क्र. 1 चे कथनानुसार सदर तक्रार या मंचाच्या अधिकारक्षेत्रात नाही. तसेच सदर तक्रार खोटी व तथ्यहीन आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांचे कथनानुसार तक्रारकर्ता व गैरअर्जदार क्र. 1 यांचेमध्ये आपसी समझोता झाला. गैरअर्जदार क्र. 1 यांनी तक्रारकर्त्यास दि.13.04.2011 रोजी नो ड्युज सर्टिफिकेट दिलेले आहे. तसेच सदर प्रकरणात गैरअर्जदाराविरुध्द तक्रारकर्त्याची कुठलीही मागणी नाही. वरील सर्व बाबी लक्षात घेता गैरअर्जदार यांनी दिलेल्या सेवेत कुठलीही कमतरता नाही. उलट तक्रारकर्त्याने त्यांच्याविरुध्द खोटी तक्रार दाखल केली, म्हणून सदर तक्रार नुकसान भरपाईसह खारीज करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार यांनी केलेली आहे.
4. गैरअर्जदार क्र. 2 यांनी तक्रारकर्त्याने त्याच्याकडे सदर वाहनाचा विमा काढण्याची बाब मान्य केलेली आहे. परंतू तक्रारकर्त्याचे इतर आरोप अमान्य केलेले आहे. गैरअर्जदार क्र. 2 यांच्या कथनानुसार तक्रारकर्त्याचा दावा योग्य ती छाननी व पडताळणी करुन दि.29.03.2010 रोजी निकाली काढला. सदर दावा तज्ञाच्या मुल्यांकनाप्रमाणे तसेच तक्रारकर्त्याच्या निर्देशानुसार तो वाहन दुरुस्त करण्यास असमर्थ असल्याचे त्याने विनंती केल्यानुसार व त्याच्या संमतीप्रमाणे ‘कॅश लॉस तत्वावर’ श्री. जी. आर. पाटील या तज्ञानी (सर्व्हेयर) केलेल्या मुल्यांकनाप्रमाणे रु.3,01,710/- एवढी रक्कम मॅगमा सराची फायनांस या कंपनीला धनादेशाद्वारे दि.29.03.2010 रोजी अदा करण्यात आली, त्यामुळे गैरअर्जदार यांनी दिलेल्या सेवेत कुठलीही कमतरता नाही. तक्रारकर्त्याने अधिक लाभ बेकायदेशीररीत्या मिळविण्याच्या हेतूने सदर तक्रार दाखल केलेली आहे व ती विचाराअंती आहे.
5. गैरअर्जदार क्र. 3 यांचे कथनानुसार टाटा कंपनीचे अधिकृत विक्रेते असून विक्रीपश्चात सेवादेखील पुरवितात. गैरअर्जदा क्र. 3 यांनी तक्रारकर्त्याने सदर किमतीत वाहन त्यांच्याकडून खरेदी केल्याचे तसेच तक्रारकर्त्याने त्यासाठी घेतलेली कर्जाऊ रक्कम, विमा व डाऊट पेमेंटबाबत दिलेली रक्कम या संबंधी तक्रारकर्त्याने केलेली विधाने मान्य केली. गैरअर्जदार क्र. 3 यांनी हेही मान्य केले आहे की, त्यांनी एक्सीडेंट रीपेअरचे ईस्टीमेट रु.11,35,784/- दिलेले होते. परंतू गैरअर्जदार क्र. 3 यांनी तक्रारकर्त्यास सदर वाहन टोटल लॉसमध्ये आहे असे सांगितले नाही. झालेले नुकसान व नुकसान भरपाईची रक्कम देण्याची जबाबदारी ही गैरअर्जदार विमा कंपनीची आहे. तसेच ग्राहक स्वतः दुरुस्तीपोटी पैसे भरण्यास तयार नसेल तर विमा कंपनीकडून अप्रुव्हल आल्याशिवाय गाडीची दुरुस्ती केली जात नाही. या प्रकरणात शेवटपर्यंत अप्रुव्हल आले नाही. दि.15.06.2010 रोजी गैरअर्जदार क्र. 1 यांनी सदर वाहन गैरअर्जदार क्र. 3 कडून ताब्यात घेतले. सदर दावा सेटल होण्यास जो वेळ लागला त्यास तक्रारकर्ता व विमा कंपनी जबाबदार आहे. उलट सदर वाहन सदर वाहन वर्कशॉपमध्ये पडून होते व दि.15.06.2010 रोजी वाहन गैरअर्जदार क्र. 3 कडून ताब्यात घेतले, त्यामुळे रु.400/- प्रमाणे नुकसान झाले. त्याची भरपाई गैरअर्जदार क्र. 1 व 2 आणि तक्रारकर्ता यांचेकडून गैरअर्जदार क्र. 3 ला मिळावयास हवी. सदर खोटी तक्रार दाखल केल्याने, ती खारीज करण्यात यावी अशी विनंती गैरअजर्दार क्र. 3 यांनी केलेली आहे.
-निष्कर्ष-
6. प्रकरणातील एकंदर वस्तूस्थिती पाहता निर्विवादपणे तक्रारकर्त्याने कर्जसहाय्य घेऊन टाटा टी.एसी.एच. हे वाहन गैरअर्जदार क्र. 3 यांचेकडून खरेदी केलेले होते व त्याचा विमा गैरअर्जदार कंपनीने काढलेला होता. दाखल दस्तऐवजावरुन हेही दिसून येते की, दि.08.12.2008 रोजी सदर वाहनास अपघात होऊन सदर वाहन क्षतिग्रस्त झालेले होते व तक्रारकर्त्याने विमा दावा गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे सादर केलेला होता.
7. गैरअर्जदार यांचे कथनानुसार त्यांनी तक्रारकर्त्याच्या दाव्याची छाननी पडताळणी करुन आय आर डी ए परवानाधारक सर्व्हेयर श्री. जी. आर. पाटील या तज्ञांनी केलेल्या नुकसानीच्या मुल्यांकनानुसार, तसेच तक्रारकर्त्याच्या निर्देशानुसार सदर दावा कॅशलेस तत्वावर निकाली काढून पात्र रकमेपैकी रु.3,01,710/- एवढी रक्कम दि.29.03.2010 रोजी तक्रारकर्त्याच्या निर्देशानुसार गैरअर्जदार यांना धनादेशाद्वारे अदा केले.
8. तर तक्रारकर्त्याच्या मते सदर वाहन विकत घेतल्यानंतर 3 महिन्याच्या आत सदर वाहनाचा दावा केलेला असल्यामुळे, केवळ 3,01,010/- एवढया किमतीत गैरअर्जदार क्र. 2 यांनी ‘टोटल लॉस’ अंतर्गत विकली. वास्तविक सदर वाहन रु.11,00,000/- एवढया किमतीत विकावयास पाहिजे होती. सदर वाहन संदर्भात किती किमतीत वाहन विकले व सदर रक्कम गैरअर्जदार यांनी कोणाला दिले याबाबतदेखील गैरअर्जदार यांनी कुठलीही सुचना तक्रारकर्त्यास दिली नाही.
9. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या दस्तऐवज क्र. 99 वरील दि.18.05.2009 रोजीच्या तक्रारकर्त्याने यांना दिलेल्या पत्राचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारकर्त्याने आर्थिक कारणास्तव सदर वाहन तो दुरुस्त करण्यास अर्समथ असल्याच्या कारणावरुन सदर क्लेम टोटल लॉस बेसिसवर सेटल करण्यासंबंधी गैरअर्जदार यांना विनंती केलेली होती. तसेच दस्तऐवज 100 वरुन हे दिसून येते की, तक्रारकर्त्याने सर्व्हेयरने मंजूर केलेली (Cash loss basis) रक्कम फायनांस गैरअर्जदार/वित्त सहाय कंपनी यांना अदा करावी यासाठी दि.20.11.2009 रोजीचे ना हरकत प्रमाणपत्र गैरअर्जदार विमा कंपनीला दिलेले होते. दस्तऐवजावरुन हेही दिसून येते की, रु.3,01,010/- एवढी रक्कम दाव्यापोटी गैरअर्जदार क्र. 2 यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांना दि.29.03.2010 रोजी अदा केलेली होती. तक्रारकर्त्याच्या शपथपत्रावरुन हेही दिसून येते की, सदर वाहनाचा कब्जा गैरअर्जदार क्र. 1 ला दिलेला होता. गैरअर्जदार क्र. 1 च्या शपथेवरील कथनातील परिच्छेद क्र. 10 मध्ये असे नमूद केलेले आहे की, तक्रारकर्ता व गैरअर्जदार क्र. 1 मध्ये समझोता होऊन दि.13.04.2011 रोजी गैरअर्जदार क्र. 1 यांनी तक्रारकर्त्यास “No dues” सर्टिफिकेट दिलेले आहे. गैरअर्जदार यांचे हे म्हणणे तक्रारकर्त्याने खोडून काढले नाही. त्यामुळे सदर गैरअर्जदार क्र. 1 यांच्या म्हणण्यात तथ्य आहे असे या मंचाचे मत आहे.
10. त्याचप्रमाणे विमा क्लेम पॉलिसी रक्कम गैरअर्जदार क्र. 2 यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांना दि.29.03.2010 रोजी दिलेली आहे व गैरअर्जदार क्र. 1 यांनी सदर रक्कम गैरअर्जदाराच्या कर्ज खात्यात जमा केलेली होती असे दिसून येते. सदर बाबीस प्रथमतः हरकत तक्रारकर्त्याने दि.13.09.2010 च्या रोजी गैरअर्जदारास नोटीस पाठवून घेतली व त्यानंतर दि.30.10.2010 ला सदर तक्रार या मंचात दाखल केलेली आहे. फायनल सेटलमेंटपोटी रक्कम स्विकारतांना तक्रारकर्त्याने कुठलाही आक्षेप घेतला नाही. जवळपास साडेपाच महिन्यानंतर सदर बाबी संदर्भात हरकत घेऊन सदर तक्रार तक्रारकर्त्याने या मंचात दाखल केली.
11. त्याचप्रमाणे विमा दाव्याची रक्कम कपात करुन उर्वरित रु.3-4 लाख रुपये गैरअर्जदार क्र. 2 यांनी तक्रारकर्त्यास देण्याचे कबुल केले होते. तक्रारकर्त्याच्या या म्हणण्यापोटी कुठलाही सबळ पुरावा सादर केला नाही. त्यामुळे गैरअर्जदार यांनी आपल्या सेवेत कमतरता दिली हे तक्रारकर्त्याचे म्हणणे पुराव्या अभावी या मंचाला मान्य करता येणार नाही. सबब आदेश.
-आदेश-
1) उपरोक्त निष्कर्षावरुन सदर तक्रार निकाली काढण्यात येते.
2) खर्चाबद्दल काहीही आदेश नाही.