(मंचाचा निर्णय: श्रीमती जयश्री येंडे - सदस्या यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 22/08/2011) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दिनांक 29.04.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. प्रस्तुत प्रकरणातील तक्रारकर्त्याचे म्हणण्यानुसार त्याने गैअर्जदार क्र.1 यांचेकडून मोबाईल दूरध्वनी संच मॉ. नं. FLY E-106, Sr.910002290078224, बॅटरी नं. CH 090804245 हा दि.18.10.2009 रोजी एकूण रक्कम रु.5,000/- एवढया मोबदला देऊन खरेदी केला होता. सदरचा संच खरेदी केल्यानंतर त्यामध्ये काही दिवसानंतर दोष उत्पन्न झाला, तसेच सदरचा संचावर येणा-या-जाणा-या कॉल्सनंतर बॅटरीचे चार्जिंग संपते, तसेच बॅटरीला अंदाजे रोज कमीतकमी 5 ते 6 तास प्रभारी (Charging) होण्यांस लागतात, फोटो काढण्याची सवलत असुन स्क्रिन खराब झाल्यामुळे मिळत नाही, स्क्रिन खराब झाल्यामुळे कुणाच्या नंबरवरुन फोन आला हे कळत नाही व बॅटरीचा वायर कमी लांबीचा असल्यामुळे वापर करण्यांस अडथळा येतो. तक्रारकर्त्याने या सर्व बाबींची सुचना गैरअर्जदार क्र.2 व 3 यांना प्रत्यक्षपणे व फोनव्दारे वारंवार कळवुनही गैरअर्जदारांनी सदरचा संच बदलवुन दिला नाही व स्क्रिन बदलवुन दिला नाही. तसेच नवीन संच बदलवुन दिला नाही ही गैरअर्जदारांची कृति त्यांनी तक्रारकर्त्यास दिलेल्या सेवेतील कमतरता असल्यामुळे गैरअर्जदारांनी सदरचा संच बदलवुन द्यावा, नुकसान भरपाईबद्दल रु.50,000/- व कायदेशिर शुल्काचे रु.2,000/- व इतर खर्च मिळावा अशी मंचास विनंती केलेली आहे. 3. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना पाठविण्यात आली असता गैरअर्जदार क्र.1 यांना नोटीस प्राप्त झाल्याची पोच प्रकरणात दाखल असुन ते मंचात उपस्थित न झाल्यामुळे मंचाने त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दि.21.10.2011 रोजी पारित केला. गैरअर्जदार क्र.3 यांनी संधी देऊनही लेखी उत्तर दाखल केले नाही त्यामुळे त्यांचे विरुध्द विना लेखी जबाब प्रकरण चालविण्याचा आदेश मंचाने पारित केला होता. मात्र गैरअर्जदार क्र.3 यांनी दि.11.11.2010 रोजीचा सदर आदेश रद्द करण्याबाबतचा अर्ज मंचाने मंजूर करुन त्यांना आपला जबाब दाखल करण्यांस परवानगी दिली. 4. गैरअर्जदार क्र.3 यांनी तक्रारकर्त्यास सदरचा संच दुरुस्ती करता त्यांचेकडे दि.09.02.2010 रोजी टाकल्याचे मान्य केले आहे. तसेच सदरच्या संचाचा डिस्प्ले फुटल्यामुळे तो वारंटीत होणार नाही व त्यासाठी डिस्प्ले बदलवुन देण्याचा चार्ज लागेल असे सांगितले व त्यास तक्रारकर्ता तयार होता, असे नमुद केले आहे. तसेच कंपनीत डिस्प्ले उपलब्ध नसेल तर वेळ लागेल असे सांगितले, तक्रारकर्त्याने सदर मोबाईल संच दुरुस्त करुन घेण्याऐवजी नुकसान भरपाईच्या मागणीची सुचना गैरअर्जदारावर बजावली असता गैरअर्जदार क्र.3 यांनी आपली प्रतिष्ठा सांभाळण्याकरता सदरचा संच त्याच कंचनीचा त्याच मॉडेलचा कुठलेही शुल्क न घेता बदलवुन देण्यांत तयार असल्याचे कबुल केले आहे. 5. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र. 3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात टॅक्स इन्व्हॉइस, कस्टमर एक्नॉलेजमेंन्ट, प्रिंट मेसेज 1,2,3 इत्यादींच्या छायांकीत प्रती जोडलेल्या आहेत. 6. सदर तक्रार मंचासमक्ष मौखिक युक्तीवादाकरीता दि.06.08.2011 रोजी आली असता दोन्ही पक्ष गैरहजर, त्यांना संधी देऊनही ते युक्तिवाद करीत नसल्यामुळे प्रकरण गुणवत्तेवरील निकालाकरीता ठेवण्यांत आले. सदर प्रकरणी दाखल तक्रार व दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील प्रमाणे निष्कर्षाप्रत पोहचले. -// निष्कर्ष //- 7. तक्रारकर्त्याची शपथेवरील तक्रार तसेच तक्रारीसोबत दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता या मंचाचे असे मत आहे की, निर्वीवादपणे तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून मोबाईल दूरध्वनी संच मॉ. नं. FLY E-106, Sr.910002290078224, बॅटरी नं. CH 090804245 हा दि.18.10.2009 रोजी एकूण रक्कम रु.4,444/- एवढा मोबदला देऊन खरेदी केला होता. तसेच सदरच्या संचात वारंटी कालावधीत दोष उत्पन्न झाला होता, म्हणून तक्रारकर्त्याने सदरचा संच गैरअर्जदार क्र.3 यांचेकडे दि.09.02.2010 रोजी दुरुस्त करण्याकरीता दिलेला होता, ही बाब गैरअर्जदार क्र.3 यांनी आपल्या उत्तरात मान्य केलेली आहे. तसेच सदरचा संच गैरअर्जदारांनी अद्दापही दुरुस्त करुन दिलेला नाही, ही गैरअर्जदारांची कृति निश्चितपणे त्यांचे सेवेतील कमतरता आहे. गैरअर्जदार क्र.3 यांनी आपल्या उत्तरात ते तक्रारकर्त्यास जुन्या संचा ऐवजी त्याच मॉडेल व कंपनीचा दुसरा संच देण्याचे मान्य केलेले आहे. तक्रारकर्त्याने केलेली नुकसान भरपाईची मागणी पुराव्या अभावी या मंचाला मान्य करता येत नाही. परंतु सदरचा संच अद्यापही गैरअर्जदारांनी दुरुस्त करुन दिलेला नाही त्यामुळे निश्चितपणे तक्रारकर्त्यास मानसिक त्रास सहन करावा लागला. वरील सर्व बाबी लक्षात घेता आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अंतिम आदेश //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदार क्र.3 यांनी तक्रारकर्त्यास त्याच कंपनी व मॉडलचा नवीन मोबाईल दूरध्वनी संच बदलवुन द्यावा. 3. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास मानसिक त्रासापोटी रु.1,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/- अदा करावे. 4. वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |