(घोषित दि. 11.11.2010 व्दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्यक्ष) गैरअर्जदार वीज वितरण कंपनीच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, त्याने गैरअर्जदार वीज वितरण कंपनीकडून ग्राहक क्रमांक 510030116320 द्वारे घरगुती वापरासाठी वीज जोडणी घेतली आहे. सदर वीज जोडणी थकबाकीच्या कारणावरुन कायमस्वरुपी खंडीत करण्यात आली होती. वीज वितरण कंपनीने ज्या ग्राहकांचा वीज पुरवठा कायमस्वरुपी खंडीत केला होता त्यांच्यासाठी “नवप्रकाश योजना” जाहीर केली होती. सदर योजनेच्या अटी व शर्ती प्रमाणे ज्या वीज ग्राहकांची थकबाकी दिनांक 31.03.2008 पर्यंत रुपये 10,000/- व त्यापेक्षा जास्त असेल अशा ग्राहकांनी रुपये 5,000/- एकरक्कमी एक वेळेची तडजोड म्हणून गैरअर्जदाराकडे भरल्यास त्या वीज ग्राहकांचा वीज पुरवठा पुर्ववत सुरु करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार त्याने दिनांक 27.08.2008 रोजी रुपये 5,000/- भरले. त्यानंतर त्याचा वीज पुरवठा पुर्ववत सुरु करण्यात आला.त्यानंतर वीज वितरण कंपनीने डिसेंबर 2008 च्या वीज वापराबद्दल दिनांक 09.01.2009 रोजी सरासरीनुसार देयक दिले. सदर देयक भरण्यात आले. त्यानंतर मार्च 2010 पर्यंत वीज वितरण कंपनीकडून प्राप्त झालेली सर्व देयके त्याने नियमित भरली. तरीसुध्दा वीज वितरण कंपनीने दिनांक 20.05.2010 रोजी नोटीस देवून रुपये 1,82,376/- ची मागणी केली व नवप्रकाश योजनेचा लाभ देण्यास नकार दिला. अशा प्रकारे वीज वितरण कंपनीने त्रुटीची सेवा दिली. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, दिनांक 05.03.2009 रोजी वीज वितरण कंपनीने त्यास दिलेले देयक चुकीचे असल्याचे घोषित करावे व दिनांक 20.05.2010 रोजी वीज वितरण कंपनीने दिलेल्या नोटीस मधील रक्कम त्याच्या देयकातुन कमी करावी व त्यास नवप्रकाश योजनेचा लाभ द्यावा. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. वीज वितरण कंपनीने हे मान्य केले आहे की, त्यांनी “नवप्रकाश योजना” जाहीर केली होती व सदर योजनेचा लाभ मिळवा म्हणून तक्रारदाराने अर्ज दिला होता. वीज वितरण कंपनीचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराने नवप्रकाश योजेच्या अटी व शर्तींचे पालन केले नाही. योजनेनुसार वीज बिल नियमित भरणे आवश्यक असताना तक्रारदाराने नियमितपणे देयकांचा भरणा केला नाही. तक्रारदाराने नवप्रकाश योजनेनुसार त्याचा वीज पुरवठा पुर्ववत सुरु केल्यानंतर नियमितपणे 1 वर्षाची देयके भरली नाही व नवप्रकाश योजनेच्या अटी व शर्तींचे पालन केले नाही. त्यामुळे तक्रारदाराला थकीत रकमेची मागणी करणे गैर नसुन त्याला त्रुटीची सेवा दिलेली नाही. म्हणून तक्रारदाराची तक्रार फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने केली आहे. दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात मुद्दे उत्तर 1.गैरअर्जदार वीज वितरण कंपनीच्या सेवेत त्रुटी आहे काय ? होय 2.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे कारणे मुद्दा क्रमांक 1 – तक्रारदाराच्या वतीने अड.एच.ए.नवाब यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीच्या वतीने अड.जी.आर.कड यांनी युक्तीवाद केला. तक्रारदाराकडे रुपये 81,170/- थकबाकी असल्यामुळे गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने त्याचा वीज पुरवठा वर्ष 2006 मध्ये कायमस्वरुपी खंडीत केला होता. वीज वितरण कंपनीने दिनांक 15.07.2008 रोजी ज्या ग्राहकांचा वीज पुरवठा थकबाकीच्या कारणावरुन कायमस्वरुपी खंडीत केला त्यांचा वीज पुरवठा पुर्ववत सुरु करण्यासाठी “नवप्रकाश योजना” जाहीर केली होती. सदर योजनेनुसार वीज पुरवठा पुर्ववत सुरु करण्यासाठी थकबाकीदार ग्राहकाने जर त्याची थकबाकी रुपये 10,000/- किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर रुपये 5,000/- भरणे आवश्यक होते व वीज पुरवठा पुर्ववत सुरु केल्यानंतर 1 वर्ष नियमित देयके भरणे बंधन कारक होते. सदर योजनेनुसार तक्रारदाराची थकबाकी रुपये 10,000/- पेक्षा जास्त असल्यामुळे त्याने रुपये 5,000/- वीज वितरण कंपनीकडे दिनांक 29.08.2008 रोजी भरले. त्यानंतर वीज वितरण कंपनीने तक्रारदाराचा कायमस्वरुपी खंडीत केलेला वीज पुरवठा नोव्हेंबर 2004 मध्ये पुर्ववत सुरु केला. अशा प्रकारे वीज पुरवठा पुर्ववत सुरु केल्यानंतर वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला नवप्रकाश योजनेनुसार पहिले देयक दिनांक 09.01.2009 रोजी दिले. सदर देयक तक्रारदाराने दिनांक 19.01.2009 रोजी भरले. त्यानंतर वीज वितरण कंपनीने दिनांक 07.02.2009, 05.03.2009, 06.04.2009, 10.05.2009, 04.06.2009, 04.07.2009, 30.07.2009, 25.08.2009, 23.09.2009, 31.10.2009, 09.12.2009, 07.01.2009, 02.02.2010, 27.02.2010 आणि 08.04.2010 रोजी दिलेली देयके तक्रारदाराने नियमित भरल्याचे पावत्यांवरुन दिसुन येते. तक्रारदाराने नवप्रकाश योजनेच्या अटीनुसार दिनांक 30.11.2008 पासुन दिनांक 23.03.2010 या कालावधीतील वीज वापराची देयके नियमित भरल्यानंतर दिनांक 20.05.2010 रोजी वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला नोटीस देवून रक्कम रुपये 1,82,376/- थकीत असल्याचे दर्शवून सदर रक्कम भरण्यास सांगितले. तक्रारदाराने नवप्रकाश योजनेच्या अटींची पुर्तता केलेली असतानाही वीज वितरण कंपनीने त्याच्याकडील थकबाकी माफ करुन त्यास नियमित देयके देण्याऐवजी त्यास मागील पुर्ण थकबाकीची मागणी करुन निश्चितपणे अनुचित व्यापार करुन त्यास त्रुटीची सेवा दिलेली आहे. आमच्या मतानुसार तक्रारदाराने नवप्रकाश योजनेच्या अटींची पुर्तता केलेली असुन तो सदर योजनेनुसार संपुर्ण थकबाकी माफ होण्यास पात्र आहे. कारण नवप्रकाश योजनेच्या अट क्रमांक 2 नुसार तक्रारदाराने एकरकमी एकवेळची तडजोड म्हणून रुपये 5,000/- दिनांक 27.08.2008 रोजी भरल्यानंतर त्याचा वीज पुरवठा पुर्ववत चालू करण्यात आला व त्यानंतर त्याने पुढील वर्षभर सर्व वीजेची देयके नियमित भरली होती.म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार मंजुर करण्यात येते.
- गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदारास दिनांक 20.05.2010 रोजी दिलेली नोटीस रद्द करण्यात येते. वीज वितरण कंपनीने तक्रारदारास नवप्रकाश योजना लागु झाल्यानंतर त्याने भरलेली एकरकमी एकवेळची तडजोड रक्कम रुपये 5,000/- सोडून उर्वरीत थकबाकीचे देयक पुर्णत: रद्द करण्यात येते. त्यामुळे वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला नवप्रकाश योजनेनुसार केवळ चालू बाकीचे सुधारित देयक निकाल कळाल्यापासून एक महिन्याच्या आत द्यावे.
- गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रुपये 500/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 500/- असे एकूण रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्त) निकाल कळाल्यापासून एक महिन्याच्या आत द्यावेत किंवा त्याच्या पुढील देयकात समायोजित करावेत.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.
| | HONORABLE Mrs. Jyoti H. Patki, Member | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | , | |