(मंचाचा निर्णय : श्री. अमोघ कलोती - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक – 16/03/2013)
1. तक्रारकर्तीने विरुध्द पक्षकारांकडून भुखंडाचे विक्रीपत्र व ताबा मिळणेसाठी ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारकर्तीचे कथन थोडक्यात येणेप्रमाणे -
तक्रारकर्ती व तिची परिचीत सौ. निर्मलाबाई त्र्यंबक जाधव यांनी संयुक्तपणे विरुध्द पक्षाचे मालकीची मौजा-डवलामेटी. प.ह.नं. 5, खसरा नं. 41,42, तालूका-जिल्हा नागपूर येथील भुखंड क्र.63, आराजी 1500 चौ.फूट, किंमत रु.60/- प्रति चौ.फूट प्रमाणे एकूण रु.90,000/- मध्ये खरेदी करण्याचे कबुल केले होते. तक्रारकर्ती व सौ. निर्मलाबाई त्र्यंबक जाधव यांनी सदर भुखंडाचा संपूर्ण मोबदला रक्कम विरुध्द पक्षाला दिली व रक्कम स्विकारल्याबाबत विरुध्द पक्षाने रितसर पावत्या दिल्या.
3. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे सदर भुखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र
करुन देण्याबाबत मागणी केली, परंतु विरुध्द पक्षाने विक्रीपत्र करुन देण्यांस व भुखंडाचा ताबा देण्यांस टाळाटाळ केली. तक्रारकर्त्याने दि.27.11.2010 रोजी विरुध्द पक्षाला या संदर्भात एक पत्र पाठविले. परंतु विरुध्द पक्षाने सदर पत्र स्विकारले नाही, त्यामुळे तक्रारकर्तीने दि.15.01.2011 रोजी व्दितीय स्मरणपत्र पाठविले. सदर पत्र देखिल विरुध्द पक्षाने स्विकारले नाही व तक्रारकर्तीकडे अतिरिक्त पैशाची मागणी करुन भुखंडा संबंधी दस्तावेज आणि विक्रीपत्र करुन देण्यांस नकार दिला.
करीता तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे...
4. प्रस्तुत प्रकरणाची नोटीस मिळूनही विरुध्द पक्ष प्रकरणात हजर झाले नाही, त्यामुळे त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने दि.13.12.2012 रोजी पारित केला.
5. तक्रारकर्तीतर्फे सौ. अनुराधा देशपांडे यांचा युक्तिवाद ऐकला त्यांनी तक्रारीमधील कथनालाच लेखी युक्तिवाद समजण्यांत यावा अशी पुरसीस अभिलेखावर दाखल केली.
6. प्रस्तुत प्रकरणी मंचाचे निर्णयार्थ उपस्थित होणारे मुद्दे व त्यावरील निष्कर्ष खालिल प्रमाणे नोंदविलेले आहे...
मुद्ये निष्कर्ष
1. सदर भुखंडाचे विक्रीपत्र व ताबा मिळण्यांस तक्रारकर्ती
हकदार आहे काय ? नाही.
1. विरुध्द पक्षकारांचे सेवेत कमतरता असल्याचे होय.
सिध्द होते काय ?
2. आदेश ? तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
- कारणमिमांसा -
-
7. विरुध्द पक्षाने सदर भुखंडापैकी 750 चौ.फूट भुखंडाचे विक्रीपत्र तक्रारकर्तीच्या नावे व उर्वरित 750 चौ.फूट भुखंडाचे विक्रीपत्र सौ. निर्मलाबाई त्र्यंबक जाधव यांचे नावाने करुन देण्याचे विरुध्द पक्षाने मान्य केले असल्याचे कथन तक्रारकर्तीने तक्रारीमधे केले आहे. तसेच एकूण मोबदला रक्कम रु.90,000/- पैकी तक्रारकर्तीने व सौ. निर्मलाबाई त्र्यंबक जाधव यांनी प्रत्येकी रु.45,000/- विरुध्द पक्षास दिल्याचे तक्रारीत नमुद आहे आणि तसे अभिलेखावर दाखल केलेल्या पावत्यांवरुन दिसुन येते.
8. सौ. निर्मलाबाई त्र्यंबक जाधव यांनी याबाबत तक्रार दाखल केलेली नाही तसेच प्रस्तुत प्रकरणामधे सदर भुखंड क्र.63 च्या विक्रीबाबत विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीच्या नावे कोणतेही बयाणापत्र (करारनामा) केल्याचे दिसुन येत नाही. तरी सदर भुखंडाच्या विक्रीबाबत विरुध्द पक्षाने पावत्या जारी केल्याचे दिसुन येते. सदर भुखंड विक्रीबाबत संबंधीत पक्षामधे कोणताही औपचारीक करारनामा नसल्यामुळे सदर भुखंडाचे विक्रीपत्र व ताबा देण्याबाबत आदेश देता येणार नाही, असे मंचाचे मत आहे.
9. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास रक्कम रु.45,000/- दिल्याचे आणि सदर रक्कम तक्रारकर्तीने परत मागितल्याचे अभिलेखावर उपलब्ध कागदपत्रांवरुन दिसुन येते. तसेच मागणी करुनही तक्रारकर्तीची रक्कम विरुध्द पक्षाने परत केली नाही, त्यामूळे त्यांचे सेवेतील कमतरता सिध्द होते, असे मंचाचे मत आहे. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीस भुखंडाची रक्कम परत न करता ती वापरली व तक्रारकर्तीला सदर रकमेची मागणी वारंवार करावी लागली. तसेच मंचासमक्ष तक्रार दाखल करावी लागली, त्यामुळे साहजिकच तक्रारकर्तीला शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागला असे मंचाचे मत आहे.
करीता मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे...
- : अंतिम आदेश : -
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला रक्कम रु.45,000/- तक्रार दाखल दिनांक 26.07.2011 पासुन प्रत्यक्षात रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.12% दराने व्याजासह परत करावे.
3. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीस शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.3,000/- द्यावे.
4. विरुध्द पक्षाने आदेशाचे पालन आदेश प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.
5. उभय पक्षास सदर आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.