निकालपत्र :- (दि.28/07/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (01) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले आहे. उभय पक्षकारांचे वकीलांचा अंतिम युक्तीवाद ऐकला. सदरची तक्रार सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा योग्य व न्याय क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे दाखल करणेत आली आहे. (02) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) सामनेवाला कंपनी ही वित्तीय व्यवसाय करणारी विमा कंपनी असून यातील तक्रारदार यांचे पती मयत नाथाजी महादेव पाटील यांचा शेतकरी वैयक्तिक अपघात विमा योजनेअतंर्गत विमा पॉलीसी क्र.181200/42/2008/91 अन्वये विमा उतरविलेला होता. पॉलीसी कालावधीत दि.15/04/2008 रोजी संध्याकाळी 7 ते 7.30 चे सुमारास तक्रारदाराचे पती मोटरसायकल वरुन बोरपाडळे ते कोडोली येथे जात असता अचानक अनपेक्षीतरित्या अंधारात बैलगाडीला धडकून गंभीर जखमी झाले व त्यांना उपचाराकरिता नेत असताना वाटेतच ते मयत झाले. तक्रारदाराने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच पूर्तता करुन शासनाने नियुक्त केलेल्या अधिका-यांमार्फत क्लेम पाठवला असता सामनेवाला यांनी दि.15/03/2010 चे पत्रान्वये ड्रायव्हींग लायसेन्स दिले नाही व क्लेम वेळेत दाखल केला नाही अशा तांत्रिक कारणांचा आधार घेऊन क्लेम नाकारलेला आहे. तक्रारदार हे नेहमी मोटरसायकलचा वापर करत असत. तसेच वाहनाचा अधिकृत परवानाही बाळगत होते. सदर अपघातावेळी त्यांचेजवळ वाहनाचा अधिकृत परवाना होता. मात्र सदर परवाना अपघातामध्ये गहाळ झालेला आहे. तक्रारदार हे अडाणी अशिक्षीत व निरक्षर विधवा महिला असून सामनेवाला अथवा शासन प्रतिनिधी यांनी प्रत्यक्षपणे सदर पॉलीसी व अटींच्या नियमांची माहिती तक्रारदारास कधी दिलेली नव्हती व नाही. तक्रारदारास तिचे पतीच्या परवांन्याचा नंबरदेखील माहित नव्हता त्यामुळे त्याबाबतची माहिती त्या पुरवू शकल्या नाही. त्यामुळे तक्रारदाराचा न्याययोग्य क्लेम नाकारुन सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवलेने सदरची तक्रार मे. मंचात दाखल करणे भाग पडले. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन तक्रारदारांना सामनेवालांकउून विमा रक्कम रु.1,00,000/- दि.15/07/2008 पासून द.सा.द.शे. 18 टक्के वयाजासहीत, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/- मिळणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती केलेली आहे. (03) तक्रारदाराने तक्रारीच्या पुष्टीप्रित्यर्थ्य सामनेवाला यांनी क्लेम नाकारलेचे पत्र, पोलीस वर्दी पंचनामा, पोस्ट मार्टेम रिपोर्ट, इन्क्वेस्ट पंचनामा, शवपरिक्षेकरिता पाठवावयाचा पोलीस अहवाल इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. (04) सामनेवालांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार मान्य केले कथनाखेरीज तक्रारदाराची तक्रार परिच्छेद निहाय नाकारलेली आहे. तक्रार अर्जातील कलम 1 मधील मजकूर मान्य व कबूल आहे. सामनेवाला विमा कंपनीची जबाबदारी आलीच तर ती विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीनुसार राहील. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, महाराष्ट्र शासनाच्या शासन शुध्दीपत्रक क्र. शेअवि-2008/प्र.क.187/11, मुंबई यांचे दि.19/05/2009 चे आदेशानुसार उपरोक्त दि.06/09/2008 चे शासन निर्णयामधील अनुक्रमांक 23(ई)(7) व अनुक्रमांक 8 प्रमाणे समाविष्ट करणेत आलेल्या ‘’जर शेतक-याचा मृत्यू वाहन अपघातामुळे झाला असेल व अपघातग्रस्त शेतकरी वाहन स्वत: चालवत असेल अशा प्रकरणी वैध वाहन चालवणेचा परवाना सादर करणे आवश्यक राहील. यानुसार तक्रारदाराने त्यांना वेळोवेळी सांगून वाहन परवाना दाखल केलेला नाही. त्यामुळे सामनेवाला यांनी योग्य कारणास्तव क्लेम नाकारुन कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी व रक्कम रु.5,000/-खर्चापोटी सामनेवाला यांना देणेचा आदेश व्हावा अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (05) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ शासन निर्णय 2008 व 2009 चे पत्रक व करारपत्र इत्यादी कागदपत्र दाखल केलेली आहेत. तसेच अॅड. मानकामे या इन्व्हेस्टीगेटर यांचे शपथपत्र व रिपोर्ट दाखल केला आहे. (06) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवालांचे लेखी म्हणणे व उभय पक्षकारांच्या वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1) सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवली आहे काय? -- होय 2) काय आदेश? -- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- अ) तक्रारदाराचे पतीचा विमा सामनेवालांकडे उतरविलेला होता. त्याचा पॉलीसी क्र.181200/42/2008/91 आहे. पॉलीसीबाबत वाद नाही. दि.15/04/2008 रोजी संध्याकाळी 7 ते 7.30 चे सुमारास तक्रारदाराचे पती मोटरसायकल वरुन बोरपाडळे ते कोडोली येथे जात असता अचानक अनपेक्षीतरित्या अंधारात बैलगाडीला धडकून गंभीर जखमी झाले व त्यांना उपचाराकरिता नेत असताना वाटेतच ते मयत झाले. अपघाताबाबतसुध्दा वाद नाही. तक्रारदाराचे पतीचा मृत्यू अपघाती झालेला आहे हे क्लेम फॉर्म, पोलीस वर्दी जबाब, पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, शवपरिक्षे साठी दयावयाचा पोलीस अहवाल इत्यादी दाखल कागदपत्रांवरुन निर्विवाद आहे. प्रस्तुत तक्रारदाराचे पतीचा मृत्यू हा नैसर्गिक नसून अपघाती आहे ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. त्याबाबत वाद नाही. वादाचा मुद्दा उपस्थित होतो तो सामनेवाला यांनी दि.15/03/2010 चे पत्राने तक्रारदाराचे मयत पतीचा वाहन परवाना वेळोवेळी स्मरण करुन कळवूनही दिलेला नाही. तसेच दि.15/11/2008 नंतर कट ऑफ तारखेनंतर प्रस्ताव दाखल केला असलेने क्लेम नाकारलेला आहे. सामनेवाला यांनी दाखल केलेल्या महाराष्ट्र शासनाचा नमुद अपघात योजनेअंतर्गत जी.आर. चे अवलोकन केले असता दि.06/09/2008 च्या शासन निर्णयामध्ये 23(ई)(7) नंतर शासन शुध्दीपत्र 23(ई)(8) म्हणून नव्याने समाविष्ट करणेत येत आहे. 23 (ई) (8) “ जर शेतक-याचा मृत्यू वाहन अपघातामुळे झाला असेल व अपघातग्रस्त शेतकरी स्वत: वाहन चालवत असेल अशा प्रकरणी वैध वाहन चालविणेचा परवाना सादर करणे आवश्यक राहीत.” सदरची सुधारणा राज्यात सन 2008-09 करीत कार्यन्वयीत झालेच्या दिनांकापासून राहील असे नमुद केलेले आहे. सदर योजना 15ऑगस्ट-08 ते 14ऑगस्ट-09 या वर्षाच्या कालावधीकरिता होती. सबब तक्रारदाराचा मृत्यू हा दि.15/04/2008 रोजी झालेला आहे. सबब सदर जी.आर.लागू होण्यापूर्वीच्या कालावधीत तक्रारदाराचा मृत्यू झालेला आहे. सामनेवाला यांनी दावा दि.15/03/2010 रोजी जरी नाकारला असला वरील वस्तुस्थितीचा विचार करता प्रस्तुतची अट ही तक्रारदाराचे मृत्यूनंतर प्रभावीत झालेली आहे; तसेच सामनेवाला यांनी प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेल्या विमा पॉलीसी व पॉलीसीच्या अटी व शर्तीचे अवलोकन केले असता प्रस्तुत पॉलीसी ही दि.15/08/2007 ते 14/08/2008 याकालावधीसाठी होती. त्यामुळे प्रस्तुत शुध्दीपत्रकातील अट प्रस्तुत प्रकरणी लागू होत नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. वादाकरिता प्रस्तुतचा दावा हा प्रस्तुत शुध्दीपत्रक प्रसिध्द झालेनंतर सामनेवाला कंपनीकडे गेलेला आहे. त्यामुळे सदर बाबींचा विचार करता तसेच सामनेवाला यांनी दाखल केलेल्या अटी व शर्तीचे अवलोकन केले असता Clause VI(A)-3 मध्ये Accident occurring where the motor vehicle does not have proper permit. All farmers except the one who is driving without holding proper permit should be eligible for claim. चा विचार करता वाहन चालवतेवेळी शेतक-यांकडे अपघातावेळी वाहन परवाना असणे गरजेचे आहे.वरील अटीचा विचार करता तकारदाराचे पतीकडे वाहन चालवणेचा वैध परवाना होता. मात्र अपघातावेळी वाहन चालवतेवेळी प्रस्तुतचा परवाना त्याचे ताब्यातच होता सदर अपघातावेळी नमुदचा परवाना गहाळ झालेला आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. सामनेवाला विमा कंपनीने सुनिल मानकामे या त्यांचे इन्व्हेस्टीगेटर यांचा रिपोर्ट व शपथपत्र दाखल केलेले आहे. सदर रिपोर्टनुसार त्यांनी डेप्युटी रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये जाऊन त्यांचेकडील रेकॉर्डची तपासणी केली असता नेताजी महादेव पाटील रा. बोरपाडळे ता.पन्हाळा जि.कोल्हापूर याचे नांवे आर.टी.ओ.कोल्हापूर यांनी सदर व्यक्तीस ड्रायव्हींग लायसन्स दिलेबाबतचे दिसून आलेले नाही असे नमुद केलेले आहे व त्याप्रमाणे शपथपत्र दाखल केलेले आहे. सदर बाबींचा विचार करता वस्तुत: यापूर्वी ब-याच प्रकरणात आर.टी.ओ. कोलहपूर यांना ड्रायव्हींग लाससन्सबाबत साक्षी समन्स काढलेले होते त्यामध्ये त्यांनी वाहन परवाना नंबरशिवाय रेकॉर्ड उपलब्ध होऊ शकत नाही. तसेच डुप्लीकेट परवानाही काढता येत नाही असे नमुद केलेले आहे. तसेच विविध तक्रारदार व वेगवेगळया विमा कंपन्यांनी नमुद अधिका-याकडून नमुद वाहन परवान्याची माहिती मागितली असता अशाप्रकारची उत्तरे दिलेली आहेत. याचा विचार करता नमुद इन्व्हेस्टीगेटर यांना नावावरुन नावावरुन वाहन परवाना शोधता येतो व तो शोधला असता वैध वाहन परवाना मिळून आलेला नाही असे दाखविणारा प्रस्तुत ऑथॉरिटीचा कागद प्रस्तुत प्रकरणी दाखल नाही; सबब मे. मंचास अशा प्रकारच्या प्रकरणाची निर्गत करताना समोर आलेल्या या स्वरुपाच्या बाबींचा विचार करता इन्व्हेस्टीगेटर यांचे रिपोर्ट व शपथपत्र हे कनक्लुजीव प्रुफ म्हणून विचारात घेता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदाराचे पतीकडे वाहन चालविणेचा अधिकृत परवानाच नव्हता अशी वस्तुस्थिती दिसून येत नाही. अपघातावेळी प्रस्तुतचा परवाना गहाळ झालेला आहे व त्याचा नंबर तक्रारदारास माहिती असेल असे नाही. तसेच सदर परवान्याची दुबार प्रत आर.टी.ओ. कडून प्राप्त होण्यासारखी परिस्थिती नाही. अशा परिस्थितीत सामनेवालांनी पॉलीसीचा मूळ हेतू तसेच अपघातामध्ये परवाना गहाळ झालेचे गृहीत धरुन तक्रारदाराचा क्लेम मंजूर करावयास हवा होता. तसे सामनेवाला यांनी केलेले नाही. तक्रारदाराचा पारदर्शी व न्याययोग्य क्लेम तांत्रिक कारणास्तव नाकारुन सेवा त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. ब) वादाचा दुसरा मुद्दा आहे तो प्रस्तुतचा क्लेम हा दि.15/11/2008 नंतर आलेला आहे. म्हणजे कट ऑफ तारखेनंतर आलेने नाकारलेला आहे. सदर बाबींचा विचार करता शासन निर्णय क्र. शेअवि-2008/प्र.क.187/11, मंत्रालय, मुंबई दि.19/05/2009 च्या यांचे (इ) विमा कंपन्या - क्लॉज नं.3 पान नं.9 वर सदर योजना कालावधीत विमा प्रस्ताव प्राप्त झालेस तो विचारात घेणे बंधनकारक राहील. अखेरच्या दिवसात झालेल्या अपघातासाठी कालावधी संपलेनंतर 90 दिवसांपर्यंत दावे स्विकारणेत यावेत. समर्थनीय कारणास्तव 90 दिवसांनतर प्राप्त दावे स्विकारणेत यावेत. तथापि अपघाताचे सुचना पत्र विमा कालावधी संपलेनंतर 90 दिवसांपर्यंत घेणे बंधनकारक राहील व तयानुसार सविस्तर कारवाई करणे कंपनीवर बंधनकारक राहील असे नमुद केले आहे. सदर क्लॉज 3 चा विचार करता तक्रारदार या मयत विमाधारकाची पत्नी ही अडाणी, अशिक्षीत, विधवा असहाय्य स्त्री आहे. पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे या छोटया खेडेगांवात ती राहते. प्रस्तुत पॉलीसीच्या अटी व शर्तीस त्या अनभिज्ञ आहेत. तसेच तिच्या पतीचा अपघातामध्ये अकाली मृत्यू झालेमुळे तिचेवर ओढवलेला दुख:द प्रसंग व तिची मानसिक अवस्था लक्षात घेता प्रस्तावास झालेला विलंब हा माफ करण्यायोग्य आहे. तक्रारदाराचे विमा पॉलीसी क्र. 181200/42/2008/91 असून क्लेम क्र.1812004820091296 असा आहे. अपघात सिध्द होणेसाठी लागणारे सर्व कागदपत्रे प्रस्तुत प्रकरणी दाखल आहेत तसेच ते सामनेवाला यांना मिळालेली आहेत. सदर क्लेम हा 2009 मध्ये सामनेवाला यांना मिळालेची वस्तुस्थिती दिसून येते. प्रस्तुत उभय पक्षांनी प्रस्तुतचा क्लेम कधी दाखल केला हे स्पष्ट केलेले नाही. मात्र सामनेवाला यांनी दि.15/03/2010 चे पत्रात वर नमुद बाबींचा उल्लेख आलेला आहे. यावरुन क्लेम प्राप्त झालेपासून 3 महिन्यात क्लेम बाबत निर्णय देणे सामनेवाला कंपनीस बंधनकारक होते. त्याप्रमाणे दि.15/03/2010 रोजी क्लेम नाकारलेचे कळवलेले आहे. याचा अर्थ 15 डिसेंबर-2009 चे आसपास किंवा त्यापूर्वी प्रस्तुतचा क्लेम दाखल असला पाहिजे. सबब वरील क्लॉज व परिस्थितीचा विचार करता सामनेवाला प्रस्तुत क्लेम दाखल करणेबाबत झालेला विलंब हा समर्थनीय कारणास्तव माफ करु शकले असते. मात्र तसे न करुन सामनेवाला यांनी सेवात्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता सामनेवाला यांनी तक्रारदाराचा न्याययोग्य क्लेम नाकारुन सेवा त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 :- मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदाराचे पतीचा अपघाती मृत्यू झालेने तक्रारदार पॉलीसीप्रमाणे विमा रक्कम रु.1,00,000/- क्लेम नाकारले तारखेपासून म्हणजे दि.15/03/2010 रोजीपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच सामनेवाला यांनी सेवेत ठेवलेल्या त्रुटीमुळे तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास पॉलीसीप्रमाणे असलेली रक्कम रु.1,00,000/-(रु.एक लाख फक्त) अदा करावी. सदर रक्कमेवर दि.15/03/2010 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे. 3) तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.500/-(रु.पाचशे फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/-(रु. एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |