श्री नरेश बनसोड, सदस्य यांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 16/12/2011)
1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. प्रस्तुत प्रकरणातील तक्रारकर्त्यांच्या तक्रारीचा आशय असा आहे की, मृतक सुभाष पी. चंदनकर यांनी गैरअर्जदारांकडून पर्सनल एक्सीडेंट पॉलिसी (कंबाईन फॅमीली पॉलिसी) 11.12.2006 ते 10.12.2011 च्या कालावधीकरीता घेतली होती. यामध्ये नामनिर्देशित व्यक्ती म्हणून पत्नी व दोन मुले यांचा समावेश असून पॉलिसी क्र. 7049870313, 7049870314, 7049870315 व 7049870316 होते. मृतक सुभाष चंदनकर हे सप्टेंबर 2009 मध्ये नागद्वार येथे दर्शन करण्याकरीता गेले व भुराभगतवरुन चौरागड येथे जात असतांना सागाखेडा या गावाजवळ आंघोळ करीत असतांना पाण्यात बुडून अपघाती मृत्यू झाला. सदर बाब दि.03.09.2009 च्या सरकारी रुग्णालय, तामियॉ, जि.छिंदवाडा, मध्यप्रदेश यांनी दिलेल्या शव परीक्षण अहवालावरुन स्पष्ट होते. यावेळेस सदर पॉलिसी ही कालातीत होती, त्यामुळे तक्रारकर्ते नामनिर्देशित व्यक्ती म्हणून रु.1,00,000/- विमा दाव्यापोटी मिळण्यास पात्र आहेत. दि.12.11.2009 रोजी तक्रारकर्ता क्र. 1 व 2 यांनी विमा दावा प्रपत्रासोबत आवश्यक दस्तऐवज जोडून विमा दावा मिळण्याकरीता गैरअर्जदार क्र. 1 कडे दाखल केला. आश्वासित केलेल्या कालावधीत विमा रक्कम न मिळाल्याने तक्रारकर्त्यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांनी त्याबाबत विचारणा केली असता त्यांनी अंतिम जांच निष्कर्ष रीपोर्ट, मृतकाचे ओळखपत्र, नॉमिनीचे ओळखपत्र, पोलिस रीपोर्ट, पंचनामा रीपोर्ट, शव परीक्षण अहवाल इ. कागदपत्रांची मागणी केली. जेव्हा की ही सर्व कागदपत्रे आधीच दावा प्रपत्रासह दाखल केलेली होती. तरी दावा लवकर निकाली निघण्याचे दृष्टीकोनातून ती पुरविण्यात आली. यानंतर गैरअर्जदार क्र. 1 ने विसेरा रीपोर्टची मागणी केली. जेव्हा की, विसेरा रीपोर्ट हा फक्त विषप्राशनामुळे झालेल्या मृत्युकरीताच मागविल्या जातो व हे गैरअर्जदारांना संबंधित डॉक्टरांनी सांगितले, तसेच शव परीक्षणातही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट नमूद असतांना गैरअर्जदार अशा कागदपत्रांची मागणी करुन प्रकरण प्रलंबित ठेवत होते. पुढे पब्लीस नोटीस, एस.डी.ओ.जुन्नारदेव यांचे अंतिम जांच रीपोर्ट दाखल करण्याची मागणी केली. गैरअर्जदाराच्या मागणीनुसार सर्व दस्तऐवज दाखल करुनही विमा दावा मंजूर करण्यात आला नाही व दाव्याची रक्कम वारंवार आश्वासन देऊनही गैरअर्जदारांनी दिली नाही, म्हणून तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन पॉलिसी दावा रक्कम रु.1,00,000/-, मानसिक व शारीरीक त्रासापोटी रु.25,000/-, कार्यवाहीच्या खर्चापोटी रु.10,000/- व वकिलांच्या खर्चाची मागणी केलेली आहे. आपल्या तक्रारीचे पुष्टयर्थ एकूण 11 दस्तऐवज दाखल केले आहे. त्यामध्ये तक्रारकर्त्याने तक्रारीत उल्लेखित सर्व दस्तऐवजांचा समावेश आहे. तसेच गैरअर्जदाराला रक्कम दिल्याची पावती, लाईफकार्ड फॅसिलीटी कार्डची प्रत दाखल केली आहे.
2. मंचाने गैरअर्जदार क्र. 1 ते 3 ला नोटीस पाठविली असता, नोटीस प्राप्त होऊनही गैरअर्जदार क्र. 1 ते 3 गैरहजर. तसेच त्यांनी तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले नाही, म्हणून मंचाने त्यांच्याविरुध्द एकतर्फी कारवाईचा आदेश पारित केला.
3. मंचाने तक्रारकर्त्यांचे वकिलांचा युक्तीवाद ऐकला. तसेच कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले.
-निष्कर्ष-
4. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारातर्फे वैयक्तीक अपघात अंतर्गत पॉलिसी काढल्यामुळे तक्रारकर्ता ग्राहक ठरतो आणि तक्रार व दाखल दस्तऐवजावरुन तक्रारकर्त्याने आपली तक्रार विमा दावा मिळण्यास सिध्द केलेली आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे व तक्रार आणि दस्तऐवजांची वस्तूस्थिती गैरअर्जदारांना मान्य असल्यामुळे त्यांनी मंचासमोर उपस्थित होऊन आपले भाष्य करणे टाळलेले आहे.
5. तक्रारकर्त्याचे वकिलांनी 28.12.2010 ला गैरअर्जदारास नोटीस पाठविली होती. त्यांचे उत्तराचे परिच्छेद क्र. 4 मध्ये नमूद केले आहे की, गैरअर्जदाराने इन्व्हेस्टीगेशन रीपोर्ट, आय-कार्ड, एफ.आय.आर, इंक्वेस्ट पंचनामा इ.ची मागणी केली. परंतू तक्रारकर्त्याने दाखल केले नाही. जेव्हा की, संबंधित सदर दस्तऐवज तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत दाखल केले आहे, त्यामुळे गैरअर्जदाराने आपल्या सद्सद् विवेकबुध्दीचा वापर करुन विमा दाव्याची पडताळणी केली असती तर गैरअर्जदाराचे समाधान झाले असते. 15.01.2011 चे गैरअर्जदाराने पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की, शव विच्छेदन करणा-या डॉक्टरांसाबत संपर्ककेला असता ते म्हणाले की, ज्या प्रकरणात वीष घेतल्याने मृत्यू होतो, फक्त त्या प्रकरणातच विसेरा रीपोर्ट प्राप्त करु शकतात व मृतकाचा मृत्यू हा पाण्यात बुडून झालेला होता असे कथन केले आहे. हे नोटीसला दिलेल्या उत्तरातील कथन वस्तूनिष्ठ पूराव्याअभावी, तसेच पॉलिसीच्या अटी व शर्ती अंतर्गत येत नसल्यामुळे गैरअर्जदाराची मागणी निरर्थक स्वरुपाची होती व तक्रारकर्त्यांना एकमेव त्रास देण्याच्या हेतूने दस्तऐवजांची मागणी केली होती व तक्रारकर्त्यांचा विमा दावा प्रलंबित ठेवला ही गैरअर्जदाराची ग्राहक सेवेतील गंभीर स्वरुपाची त्रुटी आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. म्हणून गैरअर्जदार विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- मृत्यू दि.03.09.2009 पासून तक्रारकर्त्याचे हाती रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याज मिळण्यास पात्र आहे. झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासाकरीता रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चाकरीता रु.2,000/- देणे संयुक्तीक होईल असे मंचाचे स्पष्ट मत आहे, म्हणून खालीलप्रमाणे आदेश.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- मृत्यू दि.03.09.2009 पासून तक्रारकर्त्याचे हाती रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह द्यावी.
3) गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला, शारिरीक व मानसिक त्रासाच्या क्षतिपूर्तीबाबत रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चाकरीता रु.2,000/- द्यावे.
4) सदर आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी संयुक्तपणे किंवा पृथ्थकपणे आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याचे आत करावी.