श्री नरेश बनसोड, सदस्य यांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 17/01/2012)
1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्यांनी गैरअर्जदाराच्या इंपोरटेड मोबाईल शॉपीमधून, लॉंगटेल ई 300 हा मोबाईल रु.2,700/- मध्ये इंपोरटेड म्हणून खरेदी केला. दि.17.09.2010 रोजी सदर मोबाईलच्या कीपॅडमध्ये दोष निर्माण झाल्याने, गैरअर्जदाराकडे तक्रारकर्त्याने मोबाईल दुरुस्तीकरीता नेला असता, त्यांनी विदर्भ कॉम्प्युटर, अंजून कॉम्प्लेक्स येथे पाठविले. जेव्हा की, विदर्भ कॉम्प्युटर फक्त चायना निर्मित व ऑर्डीनरी मोबाईलची दुरुस्ती करतात. विदर्भ कॉम्प्युटर यांनी मोबाईल दुरुस्तीकरीता ठेवून घेतला व आजतागायत परत केलेला नाही. तसेच तक्रारकर्त्याला चांगल्या प्रतीचा मोबाईल सांगून चायना निर्मित मोबाईल दिल्याने, तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराच्या अनुचित व्यापार प्रथेबाबत सदर तक्रार मंचासमोर दाखल केली व मागण्या केल्या आहे की, रु.7,300/- मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासाबाबत मिळावी व इतर मागण्या केलेल्या आहेत. तक्रारीसोबत एकूण 10 दस्तऐवज दाखल केलेले आहेत.
2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांवर बजावण्यात आली असता त्यांनी तक्रारीस लेखी उत्तर प्राथमिक आक्षेपासह दाखल केले.
3. गैरअर्जदाराने लेखी उत्तरात, तक्रारकर्त्याने लॉंगटेल वर्कशॉपमध्ये मोबाईल दुरुस्तीस पाठविला असे म्हटले आहे, त्यामुळे त्यांना विरुध्द पक्ष करणे आवश्यक होते, म्हणून तक्रार खारीज करण्याची मागणी केली. तसेच पुढे परिच्छेदनिहाय उत्तरामध्ये त्यांचे दुकानात ब्रांडेड वस्तूंची विक्री होते. तक्रारकर्त्याला लॉंगटेल कंपनीचा मोबाईल 12.01.2010 रोजी विकल्यानंतर त्यामध्ये दोष निर्माण झाला तर त्याचे सुटे भाग बदलवून देण्याची कंपनी वारंटी देत असते, म्हणून लॉगटेल कंपनीचे वर्कशॉप विदर्भ कॉम्प्युटर असल्याने तक्रारकर्त्याला तेथे पाठविण्यात आले होते. तसेच तक्रारकर्त्याने त्यापूर्वी सदर मोबाईल अन्य ठिकाणी दाखविल्याने लॉगटेल वर्कशॉपने वारंटी देण्यास नकार दिला. करीता त्यांना विरुध्द पक्ष करणे गरजेचे होते. तक्रारीतील इतर सर्व विधाने गैरअर्जदाराने अमान्य केलेली आहेत.
4. तक्रारकर्त्याने प्रतिज्ञापत्रात गैरअर्जदाराने लेखी उत्तरात केलेले कथन खोटे असून त्यांची फसवणूक केल्याचे नमूद केले आहे.
5. सदर तक्रार युक्तीवादाकरीता आल्यावर मंचाने तक्रारकर्ता व गैरअर्जदारांचे वकील यांचा युक्तीवाद ऐकला. तसेच तक्रारीसोबत दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले.
-निष्कर्ष-
6. गैरअर्जदाराने हे मान्य केले आहे की, तक्रारकर्त्याने 12.01.2010 ला लॉंगटेल ई 300 नावाचा मोबाईल खरेदी केला होता व त्यादाखल दिलेल्या पावतीवरुन हे स्पष्ट होते की, त्या मोबाईलची वारंटी एक वर्षाची होती. गैरअर्जदाराने लाँगटेल कंपनीचे वर्कशॉप विदर्भ कॉम्प्युटर यांना विरुध्द पक्ष केले नाही या सबबीखाली तक्रार खारीज करण्याची मागणी केली. गैरअर्जदाराची सदर मागणी मंचास संयुक्तीक वाटत नाही, कारण तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराकडून मोबाईल खरेदी केला होता व तो त्यांचा ग्राहक ठरतो. त्यामुळे वर्कशॉपची जबाबदारी नसून वितरकाकडून मोबाईलमध्ये आलेला बिघाड दुरुस्त करण्याची/तजविज करण्याची जबाबदारी ही संपूर्णपणे गैरअर्जदाराची आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. कारण सदर मोबाईल हा चायनामेड असल्यामुळे व उत्पादकाचे नाव तक्रारकर्त्यासमोर नसल्यामुळे तक्रारकर्त्याने मोबाईलमध्ये आलेला बिघाड इंपोरटेड मोबाईलच्या नावाखाली चायनामेड सारख्या तकलादू मोबाईलची केलेली विक्री यातून तक्रारकर्त्याची फसवणूक झाली व लॉंगटेल कंपनीच्या वर्कशॉपमध्ये त्याच्या मोबाईलमध्ये आलेला कीपॅडमधील दोष दुरुस्त करण्यात पूर्णतः ते अपयशी ठरले असे मंचाचे स्पष्ट मत आहे. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याचा मोबाईल संबंधी तक्रारीचे समाधान न करणे व मोबाईल वारंटीमध्ये असतांना त्याची दुरुस्ती करुन न देणे ही त्यांच्या ग्राहक सेवेतील गंभीर स्वरुपाची त्रुटी आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. म्हणून गैरअर्जदाराने मोबाईलची किंमत रु.2,700/- तक्रार दाखल दि. 21.04.2011 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह परत करणे, तसेच तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासाकरीता व तक्रार दाखल करण्यास आलेला खर्च म्हणून रु.2,000/- देणे संयुक्तीक होईल असे मंचाचे मत आहे. म्हणून मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला मोबाईलची किंमत रु.2,700/- तक्रार दाखल दि. 21.04.2011 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह रक्कम अदा होईपर्यंत द्यावी.
3) गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासाकरीता व तक्रार दाखल करण्यास आलेला खर्च म्हणून रु.2,000/- द्यावे.
4) सदर आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत मिळाल्यापासून गैरअर्जदाराने 30 दिवसाचे आत करावे.