निकाल
दिनांक- 13.12.2013
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार शरद साहेबराव जाधव यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे, तक्रारदार हे शेतकरी असून शेती व्यवसायावर त्यांचे कूटूंबाची उपजिवीका चालवतात. तक्रारदार यांहचे नांवे मौजे मोरगांव येथे गट नं.685 ही शेत जमिन आहे. सदरील शेत जमिनीमध्ये दि.7.6.2010 रोजी तक्रारदार यांनी दिड एकरामध्ये ऊसची लागवड केली होती. ऊसाचे लागवडीनंतर दिड ते दोन महिन्याने तक्रारदार यांचे शेतात तण वाढल्यामुळे त्यावर बंदोबस्त करण्यासाठी औषधाची चौकशी करण्यासाठी सामनेवाले क्र.1 यांचे दूकानात गेले. सामनेवाले क्र.1 यांनी सामनेवाले क्र.2 यांनी उत्पादीत केलेले ग्लेसेल या औषधांचे एक लिटरचे तिन डब्बे व समृध्दी एक लिटरचे तिन डब्बे तक्रारदारास दिले. सामनेवाले क्र.1 यांनी अशी हमी दिली की, सदरील औषध विशिष्ट प्रमाणात एकत्रित करुन फवारल्यास तण नाश होईल. तक्रारदार हे सामनेवाले क्र.1 यांचेवर विश्वास ठेऊन सदरील औषध घेऊन गेले. 15 दिवसांनंतर तक्रारदार यांने औषधाची फवारणी ऊसावरील तणावर केली. तक्रारदार यांना दुसरे दिवशी असे आढळून आले की, त्यांचे शेतातील एक एकर ऊस तणावर मारलेल्या औषधामुळे जळून गेला. तक्रारदार यांनी सदरील बाब सामनेवाले क्र.1 यांचे निदर्शनास आणली. तक्रारदार हे सामनेवाले क्र. 1 यांचे दूकानात प्रत्यक्ष जाऊन भेटले व औषध फवारल्यामुळे एक एकर ऊस जळाला आहे असे सांगितले. त्यावर सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांना उडवाउडवीचे उत्तर दिले व दूकानातून बाहेर हाकलून दिले. सामनेवाले क्र.1 यांने ज्या प्रमाणात तणनाशक फवारण्यास सांगितले होते त्याचप्रमाणात तक्रारदार यांनी तणनाशकाचा वापर केला. सामनेवाले क्र.1 यांनी चूकीची माहीती देऊन तक्रारदार यांना सदरील औषध विकत घ्यावयास लावले.
तक्रारदार यांचे पूढे कथन असे की, त्यांनी सदरील बाब कृषी अधिकारी यांचे निदर्शनास आणली. जिल्हास्तरीय बिज समितीने तक्रारदार यांचे शेतावर दि.26.10.2010 रोजी प्रत्यक्ष भेट दिली व ऊस जळाल्या बाबत खात्री करुन घेतली व तसेच शेतक-याचे जाबजवाब घेतले व पंचनामा केला. कृषी अधिकारी बीड यांनी दि.01.11.2010 रोजी अहवाल सादर केला. सदरील अहवालामध्ये सामनेवाले क्र.1 यांनी सदोष तणनाशक विक्री केल्यामुळे ऊसाचे पिक जळाले आहे असे नमूद केले. तक्रारदार यांचे सदरील ऊस जळाल्यामूळे रु.60,000/- चे नुकसान झाले आहे. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे. सदरील औषध सामनेवाले क्र.2 या कंपनीने उत्पादित केलेले आहे. त्यांनी सदोष औषधाची निर्मीती केली आहे. सबब, तक्रारदार यांना सामनेवाले यांचेकडून नुकसान भरपाई रु.60,000/-, मानविक व आर्थिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- असे एकूण रु.75,000/- नुकसान भरपाई मिळावी म्हणून सदरील तक्रार दाखल केली आहे.
सामनेवाले क्र. 2 हे मंचामसेर हजर झाले. त्यांनी लेखी म्हणणे नि.9 अन्वये सादर केले आहे. सामनेवाले क्र.2 यांनी जी लेखी म्हणणे दाखल केले आहे तेच लेखी म्हणणे सामनेवाले क्र.1 यांचे समजावे अशी पुरसीस दाखल केली.
सामनेवाले यांचे कथन की, तक्रारदार यांनी सदरील औषधे व्यापारी कारणासाठी विकत घेतले आहे. सबब, सदरील तक्रार चालविण्याचा या मंचास अधिकार नाही. सामनेवाले यांनी असे कथन केले आहे की, तक्रारदार यांनी घेतलेली औषधामध्ये कोणताही दोष नव्हता. तक्रारदार यांचे चूकीमुळे तक्रारदार यांचे नुकसान झालेले आहे. तसेच सामनेवाले यांचे कथन की, सदरील केसमध्ये गुतागुंतीचे प्रश्न असल्यामुळे सदरील तक्रार दिवाणी न्यायालयात चालविण्यास पात्र आहे. औषधामध्ये दोश आहे किंवा नाही हे तपासणीसाठी पुरावा घेणे गरजेचे आहे. सामनेवाले यांनी असे कथन केले आहे की, सदरील औषध हे प्रमाणीत असून त्यांची योग्य त्या प्रयोगशाळेतून तपासणी केलेली आहे. सदरील औषधे भारतात सर्व शेतकरी वापरतात. तक्रारदार यांनी ऊसामध्ये सदरील औषध वापरावयास नको होते. तक्रारदार यांनी स्वतःचे निष्काळजीपणामुळे सदरील औषध वापरले आहे. सबब, सामनेवाले यांनी तक्रारदार यांची तक्रार रदद करावी अशी मागणी केली आहे.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत नि.4 वर सामनेवाले क्र.1 यांचेकडून औषध विकत घेतल्याबददल पावती हजर केली आहे. तसेच कृषी अधिकारी यांचेकडे दिलेला अर्ज, कृषी अधिकारी यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन केलेला पंचनामा, रिपोर्ट सादर केलेले आहेत. तक्रारदार यांनी स्वतःचे शपथपत्र नि.11 अन्वये सादर केले आहे. सामनेवाले यांनी लेखी म्हणणे सोबत सामनेवाले क्र.2 कडे असलेले लायसन्स सादर केले आहे.
तक्रारदार यांचे वकील श्री.काळे यांचा यूक्तीवाद ऐकला, सामनेवाले यांचे वकील श्री. कासट यांचा यूक्तीवाद ऐकला. तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले कागदपत्र यांचे अवलोकन केले. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना चूकीचे औषध देऊन
सेवेत त्रुटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार शाबीत
करतात काय ? होय.
2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ः-
तक्रारदार यांचे वकील श्री.काळे यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांनी त्यांचे शेतामध्ये ऊसाची लागवड केली. ऊसाचे पिक दिड ते दोन महिन्याचे झाले असता त्यामध्ये मोठया प्रमाणात तण वाढले.त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाले क्र.1 यांचे दुकानात गेले व त्यांनी सदरील बाब सांगितली. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांना ग्लेसेल औषध वापरल्यास व त्यासोबत समृध्दी औषध वापरल्यास तण नाश होईल असे सांगितले. सामनेवाले क्र.1 यांचेवर विश्वास ठेऊन तक्रारदार यांनी औषधे विकत घेतली व सामनेवाले क्र.1 यांनी सांगितल्या प्रमाणात त्यांची फवारणी. ऊसातील तणावर केली. तक्रारदार यांचे शेतातील एक एकर ऊस त्या औषधामुळे जळून गेला. तक्रारदार यांचे वकिलांनी या मंचाचे लक्ष तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावर वेधले. तसेच असा यूक्तीवाद केला की, सामनेवाले क्र.2 यांनी सदोष औषधाचे उत्पादन करुन ते सामनेवाले क्र.1 यांचे दूकानात विक्रीस ठेवले. सदरील औषधे सदोष आहेत. त्यामुळे तक्रारदार यांचे नुकसान झाले. सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे. सबब, तक्रारदार हे तक्रारीत मागणी केलेली नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत.
सामनेवाले यांचे वकील श्री. कासट यांनी असा यूक्तीवाद केला की, सदरील औषधामध्ये कोणताही दोष नाही. तक्रारदार यांनी चूकीच्या पध्दतीने औषधे वापरल्यामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. तक्रारदार हे पिकाचे नुकसान भरपाईस स्वतः जबाबदार आहेत.तसेच सामनेवाले यांचे वकील यांनी असा यूक्तीवाद केला की, तक्रारदार यांनी सदरील औषधाचे नमूने मंचासमोर हजर केले नाही म्हणून औषधामध्ये कोणताही गुणधर्म होता अगर ते सदोष आहेत हे तक्रारदार सिध्द करु शकले नाहीत. सबब, तक्रारदाराची तक्रार रदद करण्यात यावी.
तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व सोबत दाखल केलेले कागदपत्राचे काळजीपुवर्क अवलोकन केले. तसेच सामनेवाले यांनी केलेला यूक्तीवाद व लेखी म्हणणे यांचेमध्ये कथन केलेल्या बाबी लक्षात घेतल्या.तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 यांचे दूकानात जाऊन ऊस पिकावर तण वाढलेला आहे त्यांचे बंदोबस्त करण्यासाठी औषधाची मागणी केली. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांना तक्रारीत नमूद केलेले औषध घेण्या बाबत सांगितले. तक्रारदार हे अशिक्षीत शेतकरी असल्यामुळे त्यांनी सामनेवाले क्र.1 यांचेवर विश्वास ठेऊन औषध विकत घेतले. तसेच सामनेवाले क्र.1 यांनी ज्या प्रमाणात औषधाची फवारणी करण्यास सांगितले त्या प्रमाणात तक्रारदारांनी औषधाची फवारणी केली. सदरील ग्लेसेल औषधे तणनाशक म्हणून वापरले जाते. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांना त्यांचे शेतात ऊसाचे पिक आहे त्यामुळे सदरील तणनाशक ऊसाचे पिकामध्ये फवारु नये असे सांगणे गरजेचे होते. तक्रारदार हे सामनेवाले क्र.1 यांनी दिलेल्या विश्वासावर विसंबून राहिले व तसेच सामनेवाले क्र.1 यांने तक्रारदार यांना सदरील औषध हे ऊस पिकामध्ये वाढलेल्या तणावर गुणकारक आहे असे सांगितले. त्यावर विश्वास ठेऊन तक्रारदार यांनीसदरील औषध विकत घेतले. त्यामुळे सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. सदरील औषधाचे उत्पादन कर्ता सामनेवाले क्र.2 आहेत. सदरील औषधामध्ये कोणताही उत्पादीत दोष नाही. ग्लेसेल औषधे हे तणनाशक आहे म्हणून वापरले जाते परंतु ते विशिष्ट पिकामध्ये वापरले जाते. त्यांचा वापर ऊसाचे पिकामध्ये त्यांची फवारणी करता येत नाही. तसेच सदरील औषध एकदल व द्विदल पिकामध्ये असलेल्या तणनाशका मध्ये कधी वापरायचे या बाबत नियमावली दिलेली आहे.त्यामुळे सदरील औषधामध्ये दोष आहे ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केलेली नाही. सामनेवाले क्र.2 यांना या बाबत दोषी धरता येणार नाही.
वर नमूद केलेल्या कारण मिमांसावरुन या मंचाचे मत असे की, सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांना चूकीची औषधे देऊन ती ऊस पिकात फवारण्यास सांगितली त्यामुळे तक्रारदार यांचे शेतातील ऊस जळाला म्हणून सामनेवाले क्र.1 हे नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत.
तक्रारदार यांनी असे नमूद केले आहे की, एक एकर क्षेत्रामध्ये सुमारे 30 टन ऊस उत्पादन झाले असते व तक्रारदार यांना रक्कम रु.60,000/- मिळाले असते. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन असे निदर्शनास येते की, सदरील ऊस हा दिड ते दोन महिन्याचा होता म्हणजे अगदीच लागवडीचे कालावधीतील आहे. सदरील ऊस जळाल्यानंतर तक्रारदार हे त्या शेतात दूसरे उत्पादन सहज काढू शकत होते. ऊस पेरणीसाठी लागलले बेणे, त्यावरील खर्च, तक्रारदार यांनी केलेला खर्च या बाबी लक्षात घेतल्या असता या मंचाचे मते तक्रारदार यांचे शेतातील एक एकर ऊस जळाला त्यापोटी नुकसान भरपाई रक्कम रु.30,000/- देण्यास सामनेवाले क्र.1 जबाबदार आहेत. तसेच तक्रारदार यांना जो शारीरिक व मानसिक त्रास झाला त्यापोटी रु.2,000/’ तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/- देण्यास सामनेवाले क्र.1 हे जबाबदार आहेत.
मुददा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले क्र.1 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदार यांना
जळालेल्या ऊसाचे नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.30,000/-
निकाल कळाल्यापासून 30 दिवसांचे आंत दयावेत, सदर रक्कम न
दिल्यास तक्रार दाखल दि.30.09.2011 पासून द.सा.द.शे. 9 टकके
दराने व्याज संपूर्ण रककम वसूल होईपर्यत दयावे लागेल.
3. सामनेवाले क्र.1 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदार यांना शारीरिक
व मानसिक त्रासापोटी रककम रु.2,000/- व तक्रारीचा खर्च
रु.1,000/- दयावा.
4. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.