( आदेश पारित द्वारा : श्रीमती जयश्री येंडे मा. सदस्या )
आदेश
( पारित दिनांक : 19 मार्च, 2012 )
तक्रारदार ह्यांनी प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये मंचासमक्ष दाखल केली आहे.
प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराने गैरअर्जदार
यांचेकडुन, मौजा- भामटी, खसरा नं.68/1 मधील भुखंड क्रं.14, राजकमल अपार्टमेंट्स मधील सदनिका क्रमांक 301 ही दिनांक 12/5/2008 रोजीचे विक्रीपत्राने खरेदी केले. दिनांक 19 जानेवारी 2007 रोजी पंजीकृत करण्यात आले.
सदनिकेचा ताबा घेतल्यानंतर तक्रारदारांना सदनिकेत अनेक त्रुटी आढळुन
आल्या. त्यापैकी बांधकामात न वापरलेले सामान गच्चीवर व बरेचसे भंगार पार्कींगच्या जागेवर पडुन होते. दोन्ही ओव्हरहेड टाक्यांना जास्तीचे पाणी वाहुन जाण्याच्या दृष्टीने पाईप लावलेले नाहीत त्यामुळे टाकी भरुन वाहतात व गच्चीवर पाणी साचुन भिंतीमधे पाणी झिरपते. पाकींगच्या जागेत दिवे लावण्याच्या दृष्टीने सॉकेट्स किंवा होल्डर्स लावलेले नसल्याने पार्कींगच्या जागेत बल्ब किंवा टयुब लाईट लावणे शक्य नाही व तेथे अंधारच असतो. पार्कींगच्या जागेचा वापर नुकताच सुरु झाला असुन प्लास्टर निघत आहे. पाण्याचे दोन्ही पंप नीट बसविलेले नाहीत त्यांचेवर झाकण सुध्दा नाही. विजेच्या तारा जमिनीवर मोकळया पडलेल्या आहेत त्यामुळे जीवीतास धोका होऊ शकतो. मुख्य दरवाजाचे अलाइनमेंट बरोबर नसल्याने तो नीट बंद करता येत नाही व रात्री कुलुप लावता येत नाही. मुख्य दरवाजा रस्त्यापेक्षा जास्त उंच असल्याने कॉक्रीटचा रॅम्प देणे आवश्यक आहे. वायव्य दिशेकडुन गच्चीवर येणा-या ड्रेन पाइपला बरोबर आधार नसुन तो नुसता विटांच्या आधारावर उभा केलेला आहे. सॅनीटरी चेंबर्स व शिवर लाईन विहीरीच्या इतकी जवळ आहे की सांडपाणी कधीही विहिरीत झीरपु शकते. जमीनीतील पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे झाकण व्यवस्थित नाही ते ढीले असल्याने त्याला लॉक करता येत नाही. पाण्याची टाकी व ती ज्या चेबरमध्ये बसविलेली आहे त्यात अंतर आहे ते बुझवणिे गरजेचे आहे. न्हाणीघर व संडास येथुन येणारे बहुतेक ड्रेन पाईप फुटलेले असल्याने सर्व सांडपाणी भिंतीवरुन वाहत असते व ते पार्कींगच्या जागेत पडते. तसेच गैरअर्जदाराने इमारतीचे पुर्ण बांधकाम झाल्याचे सक्षम प्राधिका-यांचे प्रमाणपत्र सदनिकाधारकांना दिलेले नाही. याबाबत गैरअर्जदारांनी लवकरात लवकर निराकरण करतील असे आश्वासन दिले परंतु आजतागायत गैरअर्जदाराने त्रुटींचे निराकरण केलेले नाही.
पुढे गैरअर्जदार टाळाटाळ करीत आहे असे लक्षात आल्यामुळे तक्रारदार व अजुन दोन सदनिकाधारकांनी श्रीमती मंजिरी अवघडे व श्री अ रा राठी यांनी मिळुन जुजबी डागडुजी व विद्युत काम करुन घेतले त्याचा खर्च रुपये 1,51,300/- व 7,520/- एवढा आला. त्यापैकी तक्रारदाराचा वाटा रुपये 52,940/- एवढा आला. तक्रारदाराने सदरनिकेचा ताबा घेईपर्यतचे पाण्याचे देयक भरावयाचे होते. ते तक्रारदाराने भरले. या सर्व खर्चास गैरअर्जदार जबाबदार आहेत. तक्रारदाराने दिनांक 31/8/2007 ते 31/3/2009 या काळातील एकुण रुपये 1273/- देयकापैकी 31/8/2007 ते 30/4/2008 पर्यतचे देयक रुपये 5800/- गैरअर्जदाराने भरावयास हवे होते ते गैरअर्जदाराने भरले नाही.
सदर भुखंडावर एकुण 5 गाळे असल्याने सदर रक्कमेपैकी प्रत्येकी 1160/- एवढा खर्च आला. तसेच पाण्याचे मिटर दोषयुक्त असल्याने त्याचे दुरुस्तीचा खर्च रुपये 1500/- आला. तो प्रत्येकाचे हिस्स्यावर 300/- रुपये आला. या सर्व नुकसान भरपाईस गैरअर्जदार जबाबदार आहेत म्हणुन तक्रारदाराने ही तक्रार दाखल करुन रुपये 70,000/- नुकसान भरपाई मिळावी. तसेच परिच्छेद क्रं.2 व 3 प्रमाणे सदनिकामधील त्रुटी दुर कराव्यात. तक्रारदाराने दुरुस्ती करिता केलेल्या खर्चाची प्रतीपुर्ती 12 टक्के व्याजासह मिळावी. इमारतीचे बांधकाम पुर्ण झाल्याचे सक्षम प्राधिकारी यांचेकडुन प्रमाणपत्र द्यावे. अशी मागणी केली.
तक्रारकर्त्याने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून, दस्तऐवजयादीनुसार एकुण 07 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात अॅग्रीमेंट आफ डेव्हलपमेंट अॅण्ड सेल, महालक्ष्मी एंन्टरप्राईजेसचे बिल, फर्नानडिस कॉन्ट्रॅक्टरचे बिल, ऑफर लेटर,सोनी एन्टरप्राईजेसचे ऑफर लेटर, इत्यादी कागदपत्रे दाखल केलीत.
यात गैरअर्जदार यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्यात आली. नोटीस प्राप्त होऊन गैरअर्जदार हजर झाले व आपला लेखी जवाब दाखल केला.
गैरअर्जदार यांचे कथनानुसार तक्रारदाराने सदर सदनिका खरेदी केल्याची बाब मान्य केलेली असुन इतर आरोप अमान्य केलेले आहेत. गैरअर्जदार यांचे कथनानुसार सदनिकेतील काही गाळयांचे अतिरिक्त काम सुरु असल्यामुळे थोडे बहुन बांधकामासंबंधीत सामान सदनिकेच्या गच्चीवर ठेवण्यात आले होते पण काही दिवसांमध्येच ते सामान तिथुन हटविण्यात आले होते. दोन्ही ओव्हरहेड टाक्यांना जास्तीचे पाणी वाहून जाण्याच्या दृष्टीने पाईप लावण्यात आले होते व ते अजुनही तेथे आहेत. सदर गोष्टींची शहनिशा कोर्ट कमिशनरद्वारे करुन घेण्यात येऊ शकते. त्याप्रमाणे गरजेनुसार पार्कींगच्या जागेत वाजवी दिवे व टयुबलाईंट्स लावण्यात आलेल्या होत्या परंतु कालांतराने जर टयुबलाईट्स व दिवे खराब झाले असल्यास व त्याची रिप्लेसमेट न झाल्यास त्या ठिकाणी आता अंधार होत असेल तर त्यास गैरअर्जदार जबाबदार नाही. पाण्याचे दोन्ही पंप निट बसविलेले आहे व त्यावर झाकण सुध्दा आहेत. हे पंपाचे निरिक्षण केल्यास दिसुन येईल. विद्युत तारा देखिल बरोबर लावण्यात आलेल्या आहेत त्या मोकळया नाहीत. तसेच चुकीच्या वापरामुळे व इतर अनेक कारणांमुळे प्लास्टर निघाले असेल तर त्यास गैरअर्जदार जबाबदार नाही. कारण विक्रीपत्र करतांना व ताबा देतांना अशा कोणत्याही प्रकारच्या तक्रारी गाळेधारकांनी केल्या नव्हत्या.
मुख्य दरवाजाचे अलाइन्मेंट बरोबर आहे. एवढया कालांतराने व वापराने दरवाज्यामध्ये जर काही त्रुटी निर्माण झाली असेल तर त्यास गैरअर्जदार जबाबदार नाही. गच्चीवरुन येणा-या ड्रेन पाईपला बरोबर आधार देण्यात आलेला आहे त्यांत कोणतीही त्रुटी नाही. सॅनेटरी चेम्बर व सिवर लाईन विहीरीपेक्षा जमेल तेवढया दुर आहे व या कारणामुळे यामध्ये नमुद तक्रार खोटी आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे झाकण व्यवस्थित आहे ही टाकी रेडीमेड व शास्त्रीयदृष्टया तयार करण्यात आलेली आहे व चांगल्या प्रतीची आहे व ती स्वच्छता व अरोग्याच्या दृष्टीने मुद्दामुन लावण्यात आलेली आहे व ती जमीनीत व्यवस्थीत लावण्यात आलेली आहे जेणेकरुन ती बाहेर काढुन स्वच्छ करता यावी. त्यामुळे मध्ये अंतर आहे. पाण्याच्या मिटर झाकण लावण्यात आलेले होते. कालांतराने ते झाकण निघाले असेल तर गैरअर्जदाराची जबाबदारी नाही. न्हाणीघर व संडास येथुन येणारे ड्रेन पाईप फुटलेले नाहीत ते लावते वेळेस व्यवस्थीत व उच्च दर्जाचे लावलेले होते. त्यामधुन सांडपाणी बाहेर येत नाही.
सक्षम अधिका-यांचे प्रमाणपत्राचा तक्रारदारांशी काहीही संबंध नाही व गैरअर्जदाराने याबाबत कधी मागणी केली नाही व आवश्यक तेवढे प्रमाणपत्र घेतल्यानंतर गाळेधारकांना विक्रीपत्र करुन देण्यात आले होते.
तक्रारदारांना जुजबी डागडुजीकरिता 1,51,300/- व 7,520/- एवढा खर्च आल्याची बाब खोटी आहे व पाण्याचे बिलापोटी गाळेधारकांनी रक्कम भरलेली आहे त्यापैकी 5800/- रुपये ताबा घेण्याचे पुर्वीचे देयक गैरअर्जदाराने भरायचे होत हे म्हणणे खोटे आहे. यावरुन हे सिध्द होते की, गैरअर्जदार यांचे सेवेत कुठलीही त्रुटी नाही. म्हणुन सदर तक्रार खर्चासह खारीज करावी अशी मागणी केली.
तक्रारकर्त्यातर्फे वकील श्री श्री आर डी धर्माधिकारी व गैरअर्जदारातर्फे वकील केतकी जोशी यांचा युक्तिवाद ऐकला.
-: का र ण मि मां सा :-
सदर प्रकरणातील वस्तुस्थिती पाहता सदरची तक्रार कालमर्यादेत आहे.
दोन्ही पक्षाचे म्हणणे दाखल दस्तऐवजांचे निरिक्षण केले असता
तक्रारदारांनी गैरअर्जदार यांना मौजा भामटी, खसरा नं.68 मधील भुखंडक्रं.14 वर सदनिकेचे बांधकाम करण्यास दिले. त्यावर गैरअर्जदाराने राजकमल अपार्टमेंट नावाने बांधकाम केले. तक्रारदारांना दिनांक 10 जानेवारी 2008 रोजी सदनिकेचा ताबा मिळाल्यानंतर त्यामध्ये काही त्रुटी आढळुन आल्या त्यामुळे सदर त्रुटी दुर करण्याकरिता तक्रारदाराने ही तक्रार या मंचात दाखल केलेली आहे व त्रुटीची सत्यता पडताळणीकरिता तक्रारदाराने मागणी केल्यानुसार या मंचाने सदनिकेच्या बांधकामातील त्रुटींचे निरिक्षण करण्याकरिता श्री राजेश खरे, यांना कोर्ट कमिशनर म्हणुन नियुक्त करण्यात आले. कोर्ट कमिशनर श्री राजेश खरे यांनी सदर जागेची दोनही पक्षकारांच्या उपस्थीती प्रत्यक्ष पाहणी करुन आपला अहवाल दिनांक 25.10.2011 रोजी मंचात दाखल केला. सदर अहवालाचे अवलोकन करता सदनिकेच्या बांधकामात सदर त्रुटी आढळुन आल्या.
1. दोन्ही ओव्हरहेड टाक्यांना जास्तीचे पाणी वाहुन जाण्याच्या दृष्टीने पाईप
लावलेले नाहीत.
2. पाण्याचे दोन्ही पंप नीट बसविलेले नाहीत त्यावर कुलुप लावायची सोय नाही.
3. मुख्य दरवाज्याला तडा गेलेली आहे.
4. ड्रेन पाइप बरोबर लावलेला नाही.
5. विहीर व ड्रेन चेंबर जवळजवळ आहे व शिवर लार्इन दुर आहे.
6. तळमजल्यावरील पिण्याच्या पाण्याची टाकी व्यवस्थित बसविलेली नाही व त्यावर झाकण व्यवस्थित नाही.
7. पाण्याचे मिटरला झाकण लावलेले नाही.
8. काही ठिकाणी पाईप जोडणीचे जागी गळती दिसुन आली. तसेच पाण्याची
टाकी समोरच्या बाजुला बसविण्यात आलेली असुन तिला झाकण नाही.
सांडपाण्याचे दोन्ही पाईप जोडण्यात आलेले असुन त्यातील गॅसचा पाईप गळा लावलेला नाही.
ही गैरअर्जदार यांची सेवेतील कमतरता आहे. त्यामुळे सदरच्या त्रुटी दूर
करण्याची जबाबदारी ही गैरअर्जदाराची आहे. असे या मंचाचे मत आहे.
सदर अहवालात विहिरीपासुन ड्रेनचे चेंबर जवळजवळ आहे व शिवर कडुन
दुर आहे असे दिसुन येते. गैरअर्जदार यांनी ड्रेन चेंबर विहिरीपासुन योग्य अंतरावर करुन द्यावे कारण स्वास्थाच्या दृष्टीने ते आवश्यक आहे.
तसेच तक्रारदाराचे म्हणणे की त्यांनी सदर सदनिकेतील दुरुस्तीपोटी
दोन्ही सदनिकाधारकांनी काही दुरुस्ती करुन घेतली. त्याबाबत आलेला खर्चाचे मागणी तक्रारदाराने केलेली आहे. परंतु दस्तऐवज क्रं.4 व 5 वर तक्रारदाराने रुपये 7520/- व रुपये 1,51,300/- चे जे ऑफर लेटर/कागदपत्र दाखल केलेले आहे ते केवळ अपेक्षीत खर्चाबाबत आहे. सदर रक्कम खर्च केल्याचे सुस्पष्ट पुरावा तक्रारदाराने दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारदाराचे म्हणणे की, सदर रक्कम दुरुस्तीपोटी खर्च केल्याची बाब या मंचास मान्य करता येणार नाही. तसेच दस्तऐवज क्रं. 3 व 4 प्रमाणे दिनांक 8/1/2010 रोजी तक्रारदाराने 15 एमएम चे पाण्याचे मिटर बदलविलेले दिसुन येते म्हणजेच पुर्वी पाण्याचे मिटर गैरअर्जदाराने लावलेले होते. तसेच ते मागणी प्रमाणे नव्हते अशी तक्रारदाराची तक्रार नाही. त्यामुळे सदर खर्चापोटी तक्रारदाराची खर्चाची मागणी या मंचाला मान्य करता येणार नाही.
कागदपत्र क्रं. 15 वरील अॅग्रीमेंट आफ डेव्हलपमेंट अॅन्ड सेल पाहता सदर अॅग्रीमेंट पंजीकृत झालेल्या दिवसापर्यत पाण्याचे देयक व अन्य शुल्क देण्याची जबाबदारी गैरअर्जदार यांची राहील असे अॅग्रीमेंट आफ डेव्हलपमेंट अॅन्ड सेल मधे नमुद आहे.
सदर सदनिकेचा ताबा तक्रारदारास 10 जानेवारी 2008 रोजी मिळाल्याचे दिसुन येते. त्यामुळे त्यादिवसापुर्वीचे पाण्याचे देयक भरण्याची जबाबदारी गैरअर्जदार यांनी असतांना देखील या कालावधीपुर्वीचे दिनांक 31/8/2007 ते दिनांक 10 जानेवारी 2008 या कालावधीचे देयक तक्रारदाराने अदा केलेले दिसुन येते. (कागदपत्र क्रं.26). त्यापैकी दिनांक 31/8/2007 ते 10/01/2008 या कालावधीचे तक्रारदाराचे वाटयाला येणा-या देयकाची रक्कम देण्याची जबाबदारी गैरअर्जदाराची राहील.
वरील सर्व परिस्थितीचा विचार करता गैरअर्जदाराने तक्रारदारास विक्री
केलेल्या सदनिकेमध्ये कोर्ट कमिशनरने दिलेल्या अहवालाचे निरिक्षण करता सदनिकेचे बांधकामात काही त्रुटी दिसुन आढळुन आल्या ही गैरअर्जदार यांचे सेवेतील कमतरता आहे व त्या त्रुटी दुर करण्याची जबाबदारी गैरअर्जदाराची आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब आदेश.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदाराने, कोर्ट कमिशनर श्री राजेश खरे यांनी दिलेल्या अहवालानुसार व कारणमिमांसेत नमुद क्रमांक 1 ते 8 नुसार सदनिकेतील त्रुटी दुरुस्त करुन द्याव्यात.
3. गैरअर्जदार यांनी दिनांक 31/8/2007 ते 10/1/2008 या कालावधीच्या पाण्याच्या देयकाची रक्कम ती सदनिकाधारकांनी भरलेली आहे ती (तक्रारदाराच्या वाटयाला येणारी) तक्रारदारास परत करावी.
4. गैरअर्जदाराने तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 2,000/- द्यावे.
सदर आदेशाचे पालन गैरअर्जदाराने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आत करावे.