मंचाचे निर्णयांन्वये श्री. मिलिंद केदार, सदस्य. - आ दे श – (पारित दिनांक : 27/12/2010) 1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय असा आहे की, त्याने दि.29.12.2009 रोजी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत गैरअर्जदाराच्या कार्यालयात अर्ज करुन कार्यालयाशी संबंधित माहिती मागितली असता गैरअर्जदाराने नियमानुसार 30 दिवसाच्या आत माहिती पुरविली नाही व संबंधित दस्तऐवज तक्रारकर्त्याला निर्धारित अवधीत पुरविले नाही, म्हणून तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक त्रास झाला. त्याच्या भरपाईकरीता तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन शारिरीक व मानसिक त्रासाकरीता रु.95,000/- आणि तक्रारीचा खर्चाबाबत रु.5,000/- मिळावे अशा मागण्या केलेल्या आहेत. 2. सदर तक्रारीचा नोटीस गैरअर्जदारावर बजावण्यात आला असता गैरअर्जदाराने तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले. 3. गैरअर्जदाराने आपल्या लेखी उत्तरामध्ये नमूद केले आहे की, तक्रारकर्त्याचा अर्ज हा राज्य माहिती आयुक्त, नागपूर यांचेकडे पाठविण्यात आल्यामुळे त्यांनी दि.11.01.2010 रोजी गैरअर्जदारास तो पाठविला व सदर अर्ज गैरअर्जदारास 15.01.2010 रोजी प्राप्त झाला. तक्रारकर्त्याने मागितलेली माहिती सहा जिल्हयांशी संबंधित असल्याने त्यांच्याकडून माहिती मागवून ती तक्रारकर्त्यास देण्यात आली. गैरअर्जदाराचे म्हणण्यानुसार त्यांनी एक महिन्याचे आत माहिती पुरविली आहे. गैरअर्जदाराने लेखी उत्तरात तक्रारकर्त्याने त्यांच्याकडून कोणतेच खरेदी विक्रीचे व्यवहार केलेले नसल्याने, तो तक्रार दाखल करु शकत नाही, म्हणून सदर तक्रार खारीज करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे. 4. मंचासमोर तक्रार युक्तीवादाकरीता दि.07.12.2010 रोजी आली असता उभय पक्ष गैरहजर. मंचाने सदर प्रकरणी दाखल दस्तऐवजांच्या आधारे व गुणवत्तेच्या आधारे प्रकरण निकाली काढण्याचे ठरविले. 5. मंचाने सदर प्रकरणी दाखल दस्तऐवजांचे व उभय पक्षांच्या कथनाचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष’ 6. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवज क्र. 1 वरुन, त्याने गैरअर्जदाराकडे माहिती मागण्याकरीता अर्ज केल्याचे स्पष्ट होते. तसेच तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद केलेल्या मा. राष्ट्रीय आयोगाच्या निवाडयानुसार तक्रारकर्ता हा गैरअर्जदाराच्या त्रुटीबाबत तक्रार दाखल करु शकतो. 7. गैरअर्जदाराने दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केल्याप्रमाणे गैरअर्जदाराने विविध जिल्ह्यातून प्राप्त माहिती तक्रारकर्त्यास पाठविलेली आहे. परंतू सदर माहितीचा दिनांक बघता तो तक्रारकर्त्याचा अर्ज गैरअर्जदाराला प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाच्या नंतर माहिती दिलेली आहे. त्यामुळे एक महिन्याच्या आत माहिती पाठविली हा गैरअर्जदाराने घेतलेला बचावात्मक पावित्रा मंचाला रास्त वाटत नाही. 30 दिवसाच्या आत माहिती न देऊन गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी केलेली असल्याने तक्रारकर्ता सदर प्रकरणी दाद मिळण्यास पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. 8. तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराच्या कृतीमुळे त्याला मानसिक व शारिरीक त्रास झाल्याचे नमूद केलेले आहे व त्याबाबत रु.95,000/- ची मागणी केलेली आहे. पुराव्याअभावी सदर मागणी ही अवाजवी वाटते. परंतू गैरअर्जदाराच्या कृतीमुळे साहजिकच तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक त्रास झाला असेल. त्याची क्षतिपूर्ती म्हणून तक्रारकर्ता रु.500/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारीच्या खर्चाबाबत रु.500/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. म्हणून मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदाराला आदेश देण्यात येतो की, त्याने तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरीक त्रासाची क्षतिपूर्ती म्हणून रु.500/- द्यावे. तसेच तक्रारीच्या खर्चाबाबत रु.500/- द्यावे. 3) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदाराने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |