निकाल
दिनांक- 31.07.2013
(द्वारा- श्री.विनायक लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सदोष टायर व टयूब बदलून मिळणेबाबत किंवा त्याची किंमत परत मिळणेबाबत दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, गैरअर्जदार क्र.1 हा अपोलो टायर कंपनीचा विक्रेता(डिलर) आहे. गैरअर्जदार क्र.2 हा अपोलो टायर उत्पादन करणारी कंपनी आहे. तक्रारदार यांनी, तक्रारदार यांचे मालकीचे ट्रॅक्टर ट्रेलर नं.एम.एच.10-एच-9073 आहे. तक्रारदार यांनी गेरअर्जदार क्र.1 यांचेकडून गैरअर्जदार क्र.2 यांनी उत्पादन केलेले टायर व टयूब दि.11.10.2010 रोजी रक्कम रु.9,000/- मध्ये विकत घेतला. सदरील टायर व टयूब विकत घेतेवेळेस गेरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारदारास टायर टयूबची सहा महिन्याची गॅरंटी दिली होती.
तक्रारदार यांचे तक्रारीतील कथन की, तक्रारदार यांनी टायर टयूब विकत घेतल्यानंतर ते ट्रॅक्टर ट्रेलरच्या चाकांना बसविले व योग्य ती हवा भरली. सदरील ट्रेलर ऊस वाहतुक करण्याकरता वापरण्यास सुरुवात केली. दि.13.10.2010 रोजी नविन टायरचे रिंगगोट तुटले व ते फुटले. तक्रारदार यांचे कथन की, सदरील टायर व टयूब हे निकृष्ट दर्जाचे होते, त्यामध्ये उत्पादन करतेवेळेसच दोष होता.
तक्रारदार यांचे कथन की, तक्रारदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे जाऊन टायर टयूब खराब निघाल्याबाबत माहिती दिली व ते बदलून देण्याची विनंती केली. गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारदार यांना टायर व टयूब गैरअर्जदार क्र.2 कंपनीकडे पाठवावे लागेल त्यासाठी खर्च रु.500/- येईल असे सांगितले. तक्रारदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांना रु.500/- दिले, व टायर टयूब बदलून देण्यासाठी परत केले. एक महिन्यानंतर गैरअर्जदार क्र.2 यांनी तक्रारदार यांना टायर टयूब बदलून देण्यास नकार दिला. गेरअर्जदार क्र.2 यांनी टायर व टयूब यांची वैज्ञानिक व तांत्रिक पध्दतीने तपासणी न करताच खोटा व चुकीचा अभिप्राय देऊन तक्रारदार यांची मागणी नाकारलेली आहे. तक्रारदार यांनी गैरअर्जदार यांना नोटीस पाठविली परंतू, गैरअर्जदार यांनी त्याची दखल घेतली नाही. तक्रारदार यांचे ट्रॅक्टर दोन दिवस बंद राहिले त्यामुळे त्याचे आर्थिक नुकसान झाले. तसेच तक्रारदार यांना मानसिक त्रास सोसावा लागला. तसेच तक्रारदार यांना दुस-या कंपनीचे टायर टयूब विकत घ्यावे लागले. सबब तक्रारदार यांना एकूण रक्कम रु.19,500/- गैरअर्जदार क्र.1 व 2 यांच्याकडून दाव्याचा खर्च व मानसिक त्रासाबददल नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती केली.
गैरअर्जदार क्र.1 यांनी आपले लेखी निवेदन दाखल केले आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी, तक्रारदार यांनी त्यांचेकडून टायर व टयूब खरेदी केले ही बाब मान्य केली आहे. तसेच गैरअर्जदार क्र.2 हे टायर व टयूबचे उत्पादक आहे ही बाब मान्य केली आहे. गैरअर्जदार क्र.1 यांचे कथन की, जर टयूब व टायरमध्ये निर्मिती दोष आढळल्यास सदरील टयुब व टायर कंपनीकडून बदलून मिळते. गैरअर्जदार क्र.1 यांचे कथन की, टायर व टयूब बदलून देण्याची सर्वस्वी जबाबदारी कंपनीची असते. गैरअर्जदार क्र.1 यांनी कोणत्याही प्रकारची सेवेत कसूर केलेली नाही.
गैरअर्जदार क्र.2 यांनी लेखी निवेदन सादर केले आहे. गैरअर्जदार 2 यांचे कथन की, तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार दाखल होण्यास पात्र नाही. गैरअर्जदार क्र.2 यांचे कथन की, टयूब व टायरमध्ये कोणताही उत्पादीकीय दोष नव्हता. गैरअर्जदार क्र.2 यांनी असे कथन केले आहे की, त्यांनी टायर तपासणीसाठी पाठविले होते, त्यामध्ये उत्पादन दोष आढळून आला नाही. त्यामुळे तक्रारदार यांची मागणी मान्य करता आली नाही. गैरअर्जदार क्र.2 यांचे कथन की, तक्रारदार यांनी टायर व्यवस्थित बसविले नव्हते व सदोष रिंगगोट मुळे सदरील टायर फुटले आहे. सबब, गैरअर्जदार क्र.2 यांचे कथन की, तक्रार रदद होण्यास पात्र आहे.
तक्रारदार यांनी दाखल केलेला पुरावा व कागदपत्राचे अवलोकन केले. तक्रारदार यांचे विद्वान वकील श्री.कदम यांचा युक्तीवाद ऐकला. गैरअर्जदार यांनी दाखल केलेला पुरावा व कागदपत्राचे अवलोकन केले. तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे विद्वान वकील श्री.जोशी यांचा युक्तीवाद ऐकला.
वरील सर्व विवेचनावरुन मंचासमोर खालील मुददे उपस्थित होतात, व त्याचेसमोरच त्याची उत्तरे दिलेली आहेत.
मुददे उत्तर
1) तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या टायरमध्ये उत्पादकीय
दोष होता ही बाब सिध्द केली आहे काय ? नाही.
2) तक्रारदार हे तक्रारीतील मागणी केलेली दाद मिळण्यास पात्र आहे काय? नाही. 3) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 व 2 ः- तक्रारदार यांनी त्यांच्या पुराव्यामध्ये गैरअर्जदार क्र.1 कडून ट्रॅक्टर ट्रेलर टायर खरेदी केल्याबाबत नमुद केलेले आहे, ते टायर गैरअर्जदार क्र.2 कंपनीने उत्पादन केलेले आहे. वर नमुद केलेल्या दोन्ही बाबी गैरअर्जदार यांनी मान्य केलेल्या आहेत. तक्रारदार यांच्या पुराव्यात असे आले आहे की, त्यांनी नविन घेतलेले टायर व टयूब ट्रॅक्टर ट्रेलरला बसविले. दि.13.10.2010 रोजी टायरचे रिंगगोट तुटले व ते फुटले. तक्रारदार यांचे कथन की, टायरमध्ये उत्पादकीय दोष असल्यामुळे सदरील टायर फुटले.
सदरील टायरमध्ये उत्पादकीय दोष होता ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केली आहे काय? हे प्रामुख्याने पाहणे महत्वाचे आहे. तक्रारदार यांनी संबंधित टायर गैरअर्जदार क्र.1 मार्फत गैरअर्जदार क्र.2 कडे पाठविले, गैरअर्जदार क्र.2 कंपनीने सदरील टायरची शास्त्रीय तपासणी केली असता टायरमध्ये उत्पादकीय दोष आढळून आला नाही. सदरील रिपोर्ट गैरअर्जदार यांनी अर्जदारास कळविला आहे, तो रिपोर्ट गैरअर्जदार यांनी मंचापूढे दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रार दाखल केल्यानंतर सदरील टायर मंचासमोर हजर केले नाही अगर त्या टायरमध्ये उत्पादकीय दोष आहे किंवा काय? हे पाहण्यासाठी योग्य त्या प्रयोगशाळेत पाठविण्यासंबंधी कोणतीही कारवाई केली नाही, तक्रारदार यांचे तोंडी कथन स्विकारता येणार नाही. गैरअर्जदार यांनी त्यांच्या पुराव्यासोबत शास्त्रीय तपासणीचा अहवाल दाखल केला आहे, त्यामध्ये टायरमध्ये कोणताही उत्पादकीय दोष नाही ही बाब स्पष्ट नमुद केलेली आहे, असे असतानाही तक्रारदार यांनी त्या पुराव्याच्या विरुध्द मंचास मान्य होईल असा पुरावा हजर केलेला नाही. सबब तक्रारदार यांनी सदरील टायरमध्ये उत्पादकीय दोष होता ही बाब शाबीत केली नाही. त्यामुळे गैरअर्जदार यांनी सेवेमध्ये त्रुटी ठेवली आहे असे म्हणता येणार नाही. मंचासमोर तज्ञांचा पुरावा दाखल केलेला नाही. सबब तक्रारदार यांची तक्रार खर्चासह खारीज होण्यास पात्र आहे.
सबब मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2) खर्चाबददल आदेश नाही.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील
कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला
परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड