श्री.विजयसिंह राणे, मा. अध्यक्ष यांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 16/11/2011)
1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदाराविरुध्द दाखल केलेली असून त्यांच्या तक्रारीचा आशय असा आहे की, त्यांनी गैरअर्जदाराचे मौजा-डोंगरगाव, प.ह.क्र.21, ता. कारंजा, जि. वर्धा येथील भूखंड क्र. 29 हा 1259 चौ.फु.चा रु.12,590/- मध्ये विकत घेण्याचा करार दि.13.09.2008 रोजी केला व करारनाम्याचेवेळेस रु.5,000/- दिले व उर्वरित रक्कम मासिक हफ्ता रु.300/- देण्याचे ठरले. दि.11.12.2009 पर्यंत तक्रारकर्त्याने एकूण रु.4,500/- दिले. रक्कम देण्याची अंतिम मुदत मार्च 2011 ठरली होती. परंतु मध्यंतरी तक्रारकर्त्याला असे कळले की, ज्या जमिनीचा उल्लेख बयानात करण्यात आला होता, ती आदिवासी व्यक्तींची असल्याने शासन परवानगीशिवाय ती विकल्या जाऊ शकत नाही. याबाबत गैरअर्जदाराला विचारणा केली असता गैरअर्जदार यांनी टाळाटाळ केली व तक्रारकर्त्यासोबत बेकायदेशीर व्यवहार केला. तक्रारकर्त्याने भरलेली वेळोवेळी रक्कम परत मागितली, परंतू गैरअर्जदाराने रक्कम परत करण्यास नकार दिला. शेवटी गैरअर्जदारास कायदेशीर नोटीस पाठविला. त्यास प्रतिसाद दिला नाही व प्रत्यक्ष भेटीअंती काहीही निष्पन्न न झाल्याने शेवटी तक्रारकर्त्याने सदर तक्रार दाखल केलेली आहे व मागणी केली आहे की, अग्रीम राशी, हफ्त्याने दिलेली रक्कम, तक्रारीचा खर्च व मानसिक त्रासाची भरपाई मिळावी. तक्रारीचे पुष्टयर्थ एकूण 3 दस्तऐवज दाखल केलेले आहेत.
2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना प्राप्त झाल्यावर, त्यांनी लेखी उत्तर दाखल करुन, तक्रारीतील तक्रारकर्त्याचे संपूर्ण कथन नाकारले आहे व तक्रारकर्त्याची तक्रार खोटी असून ती खर्चासह खारीज करण्याची मागणी केली आहे.
-निष्कर्ष-
3. सदर प्रकरण युक्तीवादाकरीता आले असता तक्रारकर्त्याने लेखी युक्तीवाद दाखल केला. गैरअर्जदार गैरहजर. यातील गैरअर्जदाराने कोणतेही दस्तऐवज दाखल केलेले नाही आणि त्यामुळे योग्य पुरावा देऊन तक्रारकर्त्याचे कोणतेही आरोप खोडून काढलेले नाही. जसे की, गैरअर्जदाराने सदरची जमीन विकत घेतली आहे, ती ज्याच्या मालकीची आहे, त्याचे त्यांनी अकृषक रुपांतरण केलेले आहे व असे असतांना तक्रारकर्ता भुखंड घेण्यास टाळाटाळ करीत आहे असा पूरावा गैरअर्जदार देऊ शकला असता. तसे त्यांनी काही केलेले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याचा सदर आरोपास बळकटी प्राप्त होते. तक्रारकर्त्याने दाखल दस्तऐवजाचे आधारे रु.8,750/- एवढी रक्कम गैरअर्जदारास दिलेली आहे हेसिध्द केले आहे आणि गैरअर्जदाराने त्यांना विक्रीपत्र करुन देण्याबाबत काहीही कळविले नाही हे स्वयंस्पष्ट आहे. तक्रारकर्त्याच्या नोटीसला गैरअर्जदाराने कोणतेही उत्तर दिले नाही. उघडपणे गैरअर्जदाराची कृती व सेवा त्रुटीपूर्ण आहे. या सर्व बाबी लक्षात घेता खालीलप्रमाणे आदेश.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यास स्विकारलेली रक्कम रु.8,750/-, ती घेतल्याच्या तारखेपासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह परत करावे.
3) तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- गैरअर्जदाराने द्यावे.
4) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याचे आत करावे.