(मंचाचा निर्णय: श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक :16/01/2012)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दि.07.06.2011 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. तक्रारकर्त्याचे म्हणण्याप्रमाणे गैरअर्जदाराचा भुखंड विकासाचा व्यवसाय असुन त्याने मौजा-डोंगरगाव, प.ह.नं.21, तह. कारंजा, जि. वर्धा येथील भुखंड क्र.27 व 28 ज्याचे एकूण क्षेत्रफळ 2518 चौ.फूट असुन एकूण किंमत रु.25,180/- ला विकत घेण्याचा करारनामा दि.13.09.2008 रोजी केला, त्यावेळी अग्रिम राशी रु.10,000/- स्विकारले व वेळोवेळी हप्त्याची रक्कम रु.7,000/- स्विकारुन गैरअर्जदारांनी एकूण रक्कम रु.17,000/- स्विकारली. तक्रारकर्त्यास ज्या शेत जमीनीत हा भुखंड आहे, ती जमीन आदीवासी व्यक्तिची आहे आणि सरकारी परवानगीशिवाय त्याचे हस्तांतरण होऊ शकत नाही, असे कळले असता त्याने गैरअर्जदारांशी संपर्क केला तेव्हा त्यांनी टाळाटाळ केली. त्यानंतर तक्रारकर्त्याने गैरअर्जदारास नोटीस देऊन रकमेची मागणी केली मात्र त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. म्हणून सदर तक्रार मंचात दाखल करुन ती व्दारे रु.17,000/- एवढी रक्कम 18% व्याजासह परत मागणी केली, तसेच मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- ची मागणी केलेली आहे.
3. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत निशानी क्र.3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात अनुक्रमांक 1 ते 3 वर करारनामा, पासबुक व वकीलामार्फत पाठविलेल्या नोटीसच्या छायांकित प्रती जोडलेल्या आहेत.
4. गैरअर्जदारांना नोटीस देण्यांत आले असता सदर नोटीस ‘घेण्यांस नकार’ या शे-यासह परत आली, त्यामुळे त्यांचे विरुध्दची तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने दि.03.11.2011 रोजी पारित केलेला आहे.
5. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.09.01.2012 रोजी आली असता तक्रारकर्ता युक्तिवादाकरीता अंतिम संधी देऊनही गैरहजर. तक्रारीसोबत दाखल दस्तावेजांचे व युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले.
-// नि ष्क र्ष //-
6. यातील गैरअर्जदार मंचात हजर झाले नाही व त्यांनी तक्रारकर्त्याचे तक्रारीस उत्तर दाखल केले नाही व कोणत्याही प्रकारे आपला बचाव केला नाही व तक्रारकर्त्याचे म्हणणे खोडून काढले नाही. तसेच असा कोणताही दस्तावेज दाखल केला नाही की, ज्याव्दारे सदर जमीनीचे अकृषकात रुपांतर झाले आहे असे दिसुन येईल. त्यामुळे तक्रारकर्त्याने आपली तक्रार थोडक्यात सिध्द केलेली असुन गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याकडून रक्कम स्विकारुनही ते भुखंड देऊ शकत नसल्याचे वरील परिस्थितीवरुन दिसुन येते. करीता मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याकडून भुखंडापोटी स्विकारलेली एकूण रक्कम रु.17,000/- शेवटचा हप्ता भरल्याचा दि.11.11.2009 पासुन रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.12% व्याजासह परत करावी.
3. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- अदा करावे.
4. वरील आदेशाचे पालन गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी. अन्यथा पुढील कालावधीकरीता आदेश क्र.2 मधील रकमेवर द.सा.द.शे.12% ऐवजी 15% व्याज देय राहील.