(आदेश पारीत द्वारा- श्री.विजयसिंह ना.राणे, मा.अध्यक्ष)
-/// आ दे श ///-
(पारीत दिनांक 25 ऑक्टोबर, 2011)
तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तूत तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
यातील तक्राकर्त्या श्रीमती पुष्पाबाई अंबादास भोयर यांची गैरअर्जदार यांचेविरुध्द थोडक्यात तक्रार अशी आहे की, त्यांनी गैरअर्जदार यांचेसोबत, जे भूखंड विक्रीचा व्यवसाय करीतात, खसरा क्रमांक 171, पटवारी हलका नंबर 34, मौजा वाठोडा, जि. नागपूर येथील भूखंड क्रमांक 37, एकूण क्षेत्रफळ 1305 चौ.फुट विकत घेण्याचा सौदा केला आणि बयानापत्राचे वेळी रुपये 40,000/- एवढी रक्कम दिली. पुढे वेळोवेळी मिळून रुपये 83,240/- एवढी रक्कम मोबदल्यापोटी गैरअर्जदारास दिली. अर्ध्यापेक्षा अधिक रक्कम गैरअर्जदारास दिली आणि उर्वरित रक्कम देण्यास तक्रारकर्त्या तयार आहेत. त्यांनी गैरअर्जदाराकडे राहिलेली रक्कम स्विकारुन भूखंडाचे विक्रीपत्र करुन द्या अशी मागणी केली, मात्र गैरअर्जदाराने नेहमीच टाळाटाळ केली. पुढे गैरअर्जदारास नोटीस दिली, मात्र त्याचाही उपयोग झाला नाही. म्हणुन शेवटी नाईलाजाने तक्रारकर्त्या श्रीमती पुष्पाबाई भोयर यांनी सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन, तीद्वारे बयानापत्राप्रमाणे भूखंड क्र.37 चे विक्रीपत्र त्वरीत करुन द्यावे, किंवा गैरअर्जदारास देण्यात आलेली मोबदल्याची रक्कम रुपये 83,240/- द.सा.द.शे 24% दराने व्याजासह परत द्यावी, त्यांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासासाठी नुकसान भरपाई म्हणुन रुपये 1 लक्ष द्यावी, वकीलाचे फीपोटी रुपये 10,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणुन रुपये 5,000/- मिळावेत अशा मागण्या केलेल्या आहेत.
यातील गैरअर्जदार यांना मंचातर्फे नोटीस बजविण्यात आली, गैरअर्जदार यांना सदर नोटीस मिळाल्याची पोचपावती प्राप्त झाली. मात्र गैरअर्जदार मंचासमक्ष उपस्थित झाले नाहीत, वा आपला लेखी जबाब सुध्दा दाखल केलेला नाही, म्हणुन त्यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 25/4/2011 रोजी मंचाने पारीत केला.
तक्रारकर्तीने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून, सोबत बयानापत्र, रकमा दिल्याच्या पावत्या, नोटीस, लेआऊट प्लॉन आणि प्रतिउत्तरादाखल वेगळा प्रतिज्ञालेख इत्यादी दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केले आहेत.
सदर प्रकरणात तक्रारकर्तीच्या वकीलांचा युक्तीवाद मंचाने ऐकला.
यातील तक्रारकर्तीने बयानापत्र व पुढे वेळोवेळी गैरअर्जदार यांना दिलेल्या रकमेच्या पावत्या मंचासमक्ष दाखल केलेल्या आहेत. यावरुन तक्रारकर्तीने गैरअर्जदारास रुपये 40,000/- एवढी रक्कम बयानापोटी दिली आणि पुढे वेळोवेळी मिळून एकंदरीत रुपये 83,240/- एवढी रक्कम दिली, ह्या बाबी मंचासमक्ष सिध्द होतात. तक्रारकर्तीने यासंबंधात गैरअर्जदारास नोटीस पाठविल्याचे दिसते, मात्र त्यावर त्यांची सही शिक्का दिला नाही व म्हणुन ती परत आलेली आहे.
तक्रारकर्तीने दाखल केलेला प्रतिज्ञालेख आणि त्यासोबत दाखल करण्यात आलेले संपूर्ण दस्तऐवज यावरुन तक्रारकर्तीने सदर तक्रार गैरअर्जदाराविरुध्द सिध्द केली आहे. गैरअर्जदाराने या प्रकरणात उपस्थित होऊन आपला बचाव केलेला नाही आणि तक्रारकर्तीचे म्हणणे खोडून काढले नाही, ही गैरअर्जदार यांचे सेवेतील गंभीर त्रुटी आहे असे आमचे मत आहे. यास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
-/// अं ती म आ दे श ///-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार यांनी तक्रारकर्तीस राहिलेली मोबदल्याची रक्कम स्विकारुन खसरा क्र. 171, प.ह.नं. 34, मौजा वाठोडा, जि. नागपूर येथील भूखंड क्रमांक 37 चे विक्रीपत्र करुन नोंदवून द्यावे व भूखंडाचा ताबा द्यावा.
किंवा
यासाठी काही कायदेशिर अडचणी असल्यास व तक्रारकर्त्या तयार असल्यास त्यांनी एकूण मोबदल्याची जमा केलेली रक्कम रुपये 83,240/- जेंव्हा—जेंव्हा रकमा दिल्या, त्या—त्या तारखेपासून द.सा.द.शे. 18% दराने व्याजासह मिळून येणारी रक्कम तक्रारकर्तीस परत करावी.
3. गैरअर्जदार यांनी तक्रारकर्तीस झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाकरीता रुपये 5,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 1,000/- याप्रमाणे एकंदरीत रुपये 6,000/- (रुपये सहा हजार फक्त) एवढी रक्कम द्यावी.
4. गैरअर्जदार यांनी उपरोक्त आदेशाचे पालन त्यांना आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांका पासून एक महिन्याचे आत करावे.