(मंचाचा निर्णय: श्री. नरेश बनसोड - सदस्य यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 16/04/2012)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत मंचात दि.22.11.2010 रोजी विरुध्द पक्षा विरुध्द दाखल करुन मंचास मागणी केली आहे की, विरुध्द पक्षाचे सेवेत त्रुटी तसेच अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब असल्याचे घोषीत करावे व कुटूंबाचे प्रवासाचे टिकीट संबंधात विरुध्द पक्षास दिलेली रक्कम `.31.632/- व इतर खर्च एकत्रीतरित्या `.1,02,038/- व शारीरिक मानसिक त्रासाकरीता `.2,00,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी `.25,000/- मागणी केलेली आहे.
प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. विरुध्द पक्ष त्यांचे ग्राहकांना विमान सेवेकीरता टिकीटे उपलब्ध करुन देण्याचा व्यवसाय करतात म्हणून तक्रारकर्त्याने दि.01.04.2010 रोजी स्वतः व त्याची पत्नी तसेच त्यांचे सासरे, सासु यांचे नावे, गो. एअर लाईन्स् या विमानाचे दि.18.04.2010 ची दिल्ली ते गुवाहाटी या मार्गावर प्रवास करण्या हेतु अग्रिम टिकीटांची नोंदणी विरुध्द पक्षास रोख स्वरुपात `.22,912/- देऊन विमान क्र.जी-8 606 या विमानाची दोन टिकीटे चौघांच्या प्रवासाकरीता दिली. तक्रारकर्त्याने वरील प्रमाणेच कलकत्ता ते नागपूर प्रवासाकरीता अग्रिम टिकीटे घेण्याकरीता रु.8,720/- रोखीने 25.04.2010 ला परतीचा प्रवास करण्याकरीता विरुध्द पक्षास दिले. त्यानुसार विरुध्द पक्षाने त्यांच्या कुटूंबीयांकरीता दोन टिकीटे इंडिगो विमान क्र.6 ई- 404 अशी दिली. तक्रारकर्त्याने दि.18,04.2010 रोजी निर्धारित प्रवास करण्याचे हेतुने दि.17.04.2010 रोजी विमान सेवा कंपनीच्या चौकशी केंद्रात चौकशी केली असता त्यांच्या कुटूंबीयांची नावे आढळून आली नाही. विरुध्द पक्षास विनंती करुन सुध्दा त्यांनी तक्रारकर्त्यास मदत केली नाही. तक्रारकर्ता हा पत्नीसह दि.17.04.2010 रोजी कोटा ते दिल्ली मार्गावर रेल्वेत प्रवास करीत होता. तक्रारकर्त्यास दि.18.04.2010 ला तसेच 25.04.2010 ला सुध्दा त्यांची नावे विमान सेवा पुरवीणा-या चौकशी केंद्रावर चौकशी केली असता आढळून आली नाही, त्यामुळे तक्रारकर्त्यास दुस-या कंपनीची नवीन टिकीटे `.15,800/- ला घ्यावी लागली, त्यामुळे तक्रारकर्त्यास अतिशय शारीरिक, मानसिक व आर्थीक त्रास सहन करावा लागला.
3. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास दि.29.04.2010, 16.06.2010, 30.07.2010 रोजी पत्र पाठविले परंतु त्यास विरुध्द पक्षाने योग्य प्रतिसाद दिला नाही व तक्रारकर्त्याकडून घेतलेली रक्कम आजपावेतो परत केली नाही, याकरीता मंचात तक्रार दाखल करावी लागली.
4. तक्रारकर्त्याने आपल्या म्हणण्याचे पृष्ठयर्थ दि.18.04.2010 व 25.04.2010 व 17.04.2010 ची टिकीटांच्या प्रति दाखल केल्या अ.क्र.पृ.क्र. 7 ते 17 वर आहेत.
5. विरुध्द पक्षाचे म्हणणे थोडक्यात खालिल प्रमाणे...
विरुध्द पक्षाने म्हटले की, तक्रारकर्त्याने दिल्ली ते गुवाहाटी या गो एअरलाईन्सच्या विमानाची अग्रिम टिकीटांकरीता `.22,912/- तसेच परतीच्या प्रवासाहेतू दोन टिकीटे इंडिगो विमान क्र.6-ई 404 मान्य केले परंतु म्हटले की, त्यांनी तक्रारकर्त्यास टिकीटे दिलेली नाही. व दोन्ही टिकीटांची रक्कम रोखीने मिळाल्याचे विरुध्द पक्षांनी मान्य केले. दि.01.04.2010 रोजी अग्रिम टिकीटांकरीता कारवाई सुरु असतांना दि.06.04.2010 ला विरुध्द पक्षाचा अपघात झाल्यामुळे ते गो एअरलाईन्सची टिकीटे काढून देऊ शकत नसल्यामुळे दि.08.04.2010 रोजी राठी नर्सिंग होम, नागपूर येथे तक्रारकर्त्यास बोलावुन सदर्रहू रक्कम `.22,912/- तक्रारकर्त्यास दिले व त्याची कोणतीही पावती तक्रारकर्त्याने दिलेली नाही व टिकीट बुक न करु शकल्यामुळे दिलगीरी व्यक्त केली. तक्रारकर्त्यास रक्कम परत केल्यामुळे कोणतीही जबाबदारी शिल्लक राहत नाही व विरुध्द पक्ष 3-4 महिने सदर्रहू व्यवसाया संबंधीत कामे करण्यांस असमर्थ असल्यामुळे त्यांनी ती रक्कम तक्रारकर्त्यास परत केली व विरुध्द पक्ष घराचे बाहेर निघू शकत नसल्यामुळे संपूर्ण कामे विस्कळीत झाली व त्याचे सेवेत त्रुटी नसल्यामुळे सदर तक्रार खारिज करण्याची मागणी केली आहे.
6. तक्रारकर्त्याने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले की, तो दि.06.04.2010 रोजी कोटा येथे जे.टी.स्पेशल रेल्वेव्दारे आपल्यापत्नीसह गेला होता व तेथे तो दि.09.04.2010 पर्यंत वास्तवास होता व त्यासंबंधीचे टिकीट श्री माहेश्वरी समार, कोटा येथे वास्तव्यास असल्याबाबतची पावती आपल्या प्रतिज्ञालेखासोबत सादर केली आहे व ते दस्तावेज अ.क्र.पृ.क्र. 44 व 45 वर दाखल केली आहे.
7. मंचाने दोन्ही पक्षांचे वकीलांचा युक्तिवाद ऐकला व तक्रारीसोबत असलेल्या सर्व कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले असता आम्ही खालिल प्रमाणे निष्कर्षाप्रत पोहचलो.
-// नि ष्क र्ष //-
8. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून प्रवासाकरीता विमानाची टिकीटे खरेदी केली व त्याकरीता रोखीने दि.01.04.2010 रोजी `.22,912/- व त्यानंतर दुस-या प्रवासाकरीता `.8720/- विरुध्द पक्षास दिल्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक ठरतो. विरुध्द पक्षाने म्हटले की, दि.06.04.2010 ला त्याचा अपघात झाल्यामुळे तो राठी नर्सिंग होम, नागपूर येथे भरती असतांना तक्रारकर्त्यास दि.08.04.2010 ला बोलवुन `.22,912/- परत केल्याचे म्हटले आहे, परंतु परतीच्या विमानाची रक्कम `.8,720/- तक्रारकर्त्यास परत केल्याचा उल्लख नाही. तक्रारकर्त्याने पृ.क्र. 44, 45 वरील दाखल दस्तावेज व शपथपत्रावरुन हे स्पष्ट झाले की, तक्रारकर्ता हा दि.06.04.2010 रोजी पत्नीसह खाजगी कामाहेतू कोटा येथे गेलेला होता व दि.09.04.2010 पर्यंत वास्तव्यास होता. तक्रारकर्त्याने दि.08.04.2010 रोजी श्री माहेश्वरी समाज कोटा येथे वास्तव्यास असल्याबाबतची पावती दाखल केली, त्यामुळे विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास दि.08.04.2010 ला राठी नर्सिंग होम येथे बोलावुन `.22,912/- परत केल्याचे म्हणणे पूर्णतः अविश्वसनीय व खोटे ठरते. व विरुध्द पक्षाचे सेवेत गंभीर स्वरुपाची त्रुटी असुन त्यांनी तक्रारकर्त्याचे पैसे हडपण्याकरीता खोटे कथन करुन अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष तक्रारकर्त्याकडून घेतलेली रक्कम `.22,912/- अधिक रु.7,820/- अशी एकत्रीत रक्कम `.30,732/- तक्रारकर्त्यास 9टक्के व्याजासह तक्रारकर्त्यास रक्कम मिळेपर्यंत देण्यांस बाध्य आहे. विरुध्द पक्षाचे गैरकायदेशिर कृतिमुळे तक्रारकर्ता दिल्ली ते गुवाहाटी व कलकत्ता ते नागपूर या प्रवासापासुन मुकला व त्याव जास्त खर्च करुन प्रवास करावा लागला तसेच झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाकरीता `.20,000/- नुकसान भरपाई देणे तसेच तक्रारीचा खर्च म्हणून `.3,000/- देणे संयुक्तिक होईल असे मंचाचे मत आहे, करीता खालिल प्रमाणे आदेश देण्यांत येतो.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. विरुध्द पक्षाला आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास विमान टिकीटांची रक्कम `.30,732/- तक्रार दाखल दि.22.11.2010 पासुन तक्रारकर्त्याचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9% व्याजासह द्यावी.
3. विरुध्द पक्षाला आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला शारीरिक, मानसिक त्रासापोटी `.20,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी `.3,000/- द्यावे.
4. वरील आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्षाने आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी. अन्यथा आदेश क्र.2 वर 12% व्याज देय राहील.