निकालपत्र :- (दि.02/08/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या)
(1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवालांना नोटीस लागू झालेची पोहोच दाखल आहे. सामनेवाला मंचात उपस्थित झाले नाहीत. लेखी म्हणणेही दाखल केले नाही. युक्तीवादही केलेला नाही. तक्रारदाराचे वकीलांचा युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार संकट हरण विमा योजनेअंतर्गत मागणी केलेली विमा रक्कम सामनेवालांनी तक्रारदारास न देऊन सेवात्रुटी ठेवलेमुळे दाखल करणेत आली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) सामनेवाला ही विमा व्यवसाय करणारी वित्तीय संस्था असून तक्रारदारचे मयत पती दिलीप हिंदूराव बोरगे हे सामनेवालांनी खत खरेदीवरील संकट हरण विमा योजनेचे पॉलीसीधारक ग्राहक होते.तक्रारादार या नमुद मयत पॉलीसीधारकच्या बेनिफिशरी आहेत.
ब) तक्रारदाराचे मयत पतीने पन्हाळा तालुका भाजीपाला व फळे उत्पादक सह.खरेदी विक्री संघ मर्या. पन्हाळा यांचेकडून इफको कंपनीचे खताची 17 पोती दि.02/09/2008रोजी खरेदी केली होती. सदर खत खरेदीवर एका गोणीस रु.4,000/-प्रमाणे एकूण 17 पोत्यांवर रक्कम रु.68,000/- इतकी सामनेवालांकडील विमा क्लेम रक्कम निश्चित केलेली होती.सदर पॉलीसीच्या दरम्यान तक्रारदाराचे पती दि.11/11/2008 रोजी उपचारा- दरम्यान मयत झाले. तदनंतर तक्रारदाराने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन सामनेवालांकडे क्लेम मागणी केली असता दि.01/06/2009 रोजी तक्रारदाराचे मयत पती हिंदूराव बोरगे यांच्या सहीत फरक असलेचे कारण दाखवून क्लेम नाकारला आहे. क) वास्तविक मयत दिलीप बोरगे हे पडळ संस्थेचे कर्जदार होते. त्या संस्थेकडील सहीचे नमुन्याचे कागदपत्र दिले होते तरीही क्लेम टाळणेकरिता खोटे व चुकीचे कारण देऊन सामनेवाला यांनी क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेमुळे सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासहीत मंजूर करावी, सामनेवालांकडून तक्रारदारास क्लेमची रक्कम रु.68,000/-दि.11/11/2008 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेतोपर्यंत द.सा.द.शे. 18 टक्के व्याज देणेबाबत आदेश व्हावा, मानसिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- मंजूर व्हावी अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत खत खरेदी पावती, कर्ज पावतीवरील सहीचा नमुना, क्लेम नाकारलेचे सामनेवाला यांचे पत्र इत्यादी कागदपत्र दाखल केली आहेत. (4) सामनेवालांना नोटीस लागू होऊनही ते मंचात उपस्थित राहीले नाहीत किंवा लेखी म्हणणे, युक्तीवाद केला नाही त्यांचेविरुध्द हे मंच एकतर्फा आदेश पारीत करीत आहे.
(5) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1) सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे का ? --- होय. 2) तक्रारदार विमा रक्कम मिळणेस पात्र आहे का ? --- होय. 3) काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे
मुद्दा क्र.1 :- तक्रारदाराने दाखल केलेल्या सामनेवाला विमा कंपनीच्या विम्याबाबतच्या माहितीपत्रकात संकट हरण विमा योजना असा उल्लेख नमुद असून सदर योजनेप्रमाणे सहकारी संस्थेची पावती किंवा बील म्हणजेच विमा पॉलीसी होय असे स्पष्टपणे नमुद केले असून सदर पावतीवर शेतक-याचे पूर्ण नांव, पत्ता, विक्रीची तारीख, महिना व वर्ष, इफको खत खरेदी केलेल्या गोणींची संख्या-तपशील, वारसदारचे नांव, खरेदीवर शेतक-याची सही किंवा अंगठयाचे निशान या बाबी नमुद असणे आवश्यक. त्या नमुद नसतील तर विमा दावा फेटाळला जावू शकतो असे स्पष्ट नमुद केले आहे. नमुद अटींचा विचार करता तक्रारदाराने प्रस्तुत प्रकरणी पन्हाळा तालूका भाजीपाला व फळे उत्पादक सह. खरेदी विक्री संघ मर्या. यांचेकडील खत खरेदीची दि.02/09/2008 ची पावती/बील नं.4103 दाखल केले असून वरीलप्रमाणे सर्व नोंदी केलेल्या आहेत. तक्रारदाराचे नांव,पत्ता, खताचा तपशील, गोणीची संख्या 17 नमुद आहे. तक्रारदाराची व विक्रेत्याची सही आहे. सबब तक्रारदाराचे पतीकडील सामनेवालांची पावती हीच पॉलीसी वैध होती ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. दि.01/04/2009 रोजी सामनेवालांनी मयत दिलीप बोरगे च हस्ताक्षर प्रमाणासाठी पॅन कार्ड/ड्रायव्हींग लायसन्स/बँक रेकॉर्डच्या प्रमाणित हस्ताक्षराबाबत मागणी केली होती. त्याप्रमाणे तक्रारदाराने विठ्ठल विकास सेवा संस्था मर्या. पडळ ता.पन्हाळा जि.कोल्हापूर यांचेकडील कर्ज खाते नं.421 कर्ज रजि. नं.236 'S' पावती नमुना पाठवून दिला होता. सामनेवालांनी दि.01/06/2009 रोजी खरेदी पावती व वर नमुद संबंधीत रिसीटवरील पावती या वरील तक्रारदाराचे पतीचे सहीत फरक आढळल्याने दावा नाकारला आहे. मात्र उघडया डोळयांनी पाहिले असता दोन्ही सहीत साम्य दिसते. तसेच काही अंशी सहीत फरकही पडत असतो. म्हणूनच तीन नमुन्यामध्ये सहया घेतल्या जातात. नमुद सही तक्रारदाराचे पतीने केलेलीच नाही असा सामनेवालांचा आक्षेप नाही तर सहीत फरक आहे. जर सही तक्रारदाराचे पतीची नसेल किंवा सहीत फरक असेल तर ती बाब सिध्द करणेची जबाबदारी सामनेवालांवर येते. सामनेवाला हस्ताक्षर तज्ञांकडून दोन्ही सहयांची पडताळणी करुन सदर बाब सिध्द करु शकली असते ती त्यांनी सिध्द केलेली नाही. तक्रारदारचे पती मयत झालेले आहेत. खत खरेदी पावती दि.02/09/2008 रोजी केलेली आहे. 'S' पावती रिसीट ही दि.30/6/2008 ची आहे तर तक्रारदाराचे पती दिलीप बोरगे हे दि.11/11/2008 रोजी मयत झालेले आहेत. याचा विचार करता ते पुढे मयत होणार आहेत या हेतूने आधीच खरेदीपावतीवर कोणीतरी सहया केल्या असे म्हणणेही हास्यास्पद ठरेल. सबब सामनेवालांनी कोणत्या कायदेशीर पुराव्याचा आधार न घेता निव्वळ तांत्रिक कारणावरुन विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2:- नमुद दाखल माहितीपत्रकाप्रमाणे विमाधारकाचा मृत्यू झालेस प्रत्येक गोणीमागे रु.4,000/- विमा रक्कम मिळेल असे नमुद केले आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या खरेदी पावतीवर 17 पोती (गोणी) खरेदी केले आहे. सबब तक्रारदार प्रत्येक गोणीस रु.4,000/- प्रमाणे एकूण रक्कम रु.68,000/- व्याजासहीत मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.3 :- तक्रारदार हया निराधार विधवा महिला आहेत व तिच्यावर तिच्या मुलांची जबाबदारी आहे. याचा विचार करता सामनेवालांच्या सेवेतील त्रुटीमुळे तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहेत. आदेश (1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. (2) सामनेवालांनी तक्रारदारास विमा रक्कम रु.68,000/- दि.01/06/2009 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने वयाज अदा करावे.
(3) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2,000/-(रु. दोन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु;1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |