द्वारा - श्री. एस़्.बी.धुमाळ: मा.अध्यक्ष
ग्राहक वाद संक्षिप्त स्वरुपात खालीलप्रमाणे :-
1) तक्रारदारांचे मयत पती प्रविण सिताराम शेळके हे मौजे टाकळी लोणार, ता.श्रीगोंदा, जि.अहमदनगर येथील कायमचे रहिवासी होते. त्या गावातील जमीन गट क्रं. 281 त्यांच्या मालकीची होती. सदरची जमीन तक्रारदारांचे पती स्वतः वहिवाटत होते.
2) दि.28/01/2006 रोजी तक्रारदारांचे मयत पती प्रविण सिताराम शेळके हे मोटरसायकलवरुन चाललेले असताना एका अनोळखी वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली. त्यामुळे प्रविण शेळके गंभीररित्या जखमी झाले. वरील अपघातानंतर प्रविण शेळकेना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तथापि, त्यांना झालेल्या गंभीर स्वरुपाच्या जखमांमुळे दि.05/02/2006 रोजी त्यांचे निधन झाले. पतीच्या अकस्माक निधनामुळे तक्रारदार असहाय्य व निराधार झाल्या. तक्रारदारांची परिस्थिती गरीबीची आहे.
3) तक्रारदारांना महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आवश्यक ती कागदपत्रे जमा करुन नुकसान भरपाई अर्ज कागदपत्रांसहित श्रीगोंदा तहसीलदार कार्यालय येथे दाखल केला. श्रीगोंदा तहसीलदार कार्यालय यांनी तक्रारदारांचा अर्ज सामनेवाला विमा कंपनीला पाठविला. तथापि, अद्यापि सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या क्लेमसंबंधी निर्णय घेतला नाही. तक्रारदारांनी अनेक वेळा दूरध्वनीवरुन तसेच स्वतः सामनेवाला यांच्या मुंबई येथील कार्यालयात जाऊन या बाबतीत चौकशी केली असता तक्रारदारांना सामनेवाला यांनी प्रतिसाद दिला नाही. तक्रारदारांनी दि.05/12/2008 रोजी सामनेवाला यांना वकिलांमार्फत नोटीस बजावूनसुध्दा सामनेवाला यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तक्रारदारांनी सदरचा अर्ज या मंचासमोर दाखल केला आहे.
4) सामनेवाला यांनी तक्रारदारांना त्यांच्या पतीच्या निधनाबद्दल शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेखाली नुकसान भरपाई म्हणून रु.1,00,000/- द्यावे असा सामनेवाला यांना आदेश करावा तसेच वरील रकमेवर द.सा.द.शे. 12 टक्के दराने व्याज द्यावे असा आदेश करावा अशी विनंती तक्रारदारांनी या मंचास केली आहे. तक्रारदारांनी या अर्जाच्या खर्चापोटी सामनेवाला यांच्याकडून रु.5,000/- ची मागणी केलेली आहे.
5) तक्रारदारांनी तक्रार अर्जाच्या पृष्ठयर्थ प्रतिज्ञापत्र दाखल करुन यादीप्रमाणे कागदपत्रे दाखल केलेली आहेत. त्या सोबत शेतकरी व्यक्तिगम अपघात विमा योजनेसंबंधीचे महाराष्ट्र शासनाचे दि.05/01/2005 चे शासनाच्या निर्णयाची प्रत दाखल केली आहे.
6) सामनेवाला यांनी कैफीयत दाखल करुन तक्रारदारांची मागणी अमान्य केली आहे. तक्रार अर्ज गैरसमजुतीवर आधारीत असून तक्रार अर्जात केलेले आरोप खोटे व बिनबुडाचे असून तक्रार अर्ज खर्चासहित रद्द करण्यात यावा असे सामनेवाला यांचे म्हणणे आहे.
7) सन 2004 मध्ये महाराष्ट्र सरकार व सामनेवाला विमा कंपनी यांच्या संयुक्त प्रयत्नाने गरीब शेतक-यांना अपघातासारख्या कठीण प्रसंगी आर्थिक मदत व्हावी यासाठी शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना सुरु करण्यात आली व महाराष्ट्र सरकारने आवश्यक तो प्रिमीयम सामनेवाला यांना दिलेला आहे असे सामनेवाला यांनी कैफीयत परिच्छेद 2 मध्ये नमूद केलेले आहे.
8) सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीप्रमाणे तक्रारदार ग्राहक नाहीत. तसेच, महाराष्ट्र सरकारने सामनेवाला यांच्या विरूध्द राष्ट्रीय आयोगापुढे 2,232 क्लेम दाखल केले असल्यामुळे सदरचा तक्रार अर्ज या मंचासमोर चालवू शकत नाही.
9) शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेखाली नुकसान भरपाई मागताना अपघातग्रस्त इसम हा शेतकरी आहे किंवा होता हे सिध्द करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करणे आवश्यक असते. परंतु, याकामी तक्रारदारांनी त्यांचे पती शेतकरी होते हे दाखविण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. फेरफारचा उतारा तसेच मयाच्या वयाचा दाखला सादर केलेला नाही. पोलीस तपासाचा अंतिम अहवाल, ड्रायव्हींग लायसन्स, शवविच्छेदनाचा अहवाल तक्रारदारांनी सादर केलेला नाही. शवविच्छेदनाचा अहवाल सादर न केल्यामुळे मयताचा मृत्यु कशामुळे झाला हे निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे सामनेवाला यांना तक्रारदारांच्या अर्जाबाबतीत निर्णय घेता आला नाही.
10) कैफीयत परिच्छेद 8 मध्ये सामनेवाला यांनी कैफीयत कलम 6 व 7 मधील मजकूराच्या विसंगत विधाने केली असून सामनेवाला यांनी तक्रारदारांचा क्लेम योग्य कारणावरुन नाकारला आहे असे म्हटले आहे. कैफीयतीसोबत दि 02/06/2006 च्या पत्राची छायांकित प्रत दाखल केलेली आहे. या कामी सामनेवाला यांनी इनव्हिस्टिगेटरची नेमणूक केली होती व इनव्हिस्टिगेटरने सादर केलेल्या रिपोर्टवरुन तक्रारदारांचा क्लेम मंजूर करता येणार नाही असे म्हटले आहे. कैफीयतीसोबत सामनेवाला यांनी चार्टर हाऊस डिटेक्टीव सर्व्हीस इनव्हिस्टिगेटर यांचा दि.06/04/2006 रोजीचा अहवाल दाखल केलेला आहे. सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी योग्य त्या कारणावरुन तक्रारदारांचा क्लेम नाकारला असल्यामुळे सामनेवाला यांच्या सेवेत कमतरता आहे असे म्हणता येणार नाही. तक्रारदारांनी तक्रार अर्जात केलेले सर्व आरोप तक्रारदारांनी नाकारले असून तक्रार अर्ज खर्चासहित रद्द करण्यात यावा असे म्हटले आहे.
11) सामनेवाला यांनी कैफीयतीसोबत तक्रारदारांनी दि.04/03/2006 रोजी सामनेवाला यांच्याकडे शेतकरी व्यक्तिगत अपघात योजने अंतर्गत नुकसान भरपाईसाठी केलेला अर्ज व त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रांच्या छायांकित प्रती दाखल केलेल्या आहेत. तक्रारदारांनी दि.11/07/2011 रोजी अर्जासोबत मयत प्रविण शेळके यांचे ड्रायव्हींग लायसन्सची छायांकित प्रत, वारस नोंद प्रकरणाची नोंदवही, 6-क नोंदीचे प्रमाणपत्र, सातबाराचा उतारा दाखल केलेला आहे. याकामी तक्रारदारांनी लेखी युक्तिवाद दाखल केला. तसेच, सामनेवाला यांनी लेखी युक्तिवाद दाखल केला आहे तसेच पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदारांचे वकील अडव्होकेट अभयकुमार जाधव व सामनेवाला यांचे वकील अडव्होकेट अंकुश नवघरे यांचा तोंडी युक्तिवाद ऐकला व तक्रार अर्ज निकालावर ठेवण्यात आला.
12) निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात :-
मुद्दा क्रं.1 – तक्रारदार हे सामनेवाला यांच्या सेवेत कमतरता आहे हे सिध्द करतात काय?
उत्तर – होय.
मुद्दा क्रं.2 – तक्रारदारांना त्यांच्या पतीच्या अपघाती निधनाबद्दल शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेखाली सामनेवाला यांच्याकडून रु.1,00,000/- नुकसानभरपाई, व्याज व या अर्जाचा खर्च मागता येईल काय?
उत्तर – अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा:-
मुद्दा क्रं.1 - तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे मयत पती प्रविण सिताराम शेळके हे मौजे टाकळी लोणारी, ता.श्रीगोंदा, जि.अहमदनगर येथील रहिवासी होते. व त्या गावात ते शेतीचा व्यवसाय करीत होते. तक्रारदारांच्या पतीच्या नावे मौजे टाकळी लोणारी या गावातील जमीन गट क्रं.281 होती व त्या जमिनीचा हिस्सा त्यांच्या मालकीचा होता. त्या जमिनीच्या सातबाराच्या उता-यात त्यांच्या पतीच्या नावाची नोंद होती. तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत मौजे टाकळी लोणारी जमीन गट क्रं.281 चा सातबाराचा उतारा दाखल केला असून तक्रारदारांचे मयत पती प्रविण शेळके, रत्नमाला शेळके आदींच्या नावांची नोंद होती असे दिसते.
सामनेवाला यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदारांनी त्यांच्या क्लेम फॉर्मसोबत त्यांचे पती शेतकरी होते हे दाखविणा-या कागदपत्रांचा पुरावा दाखल केलेला नाही. फेरफारचा उतारा दाखल केलेला नाही. तसेच, मृत्युसमयी तक्रारदारांच्या पतीचे वय काय होते याचा पुरावा दाखल केलेला नाही. याकामी सामनेवाला यांनी कैफीयतीसोबत तक्रारदारांकडून मिळालेला क्लेम फॉर्म व त्यासोबत कागदपत्रांच्या छायांकित प्रती दाखल केलेल्या आहेत. तक्रारदारांनी त्यांचा क्लेम फॉर्म तहसीलदार कार्यालय श्रीगोंदा यांच्यामार्फत दि.04/03/2006 रोजी सामनेवाला विमा कंपनीला पाठविला असे दिसुन येते. त्या क्लेम फॉर्मसोबत तलाठयाचे प्रमाणपत्र जोडले असून मयत प्रविण शेळके हे त्या गावचे शेतकरी होते असे नमूद करुन त्यांच्या वहिवाटीखाली 2.90 हेक्टर जमीन होती व ते मौजे टाकळी लोणारी या गावातील शेतकरी होते असे म्हटले आहे. क्लेम फॉर्मसोबत मौजे टाकळी लोणारी जमीन गट क्रं.281 च्या सातबाराचा उतारा दाखल केला असून मयत प्रविण शेळके यांचे नाव मालक सदरी नोंदविलेले आहे. प्रविण शेळके यांच्या नावाचा 8-अ च्या उता-याची छायांकित प्रत क्लेम फॉर्मसोबत जोडलेली आहे. तसेच, 7-अ च्या उता-याची प्रमाणित प्रत जोडली असून त्यात मयताचे वडील, मुलगी व पत्नी वारस आहे असे म्हटले आहे. प्रविण शेळके यांच्या मृत्युच्या दाखल्याची सत्य प्रत श्रीगोंदा पोलीस स्टेशनला केलेल्या अपघाती मृत्युच्या नोंदीची छायांकित प्रत, अपघातासंबंधी दिलेल्या वर्दीची छायांकित प्रत, इन्क्वेस्ट पंचनामा, पुणे महानगरपालिकेने दिलेला मृत्यु दाखल्याची प्रत सादर केलेल्या आहेत. पुणे महानगरपालिकेने दिलेल्या मृत्यु दाखल्यामध्ये प्रविण शेळके यांचा मृत्यु त्यांच्या डोक्यास झालेल्या जखमांमुळे दि.05/02/2006 रोजी झाला असे नमूद केले आहे. मयताचे वडील सिताराम शेळके यांच्या जबाबाची छायांकित प्रत जोडली असून त्यांनी त्यांच्या जबाबात त्यांचा मुलगा प्रविण शेळके याला दि.28/01/2006 रोजी समोरुन ट्रेलर आल्यामुळे प्रविण शेळकेची हीरोहोंडा मोटरसायकल घसरली व त्यांना लागले त्यामुळे त्यांना रुबी हॉल क्लिनीकमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, दि.05/02/2006 रोजी त्यांचा मृत्यु झाला. मृत्युनंतर डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे मयताचे शवविच्छेदन केले नाही असे नमूद केले आहे. सामनेवाला यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन क्लेम फॉर्मसोबत वरील कागदपत्रे तक्रारदारांनी सामनेवाला यांच्याकडे सादर केली होती असे दिसुन येते. याकामी सामनेवाला यांनी इनव्हिस्टिगेटरची नेमणूक केली होती. सामनेवाला यांनी चार्टर हाऊस डिटेक्टीव सर्व्हीस इनव्हिस्टिगेटरचा दि. 06/04/2006चा गोपनीय अहवाल सादर केला आहे. त्या गोपनीय अहवालामध्ये मयत प्रविण शेळके हे तांदळी दुभाला येथील शेतकरी होते व त्यांच्या नावे 2.90 हेक्टर जमीन होती असे नमूद केले आहे. दि. 28/01/2006 रोजी मयत प्रविण शेळके अहमदनगरवरुन गावी येत असताना मोटरसायकल घसरल्याने त्यांना अपघात झाला व त्या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरुपाची जखम झाली. पुणे महानगरपालिकेने दिलेल्या मृत्यु दाखल्यामुध्ये प्रविण शेळकेंचा मृत्यु त्यांच्या डोक्यास व मेंदूस गंभीर स्वरुपाच्या अनेक जखमा झाल्यामुळे झाला असे नमूद केले आहे. प्रविण शेळकेंचे ड्रायव्हींग लायसन्स होते व मृत्यु समयी त्यांचे वय 35 वर्ष होते असे दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन दिसुन येते.
इनव्हिस्टिगेटरचा वरील रिपोर्ट मिळण्यापूर्वीच सामनेवाला यांनी दि.02/06/2006 रोजी तक्रारदारांना पत्र पाठविले. त्या पत्राची छायांकित प्रत निशाणी ‘अ’ ला कैफीयतीसोबत दाखल केलेली आहे. त्यामध्ये मयत प्रविण शेळके यांचा अपघाती मृत्यु झाला तरी त्यांच्या प्रेताचे शवविच्छेदन केले नाही. या कारणावरुन तक्रारदारांचा क्लेम नाकारण्यात येतो असे तक्रारदारांना कळविले आहे.
तक्रारदारांच्या वकिलांच्या म्हणण्याप्रमाणे वास्तविक तक्रार अर्जासोबत तक्रारदारांनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे दाखल केलेली होती. त्यामध्ये प्रविण शेळके हे शेतकरी असल्याच्या संबंधी महसूल रेकॉर्डमधील नोंदी, प्रविण शेळकेच्या अपघाताची पोलीस स्टेशनला दिलेल्या वर्दीची माहिती, जखमी अवस्थेत प्रविण शेळकेला खाजगी रूग्णालयामध्ये दाखल केले होते व गंभीर जखमांमुळे त्यांचे निधन झाले. यासोबत पुणे महानगरपालिकेने दिलेल्या मृत्युच्या दाखल्यामध्ये प्रविण शेळकेचा मृत्यु डोक्यास व मेंदुस झालेल्या गंभीर जखमांमुळे झाला असे नमूद केले आहे. पोलीस हवालदार बंडगार्डन पोलीस स्टेशन यांनी सादर केलेल्या रिपोर्टमध्ये मयताचे कॉज ऑफ डेथ सर्टिफीकेट मिळाल्याने P.M. करण्यात आले नाही असे लिहीले आहे. या सर्व कागदपत्रांचा विचार न करता केवळ शवविच्छेदन केले नाही या कारणावर सामनेवाला यांनी तक्रारदारांचा क्लेम चुकीने नाकारला आहे असे दिसुन येते.
सामनेवाला यांच्या वकिलांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रार अर्जात केलेले आरोप खोटे व बिनबुडाचे आहेत. महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय आयोगाकडे 2232 तक्रारी दाखल केल्या असल्यामुळे या मंचाला सदरचा अर्ज चालविता येणार नाही असे म्हटले आहे. तसेच (Res Judicata)चा बाध येतो असे म्हटले आहे सामनेवाला यांनी राष्ट्रीय आयोगासमोर दाखल केलेल्या अर्जामध्ये तक्रारदारांच्या अर्जाचा समावेश आहे असा काहीही पुरावा दाखल केलेला नाही. राष्ट्रीय आयोगाने शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेखालील प्रकरणे ग्राहक मंचाने चालवू नये असा स्थगिती आदेश दिलेला नाही असे तक्रारदारांच्या वतीने सांगण्यात आले. वर नमूद केल्याप्रमाणे तक्रारदारांनी आवश्यक त्या कागदपत्रांचा पुरावा क्लेम फॉर्म सोबत सामनेवाला यांच्याकडे पाठविला. सामनेवाला यांच्या इनव्हिस्टिगेटरनी केलेल्या चौकशीमध्ये मयत प्रविण शेळकेला मोटरसायकल घसरल्याने अपघात झाला होता व नंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यु झाला असे नमूद करुन डॉक्टरांच्या सल्ल्याने मयताचे शवविच्छेदन केले नाही असे नमूद केले आहे. या सर्व बाबींचा विचार करता सामनेवाला यांनी तक्रारदारांचा क्लेम चुकीच्या कारणावरुन नाकारला आहे. सबब मुद्दा क्रं.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्रं.2- तक्रारदारांचे मयत पती प्रविण शेळके हे शेतकरी होते व त्यांचा रस्त्यावर झालेल्या अपघातामध्ये मृत्यु झाला. शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेखाली तक्रारदारांनी नुकसान भरपाईचा अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसहित सामनेवाला यांच्याकडे पाठविलेला आहे. सामनेवाला यांनी चुकीच्या कारणावरुन तक्रारदारांचा क्लेम नाकारला आहे. सबब सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या पतीच्या अपघाती निधनाबद्दल रु.1,00,000/- नुकसान भरपाई द्यावी असा आदेश करणे योग्य होईल. तक्रारदारांनी वरील रकमेवर 12 टक्के दराने व्याजाची मागणी केलेली आहे. या प्रकरणातील वस्तुस्थिती विचारात घेता सामनेवाला यांनी त्यांना इनव्हिस्टिगेटर रिपोर्ट मिळाल्यानंतर तक्रारदारांचा क्लेम मंजूर करणे आवश्यक होते. परंतु, त्यांनी तो केला नाही म्हणून सामनेवाला यांनी तक्रारदारांना वरील रक्कम रु.1,00,000/- यावर दि.01/05/2006 पासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज द्यावे असा आदेश करणे योग्य होईल.
तक्रारदारांनी त्यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाईदाखल रु.20,000/- व या अर्जाच्या खर्चापोटी रु.5,000/-ची मागणी केलेली आहे. या प्रकरणातील वस्तुस्थिती विचारात घेता सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु.5,000/- व या अर्जाच्या खर्चापोटी रु.2,000/- द्यावेत असा आदेश करणे योग्य होईल. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर त्याप्रमाणे देण्यात येते.
वर नमूद कारणास्तव खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आ दे श
1) तक्रार अर्ज क्रं.47/2009 अंशतः मंजूर करण्यात येतो.
2) सामनेवाला यांनी तक्रारदारांना त्यांच्या पतीच्या अपघाती निधनाबद्दल नुकसान भरपाई म्हणून रु.1,00,000/- (रुपये एक लाख फक्त) द्यावेत व वरील रकमेवर दि. 01/05/2006 पासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने
व्याज संपूर्ण रक्कम तक्रारदारांना मिळेपर्यंत द्यावे.
3) सामनेवाला यांनी तक्रारदारांना झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.5,000/-(रुपये पाच हजार फक्त) व या अर्जाच्या खर्चापोटी रु.2,000/-(रुपये दोन हजार फक्त) द्यावेत.
4) या आदेशाचे पालन सामनेवाला यांनी या आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत करावे.
5) सदर आदेशाची प्रमाणित प्रत उभयपक्षकारांना देण्यात यावी.