(मंचाचे निर्णयान्वये – श्री. पी. एस. चोपकर, सदस्य)
-- आदेश --
(पारित दिनांक 23 ऑगस्ट 2004)
तक्रार क्रं. 50/03 तक्रारदाराने सदरची तक्रार त्यांनी डिपॉझीट केलेली रक्कम रुपये 40,000/- व त्यावर 18%दराने व्याजाची मागणी केली आहे. तसेच शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल मोबदला म्हणून रुपये 5,000/- ची मागणी मंचासमोर केलेली आहे.
तक्रारदाराचे थोडक्यात म्हणणे असे आहे की, तक्रारदार हा व्यवसायाने डॉक्टर असून तो गोंदिया जिल्हा ग्राहक पंचायत रजीस्टर्ड संस्था हिचा सभासद असून ही तक्रार दाखल करण्यास त्यांनी जिल्हा ग्राहक पंचायत, गोंदिया यांना अधिकार दिलेले आहेत. त्यांचे वतीने श्री. दखने, सचिव यांनी ही तक्रार मंचासमोर दाखल केली आहे. डॉ. विद्यासागर यांनी गैरअर्जदार हेलमिटेल फॉर्मासिटीकल्स, धंतोली, नागपूर यांचेकडे मुह रक्कम रुपये 10,000/- रिसायकलिंग पध्दतीने दर 4 वर्षानी मुळ रकमेच्या दुप्पट होईल या समजुतीप्रमाणे व त्यापुढील 4 वर्षांनी वाढलेली रक्कम मुळ रकमेच्या दुप्पट होत जाईल अशा करार अटींवर गैरअर्जदार कंपनीचे प्रबंध संचालक, श्री. रंजन पी. दारव्हेकर या कंपनीकडे दिनांक 18.04.90 रोजी जमा केली. ही रक्कम दिनांक 18.04.94 ला रुपये 20,000/- इतकी झाली असून रिसायकलिंगप्रमाणे सन 98 मध्ये रुपये 40,000/- ची रक्कम होत आहे. करारानंतर डॉ. विद्यासागर यांनी सदर रकमेची मागणी केली. परंतु गैरअर्जदार यांनी ही रक्कम त्यांना परत केली नाही. जिल्हा ग्राहक पंचायत, गोंदिया मार्फत दिनांक 6.8.2002 व 24.10.2002 रोजी नोटीस दिली. परंतु गैरअर्जदार यांनी सदरची रक्कम तक्रारदार यांना परत दिली नाही. म्हणून सदरची तक्रार मंचासमोर दाखल केलेली आहे.
तक्रार क्र. 51/03- तक्रारकर्त्या डॉ. कमलताई फाटक हया गोंदिया जिल्हा ग्राहक पंचायत या संस्थेच्या आजीव सभासद आहेत व त्यांनी गोंदिया जिल्हा ग्राहक पंचायत या संस्थेकडे तक्रार केली. त्यांच्यातर्फे सदरची तक्रार दाखल केलेली असून रुपये 40,000/- ची मागणी केली आहे. तसेच शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रुपये 5,000/- नुकसान भरपाई मिळावी म्हणून मंचासमोर मागणी केलेली आहे.
तक्रारकर्तीची तक्रार थोडक्यात अशी आहे की, संस्थेच्या सभासद डॉ. कमलताई फाटक यांनी गैरअर्जदार हेलमिटेल फॉर्मासिटीकल्स धंतोली, नागपूर यांचेकडे मुळ रक्कम रुपये 10,000/- रिसायकलिंग पध्दतीने दर 4 वर्षांनी मुळ रकमेच्या दुप्पट होईल या समजुतीप्रमाणे व त्यापुढील 4 वर्षांनी वाढलेली रक्कम मुळ रकमेच्या दुप्पट होत जाईल अशा करार अटींवर गैरअर्जदार कंपनीचे प्रबंध संचालक श्री. रंजन पी. दरव्हेकर यांचेशी झालेल्या करारानुसार कंपनीकडे दि. 18.04.90 रोजी रिसायकलिंगनुसार रुपये 10,000/- जमा केले. ही रक्कम दि. 18.04.94 रोजी रुपये 40,000/- होती. ही रक्कम मिळावी म्हणून दिनांक 4.6.98 रोजी डॉ. कमलताई फाटक हयांनी गैरअर्जदार यांना नोटीस पाठविली. परंतु गैरअर्जदार यांनी सदरची रक्कम न दिल्यामुळे त्यांनी तक्रारदार संस्थेकडे तक्रार करुन संस्थेस योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती केली. तक्रारदार संस्थेनी गैरअर्जदार यांचेशी दिनांक 6.8.2000 व 24.10.2000 रोजी लेखी पत्रव्यवहार केला. परंतु गैरअर्जदार यांनी याबाबत कुठलीही दखल घेतली नाही. म्हणून रुपये 40,000/- व शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रुपये 5000/- नुकसान भरपाई मिळावी म्हणून मंचासमोर तक्रार दाखल केली आहे.
सदर तक्रारींची नोंद घेऊन गैरअर्जदार यांना नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार यांनी त्यांचे वकिलामार्फत सदर दोन्ही तक्रारींमध्ये आपले लेखी बयान अनुक्रमे निशाणी-8 व निशाणी-8 नुसार दाखल केले आहे.
गैरअर्जदार यांनी आपल्या लेखी जबाबात तक्रारदारांची मागणी फेटाळली असून, या मंचाला सदर तक्रार चालविण्याचा अधिकार नाही असे म्हटलेले आहे. तसेच या तक्रारी मुदतबाहय असल्यामुळे सदर तक्रारी खारीज करण्याची मंचास विनंती केली आहे. गैरअर्जदार यांचेकडे तक्रारदारांनी कोणत्याही रकमा डिपॉझिट म्हणून ठेवलेल्या नसून रिसायकलिंग पध्दतीनुसार त्या रकमा दुप्पट होण्याचा कोणताही करार केलेला नाही. थोडक्यात गैरअर्जदार यांनी सदर दोन्ही तक्रारी खारीज करण्याची मंचास विनंती केलेली आहे.
तक्रारदारांनी आपल्या तक्रारींसोबत जवळ-जवळ आठ (8) कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तक्रारदारांनी अनुक्रमे निशाणी-12 नुसार आपले प्रतिउत्तर दाखल केलेले आहे. तक्रारदारांनी दाखल केलेले कागदपत्र व संस्थेच्या सचिवांनी केलेला तोंडी युक्तिवाद तसेच गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपत्र व त्यांच्या वकिलाने केलेला तोंडी युक्तिवाद यावरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. मुद्दा निर्णय |
1 सदरच्या तक्रारी मुदतीच्या आहेत काय ? नाही |
2 या तक्रारींचा अंतिम आदेश काय ? कारणमिमांसेनुसार |
// कारणमिमांसा//
सदर दोन्ही तक्रारींमध्ये तक्रारदारांनी रुपये 10,000/- प्रत्येकी गैरअर्जदार कंपनीकडे दिनांक 18.04.90 रोजी रिसायकलिंग पध्दतीप्रमाणे दर 4 वर्षांनी मुळ रकमेच्या दुप्पट होईल या समजुतीप्रमाणे व त्यापुढील 4 वर्षांनी वाढलेली रक्कम मुळ रकमेच्या दुप्पट होत जाईल अशा करार अटींवर गैरअर्जदार कंपनीकडे जमा केल्याचे म्हटलेले आहे.मुळ रक्कम रुपये 10,000/- जी कंपनीकडे जमा केली होती ती दुप्पट होऊन सन 1994 मध्ये रुपये 20,000/-झाली. व ही रक्कम रिसायकलिंगनुसार दिनांक 18.04.98 रोजी परिपक्वता होऊन त्या दिवशी रुपये 40,000/- होणार होती. तक्रारदारांनी दाखल केलेल्या पावतीवरुन त्यांची परिपक्वता रक्कम सन 1998 सालीच देय होती असे या तक्रारींवरुन दिसून येते.
अर्जदार व गैरअर्जदार यांच्या युक्तिवादावरुन व गैरअर्जदार यांच्या उत्तरावरुन गैरअर्जदार कंपनीने त्यांच्या कंपनीच्या भरभराटीसाठी व त्यांनीच अर्जदारांना रुपये 10,000/- चे बक्षिस म्हणून दिल्याचे नमूद केले आहे. कंपनीचा धंदा वाढावा व त्यांनी निर्माण केलेल्या औषधांचा खप अधिक होण्यासाठी डॉक्टरांना ‘‘आमिष’’ म्हणून ही रुपये 10,000/- ची पावती दिली असून अशाप्रकारचा प्रत्यक्षात कोणताही व्यवहार न झाल्याचे गैरअर्जदार यांचे म्हणणे आहे. डॉ.कमलताई फाटक यांनी गैरअर्जदार यांना दिनांक 20 ऑगस्ट 94 रोजी जे पत्र पाठविले, त्या पत्रामध्ये असा उल्लेख आहे की, गैरअर्जदार ही कंपनी झपाटयाने वाढत असून त्यांनी डॉक्टरांना अशी विनंती केली आहे की, (Isoxsuprine) ही औषध देताना त्यासोबत (preganilan Tablets) हया गोळया सुध्दा लिहिण्यात याव्या, जेणेकरुन आमचा खप गोंदिया येथे वाढेल. या पत्रावरुन असे दिसून येते की, औषधीचा खप वाढल्या नंतर त्यांना ही रक्कम देय झाली असती . डॉ. कमलताई फाटक यांनी रुपये 40,000/- ची मागणी दिनांक 4 जून 1998 च्या पत्रावरुन केल्याचे दिसून येते. परंतु त्यानंतर कोणताही पत्रव्यवहार केल्याबाबतचा पुरावा तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत दाखल केला नाही. तक्रारदारांनी गोंदिया जिल्हा ग्राहक पंचायत या संस्थेकडे तक्रार केल्यानंतर त्या संस्थेनी दिनांक 6.8.2002 रोजी पत्राद्वारे गैरअर्जदार यांचेकडे रक्कम मागणी केल्याचे दिसून येते. तक्रारदारांनी दिनांक 18.04.98 रोजी परिपक्वता तिथीनंतर जवळजवळ 4 वर्षे कोणतीच कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. आणि म्हणून गैरअर्जदार यांनी आपल्या लेखी उत्तरात या तक्रारी मुदतबाहय असल्याचे म्हटले आहे. गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ राज्य ग्राहक आयोग, दिल्ली यांनी सी.पी.आर.2003 (3) पा.क्रं.294 (डी.पी.गोयल विरुध्द ब्रँच मॅनेजर, एल.आय.सी.) या प्रकरणात दिलेल्या निकालाची प्रत मंचासमोर दाखल केलेली आहे. सदर निकालातील महत्वाचा मुद्दा खालीलप्रमाणे आहे.
“When cause of action for filing complaint arose on a specified date when on amount payable by insurance Co. was payable, limitation woud not extend on basis of oral assurances alleged to have been given by insurance officials.”
सदरच्या तक्रारीमध्ये सुध्दा परिपक्वता तिथी दिनांक 18.04.98 नंतर 2 वर्षाच्या आत तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 24(अ) नुसार दाखल करावयास पाहिजे होत्या. परंतु तक्रारदारांनी सदरच्या तक्रारी मंचासमोर दिनांक 29.07.03 रोजी म्हणजेच जवळ-जवळ 5 वर्षांनी दाखल केल्याचे दिसून येते. वरील विवेचनावरुन हया दोन्ही तक्रारी मुदतबाहय आहेत असे या मंचाचे मत आहे. करिता मंच खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहे.
// अं ति म आ दे श //
1 सदरच्या दोन्ही तक्रार (तक्रार क्रं. 50/03 व 51/03) हया मुदतबाहय असल्यामुळे खारीज करण्यात येतात.
2 खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.