(घोषित दि. 29.07.2011 व्दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्यक्ष) गैरअर्जदाराच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, त्याने दिनांक 22.05.2010 रोजी विभागीय सह निबंधक सहकारी संस्था पुणे विभाग, पुणे यांच्या जाहीरातीनुसार वाहन चालक या पदासाठीचा अर्ज गैरअर्जदार क्रमांक 1 हेड पोष्ट मास्तर मुख्य डाक कार्यालय,औरंगाबाद यांच्या मार्फत स्पीड पोष्टाने विभागीय सह निबंधक पुणे विभाग यांच्याकडे पोहचविण्यासाठी पाठविला. त्याचा अर्ज दिनांक 25.05.2010 रोजी सायंकाळी 05.45 वाजेच्या आत विभागीय सह निबंधक पुणे यांच्या कार्यालयात पोहचणे आवश्यक होते. म्हणूनच त्याने तो अर्ज गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या कार्यालयातून स्पीड पोष्टाद्वारे पाठविला होता. परंतू त्याचा अर्ज गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी जवळपास 3 दिवस त्यांच्याच औरंगाबाद येथील उप कार्यालयात निष्काळजीपणे पाठविला आणि उप कार्यालयाने पुन्हा तो अर्ज गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे दिला. त्यामुळे त्याचा अर्ज विभागीय सह निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे विहित कालावधीत पोहचला नाही. म्हणून त्यास नोकरीस मुकावे लागले. गैरअर्जदाराच्या दिरंगाईमुळे व चुकीच्या कार्यपध्द्तीमुळे त्यास नोकरीच्या संधीस मुकावे लागले. त्याने गैरअर्जदाराकडे दिनांक 01.06.2010 रोजी तक्रार दिली होती. त्याबाबत गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी त्यांच्या चुकीमुळे अर्जदाराची गैरसोय झाल्याचे कळविले आणि त्याच्या कार्यालयातील कर्मचा-याच्या निष्काळजीपणामुळे उशीर झाल्याचे नमूद केले. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, त्यास गैरअर्जदाराकडून रुपये 2,00,000/- नुकसान भरपाई देण्यात यावी. गैरअजदारांनी लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराचे पत्र त्यांनी किंवा त्यांच्या कर्मचा-यांनी जाणीवपुर्वक वेळेवर पोहचविले नाही. हे म्हणणे चुकीचे आहे. गैरअर्जदाराचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराचे पत्र पोहचविण्यास दोन दिवसांचा उशीर झाला. परंतू हा उशीर लबाडीने किंवा जाणीपुर्वक केलेला नाही आणि गैरअर्जदाराचा त्यामध्ये निष्काळजीपणा नाही. म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदारांनी केली आहे. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद आणि कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात मुद्दे उत्तर 1.तक्रारदाराची तक्रार या मंचाच्या कार्यक्षेत्रात चालू शकते काय ? नाही 2.गैरअर्जदारांच्या सेवेत त्रुटी आहे काय ? मुद्दा उरत नाही 3.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 – दोन्ही पक्षातर्फे युक्तीवाद करण्यात आला. तक्रारदाराच्या वतीने अड.के.के.वाघमारे आणि गैरअर्जदारांच्या वतीने अड.एस.एम.धन्नावत यांनी युक्तीवाद केला. गैरअर्जदारांच्या वतीने युक्तीवादा दरम्यान असा मुद्दा उपस्थित करण्यात आला की, तक्रारदाराने औरंगाबाद येथून स्पीड पोष्टाद्वारे पत्र पाठविले होते आणि त्या पत्राबाबत त्याने ही तक्रार दाखल केलेली असुन, तक्रारदाराला तक्रार दाखल करण्याचे कारण औरंगाबाद येथे घडलेले असुन ही तक्रार या मंचात चालू शकत नाही. गैरअर्जदारांनी उपस्थित केलेला मुद्दा रास्त आहे. कारण गैरअर्जदाराचा व्यवहार गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्यासोबत झालेला असुन गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्या सोबत त्याचा कोणताही व्यवहार झालेला नाही. तसेच तक्रारदाराने औरंगाबाद येथून स्पीड पोष्टाद्वारे पत्र पाठविले होते. त्यामुळे त्याला तक्रार दाखल करण्याचे कारण औरंगाबाद येथेच घडल्याचे स्पष्ट दिसुन येते. ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील कलम 11 नुसार गैरअर्जदार ज्या ठिकाणी राहतो किंवा व्यवसाय करतो किंवा ज्या ठिकाणी तक्रार दाखल करण्याचे कारण घडले त्याच ग्राहक मंचात सेवेतील त्रुटी बाबत तक्रार चालू शकते. तक्रारदाराला जालना येथे तक्रार दाखल करण्याचे कारण घडलेले नाही. किंवा गैरअर्जदार जालना येथे व्यवसाय करत नसून गैरअर्जदार क्रमांक 3 हे जरी जालना येथे व्यवसाय करीत असले तरी तक्रारदाराचा त्यांच्या सोबत कोणताही व्यवहार झालेला नाही. तक्रारदाराचा व्यवहार हा गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे सोबत झालेला आहे आणि गैरअर्जदार क्रमांक 1 हे औरंगाबाद येथेच व्यवसाय करतात. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार या मंचाच्या कार्यक्षेत्रात चालू शकत नाही, असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार या मंचाच्या कार्यक्षेत्रात चालू शकत नसल्यामुळे फेटाळण्यात येते.
- तक्रारदाराला औरंगाबाद जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार दाखल करता येईल.
- तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.
| | HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe, MEMBER | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | , | |