निकाल
दिनांक- 28.08.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार श्रीमती शिला एकनाथ तिष्टक यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला क्र.2 यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत सेवा देण्यास कसूर केली आहे म्हणून विमा रक्कम व नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारदार हया मौजे काठोडा तालूका गेवराई येथील रहिवाशी असून शेती व्यवसाय करुन उदरनिर्वाह करतात. तक्रारदार यांचे पती एकनाथ रामकिसन तिष्टक हे दि.22.08.2008 रोजी दरोडा हल्ल्यात मयत झाले. सदरील दरोडयाची माहिती पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळावर येऊन पंचनामा केला. प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविले. तक्रारदार यांचे पती हे व्यवसायाने शेतकरी होते. महाराष्ट्र शासनाने शेतक-यांच्या हितासाठी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना लागू केलेली आहे. तालूका कृषी अधिकारी यांचे मार्फत प्रस्ताव पाठवून कार्यवाही केली जाते. तक्रारदार यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी तालूका कृषी अधिकारी यांचे मार्फत सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडे अर्ज पाठविला, सोबत सर्व दस्तऐवज दिले. सामनेवाला क्र. 2 यांनी अद्यापपावेतो क्लेमवर कोणताही निर्णय घेतला नाही. तक्रारदार हे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रु.1,00,000/- मिळण्यास पात्र आहे. सामनेवाला यांनी सेवा देण्यास कसूर केला आहे. सबब तक्रारदार यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत लाभ मिळावा तसेच तक्रारदार यांना शारिरिक व मानसिक त्रास झाला व तक्रार दाखल करावी लागली, त्याबाबत नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती केली आहे.
सामनेवाला क्र.1 कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेस प्रा.लि., हे या मंचासमोर हजर झाले व त्यांनी निशाणी 14 अन्वये लेखी कैफियत दाखल केली. सामनेवाला क्र.1 यांचे कथन की तक्रारदार हे त्यांचे ग्राहक नाही, सामनेवाला क्र.1 हे केवळ मध्यस्थ सल्लागार म्हणून काम पाहतात, कृषी अधिका-यांकडून आलेले विमा प्रस्ताव इन्शुरन्स कंपनीकडे पाठविण्याचे काम करतात, तक्रारदार यांनी दाखल केलेले प्रस्ताव कृषी अधिका-याकडून दि.31.08.2009 रोजी प्राप्त झाले. सदरील प्रस्ताव रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी यांच्याकडे पाठविण्यात आला, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने तक्रारदार यांचा क्लेम नामंजूर केला व तसे कळविण्यात आले आहे.
सामनेवाला क्र.2 यांना या मंचाची नोटीस बजावणी झाली ते हजर झाले नाही व लेखी म्हणणे दाखल केले नाही. सदरील बजावणी निशाणी 17 व 18 आर.पी.ए.डी च्या पावत्या दाखल आहेत.
सामनेवाला क्र.3 हे या मंचासमोर हजर झाले व त्यांनी निशाणी 9 अन्वये लेखी म्हणणे सादर केले. सामनेवाला क्र.3 यांचे कथन की, तक्रारदार यांचा प्रस्ताव दि.31.08.2008 रोजी प्राप्त झाला व तो प्रस्ताव कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेस यांच्याकडे पाठविण्यात आला.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत मरणोत्तर पंचनामा, मृत्यूचे प्रमाणपत्र, गाव नमुना 7-अ 12, गाव नमुना 8-अ हजर केलेले आहेत. निशाणी 19 अन्वये पी.एम.रिपोर्ट, प्रतिज्ञापत्र, मतदान ओळखपत्र, फेरफार नोंदणी, दाखल केलेले आहेत. तक्रारदार यांनी घटनास्थळ पंचनामा, एफ.आय.आर., दोषारोप पत्र, वारसाचे प्रमाणपत्र हजर केले आहेत.
तक्रारदार यांनी स्वतःचे शपथपत्र दाखल केले. तसेच तक्रारीसोबत दस्त हजर केले. तक्रारदार यांचे वकील श्री.पावसे यांचा युक्तीवाद ऐकला. सामनेवाला क्र.1 ते 3 गैरहजर. युक्तीवाद केला नाही. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1) सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांचा क्लेम
नाकारुन द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवलेली आहे,
ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केली आहे
काय? होय.
2) तक्रारदार हया शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा
योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यास पात्र
आहे काय? होय.
3) आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2 ः- तक्रारदार यांचे वकील श्री.पावसे यांनी असा युक्तीवाद केला की, इन्शुरन्स कंपनीने सी.ए.रिपोर्ट नाही, या कारणास्तव क्लेम नाकारलेला आहे. सदरील क्लेम नाकारल्याबाबत तक्रारदार यांना कधीही कळविलेले नाही व तसा पुरावा सादर केलेला नाही. सामनेवाला क्र.1 यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन या मंचाचे असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांनी मुदतीत प्रस्ताव दाखल केला होता व तो प्रस्ताव इन्शुरन्स कंपनीला प्राप्त झाला होता, इन्शुरन्स कंपनीने तो प्रस्ताव केवळ सी.ए.रिपोर्ट नाही, या कारणास्तव नाकारलेला आहे. इन्शुरन्स कंपनी या मंचासमोर हजर झाली नाही व तक्रारदार यांना क्लेम नाकारल्याबाबत कळविण्यात आले होते या बाबत कोणताही पुरावा हजर केलेला नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या संपूर्ण कागदपत्राचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे पती हे व्यवसायाने शेतकरी होते, त्यांचे नावे शेतजमीन नोंदवलेली आहे. दि.17.08.2008 ते 18.08.2008 चे रात्रीचे सुमारास अज्ञात चोरटयांनी तक्रारदार यांचे घरावर दरोडा घातला, त्यामध्ये तक्रारदार यांचे पतीला मारहान केली त्या मारहानीमध्ये तक्रारदार यांचे पती यांना गंभीर जखम होऊन ते मयत झाले. चोरांनी घरातील सामान सोने चांदीच्या वस्तू, जबरीने चोरुन नेल्या. सदरील घटनेची फिर्याद दाखल करण्यात आली व भारतीय दंड विधान कलम 395 व 397 अन्वये तलवडा पोलीस स्टेशन येथे नोंदविण्यात आली. संपूर्ण कागदपत्राचे अवलोकन केले असता चोरांनी दरोडा टाकून तक्रारदार यांचे पतीचा खून केला आहे ही बाब निष्पन्न होते. तक्रारदार यांनी संपूर्ण कागदपत्र इन्शुरन्स कंपनीकडे प्रस्तावासोबत पाठविले आहे. पोलीस तपासातील कागदपत्र हे इन्शुरन्स कंपनीला पाठविण्यात आले आहे. केवळ सी.ए.रिपोर्ट नाही या कारणास्तव इन्शुरन्स कंपनी तक्रारदार यांचा क्लेम नाकारु शकत नाही. सदरील केसमध्ये सी.ए.रिपोर्ट आवश्यक आहे असे या मंचास वाटत नाही. कारण तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू हा दरोडेखोरांनी केलेल्या मारहानीत झाला आहे व तसा स्पष्ट उल्लेख शवविच्छेदन अहवालामध्ये केलेला आहे. सामनेवाला क्र.2 इन्शुरन्स कंपनी यांनी तक्रारदार यांचा क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास आवश्यक त्या सर्व बाबींची पुर्तता तक्रारदार यांनी केलेली आहे. सबब तक्रारदार हया सदर योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास पात्र आहे. सबब मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2) सामनेवाला क्र.2 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी यांना
आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदार यांना शेतकरी
व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा दाव्याची रक्कम
रु.1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) निकाल
कळाल्यापासून 30 दिवसाचे आत दयावेत, सदर रक्कम विहीत
मुदतीत न दिल्यास त्यावर तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण
रक्कम वसूल होईपर्यत द.सा.द.शे.9 टक्के व्याज द्यावे.
3) सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांना झालेल्या मानसिक
व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.3,000/- (अक्षरी
रुपये तीन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1500/-
(अक्षरी रुपये एक हजार पाचशे) दयावेत.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील
कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला
परत करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड