निकाल
दिनांक- 01.10.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार सुरेखा नारायण आरे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला क्र.2 यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत सेवा देण्यास कसूर केली आहे म्हणून विमा रक्कम व नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारदार हया मौजे आथरवन पिंपरी तालूका बीड येथील रहिवाशी असून शेती व्यवसाय करुन आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. तक्रारदार यांचे पती व्यवसायाने शेतकरी होते. तक्रारदार यांचे पती दि.20.06.2009 रोजी रस्ता अपघातात मयत झाले. सदरील घटना घडल्यानंतर अपघाताची खबर पोलीसांना देण्यात आली. पोलीसांनी सदरील घटनेची चौकशी करुन अहवाल दिला. तक्रारदार यांचे पती यांचे नावावर बीड बोबडे येथे शेतजमीन नोंदवलेली आहे. महाराष्ट्र शासनाने शेतक-यांचा अपघाती मृत्यू झाल्यास शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना सुरु केलेली आहे. विम्याची रक्कम सामनेवाला क्र.2 इन्शुरन्स कंपनीकडे भरलेली आहे. सदरील विमा रक्कम मिळण्याची कार्यवाही कृषी अधिका-यांमार्फत ब्रोकर कंपनी व इन्शुरन्स कंपनी यांनी करावयाची आहे. तक्रारदार यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत लाभ मिळावा म्हणून क्लेम दाखल केला, तो क्लेम सामनेवाला यांना प्राप्त होऊनही मंजूर केला नाही, सामनेवाला यांनी द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. सबब तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून रक्कम रु.1,00,000/- मिळावी, तसेच शारिरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व खर्चापोटी रु.5,000/- मिळण्याची विनंती केली आहे.
सामनेवाला क्र.1 कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेस प्रा.लि., हे या मंचासमोर हजर झाले व त्यांनी निशाणी 11 अन्वये लेखी कैफियत दाखल केली. सामनेवाला क्र.1 यांचे कथन की ते विमा योजना राबविण्याचे कामी महाराष्ट्र शासनाला मदत करतात. त्यांच्याकडे प्राप्त झालेले विमा क्लेम ते इन्शुरन्स कंपनीकडे पाठवितात त्याचे बददल ते कोणताही मोबदला घेत नाही, त्यांनी द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवलेली नाही. पुढे सामनेवाला क्र.1 यांचे कथन की, तक्रारदार यांनी दाखल केलेला क्लेम त्यांचे कार्यालयास दि.06.01.2010 रोजी उशिरा प्राप्त झाला, तो क्लेम रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे पाठविण्यात आला. सदरील दावा रिलायन्स इन्शुरन्स कंपनीने नामंजूर केला आहे त्यास सामनेवाला क्र.1 हे जबाबदार नाही.
सामनेवाला क्र.2 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी हे या मंचासमोर हजर झाले व त्यांनी निशाणी 14 अन्वये लेखी कैफियत दाखल केली. सामनेवाला क्र.2 यांचे कथन की मयत हा वाहन चालवित असताना अपघात झाला व त्यात तो मयत झाला. मयत हा स्वतःच्या निष्काळजीपणामुळे अपघातास कारणीभूत झाला. त्यामुळे तक्रारदार हया क्लेम मिळण्यास पात्र नाही. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे कोणतेही कागदपत्र हजर केले नाही. तक्रार ही मुदतीत दाखल केली नाही. म्हणून तक्रारदार रदद करण्यात यावी.
तक्रारदार यांनी स्वतःचे शपथपत्र, कागदपत्र हजर केले. सामनेवाला युक्तीवाद केला नाही. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1) सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांचा क्लेम
नाकारुन द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवलेली आहे,
ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केली आहे
काय? होय.
2) तक्रारदार हया शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा
योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यास पात्र
आहे काय? होय.
3) आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2 ः- तक्रारदार यांनी दाखल केलेले दस्त व तक्रारीतील मजकुर क्र.2 यांनी स्वतःचे शपथपत्र हजर केले. सामनेवाला क्र.3 हे नोटीस मिळूनही मंचासमोर हजर झाले नाही. सबब त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. तक्रारदार यांचे वकील श्री.पावसे यांचा युक्तीवाद ऐकला. सामनेवाला क्र.2 इन्शुरन्स कंपनी यांचे वकील श्री.कुलकर्णी यांचा युक्तीवाद ऐकला.
यांचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे पती हे मोटार अपघातात मयत झाले ही बाब सिध्द होते. सामनेवाला क्र.2 इन्शुरन्स कंपनी यांचा युक्तीवाद की, तक्रारदाराचे पती यांच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाला व ते स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत झाले. सदरील बाब सिध्द करण्यासाठी सामनेवाला क्र.2 यांनी या मंचासमोर कोणताही पुरावा सादर केलेला नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेले पोलीस पेपर याचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे पती अपघातात मयत झाले ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांचे पती व्यवसायाने शेतकरी होते. तक्रारदार यांनी त्यांचे पती मयत झाल्यानंतर सामनेवाला यांच्याकडे क्लेम दाखल केला. सामनेवाला क्र.1 यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन असे निदर्शनास येते की, सामनेवाला क्र.2 इन्शुरन्स कंपनीने तक्रारदार यांचा क्लेम दि.24.11.2010 रोजी पत्र पाठवून क्लेम नामंजूर केला आहे असे कळविले आहे. सदरील बाब सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे लेखी खुलाशात नमुद केले नाही, अगर तक्रारदार यांचा क्लेम नाकारण्यात आला आहे असेही नमुद केलेले नाही. या उलट ते या मंचापूढे अशी केस घेऊन आले की, तक्रारदार यांनी दाखल केलेला क्लेम त्यांना प्राप्त झाला नाही. सामनेवाला क्र.2 यांना तक्रारदार यांचा क्लेम प्राप्त झाला. तक्रारदार यांचे पती व्यवसायाने शेतकरी असल्यामुळे व सदर दस्त याची पुर्तता केली असल्यामुळे सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांचा क्लेम मंजूर करणे क्रमप्राप्त होते. या मंचाचे मत की, सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांचा क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवली आहे. तक्रारदार हे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई रक्कम रु.1,00,000/- मिळण्यास पात्र आहे. तसेच शारिरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- व तक्रारीचा खर्च रु.1,000/- मिळण्यास पात्र आहे. सबब मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2) सामनेवाला क्र.2 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी यांना
आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदार यांना शेतकरी
व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा दाव्याची रक्कम
रु.1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) निकाल
कळाल्यापासून 30 दिवसाचे आत दयावेत, सदर रक्कम विहीत
मुदतीत न दिल्यास त्यावर तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण
रक्कम वसूल होईपर्यत द.सा.द.शे.9 टक्के व्याज द्यावे.
3) सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांना झालेल्या मानसिक
व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.3,000/- (अक्षरी
रुपये तीन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/-
(अक्षरी रुपये एक हजार) दयावेत.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील
कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला
परत करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड