मंचाचे निर्णयान्वये - श्री. मिलींद केदार, सदस्य //- आदेश -// (पारित दिनांक – 25/10/2010) 1. तक्रारकर्त्यानी सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्वये दाखल केलेली असून तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, त्याने दि.09.10.2008 दैनिक वर्तमानपत्रातील जाहिरात वाचून गैरअर्जदाराच्या एच.सी.एल. सर्टीफाईड इंजिनियर नावाच्या अभ्यासक्रमात ऑक्टोबर 2008 ते फेब्रुवारी 2009 या कालावधीत प्रवेश घेतला. गैरअर्जदाराच्या जाहिरातीनुसार सदर अभ्यासक्रम हा पाठयक्रम संगणक इंडस्ट्री येथील विद्वान लोकांनी तयार केलेला असून तो चांगले शिकलेले प्राध्यापक शिकविणार आहे. तसेच यामध्ये ते संगणक हार्डवेअर आणि नेटवर्कींगचे शिक्षण देणार होते. या अभ्यासक्रमामुळे प्रशिक्षणार्थींना 100 टक्के रोजगार मिळणार असेही या जाहिरातीत नमूद करण्यात आले होते. तक्रारकर्त्याने बजाज नगर येथील गैरअर्जदाराच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांना माहिती पत्रक देण्यात आले, तसेच लॅपटॉप मोफत मिळणार असेही सांगण्यात आले. सदर अभ्यासक्रमाकरीता रु.49,000/- गैरअर्जदाराकडे जमा करावयाचे होते व अभ्यासक्रम हा 12 महिन्यांचा होता. तक्रारकर्त्याने सदर अभ्यासक्रमाचे शुल्क भरुन शिक्षण घेणे सुरु केले. परंतू तक्रारकर्त्याचे असे निदर्शनास आले की, जाहिरातीत नमूद कुठल्याच आश्वासनाचे पालन गैरअर्जदार करीत नव्हते. शिकवायला प्राध्यापक नव्हते, जे प्राध्यापक शिकवित होते त्यांना चांगले शिकविता येत नव्हते, पुस्तके दिली नाहीत, कोर्सही पूर्ण केला नाही, लॅपटॉप दिला नाही, हमी देऊनही नोकरी दिली नाही. गैरअर्जदारांचा अंतर्गत वाद विकोपाला गेल्याने अभ्यासक्रम बंद पडला. अशाप्रकारे गैरअर्जदाराने अनेक प्रकारे तक्रारकर्त्याची फसवणूक केली. अशाप्रकारे सदर अभ्यासक्रमात शिकणा-या 100 ते 150 मुलांची फसवणूक गैरअर्जदाराने केली. जाहिरातीत व प्रत्यक्षात दिलेले कुठल्याच आश्वासनांची पूर्तता गैरअर्जदारांनी न केल्याने तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचामध्ये दाखल करुन रु.49,000/- व्याजासह परत मागितले. तसेच नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चाची मागणी केलेली आहे. 2. सदर तक्रारीचा नोटीस गैरअर्जदारावर बजावण्यात आला असता गैरअर्जदार क्र. 1 यांना त्यांच्या मागणीनुसार लेखी उत्तर दाखल करण्यास संधी देऊनही त्यांनी तक्रारीस लेखी उत्तर दाखल न केल्याने मंचाने दि.04.09.2010 रोजी त्यांच्या उत्तराशिवाय कारवाई चालविण्याचा आदेश पारित केला. गैरअर्जदार क्र. 2 यांना मंचाची नोटीस प्राप्त होऊनही ते मंचासमोर हजर न झाल्याने मंचाने त्यांच्याविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश दि.04.09.2010 रोजी पारित केला. 3. सदर प्रकरण मंचासमोर 13.10.2010 रोजी युक्तीवादाकरीता आले असता मंचाने तक्रारकर्त्याचा युक्तीवाद ऐकला. गैरअर्जदार क्र. 1 व 2 अनुपस्थित. मंचाने सदर प्रकरणी तक्रारकर्त्याने दाखल केलेले दस्तऐवज, प्रतिज्ञापत्र यांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 4. तक्रारकर्त्याने सदर तक्रारीसोबत त्याने तक्रारीत नमूद अभ्यासक्रमाबाबत शुल्क भरल्याची पावती सादर केलेली आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याने प्रशिक्षणाकरीता प्रवेश घेतला होता ही बाब स्पष्ट होत असून तो गैरअर्जदाराचा ग्राहक असल्याचे सिध्द होते. 5. तक्रारकर्त्याने दस्तऐवज क्र. 1 वर दि हितवाद या वर्तमानपत्रातील गैरअर्जदाराने प्रसिध्द केलेली जाहिरात दाखल केलेली असून त्यावर तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद केलेले आश्वासने गैरअर्जदाराने या जाहिरातीत दिल्याचे निदर्शनास येतात. तसेच माहिती प्रत्रकामध्ये जाहिराती व्यतिरिक्त अनेक आश्वासने व प्रलोभने सदर अभ्यासक्रमा दरम्यान देण्यात येतील असे नमूद केले आहे. तंत्रज्ञानात उच्च दर्जाचे शिक्षण, त्याच्या घेण्यात येणा-या परीक्षा, अभ्यासक्रमा दरम्यान उच्च दर्जाचे तंत्रज्ञान व वापरावयास आणि सरावाकरीता मिळणारे नाविन्यपूर्ण यंत्र हे माहिती पुस्तिकेत व जाहिरातीत दर्शविल्या गेल्यामुळे अनेक विद्यार्त्यांनी या यांत्रिकी व तंत्रज्ञान प्राप्त करण्याकरीता या जाहिरातीत बळी पडून अवाढव्य शुल्क भरुन अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. परंतू गैरअर्जदारांनी आश्वासित केलेले कुठलेच ज्ञान विद्यार्थ्यांना दिले नाही व अभ्यासक्रमही पूर्ण केला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. सदर कृती करुन गैरअर्जदाराने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे असे मंचाचे मत आहे. आश्वासन देऊन व त्याबाबतचे शुल्क घेऊन त्यांची पूर्तता न करुन गैरअर्जदारांनी सेवेत त्रुटी केलेली आहे, म्हणून तक्रारकर्ता सदर प्रकरणी दाद मिळण्यास पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. तसेच त्याने भरलेले शुल्क व्याजासह परत मिळण्यास तो पात्र आहे असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला रु.49,000/- ही रक्कम दि.15.03.2010 पासून तर प्रत्यक्ष रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह द्यावी. 6. गैरअर्जदारांनी अभ्यासक्रम पूर्ण करुन नोकरीची हमी दिली. परंतू प्रत्यक्षात अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याने तक्रारकर्ता स्वतःही त्याआधारे नोकरी मिळवू शकला नाही. तसेच आश्वासित करुनही लॅपटॉप गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास दिलेला नाही. या सर्व प्रकारामुळे तक्रारकर्त्याला निश्चितच मानसिक त्रास झालेला आहे, म्हणून तक्रारकर्ता मानसिक त्रासाच्या भरपाईबाबत रु.10,000/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारीच्या खर्चाबाबत रु.3,000/- मिळण्यास पात्र आहे. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याची तक्रार व नोटीस त्यांना प्राप्त होऊनही त्यांनी त्याचे म्हणणे काय आहे किंवा तक्रारकर्त्याची तक्रार खोडून काढण्याकरीता काहीही लेखी म्हणणे किंवा पुरावे दाखल न केल्याने तक्रारकर्त्याची शपथपत्रावर व दस्तऐवजासह असलेली तक्रार सत्य समजून व उपरोक्त निष्कर्षावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने तक्रारकर्त्याला रु.49,000/- ही रक्कम दि.15.03.2010 पासून तर प्रत्यक्ष रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत द्यावी अन्यथा गैरअर्जदार सदर रकमेवर द.सा.द.शे.12 टक्के व्याज देण्यास बाध्य राहील.. 3) गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने मानसिक त्रासाबाबत भरपाई म्हणून तक्रारकर्त्या ला रु.10,000/- द्यावे. 4) गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने तक्रारीच्या खर्चाबाबत रु.3,000/- तक्रारकर्त्याला द्यावे. 5) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत संयुक्तपणे किंवा पृथ्थकपणे करावे. 6) तक्रारकर्त्याने दाखल ‘ब’ व ‘क’ फाईल्स (सदस्यांकरीता फाईल्स) घेऊन जावे.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |