तक्रारकर्त्याचे वकील हजर, तक्रारकर्त्याची थोडक्यात तक्रार अशी आहे की, त्यांने वाहन खरेदीकरता गैरअर्जदार बँकेकडून रु.6,27,000/- एवढी कर्जाऊ रक्कम घेतली होती आणि नियमीत मासिक हप्ता भरत होता. तक्रारकर्त्याने वाहन कर्जाच्या संपूर्ण रकमेची परतफेड करुन ते विकण्याचे ठरवुन गैरअर्जदारांना विनंती केली असता गैरअर्जदारांनी दस्तावेज क्र.5 नुसार रु.4,91,132.60 एवढया रकमेची मागणी केली. त्यानुसार तक्रारकर्त्याने दस्तावेज क्र.6 व 7 प्रमाणे गैरअर्जदारांकडे जमा केली. अश्या प्रकारे पूर्ण देय रक्कम दिल्यानंतर गैरअर्जदारांकडून ना हरकत प्रमाणपत्र व वाहनाचे इतर दस्तावेज प्राप्त झाले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला वाहन विकता आले नाही, याकरता सदर तक्रार मंचात दाखल केलेली असुन ती व्दारे गैरअर्जदारांनी दिलेल्या दोषपूर्ण सेवेमुळे त्याला झालेल्या आर्थीक नुकसानीसाठी रु.50,000/- नुकसान भरपाई म्हणून मिळावी, वाहनाच्या किमतीत होत असलेल्या घटीसाठी रु.1,00,000/-, मानसिक छळासाठी रु.1,00,000/- व तक्रारीच्या खर्चाचे रु.10,000/- मिळावे अश्या मागण्या केलेल्या आहेत.
गैरअर्जदारांना नोटीस बजावण्यांत आली असता त्यांना नोटीस मिळूनही ते मंचात हजर झाले नाही व आपले कथन दाखल केले नाही. त्यामुळे मंचाने दि.22.08.2009 रोजी गैरअर्जदारांविरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित केला आहे.
तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत दस्तावेजांची यादी निशाणी 3 वर दाखल केली असुन त्यात दस्तावेज 1 ते 11 कर्ज मंजूरलचे पत्र, विक्रीचा करारनामा, कारचे बिल, विम्याची पावती, परत फेडीचे विवरण पत्र, रकमेच्या पावत्या, नोटीस, पोष्टाची पावती इत्यादी दस्तावेजांच्या छायांकीत प्रति दाखल केलेल्या आहेत.
यातील तक्रारकर्त्याचा युक्तिवाद त्यांचे वकीला मार्फत ऐकला, तक्रारकर्त्याने आपली तक्रार प्रतिज्ञालेख व आवश्यक दस्तावेजांव्दारे सिध्द केलेली आहे. गैरअर्जदारांना मंचाव्दारे नोटीस बजावण्यांत आली ती त्यांना प्राप्त झाल्याची पोष्टाची पावती प्रकरणात दाखल आहे. मात्र गैरअर्जदारांनी सदर नोटीसची दखल घेतली नाही व आपले कथन दाखल केले नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याने प्रस्तुत केलेली तक्रार गैरअर्जदारांना मान्य असल्याचे मंचाचे मत आहे.
वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करता गैरअर्जदारांनी सेवेत त्रुटी दिलेली असुन आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
- आदेश -
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास वाहनाचे आवश्यक सर्व दस्तावेज आणि कर्ज परतफेडी बाबतचे ना-हरकत प्रमाणपत्र आदेश प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसांचे आंत द्यावे.
3. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल रु.10,000/- एवढी रक्कम नुकसान भरपाईपोटी अदा करावी.
4. गैरअर्जदारांनी वरील आदेशाचे पालन 30 दिवसांचे आंत करावे.