निकाल
दिनांक- 30.12.2014
(द्वारा- श्रीमती मंजुषा चितलांगे, सदस्य)
तक्रारदार साहेबराव श्रीरंगराव शिंदे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांचेकडून रक्कम रु.1,50,000/- नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारदार हे शेतकरी असून सामनेवाला हे पीक विमा घेणारी कंपनी आहे. तक्रारदाराने सन 2012-2013 या वर्षी गट नं.44 मध्ये 1 हेक्टर जमीनीमध्ये आंबा या फळाचे पीक होते. तक्रारदार यांनी दि.30.12.2012 रोजी सामनेवाला यांच्या खात्यामध्ये स्टेट बँक ऑफ हैद्राबाद, मांजरसुंबा तालुका बीड या शाखेत रक्कम रु.6,000/- जमा करुन हंगाम वर्ष 2012-2013 या सालासाठी तक्रारदार यांनी आंबा पीकासाठी विमा घेतलेला आहे. तक्रारदाराचे आंबा पीक घेतलेल्या बोरखेड भागात सन 2012-2013 मध्ये दुष्काळ पडला व पाण्याअभावी तक्रारदाराचे सदरील आंबा पीक होरपळून नष्ट झाले. तक्रारदाराचे आंबा पीक असलेल्या बोरखेड हे गाव 50 टक्के पेक्षा कमी पैसेवारीमध्ये शासनाच्या यादीत आहे. सन 2012-2013 या वर्षासाठी सुकत जाणा-या बागासाठी अनुदान म्हणून तालुका कृषी अधिकारी बीड यांनी शासनाकडे तक्रारदार व इतर यांना मदत मिळावी म्हणून अनुदान देण्याचे शिफारस पत्र पाठविले होते. तक्रारदाराचे आंबा पीक जळून नष्ट झाल्यामुळे रक्कम रु.1,50,000/- चे नुकसान झालेले आहे. दुष्काळामुळे झालेल्या आंबा पिकाचे नुकसान शेतक-यांनी घेतलेल्या पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम शेतक-यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याचे बातमीपत्र छापून आले होते, परंतू सदर रक्कम ही तक्रारदाराच्या खात्यात जमा झाली नाही.
तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे सदर रक्कम खात्यात जमा झाली नसल्यामुळे सामनेवाला यांच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली. सामनेवाला यांनी ग्राहक मंचाच्या आदेशाशिवाय नुकसान भरपाई देता येत नाही असे सांगितले व तक्रारदारास नुकसान भरपाईची रक्कम देण्यास नकार दिला. सबब तक्रारदारास सामनेवाला यांनी नुकसान भरपाई नाकारुन सेवा देण्यात त्रुटी ठेवली आहे. त्यामुळे तक्रारदारास सदर तक्रार दाखल करावी लागली. तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर करण्यात यावी. सामनेवाला यांचेकडून रक्कम रु.1,50,000/- देण्यात यावे अशी विनंती केली आहे.
सामनेवाला क्र.1 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी निशाणी 14 अन्वये आपले लेखी निवेदन दाखल केलेले आहे. लेखी निवेदनासोबत देवाश्री भटटाचार्य यांचे शपथपत्र निशाणी क्र.15 वर दाखल केले आहे. सामनेवाला क्र.1 यांचे कथनेनुसार सामनेवाला क्र.1 यांनी सदर पॉलीसी ही हवामान आधारीत विमा योजना म्हणून स्टेट बँक ऑफ हैद्राबाद यांच्या नावे काढली आहे. पॉलीसीचा कालावधी हा दि.01.01.2013 ते 31.05.2013 आहे. सामनेवाला यांना तक्रारदार हे शेतकरी आहे किंवा नाही याबाबत माहित नाही. तक्रारदार यांनी सदरील विमा हा फळ पीक आंबा यासाठी घेतला आहे ही बाब मान्य नाही. तसेच सन 2012-2013 मध्ये दुष्काळाअभावी तक्रारदार यांचे आंबा पीक नष्ट झाले आहे ही बाब मान्य नाही. तक्रारदार यांनी सदर फळ पीक आंबा नुकसानी बाबत कोणताही दस्तऐवज दाखल केला नाही व रु.1,50,000/- चे नुकसान झाले त्या बाबतही कोणताही दस्त दाखल केला नाही. तक्रारदार हे आमचे ग्राहक नाही. तसेच तक्रारदार हे विमाधारक ही नाही. तक्रारदारास कोणतीही सेवा देणे लागत नाही. वर्तमानपत्रातून छापून आलेल्या बातम्याबाबत सामनेवाला क्र.1 यांना मान्य नाही. तक्रारदारास सदर तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडले नाही. तक्रारदार हा कायद्यानुसार ग्राहक या संज्ञेत येत नाही. सबब सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास सेवा देण्यास कसूर केला आहे असे म्हणता येणार नाही.
सामनेवाला क्र.1 यांचे पुढे कथन असे की, तक्रारदार व सामनेवाला क्र.1 यांच्यामध्ये कोणताही करार झालेला नाही. तसेच तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. सबब तक्रारदाराची तक्रार ही खारीज करण्यात यावी. सामनेवाला क्र.1 यांचे पुढे कथन असे की, सामनेवाला क्र.1 यांनी महाराष्ट्र शासन नियोजित फळ पीक विमा योजनेअंतर्गत सदर विमा पॉलीसी ही स्टेट बँक ऑफ हैद्राबाद मांजरसूंबा बीड यांचे नावे काढली आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार सदर योजनेत फळ पीक आंबा यांचा समावेश करण्यात आला आहे. सदर योजना ही सन 2012-2013 सालाकरता राबविलेली आहे, त्या योजनेअंतर्गत काही मार्गदर्शक अशी तत्वे दिलेली आहे. सदर निर्णयाचे सहपत्र 1 मध्ये नमुद केल्याप्रमाणे सहपत्र 2 नुसार लागू करण्यात येते. तसेच हवामानाच्या तपशिलानुसार सहपत्र 2 मध्ये नमुद केल्याप्रमाणे शेतक-यांना विमा कंपनी मार्फत नुकसान भरपाई देता येते. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार सहपत्र 2 हे खाली नमुद केले.
विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी) | प्रमाणके (ट्रीगर) व नुकसान भरपाई रक्कम प्रति हेक्टर रुपये |
1) अवेळी पाऊस (दि.1 जानेवारी 2013 ते 31 मे 2013) | विमा संरक्षण कालावधीत दैनंदिन पाऊस 5 मि.मि.पेक्षा जास्त झाल्यास खालीलप्रमाणे नुकसान भरपाई देय होईल. 3 दिवस पाऊस झाल्यास रु.5,000/- 4 दिवस पाऊस झाल्यास रु.15,000/- 5 दिवस पाऊस झाल्यास रु.30,000/ (कमाल देय रक्कम रुपये रु.30,000/- |
2) जास्त तापमान | |
टप्पा– अ (दि.1 मार्च 2013 ते 31 मार्च 2013) | विमा संरक्षण कालावधीत दैनंदिन कमाल तापमान 41 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त सलग तीन दिवस राहिल्यास रु.25,000/- |
टप्पा– ब (दि.1 एप्रिल 2013 ते 31 मे 2013) | विमा संरक्षण कालावधीत दैनंदिन कमाल तापमान 44 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त सलग तीन दिवस राहिल्यास रु.15,000/- |
3) कमी तापमान (दि.1 जानेवारी 2013 ते 28 फेब्रुवारी 2013) | विमा संरक्षण कालावधीत दैनंदिन किमान तापमान 9 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी सलग तीन दिवस राहिल्यास रु.30,000/- |
वर नमुद केलेल्या सहपत्राप्रमाणे सामनेवाला क्र.1 हे नुकसान भरपाई देण्यास पात्र नाही. तसेच दुष्काळाअभावी नष्ट झालेले फळ पीक हे सदर पॉलीसी अंतर्गत समाविष्ट नाही. तक्रारदार यांनी नष्ट झालेल्या फळ पीक आंबा बाबत कोणताही दस्तऐवज दाखल केलेला नाही. शासनाने नियोजित केलेले एन.सी.एम.एस.एल.मंडळामार्फत हवामान बाबतची माहिती दिलेली आहे, त्याबाबतचे कागदपत्र दाखल आहे. त्या माहिती आधारे तक्रारदार हे सदर पॉलीसी अंतर्गत नष्ट झालेल्या फळ पीक आंब्याची नुकसान भरपाई मिळण्याबाबत पात्र नाही. सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देण्यात कसूर केला आहे असे म्हणता येणार नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात यावी.
सामनेवाला क्र.2 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी निशाणी 12 अन्वये आपले लेखी निवेदन दाखल केलेले आहे. लेखी निवेदनासोबत निशाणी 13 वर पदमा केसरी मिश्रा यांचे शपथपत्र दाखल केले आहे. सामनेवाला क्र.2 यांचे कथन की, तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांचे बँकेत रक्कम रु.6,000/- भरणा करुन सामनेवाला क्र.1 यांच्या नावे डी.डी.काढलेला आहे. तक्रारीतील उर्वरीत मजकूर सामनेवाला क्र.2 यांनी स्पष्टपणे नाकारलेला आहे. सामनेवाला क्र.2 यांचे अधिक कथन असे की, दि.30.12.2012 रोजी सामनेवाला क्र.1 यांच्या नावे रक्कम रु.6,000/- चा डी.डी.काढण्यासाठी सामनेवाला क्र.2 बँकेत रक्कम भरणा केला होता. सामनेवाला क्र.1 यांना डी.डी. पाठविण्यात आलेला आहे. सामनेवाला क्र.1 यांना सदर डी.डी. मिळालेला आहे. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारास सेवा देण्यात कुठलाही कसूर केलेला नाही. सबब सामनेवाला क्र.2 विरुध्द तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात यावी.
तक्रारदार यांनी निशाणी क्र.4 अन्वये तक्रारीसोबत कागदपत्र दाखल केलेले आहे. तसेच पुराव्याकामी तक्रारदार यांचे शपथपत्र निशाणी क्र.16 अन्वये दाखल केले आहे. सामनेवाला यांनी दाखल केलेले कागदपत्र व लेखी जबाबाचे अवलोकन केले. तक्रारदार व सामनेवाला यांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1) सामनेवाला यांनी तक्रारदार यांना विम्याची
रक्कम न देऊन सेवेत त्रूटी ठेवली आहे, ही बाब
तक्रारदार यांनी सिध्द केली काय? नाही.
2) तक्रारीतील मागणी मिळण्यास तक्रारदार
पात्र आहेत काय? नाही.
3) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2ः- तक्रारदार यांनी आपले लेखी युक्तीवाद निशाणी क्र.19 अन्वये दाखल केले आहे. त्याचे अवलोकन केले असता तक्रारदार यांना सन 2012-2013 या वर्षासाठी गट नं.44 मध्ये 1 हेक्टर जमीनीअंतर्गत आंबा फळाचे पीक होते. सदर पिकांसाठी सामनेवाला यांच्याकडे रक्कम रु.6,000/- स्टेट बँक ऑफ हैद्राबाद येथे जमा केले होते. दुष्काळामुळे तक्रारदार यांचे आंब्याचे पीक नष्ट झाले. शासनाच्या यादीनुसार 50 टक्के पेक्षा कमी पैसेवारी व शासनाची मदत शिफारस प्रपत्रावरुन दिसून येते. सामनेवाला यांनी पिकाचे नुकसान झाल्याबाबत माहिती असतानाही नुकसान भरपाईची रक्कम तक्रारदार यांच्या खात्यामध्ये जमा केली नाही. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे दि.10.06.2014 रोजी चौकशी केली असता सामनेवाला यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक आहे. सामनेवाला यांनी विम्याची रक्कम न देऊन सेवा देण्यात त्रुटी ठेवली आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात यावी.
सामनेवाला क्र.1 यांचे वकील श्री.कुलकर्णी यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांनी तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे महाराष्ट्रात सन 2012 ते 2013 या वर्षी दुष्काळ व पाण्याअभावी तक्रारदाराचा आंबा पीक हा होरपळून नष्ट झालेला आहे. महाराष्ट्र शासन नियोजित फळ पीक व विमा योजनेअंतर्गतची हवामान आधारीत पॉलीसी सामनेवाला यांनी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद यांचे नावे काढलेली आहे. सदर पॉलीसीचा कालावधी हा दि.01.01.2013 ते 31.05.2013 पर्यंत आहे. तक्रारदार व सामनेवाला क्र.1 यांच्यामध्ये कोणताही करार नाही. तक्रारदार हे सामनेवाला क्र.1 यांचे ग्राहक नाही. तसेच सामनेवाला क्र.1 यांचे विमाधारक नाही. महाराष्ट्र शासनाने प्रायोगिक तत्वावरील हवामान आधारीत फळ पीक विमा योजना राबविलेली आहे. सदर योजनेत कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग शासन निर्णय क्रमांक विमायो 2012/प्र.क्र.166 “ 4” /14 ए या नुसार या योयजनेमध्ये आंबा फळ पीक समाविष्ट करण्यात आले आहे. सहपत्र 1 मध्ये नमुद केलेल्या जिल्हयामधील तालुक्यात सदर योजना लागू केलेली आहे. व सहपत्र 2 मधील नमुद केल्यानुसार हवामान आधारानुसार शेतक-यांना विमा कंपनी मार्फत नुकसान भरपाई देता येते. तक्रारदार यांनी सदरील फळ पीकाबाबत सामनेवाला क्र.2 यांना कळविणे गरजेचे आहे. तदनंतर सामनेवाला क्र.2 हे सदरील बाब ही सामनेवाला क्र.1 यांना कळविणे गरजेचे आहे. तक्रारदार यांनी कोणत्याही प्रकारची नोटीस सामनेवाला यांना दिलेली नाही. तसेच फळ पीक आंबा नष्ट झाल्याबाबत कोणत्याही प्रकारचा दस्तऐवज दाखल केलेला नाही. युक्तीवाद करत असताना वकीलांनी मंचाचे लक्ष दाखल केलेल्या कागदपत्रावर वेधले. सदरील महाराष्ट्र शासन निर्णयानुसार सदर पॉलीसी ही हवामान आधारीत पॉलीसी आहे. सामनेवाला क्र.2 यांनी दाखल केलेले हवामान बाबतची माहिती परिपत्रक यावर लक्ष वेधले. शासनाचे सहपत्र 2 नुसार अवेळी पाऊस किंवा जासत तापमान व कमी तापमान नुसार नुकसान भरपाई देण्यात येते. सामनेवाला यांनी सहपत्र 3 यावर मंचाचे लक्ष वेधले आणि त्यामध्ये स्पष्टपणे नुकसान भरपाई ठरविण्याची पध्दत निर्देशित केलेली आहे. क्रमांक 7 नुसार हवामान केंद्रामार्फत प्राप्त आकडेवारी ग्राहय धरण्यात येऊन त्यावर आधारीत योजनेच्या तरतुदीनुसार नियोजित करण्यात आलेली विमा रक्कम ही अंतिम राहील. तक्रारदार यांनी फळ पीक आंबा यांचे नुकसान हे विमा पॉलीसीच्या कालावधीत झालेले आहे ही बाब सिध्द केली नाही. तसेच तक्रारदाराची तक्रार ही कायद्यानुसार ग्राहय नाही. सबब तक्रारदाराची तक्रार रदद करण्यात यावी.
वर नमुद केलेले युक्तीवाद लक्षात घेतले. तसेच तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र व शपथपत्र याचे अवलोकन केले. सामनेवाला यांनी दाखल केलेले कागदपत्राचे अवलोकन केले. तक्रारदार हे व्यवसायाने शेतकरी आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या सातबाराच्या उता-यावरुन सन 2013 मध्ये तक्रारदार यांनी त्यांचे शेतात 1 हेक्टरमध्ये आंब्याचे फळ पीक आहे. सदर फळ पीक योजनेसाठी तक्रारदार यांनी विमा रक्कम रु.6,000/- चा भरणा सामनेवाला क्र.2 मार्फत सामनेवाला क्र.1 यांना पाठविलेले आहे असे निदर्शनास येते. सामनेवाला क्र.1 यांनी महाराष्ट्र शासन नियोजित फळ पीक योजनेअंतर्गत सामनेवाला क्र.2 यांच्या नावावर सदर विमा पॉलीसी काढली आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेले सुकत जाणा-या बागांसाठी अनुदान मागणी प्रपत्र याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, सदरील प्रपत्रावर कोणत्याही सक्षम अधिका-याची सही व शिक्का नाही. सबब ते प्रपत्र पुराव्यानिशी ग्राहय धरता येणार नाही. जर एखाद्या शेतक-यांचे काही नुकसान झाले असल्यास सदर नुकसानीबाबत तक्रारदार यांनी सक्षम अधिकारी यांच्याकडे अर्ज करुन नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करण्यासाठी कळविणे आवश्यक आहे, या बाबतचे कोणतेही अर्ज तक्रारदार यांनी सक्षम अधिका-यांकउे दिलेले निदर्शनास येत नाही. तक्रारदार यांनी त्यांचे शतात आंब्याचे पीक हे दरवर्षी किती प्रमाणे होत होते व त्यापासून किती उत्पन्न होत होते या बाबत कोणतेही कागदपत्र मंचासमोर दाखल केले नाही. तसेच तक्रारदार यांनी सदर घटनास्थळाची पाहणी करुन नुकसान झालेल्या पिकाबाबत कोणत्याही सक्षम कृषी अधिका-यांचा अहवाल मंचासमोर दाखल केलेला नाही. सबब तक्रारदार यांचे आंब्याचे फळ पिकांचे किती नुकसान झालेले आहे ही बाब तक्रारदार हे सिध्द करु शकले नाही. या उलट सदरील विमा पॉलीसी योजनेअंतर्गत सदरील विम्याची रक्कम ही हवामान आधारीत तत्वावर अवलंबून आहे. सामनेवाला यांनी दाखल केलेले महाराष्ट्र शासन निर्णय व एन.सी.एम.एस.एल. मंडळाचे हवामानबाबतचे परिपत्रक याचे अवलोकन केले. महाराष्ट्र शासनाने सहपत्र 2 मध्ये निर्देशित केलेले हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी तसेच नुकसान भरपाई कोणत्या तत्वावर आधारीत आहे असे सहपत्र 2 मध्ये नमुद केलेले आहे. त्याचे अवलोकन केले असता अवेळी झालेला पाऊस हा जर 5 मि.मि. पेक्षा जास्त झाल्यास सहपत्र 2 मध्ये नमुद केल्याप्रमाणे नुकसान भरपाई देता येते. तसेच जास्त तापमान व कमी तापमान याबाबत सुध्दा सहपत्र 2 मध्ये नमुद केल्याप्रमाणे नुकसान भरपाई देता येईल. सामनेवाला यांनी दाखल केलेले हवामान बाबतचे परिपत्रक याचे अवलोकन केले असता दि.1 जानेवारी 2013 ते 31 मे 2013 पर्यंत दैनंदिन पाऊस हा 5 मि.मि. पेक्षा जास्त झाल्याचे निदर्शनास येत नाही. तसेच 38.5 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान झाल्याचे निदर्शनास येत नाही. तसेच सहपत्र 2 मध्ये नमुद केल्याप्रमाणे कमी तापमान हे 9 डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी झाल्याचे निदर्शनास येत नाही. सबब तक्रारदार यांनी त्याचे शेतात झालेले फळ पीक आंब्याचे नुकसान एकंदरीत किती झाले व कशाप्रमाणे झाले याबाबतचा कोणताही ठोस पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. सदर विमा पॉलीसी ही हवामान आधारीत तत्वावर अवलंबून असल्यामुळे हवामान बाबतच्या परिपत्रकानुसार सन 2012 ते 2013 या वर्षाकरता कोणत्याही प्रकारचा अवेळी पाऊस किंवा जास्त तापमान किंवा कमी तापमान असे सलग 3 दिवस असल्याचे निदर्शनास येत नाही. यावरुन सामनेवाला यांनी तक्रारदारास विमा रक्कम न देऊन सेवा देण्यात त्रुटी ठेवली आहे असे म्हणता येणार नाही. तक्रारदार यांनी आंबा या फळ पिकाचे किती नुकसान झाले ही बाब सिध्द करु शकले नाही. यावरुन मंचाचे असे मत आहे की, तक्रारदाराची तक्रार रदद होणेस पात्र आहे. सामनेवाला क्र.1 यांनी विमा रक्कम न देऊन सेवा देण्यात त्रुटी ठेवली आहे असे म्हणता येणार नाही. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारास सेवा देण्यात त्रुटी ठेवली आहे असे म्हणता येणार नाही. सबब तक्रारदाराची तक्रार रदद होणेस पात्र आहे. म्हणून मुददा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदार यांची तक्रार रदद करण्यात येत आहे.
2) खर्चाबददल आदेश नाही.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर, श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड