निकाल
दिनांक- 03.03.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार शितल ऊर्फ सिता संजय खंडागळे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे, तक्रारदार हे मौजे चुंबळी ता.पाटोदा जि.बीड येथे राहतात. तक्रारदार यांचे पती संजय विठठल खंडागळे यांचा दि.28.01.2012 रोजी विषबाधा होऊन मृत्यू झाला. मयत संजय हे शेतकरी होते. महाराष्ट्र शासनाने शेतक-याच्या हितासाठी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना लागू केली आहे. सामनेवाले क्र.4 दि न्यू इंडिया अँशोरन्स कंपनी पुणे यांचेकडे विम्याची रक्कम भरली आहे. तक्रारदार यांनी दि.10.5.2012 रोजी आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करुन क्लेम सामनेवाले क्र.2 कृषी अधिकारी यांचेकडे दाखल केला. सामनेवाले क्र.2 यांचेकडून क्लेम प्राप्त झाल्यानंतर एक महिन्याचे आंत कागदपत्राची पडताळणी करुन क्लेम मंजूर करणे आवश्यक आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 यांचेकडे क्लेम दाखल केल्यानंतर वेळोवेळी विम्याची रक्कम मिळणे बाबत चौकशी केली. तक्रारदार यांनी संपूर्ण कागदपत्राची पूर्तता केलेली असतानाही सामनेवाले क्र.2 यांनी घटनास्थळ पंचनामा नाही असे तक्रारदार यांना कळविले व तक्रारदार यांस शेतकरी व्यक्तीगत अपघात विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे. तक्रारदार यांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. सबब, तक्रारदार यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम रु.1,00,000/-देण्याचे आदेश व्हावेत तसेच शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.30,000/- दयावेत व तक्रारीचा खर्च रु.5,000/- दयावा अशी मागणी केली आहे.
सामनेवाले क्र.1 व 2 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाले क्र.1 व 2 यांचे कथन की,दि.05.09.2012 रोजी तक्रारदार यांचा क्लेम सामनेवाले क्र.3 यांचेकडे पूढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला आहे.शासनाने राज्यातील शेतक-याच्या वतीने विमा हप्त्याची रक्कम सामनेवाले क्र.4 कंपनीस दिलेली आहे. तक्रारदार हे सामनेवाले क्र.1 व 2 यांचे ग्राहक नाहीत. शेतक-याच्या हिताचे दृष्टीने शासनाने एक कल्याणकारी योजना म्हणून शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना सूरु केली आहे. सामनेवाले क्र.1 व 2 यांनी कोणतीही सेवेत त्रूटी ठेवली नाही. सबब, सामनेवाले क्र.1 व 2 यांचे विरुध्द तक्रार रदद करण्यात यावी.
सामनेवाले क्र.3 यांना नोटीस तामीन न होता परत आली. तक्रारदार यांना नोटीस तामील करणे बाबत कोणतीही कारवाई केली नाही.
सामनेवाले क्र.4 विमा कंपनी हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी नि.15 अन्वये लेखी म्हणणे दाखल केले. सामनेवाले क्र.4 यांचे कथन की, तक्रारदार यांचे क्लेमच्या कामी कोणतेही कागदपत्र मिळाले नाही. त्यामुळे सामनेवाले क्र.2 यांनी सेवेत त्रूटी ठेवली नाही. तक्रारदार यांचे पती हे सामनेवाले क्र.4 यांचे ग्राहक नाहीत. तक्रारदार यांचे पतीचे अपघाताने मृत्यू झाला ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केलेली नाही. तक्रारदार यांची तक्रार रदद करण्यारत यावी.
तक्रारदार यांनी नि.3 सोबत पाटोदा पोलिस स्टेशन येथे दिलेली खबर. आकस्मीक मृत्यूची खबर, शवविच्छेदन अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र, 7/12 चा उतारा, कृषी अधिकारी यांचेकडे दाखल केलेला क्लेमच्या छायांकित प्रती, तक्रारदार यांनी नि.18 सोबत वर नमूद केलेले कागदपत्र पुन्हा दाखल केले. तक्रारदार यांनी स्वतःचे शपथपत्र नि.12 अन्वये दाखल केले आहे. सामनेवाले क्र.4 यांनी शपथपत्र नि.16 अन्वये दाखल केले.
तक्रारदार यांचे वकील श्री. काकडे यांचा यूक्तीवाद ऐकला. सामनेवाले क्र.4 चे वकील श्री. महाजन यांचा यूक्तीवाद ऐकला. सामनेवाले क्र.1 व 2 यांनी दाखल केलेले लेखी कैफियत लक्षात घेतली. तक्रारदार यांनी नि.24 अन्वये लेखी यूक्तीवाद दाखल केला त्यांचे अवलोकन केले. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. तक्रारदार याचे पती प्रपत्र ड मध्ये नमूद केलेल्या
अपघातामध्ये मयत झाले ही बाब तक्रारदार शाबीत
करतात काय ? नाही.
2. सामनेवाले क्र.4 यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत
त्रुटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केली आहे
काय ? नाही.
3. तक्रारदार हे तक्रारीत मागणी केलेली रक्कम मिळणेस पात्र
आहेत काय ? नाही.
4. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 4 ः-
तक्रारदार यांचे वकील श्री. काकडे यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू विषबाधेमुळे झाला. तक्रारदार यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत क्लेम सामनेवाले क्र.2 यांचेकडे सादर केला. सामनेवाले क्र.2 यांनी सदरील क्लेम सामनेवाले क्र.3 यांचेकडे पूढील कार्यवाहीसाठी पाठविला. सामनेवाल क्र.4 यांनी अद्यापपावेतो तक्रारदार यांचा क्लेम मंजूर केला नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना नोटीस देऊनही त्यावर उचित कारवाई करण्यात आली नाही. तक्रारदार यांचे पती व्यवसायाने शेतकरी होते. शासनाने सुरु केलेल्या योजने अंतर्गत तक्रारदार हे त्यांचे पतीचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे विमा रक्कम रु.1,00,000/- मिळण्यास पात्र आहेत. सामनेवाले यांनी सदरील रक्कम दिलेली नाही. सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे. सबब, तक्रारदार यांची तक्रार मंजूर करण्यात यावी.
सामनेवाले क्र.4 यांचे वकील श्री. महाजन यांनी असा युक्तीवाद केला की,तक्रारदार यांनी दाखल केलेला क्लेम सामनेवाले क्र.4 यांना प्राप्त झालेला नाही. तसेच तक्रारदार यांचे पती हे प्रपत्र ड मध्ये नमूद केलेल्या अपघातातील कारणामुळे मयत झालेले नाहीत. तक्रारदार हे सामनेवाले क्र.4 यांचे ग्राहक नाहीत. तक्रारदार यांचा क्लेम प्राप्त न झाल्यामुळे सामनेवाले क्र.4 यांनी सेवेत त्रूटी ठेवली नाही.
तक्रारदार यांचे कथन की, त्यांचे पतीस विषबाधा झाली त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. सबब, शासन निर्णय कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग पीएआयएस 1205/प्र.क्र.310/11अ दि.07.07.2006 रोजीचे सहपत्र प्रपत्र ड मध्ये नमूद केलेल्या अपघाताचे स्वरुपामुळे तक्रारदार यांचे पतीचे निधन झाले आहे किंवा काय हे पाहणे गरजेचे आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या दस्ताचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांनी त्यांचे पतीच्या मृत्यूची खबर पोलिस स्टेशन पाटोदा येथे दि.28.1.2012 रोजी दिलेली आहे. तक्रारदार यांनी त्यांचा पत्ता रा. चुंगळी असा दिलेला आहे. तक्रारदार व त्यांचे पती दिपक खाडसरी उदयोग सासवडे येथे काम करीत होते. दि.27.1.2012 रोजी तक्रारदार व त्यांचे पती त्यांचे घरामध्ये झोपलेले होते. सकाळी तक्रारदार यांचे पती झोपेतून उठले नाही. त्यांनी आजूबाजूचे लोकांना बोलावले व त्यांचे पतीला हालवून उठवण्याचा प्रयत्न केला. तक्रारदार यांचे पतीचे अंग ताठलेले होते व ते मयत झालेले होते. तक्रारदार यांनी सदरील मयता बाबत खबर संबंधीत पोलिस स्टेशनला दिली नाही. तदनंतर तक्रारदार यांनी त्यांचे पतीचे प्रेत जिपमध्ये घेऊन त्यांचे चुबंळे गांवी घेऊन आले. तक्रारदार यांनी त्यांचे पतीस गुजरात राज्यात कोणत्याही दवाखान्यात दाखवले नाही. सदरील प्रेत पाटोदा जि.बीड या दवाखान्यात नेण्यात आले. पोलिसांनी प्रेतावर इन्क्वेस्ट पंचनामा केला. प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविले. तक्रारदार यांनी खबरी रिपोर्टमध्ये त्यांचे पती झोपेत मयत पावले आहे असे लिहीले आहे.तक्रारदार यांचे पतीला विषबाधा झाल्यामुळे ते मयत झाले आहे या बाबत उल्लेख आढळत नाही. तक्रारदार यांचे पतीवर शवविच्छेदन अहवाल करण्यात आल. शवविच्छेदन अहवाल या मंचा समोर हजर केलेला आहे. तक्रारदार यांचे पतीचे मृत्यूचे कारण डॉक्टरांनी तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू “died due to cardiac failure due to myocardial infection ” तक्रारदार यांचे पतीचे शवविच्छेदना मध्ये तक्रारदार यांनी पती विषबाधेमुळे मयत झाले आहेत हे आढळून आलेले नाही.
शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत अपघाताचे पुराव्यासाठी सादर करावयाचे कागदपत्र व अपघाताचे स्वरुप प्रपत्र ड मध्ये नमूद केलेले आहे. प्रपत्र ड मध्ये एकूण 13 प्रकारचे अपघाताचे स्वरुप दिलेले आहेत. सदर अपघाताचे स्वरुप लक्षात घेतले असता तक्रारदार यांनी त्यांचे पतीचे मृत्यू प्रपत्र ड मध्ये नमूद केलेल्या अपघातामुळे झाला आहे हे शाबीत करणे गरजेचे आहे. तक्रारदार यांचे कथन की, त्यांचे पती विषबाधेमुळे मयत झाले परंतु डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवाल दिला त्यांचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे पतीचे शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे विष आढळून आले नाही अगर त्यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला आहे असे नमूद केलेले नाही. तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू हा “Cordial failure due to myocardial infection ” मुळे झाला आहे. म्हणजेच सदरील मृत्यू हा हार्डअँटक मुळे झाला आहे असे प्रथमदर्शनी दिसते. त्यांच कारणास्तव तक्रारदार हे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विम्याची रक्क्म मिळण्यास पात्र नाहीत.
सामनेवाले क्र.4 ही शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम देणारी संस्था आहे. विम्याची रक्कम मिळण्यासाठी क्लेम हा सामनेवाले क्र.1 व 2 मार्फत सामनेवाले क्र.3 कडे पाठविला जातो. सामनेवाले क्र.3 हे तो क्लेम सामनेवाले क्र.4 यांचेकडे पाठवितात. सामनेवाले क्र.3 हे दाव्यामध्ये पक्षकार म्हणून सामील आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.3 यांना नोटीस बजावणीसाठी कोणतीही तजविज केली नाही. त्यामुळे सामनेवाले क्र.3 यांचेवर नोटीस बजावता आली नाही. सबब, क्लेम सामनेवाले क्र.3 यांना प्राप्त झाला किंवा काय या बाबत बोध होत नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.3 यांचेवर नोटीस बजावणी कामी तजविज केली नाही. त्यामुळे तो क्लेम सामनेवाले क्र.3 यांना प्राप्त झाला असा निष्कर्ष काढता येणार नाही. वर नमूद केलेल्या सर्व कारणमिंमासे वरुन तक्रारदार यांनी त्यांचे पतीचा मृत्यू शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत नमूद केलेल्या अपघाताच्या स्वरुपात झाला ही बाब शाबीत केलेली नाही. तसेच सामनेवाले क्र.4 यांनी तक्रारदार यांनी दाखल केलेला क्लेम प्राप्त झाला नाही. त्यामुळे त्यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केलेली नाही. सबब, तक्रारदार यांची तक्रार रदद होण्यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे.
सबब, मुददा क्र.1 ते 4 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.
जयंत पारवेकर
लघुलेखक