द्वारा- श्री. एस.के.कापसे, मा. सदस्य
:- निकालपत्र :-
दिनांक 16 जानेवारी 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडून दुचाकी कर्ज रुपये 30,504/- घेतले होते. कर्जाचा हप्ता 34 महिन्यांकरिता दरमहा रुपये 1,101/- प्रमाणे दिनांक 5/12/2005 रोजी सुरु होऊन दिनांक 5/9/2008 रोजी संपणार होता. तक्रारदारांनी दिनांक 5/5/2007 पर्यन्त 18 हप्ते नियमित भरले नंतर मात्र आजारपण व इतर कारणांमुळे हप्ते भरु शकले नाहीत. तक्रारदारांनी पोस्ट डेटेड चेक्स न भरण्याची जाबदेणार यांना विनंती केली व रुपये 7713/- रक्कम रोख स्वरुपात जाबदेणारांकडे जमा केली. तक्रारदारांनी एकूण कर्ज रक्कम रुपये 37,434/- पैकी रुपये 27,531/- भरलेले आहेत, फक्त रुपये 9903/- कर्ज शिल्लक होते. तक्रारदारांनी ती रक्कम देखील जाबदेणार यांच्या डी.एस.टी खात्यात भरली व जाबदेणार तक्रारदारांना नो डयुज प्रमाणपत्र देणार होते परंतु काही तांत्रिक अडचणी सांगून जाबदेणार यांनी ते दिले नाही. उलट जाबदेणारांनी दिनांक 30/3/2010 रोजी तक्रारदारांच्या दुकानाजवळील दुचाकी उचलून नेली. तक्रारदारांनी विश्रामबाग पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदविली. गाडीच्या डिकीमध्ये गाडीचे सर्व मुळ कागदपत्रे, दुकानाचे अॅग्रीमेंट पेपर व इतर काही महत्वाची कागदपत्रे होती. जाबदेणार यांनी 2007 पासून तक्रारदारांशी कोणताही संपर्क साधला नाही. चौकशी अंती तक्रारदारांना जाबदेणार क्र. 2 यांनी दुचाकी/गाडी विकून टाकल्याचे कळले. तक्रारदारांनी जाबदेणार यांना दिनांक 27/4/2010 रोजी पत्र पाठविले. जाबदेणार यांनी तक्रारदारांना पत्र पाठविले परंतू त्यातील मजकूर तक्रारदारांना मान्य नाही. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून नुकसान भरपाई पोटी रुपये 60,000/- किंवा रुपये 15,000/- 12 टक्के व्याजासह तसेच सुस्थितीतील गाडी मागतात. तसेच तक्रारीचा खर्च रुपये 5000/- व नो डयुज प्रमाणपत्र मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. तक्रारदारांनी गाडी व्यवसायासाठी खरेदी केलेली होती त्यामुळे मा. मंचास प्रस्तूत तक्रार चालविण्याचा अधिकार नाही. तक्रारदार व जाबदेणार यांच्यात करार होऊन त्यानुसार जाबदेणार यांनी तक्रारदारांना रुपये 30,504/- कर्ज दिले होते. तक्रारदारांनी पहिले दरमहा 13 हप्तेच नियमित भरले. तक्रारदारांनी दुचाकी कर्जाव्यतिरिक्त जाबदेणारांकडून इतरकर्जे – वैयक्तिक कर्ज रुपये 20,690/-, धंदयासाठी कर्ज रुपये 4,00,000/-, सी बी ओ पी कर्ज रुपये 2,20,000/-, 3,30,000/- व रुपये 2,21,861/- घेतले होते. सर्व कर्जांपोटी एकूण रुपये 22,00,000/- तक्रारदारांकडून येणे बाकी आहेत. तक्रारदारांकडून रोख स्वरुपात दिनांक 11/7/2007 रोजी रुपये 1100/-, दिनांक 3/10/2007 रोजी रुपये 1107/-, 28/11/2007 रोजी रुपये 2202/-, दिनांक 28/2/2008 रोजी रुपये 1101/- मिळाल्याचे मान्य करतात परंतू त्यादिवशी तक्रारदारांकडून प्रत्यक्षात येणे असलेली रक्कम अधिक होती. तक्रारदारांनी दिलेले दरमहा पोस्ट डेटेड चेक्स डिसऑनर झाले. तक्रारदारांनी करारानुसार ठरलेल्या अटी व शर्तीचे पालन केले नाही. तक्रारदारांबरोबर झालेला करार दिनांक 5/9/2008 रोजी टर्मिनेट करण्यात आला होता. तक्रारदार उर्वरित रक्कम रुपये 16,950/- भरु शकले नाहीत. उर्वरित कर्जाची रक्कम भरण्यास सांगूनही तक्रारदारांनी रक्कम भरली नाही. करारामध्ये ठरलेल्या अधिकारांचा उपयोग करित जाबदेणार यांनी तक्रारदारांची गाडी/दुचाकी दिनांक 30/3/2010 रोजी ताब्यात घेतली व त्याचदिवशी तक्रारदारांना उर्वरित रक्कम रुपये 27,487/- दिनांक 6/4/2010 पर्यन्त भरुन गाडी परत नेण्याचे सांगितले होते. परंतू दिलेल्या मुदतीमध्ये तक्रारदार रक्कम भरु शकले नाहीत त्यामुळे दिनांक 9/4/2010 रोजी रुपये 16,600/- या किंमतीस गाडी विकण्यात आली व जाबदेणार यांना रुपये 10,887/- चे नुकसान झाले. जाबदेणार यांच्या सेवेत त्रुटी नाही म्हणून तक्रार खर्चासह नामंजुर करण्यात यावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
3. उभय पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडून दुचाकीसाठी कर्ज रुपये 30,504/- घेतले होते. कर्ज कालावधी 34 महिने, दरमहा हप्ता रुपये 1,101/- ठरला होता. कराराप्रमाणे हप्ता दिनांक 5/12/2005 रोजी सुरु होऊन दिनांक 5/9/2008 रोजी संपणार होता या बाबी निर्वीवाद आहेत. तक्रारदारांनीच तक्रारीमध्ये दिनांक 5/5/2007 पर्यन्त 18 हप्ते नियमित भरले नंतर मात्र आजारपण व इतर कारणांमुळे हप्ते भरु शकले नाहीत हे मान्य केलेले आहे. जाबदेणार यांनी दाखल केलेल्या पोस्ट डेटेड चेक्स डिसऑनर स्टेटमेंटचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी दिलेले दिनांक 5/11/2006 पासून दिनांक 5/9/2009 पर्यन्तचे पोस्ट डेटेड चेक्स बाऊन्स झाल्याचे दिसून येते. तक्रारदारांचे कर्ज जर तक्रारदारांनी नियमित भरले असते तर दिनांक 5/9/2008 रोजीच संपणार होते. परंतू तक्रारदारांनी मान्य केल्याप्रमाणे व वर नमूद केलेल्या जाबदेणार यांनी दाखल केलेल्या स्टेटमेंट प्रमाणे तक्रारदार कर्ज परत फेडतांना डिफॉल्टर असल्याचे दिसून येते. तक्रारदारांनी जरी तक्रारीत डी.एस.टी खात्यामध्ये रुपये 9903/- रक्कम भरल्याचे नमूद केलेले असले तरी सदरहू रक्कम नक्की कधी भरली, कशी भरली यासंदर्भातील पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार कर्ज भरल्यानंतर जाबदेणार नो डयुज प्रमाणपत्र देणार होते, परंतू तक्रारदारांनी यासदंर्भात जाबदेणारांकडे केलेल्या पाठपुरावा संदर्भातील कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदारांची गाडी/दुचाकी जाबदेणारांकडे गहाण असल्यामुळे, तक्रारदार कर्ज परतफेड करतांना डिफॉल्टर असल्यामुळे जाबदेणार यांनी तक्रारदारांची गाडी ताब्यात घेतली व तक्रारदारांना उर्वरित कर्जाची रक्कम रुपये 27487/- दिनांक 6/4/2010 पर्यन्त भरुन गाडीचा ताबा घ्यावा असे कळविल्याचे दिनांक 30/3/2010 च्या दाखल पत्रावरुन दिसून येते. तसेच सदरहू रक्कम न भरल्यास गाडीची विक्री करुन ती रक्कम कर्ज खात्यात वळती केली जाईल असेही पत्रात नमूद केल्याचे दिसून येते. तरी देखील तक्रारदारांनी कर्जाची उर्वरित रक्कम भरलेली नव्हती ही बाब स्पष्ट होते. म्हणून जाबदेणार यांनी दिनांक 9/4/2010 रोजी तक्रारदारांच्या गाडीची विक्री करुन रुपये 16,600/- तक्रारदारांच्या कर्ज खात्यात दिनांक 15/4/2010 रोजी जमा करण्यात आल्याचे तक्रारदारांनी दाखल केलेल्या त्यांच्या कर्ज खात्याच्या दिनांक 21/10/2005 ते 14/08/1010 या कालावधीच्या स्टेटमेंट वरुन दिसून येते. यासर्वांवरुन जाबदेणार यांच्या सेवेतील कमतरता दिसून येत नाही. म्हणून तक्रारदारांची तक्रार अमान्य करण्यात येत आहे. वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार नामंजुर करण्यात येत आहे.
2. खर्चाबद्दल आदेश नाही.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.