निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. श्री. आर.एच.बिलोलीकर, सदस्य)
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार प्रणिता भ्र. पांडूरंग शिंदे ही मयत शेतकरी पांडूरंग देवराव शिंदे यांची पत्नी आहे. अर्जदाराचे मयत पती यांचा दिनांक 07.02.2013 रोजी त्यांच्या गावातील काही व्यक्तींनी शेतीच्या रस्त्याच्या वादावरुन भांडण करुन खुन केल्याने त्यांचा अपघाती मृत्यु झाला. पोलीस स्टेशन हदगांव जिल्हा नांदेड यांनी गुन्हा क्रमांक 11/2013 कलम 302,307 भा.द.वि. प्रमाणे गुन्हा नोंदवून घटनास्थळ पंचनामा केला. अर्जदाराचे पती हे व्यवसायाने शेतकरी होते त्याचे नावाने मौजे ऊंचेगांव,तालुका हदगांव, जिल्हा नांदेड येथे गट क्रमांक 70सी,70एफ, 83/ए/1, 83/ए/2,84/6 मध्ये एकूण 01 हेक्टर 76 आर एवढी शेतजमीन होती व ते त्या शेतीचे मालक व ताबेदार होते. शेतकरी या नात्याने तो महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेचा लाभार्थी होता, ज्याची पॉलिसी गैरअर्जदार यांचेकडे महाराष्ट्र शासनाने घेतली होती. अर्जदार यांनी पतीचे मृत्युचे पश्चात गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे दिनांक 15.08.2013 रोजी विमा रक्कम मिळणेसाठी अर्ज केला होता. तालुका कृषि अधिकारी यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,नांदेड यांना अर्जदाराचा विमा प्रस्ताव पाठविला होता. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,नांदेड यांनी गैरअर्जदार क्र. 3 यांना सदर प्रस्ताव पाठवला. गैरअर्जदार क्र. 2 यांना अर्जदाराचा विमा प्रस्ताव गैरअर्जदार क्र. 3 मार्फत प्राप्त झाला आहे. गैरअर्जदार यांनी सदर प्रस्तावास ए 0024080 असा क्रमांक दिलेला आहे व दिनांक 15.03.2014 रोजी पत्र पाठवून अर्जदारास कळविले आहे की, गैरअर्जदार यांनी दिनांक 15.01.2014 व दिनांक 03.03.2014 रोजी त्रुटींची कागदपत्रांची पुर्तता करणेसंबंधी कळविले असतांना अर्जदाराने पुर्तता केली नाही. म्हणुन सदर दावा बंद करण्यात येतो. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 2 यांना दिनांक 03.03.2014 रोजीच्या पत्राव्दारे मागणी केलेली कागदपत्रे ही दिनांक 18.07.2014 रोजी नोंदणीकृत डाकेव्दारे पाठवलेली आहेत. सदरची कागदपत्रे गैरअर्जदार क्र. 2 यांना प्राप्त होऊनही अर्जदाराचा दावा आजपर्यंत निकाली काढलेला नाही. म्हणुन अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केलेली आहे व तक्रारीमध्ये अर्जदार यांनी विम्याची रक्कम रु.1,00,000/- द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह व्याजासह गैरअर्जदार यांचेकडून अर्जदारास देण्याचा आदेश करावा. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व दावा खर्च रु.5,000/- इत्यादी रक्कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार क्र. 1 यांना नोटीस तामील होऊनही ते प्रकरणात हजर झालेले नाहीत. गैरअर्जदार क्र. 2, विमा कंपनी यांना नोटीस तामील झाल्यानंतर त्यांचेतर्फे †ò›ü.अविनाश जी.कदम यांनी वकीलपत्र दाखल केले. परंतु त्यांना अनेक संधी देऊनही लेखी जबाब दाखल केलेला नाही. दिनांक 11.02.2015 रोजी गैरअर्जदार क्र. 2 यांचेविरुध्द नोसेचा आदेश पारीत करण्यात आला. गैरअर्जदार क्र. 3 यांचा लेखी जबाब पोस्टाव्दारे प्राप्त झाला.
गैरअर्जदार क्र. 3 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. अर्जदाराचे सदरील प्रकरणामध्ये गैरअर्जदार क्र. 3 यांची व्यवहारातील भुमिका मर्यादीत आहे. महाराष्ट्र शासन, गैरअर्जदार क्र. 3 व विमा कंपनी यांचेत त्रीपक्षीय करार झालेला असून सदरील करारामध्ये नमुद केलेली मध्यस्थाची भुमिका गैरअर्जदार पार पाडत असतात. गैरअर्जदार क्र. 3 यांचे काम हे फक्त करारातील तरतुदीनुसार दावे स्विकारणे,त्यांची छाननी करणे, विमा दाव्याच्या तसेच अपघाताच्या प्रकारानुसार दाव्याच्या विचारासाठी विमा कंपनीस आवश्यक असलेले दस्तऐवज शासनाच्या जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयातून गोळा करणे, मुदतीत प्राप्त दस्तऐवजाची छाननी करुन विमा कंपनीस सादर करणे ,त्रुटी असल्यास त्याचा पाठपुरावा करुन पुर्तता करणे व ताबडतोब दावे विमा कंपनीस पाठविणे एवढेच आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 3 हे फक्त सेवा प्रदान करीत असते. सबब गैरअर्जदार क्र. 3 यांना जबाबदार धरण्यात येऊ नये अशी विनंती लेखी जबाबाव्दारे गैरअर्जदार क्र. 3 यांनी केलेली आहे.
5. अर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. अर्जदार यांचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
6. अर्जदार यांचे पती हे शेतकरी होते हे अर्जदाराने दाखल केलेल्या सातबारा उता-यावरुन स्पष्ट आहे. अर्जदाराचा मयत पती हे शेतकरी या नात्याने महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेचा लाभार्थी होते हे स्पष्ट आहे. अर्जदाराचे पतीचा मृत्यु अपघातमुळे झालेला असल्याचे दाखल पोलीस पेपर्सवरुन सिध्द होते. अर्जदार यांनी त्यांचे पतीचे मृत्यु नंतर गैरअर्जदार क्र. 1 तालुका कृषी अधिकारी यांचेकडे विमा प्रस्ताव दाखल केला तालुका कृषि अधिकारी यांनी तो प्रस्ताव जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,नांदेड यांचेकडे पाठवला व तो गैरअर्जदार क्र. 2 यांना गैरअर्जदार क्र. 3 यांचेमार्फत प्राप्त झाला. गैरअर्जदार क्र. 2 यांनी सदर प्रस्तावात त्रुटी असल्यामुळे त्रुटींची पुर्तता करण्यासाठी अर्जदारास पत्र पाठवली. अर्जदाराने सदर त्रुटींची पुर्तता दिनांक 18.07.2014 रोजी केली. परंतु त्याआधीच गैरअर्जदाराने सदरचा विमा प्रस्ताव बंद केला. अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केल्यानंतर देखील गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा दावा निकाली काढलेला नाही. वरिष्ठ न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निवाडयानुसार विमा कंपनीने अर्जदाराचा विमा प्रस्ताव वेळेत दाखल केला नाही या तांत्रिक मुद्यावर नाकारु नये. असे असतांना, विमा कंपनीने अर्जदाराचा विमा प्रस्ताव अयोग्य कारणावरुन नाकारलेला असल्याचे दिसून येते. वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार क्र. 2, विमा कंपनी यांनी अर्जदारास विम्याची रक्कम रु.1,00,000/- दिनांक 15.03.2014 दावा नाकारल्याच्या तारखेपासून द.सा.द.शे.6 टक्के व्याजासह आदेश कळाल्यापासून तीस दिवसाच्या आत द्यावेत.
3. गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदार यास सेवेत त्रुटी दिल्याबद्दल मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 2000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/- आदेश कळाल्यापासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
4. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.
5. वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारांनी निकालाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेसाठी ठेवण्यात यावे.
MR'>5. वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारांनी निकालाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेसाठी ठेवण्यात यावे.