(आदेश पारीत व्दारा- श्रीमती.चारु वि.डोंगरे, मा.सदस्या)
1. तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे. म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केलेली आहे.
2. तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात येणे खालील प्रमाणेः-
तक्रारदार यांनी आय.एन.जी.लाईफ इन्शुरन्स कंपनीकडे काही रकमेची गुंतवणूक केली होती. त्या रकमेचा हिशोब रु.77,557.27 पैसे असा होता. सदरच्या पुर्वीच्या कंपनीने तक्रारदाराला असे सुचविले की, आय.एन.जी. मार्केटशिल्ड नावाची चांगली पॉलीसी आहे. त्यामुळे तुम्ही गुंतवणूक करा. त्याचा वार्षिक हप्ता रु.50,000/- इतका आहे. तुमचे आमच्याकडे असलेल्या रु.77,557.27 पैसे पैकी पहिला हप्ता जावून राहिलेल्या रु.27,557/- मध्ये आम्ही बाकीचे पैसे टाकून रु.50,000/- दुसरा हप्ता कंपनी भरेल असे सांगितले. कंपनीच्या कर्मचा-याचे बोलण्यावर विश्वास ठेवून आय.एन.जी. कंपनीने दिलेल्या प्लॅन नुसार कंपनीकडे जमा असलेल्या रकमेपैकी रु.50,000/- चा पहिला हप्ता दिनांक 28.02.2013 रोजी वर्ग करण्यात आला. उर्वरीत रक्कम रुपये 27,557.27 पैसे कंपनीकडे बॅलन्स अकाऊंट म्हणून ठेवून घेतली. सदरहू पॉलीसीचा नं.02033739 असा आहे. आय.एन.जी. कंपनीचे अधिका-यांनी सांगितल्याप्रमाणे सदरहू पॉलीसीचा दुसरा हप्ता आय.एन.जी.लाईफ इन्शुरन्स कंपनी भरणार होती. परंतू दरम्यानच्या काळात आय.एन.जी लाईफ इन्शुरन्स कंपनी त्यानंतर सामनेवाला एक्साईड लाईफ इन्शुरन्स कंपनीने टेकओवर केली. त्यानंतर सामनेवाला एक्साईड लाईफ इन्शुरन्स कंपनीने दुसरा हप्ता दिनांक 28.02.2014 रोजी देय होता. त्यावेळी रक्कम रु.22,000/- ची मागणी तक्रारदाराकडे केली. परंतू तक्रारदाराने “ असे काही ठरलेले नाही ” म्हणून पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर दिनांक 03.11.2015 रोजी तक्रारदाराला त्यांचे मोबाईलवर फोन आला. त्यानुसार “ तुमचा पॉलीसी नं.26333739 असा असून तुम्ही दोन वर्षाचा पॉलीसी प्रिमीयमचा हप्ता भरला नाहीतर तुमचे सामनेवाला एक्साईड लाईफ इन्शुरन्स कंपनीकडे जमा असलेली रक्कम सामनेवाला कंपनी जमा करेल. त्यासाठी तुम्ही दोन हप्त्याची रक्कम रुपये 1,00,000/- चा चेक व त्यासंबंधीचा विनंती अर्ज खालील पत्त्यावर पाठवा व चेकची रक्कम रु.1,00,000/- “T.A.L.K. या नावाने पाठवा असे तक्रारदारास कळविले व खालीलप्रमाणे पत्ता फोनवरुन दिला तो असा एक्साईड लाईफ इन्शुरन्स, डी.242, सेक्टर 63, नोयडा 201 301 पाठविण्यास सांगितले. ” त्यानंतर सुमारे दहा दिवसांनी तक्रारदारास त्यांच्या मोबाईलवर फोन करुन व तक्रारदारास सांगितले की, पॉलीसी बोनस भरुन एकुण रक्कम रुपये 2,98,000/- सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा राजिंदर नगर, शाहिदाबाद, गाजियाबाद या शाखेत कंपनीच्या/ तक्रारदाराच्या अकाऊंटला जमा झालेली आहे. परंतू काही बँकींग क्लियरन्स प्रोसिजर करणे बाकी आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला वर नमुद बँकेतील कंपनीचा अकाऊंट नंबर 3465514431 आय.एफ.एस.सी. कोड सी.बी.आय.एन 0283314 कंपनी नांव T.A.L.K या खात्यामध्ये आर.टी.जी.एस. मध्ये रक्कम रु.99,999/- जमा केल्यानंतर तुम्हास एक तासाचे आत तुमची संपुर्ण रक्कम रुपये 3,98,000/- तुमच्या खात्यावर बडोदा बँक शाखा-संगमनेर येथे जमा होईल असे सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने बडोदा बँक शाखा संगमनेर अकौंटमधुन सामनेवाला कंपनीस रु.99,999/- जमा केले. अशा प्रकारे तक्रारदाराला फोन केला. व तक्रारदाराची फसवणुक करण्यात आली आहे. सदरच्या फसवणुकी संदर्भात तक्रारदाराने संगमनेर शहर पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदविली आहे. तक्रारदाराने दिनांक 26.11.2015 रोजी वकीलामार्फत सामनेवाला कंपनीस नोटीस बजावणी केली. अशा प्रकारे सामनेवाला यांनी तक्रारदाराची फसवणुक केली आहे. त्यामुळे तक्रारदाराने मंचात तक्रार दाखल करुन परीच्छेद क्र.14 प्रमाणे मागणी केली केली आहे.
3. सामनेवाला यांनी त्यांची लेखी कैफियत निशाणी क्र.15 वर दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी असे कथन केले आहे की, सामनेवाला यांनी प्रथम प्राथमिक मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांचे लेखी कैफियतीमध्ये कथन केले आहे की, संपुर्ण तक्रारदाराचे तक्रारीतील कथन नाकबूल आहे. तक्रारदाराची तक्रार ही मेंटेंनेबल नाही असे कथन केलेले आहे. तसेच सामनेवाला कंपनीने कोणतीही रक्कम तक्रारदाराकडून पॉलीसी नं.02633739 याबाबत घेतलेली नाही. सदरची तक्रार या मंचात चालू शकत नाही. ती दिवाणी व फौजदारी स्वरुपाची तक्रार असल्यामुळे तक्रारदाराने त्या कोर्टात याबाबत दाद मागावी असे कथन केलेले आहे. आय.आर.डी.ए. नुसार इन्शुरन्स कंपनीला मंजुरी देण्यात येत असते. तक्रारदाराने सदरचे प्लॅन नुसार रु.50,000/- रुपये भरुन पॉलीसी उतरविली व ती 5 वर्षापर्यंत विमा हप्ता भरावयाची आहे, सदरची पॉलीसी ही रु.5,00,000/- व 15 वर्षापर्यंतची आहे. त्यामध्ये वारसदार म्हणून मुलगा आराध्य सराफ याचे नाव नमुद केलेले आहे. व दुसरे वारसदार म्हणून अज्ञान मुलगी मानसी विराज सराफ हीचे नाव नमुद आहे. परंतु तक्रारदार यांनी लेखी पत्र देऊन सामनेवाला यांना सदरची रक्कम मुदत बाहय रक्कम जी विमा पॉलीसी नं.00909487 मध्ये ट्रान्सफर करण्यात यावी असे कळविले. त्यानुसार दिनांक 25.02.2013 रोजी प्रपोजल फॉर्म तक्रारदाराकडून भरुन घेतले. त्याप्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदार यांना पॉलीसी नं.02633739 ही दिनांक 28.02.2013 रोजी सर्व अटी व शर्ती नुसार विमा पॉलीसी देण्यात आली. त्यामध्ये विमाधारक विराज नरेंद्र सराफ असे नांव नमुद आहे. पॉलीसी नं.02633739 बाबत सदरचे पॉलीसी आय.एन.जी. लाईफ इन्सुरन्स नावाने प्लॅननुसार देण्यात आली व दिनांक 28.02.2013 अशी आहे. मॅच्युअर्ड तारीख 28.02.2028 पर्यंत असून 5 वर्षाकरीता 5,00,000/- रुपयाची उतरविलेली आहे व हप्ता रु.50,000/- वार्षिक असा आहे असे नमुद आहे. सामनेवाला यांनी पुढे असे कथन केले आहे की, तक्रारदाराला सदरचे पॉलीसीचे नुतनीकरण करण्यासाठी दिनांक 22.03.2014, 13.05.2014, 07.07.2014, 12.01.2015, 22.05.2015 व 15.07.2015 रोजी पत्रे पाठवून पॉलीसी क्र.02633739 ही नुतनीकरण करण्यासाठी कळविले. परंतू तक्रारदाराने सदरच्या पॉलीसीचे नुतनीकरण केले नाही. त्यामुळे तक्रारदाराच्या खात्यामध्ये सामनेवाला यांचेकडे जमा असलेली रक्कम रु.27,557.27 पैसे दिनांक 18.03.2016 च्या चेक व्दारे पाठविले. सदरची रक्कम ही 05.04.2016 रोजी तक्रारदार यांच्या खात्यामध्ये वर्ग झाली आहे. त्यामुळे सदरची पॉलीसी ही सामनेवाला यांचेकडे अस्तित्वात नाही. तक्रारदाराने त्याचे तक्रारीमध्ये कथन केल्याप्रमाणे रक्कम रु.1,00,000/- व रु.99,999/- चा धनादेश सामनेवाला यांना दिलेला नाही. तक्रारदाराने सदरची रक्कम कुणाला दिली याबाबत सामनेवाला यांना कोणतीही कल्पना नाही. विनाकारण सामनेवाला यांचे विरुध्द तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदाराची फसवणूक झाली याबाबतचा दावा ग्राहक न्यायालयाने चालवण्याचा अधिकार नाही. तक्रारदाराने सामनेवाला यांचे विरुध्द खोटी तक्रार दाखल केलेली आहे. म्हणून सदरची तक्रार खारीज करण्यात यावी असे सामनेवाला यांनी मंचाला विनंती केली आहे.
4. तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार, कागदपत्रे, शपथपत्र यांचे अवलोकन केले. तसेच लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. सामेनवाला यांनी दाखल केलेला जबाब, कागदपत्र, शपथपत्र व सामनेवाला यांचे वकील श्री.बंग यांनी केलेल्या युक्तीवादावरुन न्याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
| मुद्दे | उत्तर |
1. | तक्रारदार हा सामनेवालाचा ग्राहक आहे काय.? | ... होय. |
2. | सामनेवाला यांनी सेवा देणेत त्रुटी केली आहे काय.? | ... नाही. |
3. | तक्रारदार हे सामनेवालाकडून तक्रारीत केलेले नमुद मागणी मिळण्यास पात्र आहेत काय.? | ... नाही. |
4. | आदेश काय ? | ...अंतीम आदेशानुसार. |
का र ण मि मां सा
5. मुद्दा क्र.1 ः- तक्रारदार यांनी त्यांचे तक्रारीमध्ये कथन केलेले आहे की, आय.एन.जी. इन्शुरन्स कंपनी यांचेकडे विमा अस्तित्वात होता. त्या विम्याची रक्कम रु.77,557.27 पैसे पहिला हप्ता जावून राहिलेल्या 27,557/- सामनेवाला यांचेकडे जमा आहेत. त्यावेळी आय.एन.जी. लाईफ इन्शुरन्स कंपनी ही एक्साईड लाईफ इन्शुरन्स कंपनीने टेकओवर केली. तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे 02633739 विमा पॉलीसी उतरविली आहे. ही बाब स्पष्ट करण्यासाठी तक्रारदाराने प्रकरणात पॉलीसी दाखल केली आहे. सदरचे पॉलीसीचे अवलोकन केले असता तक्रारदाराने दिनांक 28.02.2013 रोजी पॉलीसी उतरविल्याचे निदर्शनास येते. त्या पॉलीसीचा कालावधी 15 वर्षाचा आहे व 5 वर्षापर्यंत तक्रारदाराला प्रत्येक वर्षाला रु.50,000/- प्रमाणे हप्ता भरावयाचा आहे ही बाब सदरचे पॉलीसीमध्ये नमुद आहे. सामनेवाला यांनी त्यांचे लेखी कैफियतीमध्ये ही बाब मान्य केलेली आहे. यावरुन तक्रारदार हा सामनेवालाचा ग्राहक आहे ही बाब स्पष्ट होते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
6. मुद्दा क्र.2 व 3 – तक्रारदार यांनी पुढे त्यांचे तक्रारीमध्ये असे कथन केलेले आहे की, आय.एन.जी.आय.इन्शुरन्स कंपनी ही एक्साईड कंपनीमध्ये टेकओवर झाल्यानंतर दिनांक 28.02.2014 रोजी सामनेवाला यांना रु.22,000/- रुपयाची तक्रारदाराला मागणी केली आहे. परंतु तक्रारदाराने सदरची रक्कम देण्यासाठी नकार दिला. त्यानंतर दिनांक 03.11.2015 रोजी तक्रारदाराला मोबाईलवरुन फोन आला व त्यांना रक्कम रु.1,00,000/- ची मागणी केली व सदरची रक्कम TALK या नावाने धनादेश एक्साईड लाईफ इन्शुरन्स, डी.242, सेक्टर 63, नोयडा 201 301 या पत्त्यावर पाठविण्यास कळविले. तक्रारदाराने सदरच्या फोननुसार रक्कम रु.1,00,000/- TALK या नावाने बँक ऑफ बडोदा शाखा संगमनेर चा धनादेश पाठविले. त्यानंतर पुन्हा सामनेवाला यांचेकडून फोन आला व TALK या खात्यात आर.टी.जी.एस. मध्ये रु.99,999/- पाठविण्यात आले. त्यानुसार तक्रारदाराने पुन्हा सदरची रक्कम सामनेवालाकडे TALK या खात्यामध्ये जमा केली. सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या या कथनाला असा बचाव घेतला की, सदरची रक्कम ही सामनेवाला यांनी घेतलेली नाही. तसेच अशी कोणतीही रक्कम सामनेवालाला प्राप्त झालेली नाही. उलट सामनेवालाने तक्रारदाराला दिनांक 22.03.2014, 13.05.2014, 07.07.2014, 12.01.2015, 22.05.2015 व 15.07.2015 या तारखांना पत्रे पाठवून त्यांचे पॉलीसी क्र.02633739 ही नुतनीकरण करण्याबाबत कळविले. परंतु तक्रारदाराने त्यांचे पॉलीसीचे नुतनीकरण केले नाही. त्यामुळे सामनेवाला यांनी त्यांचे सामनेवालाकडे जमा असलेली रक्कम रुपये 27,757/- दिनांक 18.03.2016 रोजी तक्रारदाराकडे पाठविली. व सदरचा चेक हा दिनांक 05.04.2016 रोजी तक्रारकर्ताचे खात्यामध्ये वर्ग झालेला आहे. सामनेवालाने तक्रारदाराला सर्व्हेअरचे पत्र प्रकरणात दाखल केलेले आहे. तक्रारदाराने नुतनीकरण केलेले नाही. त्यामुळे त्यांची जमा असलेली रक्कम त्यांना परत पाठविण्यात आली. यामध्ये सामनेवाला यांनी त्यांचे सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही. तक्रारदाराला कळवूनही त्यांनी विमा पॉलीसीचे नुतनीकरण केलेले नाही. उलट तक्रारदाराने त्यांना झालेल्या फोननुसार रक्कम TALK या खात्यामध्ये पाठविली आहे. असे स्वतः तक्रारदारानेच तक्रारीत कथन केले आहे. तक्रारदाराने TALK हा खाते कुणाचा आहे याबाबत चौकशी करणे गरजेचे होते. तसेच सामनेवाला यांची शाखा ही अहमदनगर येथे असल्यामुळे याबाबतची चौकशी सामनेवाला यांचे कार्यालयात जाऊन चौकशी करणे आवश्यक होते. परंतु तक्रारदाराने असे काहीही केलेले नाही. उलट तक्रारदाराने स्वतः होऊनच रक्कम वळती केलेली आहे. यामध्ये सामनेवाला यांच्या सेवेत त्रुटी होती असे म्हणता येणार नाही. तसेच तक्रारदाराने तक्रारीमध्ये असे कथन केले आहे की, त्यांनी त्यांची फसवणूक झाली व त्याबाबतची फिर्याद संगमनेर पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदविली आहे. सदरचे फिर्यादीमध्ये तक्रारदाराने सर्व बाब नमुद केल्या आहेत. फसवणूक झाली आहे असे तक्रारदाराचे लक्षात आल्यानंतर त्यांनी फौजदारी प्रकरण दाखल केले. सदरची तक्रारदाराची मागणी या मंचासमक्ष मागू शकत नाही. सदरचा वाद हा ग्राहक वाद होत नाही. त्यामुळे हे मंच ही तक्रार चालवू शकत नाही हा सामनेवाला यांनी घेतलेला बचाव संयुक्तीक आहे. संपुर्ण कागदपत्राचे अवलोकन केले असता, सामनेवाला यांनी त्यांचे सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही ही बाब सिध्द झालेली आहे. सबब सदरची तक्रार खारीज करण्याचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते.
7. मुद्दा क्र.4 – मुद्दा क्र.1 ते 3 चे विवेचनावरुन मुद्दा क्र.4 चे उत्तरार्थ खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे.
- अं ति म आ दे श –
1. तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. उभय पक्षकार यांनी या तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा.
3. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी.
4. तक्रारदार यांना या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.