(मंचाचा निर्णय: श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक :09/08/2011)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दिनांक 21.10.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. यातील तक्रारकर्तीची म्हणणे आहे की, ती गैरअर्जदार विज कंपनीची ग्राहक असुन तिचेवर विज चोरीचे खोटे प्रकरण व खोटा आरोप लावुन रु.45,555/- वसुल केले व विज पुरवठा खंडीत करुन त्रास दिला. तसेच जिल्हा सत्र न्यायालय, नागपूर यांनी विज चोरीच्या आरोपातुन निर्दोश मुक्त केले. त्यानंतर गैरअर्जदारांना जमा केलेली रक्कम रु.45,555/- परत मागितली असता त्यांनी ती परत केली नाही. म्हणून तक्रारकर्तीने ही तक्रार मंचात दाखल करुन ती व्दारे गैरअर्जदारांकडे भरलेली रक्कम रु.45,555/- परत मिळावी, सेवा खंडीत केल्याबद्दल रु.50,000/-, शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.50,000/-, तक्रारकर्त्याविरुध्द खोटी तक्रार केल्याबद्दल रु.20,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- मिळावा अश्या मागण्या केलेल्या आहेत.
3. गैरअर्जदाराला नोटीस देण्यांत आली असता त्यांनी मंचात हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला. त्यात प्राथमिक आक्षेप घेतला की, सदर प्रकरण विज चोरीचे आहे व ते विशेष न्यायालयाचे अधिकार क्षेत्रात आहे म्हणून मंचास या प्रकरणी अधिकारक्षेत्र नाही व सर्व विपरीत विधाने नाकबुल केली. विशेष न्यायालयाचे आदेशावरुन ही बाब स्पष्ट होते की, सदर प्रकरणात भरलेली रक्कम ही तक्रारकर्तीची न्यायीक जबाबदारी होती आणि गैरअर्जदाराला चुकीने त्या अगोदरची सदरची रक्कम मिळालेली नव्हती आणि जरी तक्रारकर्तीची विज चोरीच्या प्रकरणातुन सुटका केली तरी मा. न्यायालयाचे निकालपत्रानुसार जमा करण्यांत आलेली रक्कम विचारात घेतली आहे. म्हणून तक्रारकर्तीला सदर रक्कम परत मागण्याचा काहीही अधिकार नाही, करीता सदर तक्रार खारिज करण्यांत यावी असा उजर गैरअर्जदारांनी घेतला आहे.
4. तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र.3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात अनुक्रमांक 1 ते 7 वर गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीला दिलेली पत्रे, लिगल नोटीस, पैसे भरल्याच्या पावत्या इत्यादी दस्तावेजांच्या छायांकित प्रती जोडलेल्या आहेत.
5. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.26.07.2011 रोजी आली असता दोन्ही पक्षांचे वकील हजर त्यांचा युक्तिवाद ऐकला. तक्रारीसोबत दाखल दस्तावेजांचे व युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले.
-// नि ष्क र्ष //-
6. सदर प्रकरणी गैरअर्जदारांनी जो जबाब दिला त्यावर तक्रारकर्तीला प्रतिज्ञालेखा दाखल संधी देऊनही आपले उत्तर दाखल केले नाही व गैरअर्जदारांचे म्हणण्याला खोडून काढले नाही. गैरअर्जदारांनी मा. विशेष न्यायालयाचे निकालाबद्दल स्पष्ट विधान केले आहे की, तक्रारकर्तीने जमा केलेली रक्कम मा. विशेष न्यायालयाचे निकालपत्रानुसार विचारात घेतली आहे आणि गैरअर्जदाराला चुकीने त्या अगोदरची सदरची रक्कम मिळालेली नव्हती असे नमुद केलेले आहे. ही बाब तक्रारकर्तीने नाकारलेली नाही आणि महत्वाची बाब म्हणजे यातील उभय पक्षाने मा. विशेष न्यायालयाचे निकालाची प्रत दाखल केली नाही. गैरअर्जदार क्र.1 यांनी सदर न्यायालयाचे निकालाची छायांकीत प्रत दाखल केली, मात्र ती विचारात घेता येत नाही. असे असले तरी तक्रारकर्तीने गैरअर्जदारांचे सदरील विधान खोडून काढले नाही, त्यामुळे वर नमुद परिस्थितीत तक्रारकर्तीस विज वापरासंबंधी गैरअर्जदारांनी घेतलेली रक्कम मागण्याचा कोणताही अधिकार उरत नाही. यास्तव आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्तीची तक्रार निकाली काढण्यांत येते.
2. उभय पक्षांनी तक्रारीचा खर्च स्वतः सोसावा.