न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्या
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रारदार यांचा शेती हा व्यवसाय असून त्यांची शेती गट न. 258/4 क्षेत्र 3 एकर 5 गुंठे ही करनूर ता. कागल जि. कोल्हापूर येथे आहे. तक्रारदार यांचे शेतामध्ये जाबदार यांचा एक पोल असून त्यावरुन सर्व विद्युत वाहिन्या गेलेल्या आहेत. दि. 28/12/17 रोजी दु.1.45 चे दरम्यान तक्रारदार यांचे शेतातील ऊस पिकास 33/11 केव्हीए कागल उपकेंद्रातून निघणारी 11 केव्ही कागल शेती पंप वाहिनीवरुन धनगर शेती पंप रोहीत्रावरुन सर्कीट ए च्या लघुदाब वाहिनीच्या उपरी तार मार्गाच्या पोल क्र. 4 व 5 मध्ये गार्डींग व लघुदाब वाहिनीची वाय फेज एकमेकांच्या संपर्कात आलेने तक्रारदाराचे ऊस पिकास आग लागली व ती आग पसरत जावून शेजारील गट क्र. 258/5 मधील 2.5 एकरामधील ठिबक सिंचन जळाले आहे. सदर आगीत तक्रारदारांचा संपूर्ण ऊस जळून खाक झाला. सदर आगीबाबत विद्युत निरिक्षक, कोल्हापूर यांनी सदर रोहित्राची देखभाल न केल्यामुळे सदर अपघात घडल्याचे व तक्रारदार यांना नुकसानभरपाई देणेबाबत आदेश केले आहेत. परंतु जाबदार यांनी नुकसान भरपाई देण्यास नकार दिलेला आहे. म्हणून सदरचा तक्रारअर्ज दाखल करणे तक्रारदारास भाग पडले.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांचा शेती हा व्यवसाय असून त्यांची शेती गट न. 258/4 क्षेत्र 3 एकर 5 गुंठे ही करनूर ता. कागल जि. कोल्हापूर येथे आहे. तक्रारदार यांचे शेतामध्ये वि.प. यांचा एक पोल असून त्यावरुन सर्व विद्युत वाहिन्या गेलेल्या आहेत. तक्रारदार हे शेतीसाठी लागणारी वीज जाबदार यांचेकडून घेत असलेमुळे तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत. तक्रारदाराचे शेतामध्ये ऊसशेती असून एक कौलारु घर आहे. दि. 28/12/17 रोजी दु.1.45 चे दरम्यान तक्रारदार यांचे शेतातील ऊस पिकास 33/11 केव्हीए कागल उपकेंद्रातून निघणारी 11 केव्ही कागल शेती पंप वाहिनीवरुन धनगर शेती पंप रोहीत्रावरुन सर्कीट ए च्या लघुदाब वाहिनीच्या उपरी तार मार्गाच्या पोल क्र. 4 व 5 मध्ये गार्डींग व लघुदाब वाहिनीची वाय फेज एकमेकांच्या संपर्कात आलेने तक्रारदाराचे ऊस पिकास आग लागली व ती आग पसरत जावून शेजारील गट क्र. 258/5 मधील 2.5 एकरामधील ठिबक सिंचन जळाले आहे. तसेच शेजारील गट क्र. 259 मध्ये असणारे कौलारु घर व साहित्य जळाले आहे. सदर आगीत तक्रारदारांचा संपूर्ण ऊस जळून खाक झाला. सदर आगीबाबत गावकामगार तलाठी यांनी पंचनामा केला असून त्यामध्ये रक्कम रु.2,40,000/- इतके नुकसान झालेबाबत नमूद आहे. या आगीबाबत डेप्युटी एक्झीक्युटीव्ह इंजिनिअर, सबडिव्हीजन, कागल यांनी दि. 29/12/2018 रोजीचा इलेक्ट्रीकल अॅक्सीडेंटचा अहवाल इलेक्ट्रीकल इन्स्पेक्टर, आय.ई. अॅण्ड एल. डिपार्टमेंट, कोल्हापूर यांना सादर केला. सदर अहवाल प्राप्त झालेनंतर विद्युत निरिक्षक, कोल्हापूर यांनी सदर रोहित्राची देखभाल न केल्यामुळे सदर अपघात घडल्याचे व तक्रारदार यांना नुकसानभरपाई देणेबाबत आदेश केले आहेत. परंतु जाबदार यांनी नुकसान भरपाई देण्यास नकार दिलेला आहे. सबब, जाबदार यांचेकडून आगीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.2,40,000/-, मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- व तक्रारीचा खर्च रु.15,000/- मिळावेत अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
3. तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदयादीसोबत एम.एस.ई.बी. चा ए रिपोर्ट, एम.एस.ई.बी. ची टिपणी, एम.एस.ई.बी. यांनी तक्रारदार यांचा दिलेला नकाशा व फोटो, शाखा अभियंता यांचा जबाब, तंत्रज्ञ यांचा जबाब, विद्युत निरिक्षक यांचे पत्र, तक्रारदार यांचा अर्ज, तलाठी यांचा पंचनामा, तक्रारदारांचा जबाब इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्रही दाखल केले आहे.
4. जाबदार यांना नोटीस लागू होवूनही त्यांनी याकामी हजर होवून आपले लेखी म्हणणे दाखल केले नाही. सबब, जाबदार यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. परंतु सदर आदेशाविरुध्द जाबदार यांनी रिव्हीजन पिटीशन क्र. 158/19 मा. राज्य आयोग, मुंबई यांचेकडे दाखल केले. सदर पिटीशनमध्ये मा. आयोगाने जाबदार यांचे म्हणणे अभिलेखावर घेण्याचे आदेश केल्याने जाबदार यांचे लेखी म्हणणे याकामी अभिलेखावर घेण्यात आले. जाबदार यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराचे तक्रारअर्जातील संपूर्ण मजकूर नाकारला आहे. त्यांचे कथनानुसार, तक्रारदाराच्या काही तक्रारी असल्यास त्यासंबंधाने कायद्याने जाबदार यांच्या कार्यालयामध्ये स्वतंत्र ग्राहक तक्रार मंच असून त्याठिकाणी तक्रारदाराने दाद मागणे आवश्यक आहे. तक्रारदाराचे शेतजमीनीमध्ये किती नुकसान झाले आहे ते याकामी तक्रारदार यांनी दाखवून देणे गरजेचे आहे. वस्तुतः उभा ऊस जळाल्यानंतर त्याचा फक्त पाला पेटत असतो व ऊसाच्या कांडया शिल्लक रहात असतात. सदर ऊसावरील संपूर्ण पाला जळून जात असलेमुळे व निव्वळ ऊसाच्या कांडया शिल्लक रहात असलेमुळे व ऊसाच्या जळण्याने सदर ऊसाचे वजन वाढत असते. म्हणजे नॉर्मल ऊसापेक्षा जळीत ऊसाचे वजन जास्त होत असते. सदर जळक्या ऊसास साखर कारखान्याकडून सदर जळीत ऊसाच्या वयावरुन ठराविक दर कारखान्याच्या तपशीलानुसार कपात केला जात असतो. सदर तक्रारदार यांचा ऊस बिलातून जर कोणतीही वजावट झाली असेल तर ती त्यांनी याकामी दाखवून देणे गरजेचे आहे. तसेच तक्रारदारांचे ठिबक सिंचन कोणत्या कंपनीचे होते, ते कधी खरेदी केले होते, ते चालू स्वरुपात होते का, याची माहिती तक्रारदाराने शाबीत करणे गरजेचे आहे. तक्रारदाराने मागितलेली नुकसान भरपाईची रक्कम जाबदार यांना मान्य नाही. सबब, तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करावा अशी मागणी जाबदार यांनी केली आहे.
5. जाबदार यांनी त्यांचे म्हणणेच्या पुष्ठयर्थ शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
6. तक्रारदाराची तक्रार, दाखल पुरावे व युक्तिवाद तसेच जाबदार यांचे म्हणणे, पुरावा व युक्तिवाद यावरुन मंचासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक होतो काय ? | होय. |
2 | जाबदार यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदारांनी केलेल्या मागण्या मिळणेस तक्रारदार पात्र आहे काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
विवेचन
मुद्दा क्र.1
7. जाबदार ही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. असून तक्रारदार यांची शेती गट नं.258/4 क्षेत्र 3 एकर 7 गुंठे ही करनूर ता.कागल जि. कोल्हापूर येथे आहे. तक्रारदार हे जाबदार यांचेकडून शेतीसाठी लागणारी वीज घेत आहेत व याबद्दल उभय पक्षांमध्ये वादाचा मुद्दा नाही. सबब, तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये सेवा घेणार व सेवा देणार हे नाते प्रस्थापित झालेचे दिसून येते. सबब, तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1)(ड) खाली जाबदार यांचे ग्राहक होतात या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2 ते 4 एकत्रित
8. तक्रारदाराचे कथनानुसार, दि. 28/12/17 रोजी दु.1.45 चे दरम्यान तक्रारदार यांचे शेतातील ऊस पिकास 33/11 केव्हीए कागल उपकेंद्रातून निघणारी 11 केव्ही कागल शेती पंप वाहिनीवरुन धनगर शेती पंप रोहीत्रावरुन सर्कीट ए च्या लघुदाब वाहिनीच्या उपरी तार मार्गाच्या पोल क्र. 4 व 5 मध्ये गार्डींग व लघुदाब वाहिनीची वाय फेज एकमेकांच्या संपर्कात आलेने तक्रारदाराचे ऊस पिकास आग लागली व ती आग पसरत जावून शेजारील गट क्र. 258/5 मधील 2.5 एकरामधील ठिबक सिंचन जळाले आहे. तसेच शेजारील गट क्र. 259 मध्ये असणारे कौलारु घर व साहित्य जळाले आहे. सदर आगीत तक्रारदारांचा संपूर्ण ऊस जळून खाक झाला. सदर आगीबाबत गाव कामगार तलाठी यांनी पंचनामा केला असून त्यामध्ये रक्कम रु.2,40,000/- इतके नुकसान झालेबाबत नमूद आहे. या आगीबाबत डेप्युटी एक्झीक्युटीव्ह इंजिनिअर, सबडिव्हीजन, कागल यांनी दि. 29/12/2018 रोजीचा इलेक्ट्रीकल अॅक्सीडेंटचा अहवाल इलेक्ट्रीकल इन्स्पेक्टर, आय.ई. अॅण्ड एल. डिपार्टमेंट, कोल्हापूर यांना सादर केला. सदर अहवाल प्राप्त झालेनंतर विद्युत निरिक्षक, कोल्हापूर यांनी सदर रोहित्राची देखभाल न केल्यामुळे सदर अपघात घडल्याचे व तक्रारदार यांना नुकसानभरपाई देणेबाबत आदेश केले आहेत. परंतु वि.प. यांनी नुकसान भरपाई देण्यास नकार दिलेला आहे.
9. तक्रारदार यांनी शेतीसाठी भरपूर खर्च आलेला आहे व सदरचे अपघातामुळे तक्रारदार यांना फार मोठा शारिरिक व मानसिक त्रास सहन करावा लागलेने व सदरचा त्रास हा जाबदार कंपनीमुळे सहन करावा लागलेने त्यांचेकडून नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 2,40,000/- तसेच शारिरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,00,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.15,000/- वसुल होवून मागितलेला आहे.
10. तक्रारदाराने या संदर्भात तक्रारअर्जाचे सोबत काही कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारदार यांचे शेतामधील असणारे पिकास (ऊसास) आग लागले नंतर सदर आगीबाबत गावकामगार तलाठी, मौजे करनूर ता. कागल यांनी पंचनामा केला असून सदरच्या पंचनाम्यात रक्कम रु.2,40,000/- इतके नुकसान झालेबाबत नमूद केले आहे व तसा पंचनामा अ.क्र.8 व तक्रारअर्जासोबत दाखल केला आहे. तसेच दि.29 डिसेंबर 2017 चा Report of Electrical accident at village Mauje Karnoor वरुन Electrical accident (sugarcane burnt) असे स्पष्टपणे नमूद असून सोबत Form A दाखल केला आहे. यावरुन सदरचा अपघात हा “Electrical accident” च होता ही बाब शाबीत होते. दि. 3/1/18 ची उपकार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि. कंपनीचे उपविभाग कागल यांची “स्वयंस्पष्ट टिपणी” तक्रारदाराने दाखल केली आहे. यावरुनही गट नं. 258/4 मधील तीन एकरामधील ऊस पिकास आग लागली असे स्पष्ट नमूद आहे. जाबदार यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये तक्रारदाराचे ऊस पिकाचे आग लागून नुकसान झाले ही बाब नाकारलेली नाही. म.रा.वि.वि. यांनी तक्रारदार यांना दिलेला नकाशा व फोटो यावरुनही ही बाब स्पष्ट होते की, तक्रारदार यांचे ऊस पूर्णपणे जळालेला आहे. तसेच गावकामगार तलाठी, मौजे करनूर यांनी केलेला पंचनामा या मंचासमोर दाखल केला आहे व सदरचे पंचनाम्यावरुन तक्रारदार यांचे रक्कम रु.2,40,000/- इतके नुकसानीची नोंद केलेची दिसून येते व शाबीती दाखल तक्रारदाराने सरतपासाचे शपथपत्रही दाखल केले आहे. सबब, तक्रारदाराने नुकसान भरपाईची वारंवार मागणी करुनही तक्रारदारास नुकसान भरपाई न देणे ही निश्चितच सेवात्रुटी असलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, तक्रारदारांचा तक्रारअर्ज मंजूर करणेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, तक्रारदाराने मागितलेली रक्कम रु. 2,40,000/- चे नुकसान भरपाईचा पुरावा तक्रारदार यांनी दाखल केलेने तक्रारदार यांना ती देणेचे आदेश जाबदार कंपनीस करणेत येतात. तसेच तक्रारदार यांनी मागितलेली मानसिक व शारिरिक त्रासाची रक्कम रु.1,00,000/- व अर्जाचे खर्चापोटीची रक्कम रु.15,000/- ही या मंचास संयुक्तिक वाटत नसलेने मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.3,000/- देणेचे आदेश जाबदार विद्युत वितरण कंपनीस करणेत येतात. सबब, हे मंच खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. जाबदार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांनी तक्रारदार यांचे शेतीस आगीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी रक्कम रु 2,40,000/- देणेचे आदेश जाबदार कंपनीस करणेत येतात.
3. जाबदार यांनी तक्रारदार यांना मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- देणेचे आदेश करणेत येतात.
4. जाबदार यांनी तक्रारदार यांना अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- देणेचे आदेश करणेत येतात.
5. वर नमूद आदेशांची पूर्तता जाबदार यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी.
6. विहीत मुदतीत जाबदार यांनी आदेशाची पूर्तता न केलेस तक्रारदारास ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 खाली दाद मागणेची मुभा राहिल.
7. सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क पाठवाव्यात.