निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 11/12/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 21/12/2012
तक्रार निकाल दिनांकः- 11/07/2013
कालावधी 06 महिने. 20 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
मनोहर गोपाळराव फुटाणे. अर्जदार
वय 54 वर्षे. धंदा.व्यापार. अड.एस.एन.वेलणकर.
रा.क्रांती चौक,परभणी.
विरुध्द
उप- कार्यकारी अभियंता. गैरअर्जदार.
महा.राज्य विद्युत वितरण कं.म. अड.एस.एस.देशपांडे.
शहर उपविभाग, जिंतूर रोड,परभणी
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.आर.एच.बिलोलीकर.सदस्य.)
गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेल्या त्रुटीच्या व निष्काळजीपणाच्या सेवे बाबत नुकसान भरपाई मिळणे बाबतची अर्जदाराची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की,
अर्जदार हा परभणी येथील रहिवाशी असून तो व्यापारी आहे व अर्जदाराने घरगुती वापरासाठी ग्राहक क्रमांक 530010590433 अन्वये व मिटर क्रमांक 0701654782 व्दारे गैरअर्जदाराकडून दिनांक 02/05/2011 रोजी विद्युत कनेक्शन घेतले होते. सदर जोडणी मे 2011 मध्ये घेतल्यानंतर अर्जदारास जवळ पास पाच महिने लाईट बील दिले नव्हते, व प्रथम 25/10/2011 रोजी 5,130/- रुपयाचे देयक आले, ज्यात चालू रिडींग 1073 दाखवली होती. म्हणजे रिडींगच्या तारखे पर्यंत 19/10/2011 पर्यंत 5 ½ महिन्याचा वापर सरासरी दरमहा केवळ 200 युनिटचा होता. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदारास त्यानंतर कधीही रिडींग प्रमाणे लाईट बील आले नाही, डिसेंबर 2011 पासून सतत 204 युनिट दरमहा दाखवून 30/04/2012 रोजी मागील रिडींग 1399 दाखवून व चालू रिडींग “ INACCS ” 7,450/- रुपयांचे लाईट बील दिले.अर्जदाराने रिडींग प्रमाणे देयके द्या बील मग भरतो. अशी मागणी गैरअर्जदारास केली होती, पण गैरअर्जदाराने काही केले नाही. व पुन्हा त्याच पध्दतीने “ INACCS ” लिहून 29/05/2012 रोजी 8600/- चे दिनांक 30/07/2012 रोजी “ INACCS ” लिहून
रु.10,990/- चे व 29/08/2012 रोजी लॉक्ड दाखवून 12,190/- रुपयाचे बिल गैरअर्जदाराने अर्जदारास दिले.अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने गैरअर्जदारास वारंवार भेटून मिटर घरा बाहेर बसवले असल्यामुळे रिडींग प्रमाणे बिले द्या, म्हणून विनंती केली, परंतु काहीही उपयोग झाला नाही. शेवटी अर्जदारास 20/10/2012 रोजी 17/11/2012 पर्यंत भरावयाचे 15,430/- चे देयक RNA लिहून मागील रिडींग 3370 नमुद करुन दिली. म्हणून अर्जदाराने सदरची तक्रार ही मंचासमोर दाखल केलेली आहे. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, वस्तुतः मिटर घराच्या बाहेर बसविले आहे. त्यामुळे रिडींगचा फोटो घेवुन रिडींग प्रमाणे देयके देण्यास गैरअर्जदारांना काहीच अडचण नाही,परंतु अर्जदारास विनाकारण मनःस्ताप देवुन जास्तीचे बिल बिना रिडींगचे देवुन गैरअर्जदाराने त्रुटीची व निष्काळजीपणाची सेवा दिली आहे.म्हणून अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन गैरअर्जदाराने अर्जदारास ग्राहक क्रमांक 530010590433 व मिटर क्रमांक 0701654782 चे दिलेले सर्व बिले रद्द करुन प्रत्यक्ष मिटर रिडींग घेवुन 02/05/2011 पासून देयके तयार करण्याच्या कालावधी पर्यंत स्लॅब बेनिफीट देवुन कोणतेही व्याज न लावता भरलेल्या रक्कमा समायोजित करुन उर्वरित रक्कमेचे सुधारीत देयके अर्जदारास द्यावे, व तो पर्यंत अर्जदाराचा विद्युत पुरवठा गैरअर्जदाराने खंडीत करु नये, असा आदेश गैरअर्जदारास द्यावा. व तसेच गैरअर्जदाराने या पुढे मिटर रिडींग प्रमाणे बिले द्यावीत. तसे न केल्यास देयकास 200/- रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा, व अर्जदारास मानसिकत्रासा बद्दल 4,000/- रुपये व खर्चा बद्दल 1,000/- रुपये नुकसानभरपाई अर्जदारास द्यावी. अशी मंचास विनंती केली आहे.
तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. व नि.क्रमांक 6 वर 6 कागदपत्रांच्या यादीसह अर्जदाराने 6 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.ज्यामध्ये 6/1 वर गैरअर्जदाराने दिलेले 5,130/- रुपयाचे बिल व ते भरल्याची पावती, 6/2 वर गैरअर्जदाराने दिलेले 7450/- रुपयाचे दिनांक 30/04/2012 चे बिल, 6/3 वर गैरअर्जदाराने दिलेले 8,600/- चे दिनांक 29/05/2012 रोजीचे बिल 6/4 वर गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेले दिलेले 10,990/- रुपयाचे 31/07/2012 रोजीचे बिल, 6/5 वर गैरअर्जदाराने अर्जदारास 12,190/- रुपयाचे 29/08/2012 रोजीचे बिल व 6/6 वर गैरअर्जदाराने अर्जदारास 15,430/- रुपयाचे 28/10/2012 रोजीचे बील इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
मंचातर्फे गैरअर्जदारांना नोटीसा काढण्यात आल्या,गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर, परंतु गैरअर्जदाराने आपले लेखी जबाब मुदतीत दाखल न केल्यामुळे त्याच्या विरुध्द विनाजबाबाचा आदेश पारीत,म्हणून सदरचे प्रकरण मेरीटवर निकाली काढण्याचे मंचाने ठरविले.
निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदारास रिडींग न घेता चुकीची बिले देवुन
व निष्काळजीपणा दाखवुन सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे
कारणे.
मुद्दा क्रमांक 1
अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक होता ही बाब नि.क्रमांक 6/1 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते, गैरअर्जदाराने अर्जदारास दिनांक 29/05/2012 रोजी 8,600/- रुपयाचे बिल लॉक्ड शेरा मारुन रिडींग न घेता 204 युनिटचा वापर दाखवुन बिल दिले ही बाब नि.क्रमांक 6/3 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते, तसेच गैरअर्जदाराने अर्जदारास दिनांक 31/07/2012 रोजी INACCS कारण दाखवून 194 युनिट वापर दाखवून रिडींग न घेता 10,990/- रुपयाचे बिल दिले होते ही बाब नि.क्रमांक 6/4 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते.तसेच गैरअर्जदाराने अर्जदारास 29/08/2012 रोजी लॉक्ड असे कारण दाखवून 194 युनिटचा विज वापर दाखवून 12190/- रुपयाचे बिल अर्जदारास दिले होते ही बाब नि.क्रमांक 6/5 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते, तसेच गैरअर्जदाराने अर्जदारास 28/10/2012 रोजी आर.एन.ए. कारण दाखवून 199 युनिटचे बिल 15430/- रुपयाचे अर्जदारास दिले होते,ही बाब नि.क्रमांक 6/6 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते, गैरअर्जदाराने अर्जदारास सदरील बिले ही मिटर रिडींग न घेताच दिली होती व गैरअर्जदाराने अत्यंत चुकीच्या पध्दतीने बिले अर्जदारास देवून सेवेत त्रुटी दिली आहे. कारण वास्तविक नियमा प्रमाणे ग्राहकाचे मिटर ग्राहकाच्या मुख्य दरवाज्या बाहेरच फिट केलेले आहे, जेणे करुन गैरअर्जदारास रिडींग घेणे सोपे झालेले आहे. असे असतांना देखील गैरअर्जदाराने अर्जदाराच्या मिटरचे दिनांक 29/05/2012 चे 8,600/- रुपयाचे बिल, दिनांक 30/07/2012 रोजी 10,990/- रुपयाचे बिल, दिनांक 29/08/2012 रोजी 12,190/- रुपयाचे बिल, व दिनांक 28/10/2012 रोजी 15,430/- रुपयाचे बिल कधी INACCS कधी लॉक्ड व कधी आर.एन.ए. दाखवून दिली. या सर्व बाबीवरुन हे सिध्द होते की, सदरील बिलातील रिडींगच्या नोंदी मनमानी पध्दतीने केले असल्याचे स्पष्ट दिसते. कारण चालू रिडींग व मागील रिडींगचा मेळ बसत नाही व तसेच अर्जदाराने दाखल केलेल्या सदरील तक्रारीस गैरअर्जदाराने उत्तर देण्याचे टाळले, यावरुन अर्थातच जाणून बुजून अर्जदाराचा असाह्यतेचा गैरफायदा घेवुन मानसिकत्रास देवुन विनाकारण खर्चात पाडून अर्जदारावर अन्याय केला आहे, असे मंचाचे मत आहे.गैरअर्जदाराने सदरची बिले हे योग्य आहे, असा मंचासमोर पुरावा देखील दाखल करण्याचे टाळले,म्हणून सदरील चारही बिले रद्द होण्यास पात्र आहे.शिवाय त्यास सेवात्रुटीची तदनुषंगिक नुकसान भरपाई अर्जदाराला मिळाली पाहिजे. सबब मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदाराने अर्जदाराच्या ग्राहक क्रमांक 530010590433 वरील दिलेले
बील क्रमांक 242 दिनांक 29/05/2012, बील क्रमांक 228 दिनांक
31/07/2012, बील क्रमांक 234 दिनांक 29/08/2012 व बील क्रमांक 246
दिनांक 28/10/2012 चे वादग्रस्त देयके रद्द करण्यात येते.
3 गैरअर्जदाराने आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत अर्जदाराच्या
मिटरचे त्याच्या समक्ष फोटोसहीत विज वापराचे प्रत्यक्ष रिडींग घेवुन
रिडींग प्रमाणे नविन दुरुस्त बिले कोणताही दंड व्याज न आकारता द्यावीत.
4 अर्जदाराने बिलापोटी जर काही रक्कम अगोदर जमा केली असेलतर ती दुरुस्त
बिलातून वजा करुन जादा रक्कम उरत असल्यास ती पुढील बिलात समायोजीत
करावी.
5 मानसिकत्रास व त्रुटीची सेवा दिल्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदारास नुकसान भरपाई
म्हणून रु.2,000/- फक्त ( अक्षरी रु. दोनहजार फक्त) व अर्जाचा खर्च
रु.1,000/- फक्त ( अक्षरी रु.एकहजार फक्त) आदेश मुदतीत देण्यात यावे.
6 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष