निकाल
दिनांक- 30.04.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष )
तक्रारदार शिवाजी ज्ञानोबा ऊफाडे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी चूकीचे विज देयक देऊन विज पुरवठा खंडीत करुन सेवेत त्रूटी ठेवली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे, तक्रारदार हे सुशिक्षीत बेरोजगार आहेत. तक्रारदार यांनी कूटूंबाचे उदरनिर्वाहासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडे प्रकरण करुन बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडून तेलघाण्याचा व्यवसाय करण्यासाठी कर्ज घेतले. सदरील तेलघाण्याकरिता विज पुरवठा आवश्यक असल्यामुळे तक्रारदार यांनी दि.3.7.2010 रोजी सामनेवाले यांचेकडे रु.12,700/- चे कोटेशन भरले. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना तेलघाण्याकरिता विज पुरवठा दिला. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार यांचे तेलघाणा सुरु झाल्यानंतर ते नियमित विज देयक भरणा करीत आलेले आहेत. तेलघाण्याचा विज वापर प्रतिमहा 50 ते 120 युनिट असा होत आहे. दि.7.10.2011 रोजी तक्रारदार यांना रु.4400/- चे विज देयक देण्यात आले.सदर देयकावर 940 यूनिट वापरल्याचे लिहीले होते. तक्रारदार यांनी एवढया यूनिटचा वापर केलेला नव्हता. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे तोंडी तक्रार केली.दि.4.2.2012 रोजी कनिष्ठ अधिकारी यांनी पाहणी करुन अहवाल दिला. बिलामधील रिंडीग व प्रत्यक्ष रिंडीग यामध्ये 656 यूनिटचा फरक होता. तक्रारदार यांना विज देयक दूरुस्त करुन देतो असे सांगण्यात आले. दि.7.3.2012 रोजी रक्कम रु.5740/- चे विज देयक तक्रारदार यांना देण्यात आले. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे जाऊन विचारणा केली असता तक्रारदार यांनी सदरील देयक भरावेच लागेल असे सांगितले. तक्रारदार हे वेळोवेळी सामनेवाले यांचेकडे विज देयक दूरुस्त करण्यासाठी जाऊन भेटले. परंतु सामनेवाले यांनी विज देयक दूरुस्त करुन दिले नाही. दि.12.09.2012 रोजी सामनेवाले यांनी तेलघाण्याच्या मोटारीची विज खंडीत केली. दि.8.1.2013 रोजी तक्रारदार यांनी रु..8230/-चे विज देयक देण्यात आले. विज देयक दिल्यानंतर तक्रारदार यांनी विज देयक भरणा न केल्यामुळे दि.15.1.2013 रोजी सामनेवाले यांनी विजेचे मिटर काढून नेले.
तक्रारदार यांनी तक्रारीत पूढे असे कथन केले आहे की,तक्रारदार हे तेलघाण्याचा व्यवसाय करुन आपल्या कूटूंबाचा उदरनिर्वाह करतात. तक्रारदार यांनी प्रतिमहा रु.10,000/- चे उत्पन्न मिळते. सामनेवाले यांनी चूकीच्या पध्दतीने बिल आकारुन विज प्रवाह तोडला आहे. तक्रारदार यांचे कूटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. सबब, तक्रारदार यांना प्रतिमहा रक्कम रु.10,000/- याप्रमाणे सहा महिन्याचे रक्कम रु.60,000/- चे नुकसान मिळावे, मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे.
सामनेवाले हे मंचासमोर हजर झाले. सामनेवाले यांनी तक्रारीत कथन केलेले सर्व आरोप नाकारलेले आहेत. सामनेवाले यांचे कथन की, तक्रारदार यांनी नियमाप्रमाणे विज देयक कदण्यात आलेले होते. दि.7.3.2012 रोजी रककम रु.5740/- चे देयक हे थकबाकीसह देण्यात आले आहे. तक्रारदार यांनी तेलघाण्यासाठीची विज मोटार चालविण्यासाठी विज प्रवाह घेतलेला आहे. तक्रारदार यांनी नियमाप्रमाणे येणारे बिल न भरल्यामुळे विज जोडणी खंडीत केली आहे. तक्रारदार यांना विज आकार वेळोवेळी भरला असता तर विज पुरवठा खंडीत झाली नसता. सामनेवाले यांनी पूढे असे कथन केले आहे की, तक्रारदार यांना विज पुरवठा देण्यात आल्यानंतर तक्रारदार यांनी मिटर रिंडीगप्रमाणे विज देयक देण्यात आलेले आहे. फेबू्वारी 2012 मध्ये तक्रारदार यांनी विज मिटर बदलून मिटर क्र.89833948 देण्यात आला. तक्रारदार यांनी विज पुरवठा केल्यानंतर केवळ एकदाच म्हणजे दि.27.3.2011 रोजी रक्कम रु.2,000/- विज देयकाचा भरणा केलेला आहे. तक्रारदार यांनी नियमितपणे विज देयक भरलेले नाही. तक्रारदार यांनी व्यापारी कारणासाठी विज पुरवठा घेतला आहे. सबब, या मंचास तक्रार चालविण्याचा अधिकार नाही.
तक्रारदार यांनी नि.6 सोबत सामनेवाले यांनी विज देयक हजर केले आहे. तसेच प्रत्यक्ष पाहणी अहवाल हजर केला आहे. तक्रारदार यांनी स्वतःचे शपथपत्र नि.11 अन्वये दाखल केले आहे. सामनेवाले यांनी राजेश चंद्रकांतराव अंबेकर यांचे शपथपत्र दाखल केले आहे. तसेच सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा ग्राहक तक्ता (सीपीएल) दाखल केले आहे. तक्रारदार यांचे वकील श्री. धांडे यांचा यूक्तीवाद ऐकला. सामनेवाले यांचे वकील श्री. पाटील यांचा यूक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा विज पुरवठा खंडीत करुन
सेवेत त्रूटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार शाबीत करतात
काय ? नाही.
2. तक्रारदार यांनी विज पुरवठा व्यापारी कारणासाठी घेतला आहे
काय ? होय.
3. तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? नाही.
4. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 3 ः-
तक्रारदार यांचे वकील श्री.धांडे यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांनी स्वतःचे उदरनिर्वाहासाठी जिल्हा उद्योग केंद्रा मार्फत बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडून कर्ज घेऊन तेलघाण्याचा व्यवसाय सूरु केला. सदरील व्यवसाय हा तक्रारदार स्वतःचे उदरनिर्वाहाकरिता करीत होते. सामनेवाले यांनी मिटर रिंडीगप्रमाणे विज देयक न देता जास्त यूनिटचे बिल दर्शवून विज देयक दिलेले आहे. सामनेवाले यांनी बेकायदेशीररित्या तक्रारदार यांना दिलेला विज पुरवठा खंडीत केलेला आहे. तक्रारदार यांचेवर उपासमारीची वेळ आलेली आहे. तक्रारदार यांनी सदरील विज पुरवठा स्वतःचे उपजिवीकेसाठी घेतलेला असल्यामुळे ते सामनेवाले यांचे ग्राहक आहेत. सदरील विज पुरवठा हा व्यापारी कारणासाठी घेतला होता ही बाब सिध्द झालेली नाही. सबब तक्रारदार हे तक्रारीत मागणी केलेली नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत.
सामनेवाले यांचे वकील श्री.पाटील यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांनी सदरील विज जोडणी व्यापारी कारणासाठी घेतली आहे व
10 एच.पी. ची मोटार बसवलेली आहे. सदरील वापर हा व्यापारी कारणासाठी असल्यामुळे तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक नाहीत. सामनेवाले यांचे वकिलांनी पूढे असा यूक्तीवाद केला की, तक्रारदार यांना मिटर रिडीगप्रमाणे विज देयक देण्यात आलेली आहेत. तसेच विज मिटरही बदलून देण्यात आलेले आहे. तक्रारदार यांनी विज देयक वेळोवेळी भरलेले नाहीत. त्यामुळे थकबाकी वाढत गेली. तक्रारदार यांनी विज मिटर घेतल्यापासून फक्त एकदाच बिल भरलले आहे ते बिल दि.27.3.2011 रोजी रक्कम रु.2000/- भरले आहे. तदनंतर तक्रारदार यांनी कोणतेही विज देयक भरले नाही. तक्रारदार यांचा विज देयका बाबत वाद असल्यास त्यासाठी त्यांनी सक्षम अधिका-याकडे अर्ज करणे आवश्यक आहे. तक्रार चालविण्याचा अधिकार या मंचास नाही. सामनेवाले यांचे वकीलांनी या मंचाचे लक्ष सी.पी.एल. वर वेधले व तक्रारदार यांना मिटर रिंडीगप्रमाणे विज देयक देण्यात आलेले आहेत. विज देयक न भरल्यामूळे तक्रारदार यांचा विज पुरवठा नियमाप्रमाणे खंडीत करण्यात आलेला आहे. सबब, तक्रारदार यांची तक्रार रदद करावी अशी विनंती केली आहे.
तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्राचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या दस्ताचे अवलोकन केले. सामनेवाले यांचे शपथपत्राचे व दस्ताचे (सीपीएल) यांचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी विज पुरवठा हा तेलघाण्याचा व्यवसाय सूरु करण्यासाठी घेतला आहे. सदरील तेलघाणा चालविण्यासाठी तक्रारदार यांना 10 एच.पी. चा लोड घेतलेला आहे. सदरील लोडचा विचार केला असता तक्रारदार म्हणतात त्याप्रमाणे दरमहा 50 ते 120 यूनिट चा वापर केला आहे ही बाब न पटण्यासारखी आहे. 10 एच.पी. चे कनेक्शन व त्यावर चालणारी मोटार यांचा विचार केला असता निश्चितच विद्यूत वापर तक्रारदार म्हणतो त्याप्रमाणे येणे अशक्य आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना मिटर बदलून दिलेले आहे. सामनेवाले यांनी सीपीएल तक्ता दाखल केला. त्यांचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी फक्त दि.27.3.2011 रोजी रककम रु.2,000/- चे विज देयक भरल्याचे निदर्शनास येते. तदनंतर तक्रारदार यांनी विज देयक भरले नाही अगर सामनेवाले यांचेकडे मिटर बाबत लेखी तक्रार ही दिलेली नाही. तक्रारदार म्हणतात की, त्यांनी तोंडी चौकशी केली परंतु त्या बाबत त्यांनी कोणत्याही तारखेला चौकशी केली या बाबत सविस्तर निदर्शनास आणले नाही. तक्रारदार यांनी वेळोवेळी विज देयक देण्यात आलेले आहेत. तक्रारदार यांनी विज देयकाप्रमाणे रक्कम भरली नाही.तसेच सदरील विज देयका बाबत सामनेवाले यांचेकडे वादही उपस्थित केलेला नाही. तक्रारदार यांनी सदरील विज पुरवठा हा व्यापारी कारणासाठी घेतलेला आहे.त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक नाहीत. तक्रारदार यांनी या मंचासमोर सदरील व्यवसाय हा स्वतःच्या उपजिवीकेसाठी करीत होते या बाबतही विश्वासार्य पुरावा सादर केलेला नाही. तक्रारदार यांनी विज देयक नियमितपणे भरले नसल्यामुळे सामनेवाले यांनी नियमाप्रमाणे विज पुरवठा खंडीत केला आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली नाही. सबब, तक्रारदार यांची तक्रार रदद होण्यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे.
मुददा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2) खर्चाबददल आदेश नाही.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड
जयंत पारवेकर
लघुलेखक