(आदेश पारीत द्वारा- श्री.विजयसिंह ना.राणे, मा.अध्यक्ष)
-/// आ दे श ///-
(पारीत दिनांक 08 डिसेंबर, 2011)
तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तूत तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
यातील तक्रारदार श्री कालीमोद्दीन अलिमोद्दीन इनामदार यांची गैरअर्जदार यांचेविरुध्द तक्रार थोडक्यात अशी आहे की, तक्रारदार चांदूर बाजार ते अमरावती रोडवर अपघतात सापडला आणि त्या आपघातात त्यांचा डावा पाय चिरडल्या गेला व अंगावर सुध्दा गंभीर जखमा झाल्या. त्यांना उपचाराकरीता अमरावती येथे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने मेडीकल कॉलेज नागपूर येथे हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी मांडीपासून पाय कापावा लागेल असा सल्ला दिला. यास त्यांनी सअहमती दर्शविली आणि त्यांना गैरअर्जदार डॉक्टरच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. गैरअर्जदार डॉक्टरने त्यांची तपासणी करुन पाय कापण्याची गरज नाही व रुग्ण सहा महिन्यांत ऑपरेशन करुन बरा होऊ शकतो असे सांगीतले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने औषधोपचाराचे दरम्यान रुपये 5,11,000/- एवढी रक्कम गैरअर्जदार यांचेकडे वेळोवेळी भरणा केली. सदर औषधोपारादरम्यान तक्रारदारावर चार शस्त्रक्रिया करण्यात आल्या, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. तक्रारदार दुस-याचे मदतीशिवाय चालूफीरु शकत नाही आणि त्यांना फारच वेदना होतात. तसेच पायाचे हाड बरोबर न जुडल्याने कटकट असा आवाज येतो.
पुढे तक्रारदाराने गैरअर्जदाराकडे अपंगत्वाच्या दाखल्याची मागणी केली, तेंव्हा 50% तात्पुरते अपंगत्व आहे असा दाखला दिला. जेंव्हा की त्यांना कायम अपंगत्वाचा दाखला मिळणे आवश्यक होते. तक्रारदाराने उपचाराचे दरम्यान झालेल्या खर्चाबाबत बिले, ऑपरेशन नोट्स, डिस्चार्ज कार्ड इत्यादी कागदपत्रांची मागणी केली, मात्र गैरअर्जदाराने टाळाटाळ केली. गैरअर्जदार यांच्या चूकीच्या निदानामुळे तक्रारदारास तीन वर्षे यातना सहन कराव्या लागल्या. पुढे तक्रारदाराने सामान्य रुग्णालय, अमरावती येथे तपासणी केली आणि अपंगत्वाच्या दाखल्याची मागणी केली. तेंव्हा तेथील तीन तज्ञ डॉक्टरांनी त्यांची तपासणी करुन 45% कायम अपंगत्वाचा दाखल दिला आणि असे सांगीतले की, त्यांच्या पायाचे हाड अद्यापपावेतो जुळले नसून आणखी शस्त्रकीयेची गरज आहे. जर त्यावर शस्त्रक्रिया केली नाही तर पायाला ‘गँगरीन’ नावाचा रोग होऊन पाय तोडावा लागेल. तक्रारदाराने वकीलामार्फत नोटीस दिली व ऑपरेशन चार्जेस, नर्सिंग चार्जेस, रुम चार्जेस, डिस्चार्ज कॉर्ड इत्यादिंची मागणी केली. सदर नोटीस गैरअर्जदारास प्राप्त होऊन सुध्दा त्यांनी त्यास कोणतेही उत्तर दिले नाही. म्हणुन शेवटी नाईलाजाने तक्रारदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन, तीद्वारे तक्रारदाराने गैरअर्जदाराकडे वेळोवेळी जमा केलेली रक्कम रुपये 5,11,000/-, उपचारादरम्यान इतर 2 नातेवाईकांचा करावा लागलेला खर्च रुपये 2 लक्ष, तक्रारदारास झालेल्या मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासाबाबत रुपये 3 लक्ष, भविष्यात येणारा औषधोपचाराचा खर्च रुपये 1 लक्ष आणि मानसिक व शारीरिक त्रास इत्यादिचा खर्च रुपये 2 लक्ष याप्रमाणे एंकदरीत रुपये 13,11,000/- एवढी रक्कम मिळावी अशा मागण्या केलेल्या आहेत.
यातील गैरअर्जदार यांना मंचातर्फे नोटीस बजविण्यात आली, त्यावरुन हजर होऊन त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला.
गैरअर्जदाराने तक्रारदाराने त्यांचेविरुघ्द केलेली सर्व विपरीत विधाने नाकबूल केली. तक्रारदाराने हेतूपुरस्सरपणे सर्व दस्तऐवजांवर खोट्या तारखा दर्शवून आर्थिक लाभ मिळविण्याचे दृष्टीने ही तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे. तक्रारदाराचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत कालबाह्य आहे आणि तक्रारदाराने केलेले प्रतिज्ञापत्र हे अमरावती येथे केलेले असून कायदेशिररित्या अदखलपात्र असल्यामुळे ते खारीज होण्यास पात्र आहे असा प्राथमिक आक्षेप घेतला.
गैरअर्जदाराचे म्हणणे असे आहे की, दिनांक 22/4/2004 रोजी तक्रारदार गैरअर्जदार यांचे दवाखान्यात भरती झाला तेंव्हा त्यांनी तपासणी करुन पाय कापण्याची गरज नाही, तो ऑपरेशनद्वारे बरा होऊ शकतो असे सांगण्यात आले आणि त्याप्रमाणे गैरअर्जदाराने प्रयत्न करुन उपचार केलेले आहेत. गैरअर्जदार यांच्या प्रयत्नामुळेच तक्रारदाराचे दोन्ही पाय साबूत असून सद्यःस्थितीत तो दोन्ही पायावर चालू शकतो. तक्रारदाराचा अपघातात निकामी झालेला पाय न तोडता, अथवा न कापता गैरअर्जदाराने आवश्यक ती काळजी घेऊन त्याचेवर उपचार केले आहेत, मात्र तक्रारदाराने मागणी केलेले खोटे प्रमाणपत्र न दिल्यामुळे ही खोटी तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
त्यांचे पुढे असेही म्हणणे आहे की, तक्रारदारास 50% अपंगत्वाचा दाखला देण्यात आलेला आहे. तक्रारदाराच्या विनंतीनुसार मोटार अपघात न्यायाधिकरणासमक्ष साक्ष दिलेली आहे. थोडक्यात तक्रारदाराची सदर तक्रार ही खोटी व गैरकायदेशिर आहे म्हणुन ती खारीज करावी असा उजर घेतला.
तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून, सोबत दाखला, अपंगत्वाचा दाखला, लिफापा, छायाचित्रे, प्रथम खबर, घटनास्थळ पंचनामा, जखमी अहवाल प्रत, फॉर्म AA ची प्रत, अंतीम अहवाल, रजीस्ट्रेशन पर्टिकुलरची प्रत, फिटनेस प्रमाणपत्र, वाहनाची टॅक्स पावती, इंशुरन्स पॉलीसीची प्रत, डॉक्टरचे प्रमाणपत्र, स्पेशल मुख्त्यारपत्राची प्रत, उपचारासंबंधिची कागदपत्रे, रजीस्टर्ड नोटीस, पावती व पोचपावती इत्यादी दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केले आहेत. गैरअर्जदार यांनी त्यांचे दवाखान्यात भरती असलेल्या कालावधीचे वैद्यकिय दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केले आहेत.
सदर प्रकरणात दोन्ही पक्षांचा युक्तीवाद मंचाने ऐकला.
यातील तक्रारदाराने केलेल्या निवेदनाप्रमाणे नागपूर येथील मेडीकल हॉस्पीटल मध्ये त्यांचा पाय मांडीपासून कापावा लागेल असा सल्ला मिळाल्यामुळे त्यास असहमती दर्शवून, गैरअर्जदार डॉक्टरने त्यांचा पाय सहा महिन्यात बरा होऊ शकतो असे अभिवचन दिले म्हणुन तक्रारदार त्यांचे दवाखान्यात भरती झाले. प्रत्यक्षात कोणताही डॉक्टर रुगण निश्चितपणे दुरुस्त होईल असे सामान्यतः सांगत नाही. कारण अशा प्रकरणात केवळ प्रयत्न करणे एवढेच त्यांचे हाती असते. तक्रारदाराचे म्हणण्याप्रमाणे तो अपघातामध्ये गंभीर दुःखापत झालेला रुग्ण होता. पुढे गैरअर्जदार डॉक्टरने वेळोवेळी तकारदारावर शस्त्रक्रिया केल्या व उपचार केले. तक्रारदाराने सदर तक्रारीत गैरअर्जदार डॉक्टरने त्यांचे उपचारात कोणत्या प्रकारे निष्काळजीपणा केला असे नमूद केलेले नाही. तसेच त्यांचे उपचारात कोणताही निष्काळजीपणा केल्याबद्दलचा कागदोपत्री पुरावा वा तज्ञांचा पुरावा या प्रकरणात तक्रारदाराने सादर केला नाही. यात असे दिसते की, गैरअर्जदार डॉक्टरची साक्ष तक्रारदाराने त्यांचेतर्फे मोटार वाहन अपघाताचे प्रकरणात स्वतःचा साक्षीदार म्हणुन घेतलेली आहे, त्यामध्ये गैरअर्जदाराने त्यांचेवर तिनदा शस्त्रक्रिया केली. त्यांचा पाय कापावा लागला नाही आणि तक्रारदाराचा पाय वाचविण्यात ते यशस्वी झाले व तीन महिन्यानंतर त्यांचे दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली असे नमूद केलेले आहे. त्यांनी दवाखान्यामध्ये ते घेत असलेल्या शुल्कासंबंधिची पुरेसी माहिती या साक्षीदरम्यान दिलेली आहे. तसेच त्यांनी ही बाब नाकारली की, तक्रारदार हा त्यांचेकडे तीन वर्षाचे कालावधीसाठी भरती होता. त्यांनी पुढे असेही नमूद केले की, त्यांना आणखी एका शस्त्रक्रियेची गरज होती, जेणेकरुन तो पूर्णपणे बरा झाला असता. यासबंधी संबंधित न्यायालयाने सुध्दा तक्रारदाराचे हे म्हणणे की, तो 3 वर्षाचे कालावधीकरीता गैरअर्जदार डॉक्टरचे दवाखान्यात भरती होता इत्यादी बाबी अमान्य केल्या आहेत. या सर्व बाबींचा एकत्रितपणे विचार केला असता, सदर तक्रारीत तक्रारदाराने गैरअर्जदार डॉक्टरवर केवळ आरोप केले आहेत, मात्र गैरअर्जदार डॉक्टरचा निष्काळजीपणा तक्रारदार मंचासमक्ष सिध्द करु शकले नाहीत.
वरील सर्व वस्तूस्थितीचा विचार करता, आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
-/// अं ती म आ दे श ///-
1. तक्रारदाराची तक्रार निकाली काढण्यात येते.
2. खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.