श्री. विजयसिंह राणे, मा. अध्यक्ष यांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 15/12/2011)
1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्यांचे कथनानुसार, त्यांनी उपचाराकरीता गैरअर्जदाराकडे दि.12.01.2000 रोजी भेट दिली असता, त्यांची हृदयासंबंधीची तपासणी करण्यात आली व नंतर त्यांची अँजीओग्राफी करण्यात आली. गैरअर्जदारांनी त्यांना 80% ब्लॉकेज असल्याचे सांगितले व लवकरात लवकर अँजिओप्लास्टी करुन घ्या असे सांगितले. तक्रारकर्ते व त्यांचे नातेवाईक यांना रु.2,00,000/- खर्च येईल असे सांगितले. आता पैश्याची व्यवस्था नसल्यास दोन, तीन दिवसात करा व तोपर्यंत ह्यांना माझ्याकडे भरती ठेवा असे सांगितले व पैश्याची व्यवस्था करुन हॉस्पिटलमध्ये जमा करुन द्या, तसे न केल्यास व त्वरित उपचार न केल्यास हृदय रोगाचा झटका येऊ शकतो. त्यानंतर तक्रारकर्त्याने पुढे 10.09.2009 ला अपोलो हॉस्पीटल, मद्रास येथे पुन्हा तपासणी केली. तेथेसुध्दा अँजिओग्राफी करण्यात आली व तेथील निष्कर्ष गैरअर्जदारांनी सांगितलेल्या निष्कर्षाच्या विपरीत निघाले आणि कोणत्याही प्रकारचे ब्लॉकेज नाही असे सांगण्यात आले. दरम्यानच्या काळात तक्रारकर्त्यांना शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला. तसेच तो शासकीय कर्मचारी असल्याने, सतत भयभीत राहावे लागले होते. त्यामुळे ते योग्य काम करुन शकले नाही. गैरअर्जदारांचे सदर वर्तन हे अनुचित आहे. यामुळे तक्रारकर्त्यांना खुप त्रास झालेला आहे व गैरअर्जदारांचा रु.2,00,000/- हडपण्याचा हेतू दिसत होता, म्हणून तक्रारकर्त्यांनी ही तक्रार मंचासमोर दाखल केली व तीद्वारे त्यांना झालेला आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासाबद्दल रु.18,72,000/- नुकसान भरपाई मिळावी, अपोलो हॉस्पीटल, मद्रास येथे आलेला खर्च रु.22,000/-, तक्रारीबद्दलचा खर्च रु.9,000/- मिळावा इ. मागण्या केलेल्या आहेत.
2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना दिली, त्यांनी लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदाराने सर्व विपरीत विधाने नाकबुल केली. तक्रारकर्ता त्यांच्याकडे आले, त्यांची तपासणी केली. अँजिओग्राफीनुसार 80% अवरोध असल्याचा निष्कर्ष त्यात आढळून आले. त्याप्रमाणे तक्रारकर्त्यास अँजिओप्लास्टी करुन घ्यावी असा सल्ला दिला. अन्यथा हृदय विकाराचा त्रास होण्याची शक्यत आहे असे सांगितले. उपचाराकरीता लागणा-या खर्चाचा अंदाज सांगितला. तक्रारकर्त्याची आर्थिक परिस्थीती बरोबर नसल्यामुळे योग्य ते शुल्क घेतले. तक्रारकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 1999 मध्ये त्यास हृदय विकाराचा त्रास झाला होता व अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यात आला होता. तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराकडे भेट दिल्यानंतर जवळ-पास 8 महिन्यानंतर अपोलो हॉस्पिटलमध्ये तपासणी केली होती. त्या दरम्यान गैरअर्जदारांच सल्याप्रमाणे औषधोपचार सुरु होता. गैरअर्जदाराने आपले कर्तव्य बजावले. त्याला जी वस्तूस्थिती आढळून, त्याप्रमाणे उपचार केला व सल्ला दिला. तक्रारकर्त्यास त्याचेवर केलेल्या तपासणीसंबंधीचा अहवाल पूर्णपणे देण्यात आला होता, त्यात काहीही चूक नाही. गैरअर्जदारांचा या प्रकरणात कोणताही दोष नाही. गैरअर्जदार सुप्रसिध्द हृदय विकार तज्ञ आहे. त्यांच्या औषधोपचारामध्ये तक्रारकर्त्याचे ब्लॉकेज दरम्यानच्या काळात दूर झालेले असावे आणि गैरअर्जदारांच्या स्थितीचा फायदा घेऊन त्यांचेजवळून पैसे उकळण्याच्या दृष्टीने गैरअर्जदाराविरुध्द खोटी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आणि ती खारीज व्हावी असा उजर घेतला आहे.
3. सदर प्रकरण युक्तीवादाकरीता आल्यानंतर, मंचाने उभय पक्षांचा युक्तीवाद त्यांचे वकिलांमार्फत ऐकला. तसेच दाखल करण्यात आलेली शपथपत्रे व दस्तऐवजांचे सुक्ष्म अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले.
-निष्कर्ष-
4. यातील तक्रारकर्त्याची मुख्य तक्रार या आधारावर आहे की, 12.09.2009 रोजी त्याने अपोलो हॉस्पीटल, मद्रास याठिकाणी जी तपासणी करुन घेतली व जो अहवाल त्यांना प्राप्त झाला, तो गैरअर्जदार यांनी 12.01.2009 रोजी दिलेल्या अहवालाच्या विपरीत आहे. दुस-या अहवालात संबंधित ठिकाणी मार्ग अवरोध झाल्याचे दिसून येत नाही. मात्र गैरअर्जदाराने दिलेल्या अहवालात सदर मार्ग 80% अवरुध्द झालेला आहे. याचा अर्थ गैरअर्जदाराने दिलेला अहवाल व सल्ला हा अतिशय चुकीचा व निष्काळजीपणाचा होता असा होत नाही. या बाबीसंबंधी तक्रारकर्त्यांनी कोणताही पूरावा दिलेला नाही. तक्रारकर्त्याने प्राप्त केलेला दुसरा अहवाल 8 महिन्यांच्या कालावधीनंतरचा आहे. तक्रारकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यास गैरअर्जदारास हृदय विकाराचा गंभीर धोका सांगितल्यानंतर तक्रारकर्त्याने काही उपचार घेतले नसावे ह्याची शक्यता उघड आहे तक्रारकर्ता हा दरम्यानच्या काळात आपल्याला झालेल्या आजारासंबंधी योग्य तो उपचार घेत असावा. गैरअर्जदाराने असा उपचार सुचविलेला आहे आणि औषधोपचार चालू ठेवण्यास सांगितले आहे. दरम्यानच्या काळात औषधोपचारामध्ये अशा प्रकारचा मार्ग अवरोध नष्ट होऊन पुढील अहवाल हा, मार्ग अवरुध्द नसण्यासंबंधीचा येऊ शकतो. तक्रारकर्त्याने त्वरित दुसरी तपासणी करुन घेतलेली नाही, त्यामुळे गैरअर्जदाराने दिलेला अहवाल चुकीचा होता असा निष्कर्ष काढणे चुकीचे नाही.
5. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याची तक्रार मुख्य विधानाचे संबंधित मान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी जेव्हा तपासणी केली, तेव्हा मार्ग अवरुध्द झाला होता, तसा अहवाल त्यांनी तक्रारकर्त्यास दिला. त्यास औषधोपचार लिहून दिला व अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला आणि खर्चाचे अंदाजपत्रक दिले. पुढे 8 महिन्यानंतर तक्रारकर्त्यास ती स्थिती आढळून आली नाही. यासाठी गैरअर्जदाराला दोषी ठरविणे व त्यांनी आधी दिलेला अहवाल चुकीचा होता असा निष्कर्ष काढणे मंचाचे मते अयोग्य होईल. यावरुन सदर तक्रार ही गैरसमजापोटी दाखल करण्यात आलेली आहे असे दिसून येते. यास्तव खालीलप्रमाणे आदेश.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
2) उभय पक्षांनी तक्रारीचा खर्च आप-आपला सोसावा.