(मंचाचा निर्णय: श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 09/04/2012)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दि.09.04.2011 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. यातील तक्रारकर्तीची डॉ. गौतम पंचमतीया, यांचे विरुध्द थोडक्यात तक्रार अशी आहे की, तिला डाव्या डोळ्याचा मोतियाबिंदूचा त्रास होता व तिची शस्त्रक्रिया दि.02.11.2009 रोजी करण्यात आली, याबाबत गैरअर्जदारांनी रु.8,000/- घेतले. शस्त्रक्रियेपूर्वी तक्रारकर्तीला डाव्या डोळ्याने अस्पष्ट दिसत होते व शस्त्रक्रियेनंतर तिला स्पष्टपणे पाहता येईल असे सांगण्यांत आले होते, मात्र त्या डोळ्याने तिला दिसणे बंद झाले. गैरअर्जदारांनी तिला डॉ. प्रशांत बावनकुळे यांचेकडे पाठवले त्यांनी पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले. तक्रारकर्तीने इतर डॉक्टरांचा सल्ला घेतला व शेवटी दि.06.01.2010 रोजी ‘एल. व्ही. प्रसाद आय इन्स्टीटयूट, हैदराबाद’, येथे शस्त्रक्रिया केली त्यानंतर तिला चांगले दिसु लागले. सदर संस्थेच्या डॉक्टरांनी असा निष्कर्ष काढला की, दि.02.11.2009 रोजी जी शस्त्रक्रिया गैरअर्जदारांनी केली होती, त्यामुळे सदर दोष निर्माण झाला होता. म्हणून तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचात दाखल करुन ती व्दारे तिला विविध कारणांसाठी आलेला खर्च व मानसिक, शारीरिक त्रासाकरीता रु.5,00,000/- एवढी रक्कम नुकसान भरपाईपोटी मिळण्याबाबत मागणी केलेली आहे.
3. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत निशानी क्र.3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात अनुक्रमांक 1 ते 24 दस्तावेजांच्या छायांकित प्रती जोडलेल्या आहेत.
5. गैरअर्जदारांना नोटीस बजावण्यांत आली असता ते मंचात उपस्थित झाले असुन त्यांनी आपले उत्तर सादर केले आणि तक्रारीतील सर्व विपरीत विधाने नाकारली. गैरअर्जदारांचे निवेदन असे आहे की, डोळ्यातील अश्याप्रकारचा रक्तस्त्राव प्रत्येक व्यक्तिस वेगवेगळा होऊ शकतो. त्यांनी केलेल्या शस्त्रक्रियेसोबत त्यांचा कोणता संबंध नाही, त्यामुळे त्यांची कोणतीही दोषपूर्ण सेवा नाही व निष्काळजीपणा केलेला नाही व तक्रारकर्तीने असा निष्काळजीपणा केल्याबद्दल कोणताही पुरावा नाही. वैद्यकीय मॅन्यूअलप्रमाणे सुध्दा हा दोष कोणत्याही व्यक्तिस शस्त्रक्रियेनंतर किंवा अन्य कारणांनी होऊ शकतो असा उजर घेतला असुन त्यांचे विरुध्दची सदर तक्रार खारिज करावी अशी मंचास विनंती केलेली आहे.
6. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.09.04.2012 रोजी आली असता दोन्ही पक्ष गैरहजर, तसेच तक्रारीसोबत दाखल दस्तावेजांचे व युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले.
-// नि ष्क र्ष //-
7. सदर प्रकरणामधे तक्रारकर्तीने असे नमुद केले आहे की, तिने ज्या ठिकाणी दिवशी व शस्त्रक्रियाकरुन घेतली, तेथील डॉक्टरांनी असा निष्कर्ष काढला होता की, गैरअर्जदारांनी केलेल्या शस्त्रक्रियेमुळे तिच्या डोळ्यात पुढील दोष निर्माण झाले, ज्यासाठी तिला दि.06.01.2010 रोजी ‘एल. व्ही. प्रसाद आय इन्स्टीटयूट, हैदराबाद’, येथे जाऊन शस्त्रक्रिया करावी लागली. परंतु यासंबंधीचे दस्तावेजांची काळजीपूर्वक पाहणी केली असता त्यातून असा कोणताही निष्कर्ष त्यावेळी काढलेला दिसुन येत नाही. तक्रारकर्तीने संबंधीत संस्थेचा कुठलाही वैद्यकीय अधिका-यांचा वा तज्ञांचा प्रतिज्ञालेख देखील मंचात दाखल केलेला नाही. या शिवाय तक्रारकर्तीने या प्रकरणात कोणताही तज्ञ व्यक्तिचा अभिप्राय अथवा अहवाल दाखल केलेला नाही.
8. सदर प्रकरण दाखल झाल्यानंतर वैद्यकीय अभिप्रायाकरीता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथील तज्ञांकडे पाठविण्यांत आले होते. त्यांनी त्यांनी सर्व कागदपत्रांची तपासणी करुन आपला अहवाल मंचास पाठविला, त्यांचे अहवालानुसार गैरअर्जदारांनी कोणत्याही प्रकारे वैद्यकीय निष्काळजीपणा या प्रकरणात केलेला नाही. या शिवाय तक्रारकर्तीने माहितीच्या अधिकाराखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून माहिती मिळवलेली आहे, ती दाखल केली त्याप्रमाणे तक्रारकर्तीने विचारलेल्या माहितीच्या संबंधाने वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टरांनी दिलेले उत्तर लक्षात घेतले तर तक्रारकर्तीला झालेला त्रास ही अत्यंत सर्वसामान्य बाब असल्याचे उघड होते. अश्या परिस्थितीत गैरअर्जदारांचा कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा केला होता असा निष्कर्ष काढलेला नाही.
9. तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार ही गैरसमजूतीतून दाखल केलेली आहे, हे उघड आहे. यास्तव सदर तक्रार निकाली काढण्यांत येते.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्तीची तक्रार निकाली काढण्यांत येते.
2. उभय पक्षांनी तक्रारीचा खर्च ज्याचा त्याने सोसावा.