व्दारा श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे, अध्यक्षा.
तक्रारकर्ता श्री किसन घासीलाल शहारे यांनी दाखल केलेली ग्राहक तक्रार थोडक्यात अशी की,
1. त्यांच्या पत्नी श्रीमती धुरपताबाई किसन शहारे यांचा दिनांक 18/10/2008 रोजी सर्पदंशाने मृत्यू झाला. त्या शेतकरी असल्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबतचा विमादावा हा विरुध्दपक्ष यांच्याकडे पाठविण्यात आला परंतू दिनांक 21/01/2010 चे पत्रानुसार विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी दावा खारीज केला.
..2..
..2..
2. तक्रारकर्ता यांनी मागणी केली आहे की, त्यांना विमादाव्याचे रुपये 1,00,000/- हे 12% व्याजासह देण्यात यावे तसेच शारीरिक व मानसिक त्रासासाठी रुपये 10,000/- तर तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 5,000/- हे विरुध्दपक्ष यांच्या कडून मिळावेत.
3. विरुध्दपक्ष क्रमांक 1 हे त्यांच्या लेखी जबाबात म्हणतात की, त्यांच्या सेवेत कोणतीही त्रुटी नाही. तक्रारकर्ता यांनी आवश्यक ते दस्ताऐवज सादर न केल्यामुळे विमादाव्याची फाईल ही बंद करण्यात आली. तक्रारकर्ता यांच्या पत्नीचा मृत्यू हा सर्पदंशाने झालेला नसल्यामुळे सदर ग्राहक तक्रार ही खारीज करण्यात यावी.
4. विरुध्दपक्ष क्रमांक 2 हे त्यांच्या लेखी जबाबात म्हणतात की, ते महाराष्ट्र राज्य शासनाला विमा योजना राबविण्यासाठी विना मोबदला सहाय्य करतात त्यामुळे तक्रारकर्ता हे त्यांचे ग्राहक नाहीत. त्यामुळे सदर तक्रारीतुन त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात यावी.
5. विरुध्दपक्ष क्रमांक 3 हे सदर प्रकरणात हजर झाले नाहीत.
कारणे व निष्कर्ष
6. तक्रारकर्ता, विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी दाखल केलेले दस्ताऐवज, शपथपत्रे, इतर पुरावा व केलेला युक्तीवाद यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता यांच्या पत्नीचा मृत्यू हा सर्पदंशाने झालेला आहे. पोलीस विभागातर्फे तयार करण्यात आलेला मर्ग रिपोर्ट व इतर दस्ताऐवज हि बाब दर्शवितात. तसेच श्री संदीप पालवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी यांनी दिनांक 24/12/2008 रोजी तक्रारकर्ता यांना लिहीलेल्या पत्रात विषारी सापाने उजव्या पायाचे आंगठयाजवळील बोटास चावल्यामुळे धूरपताबाई किसन सहारे ही मरण पावली आहे असे वैद्यकिय अहवाल व मर्गच्या इतर कागदपत्रावरुन दिसून येते असे म्हटले आहे.
7. दिनांक 23/10/2008 च्या पोष्ट मॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे संभाव्य कारण हे विषारी सापाने घेतलेला चावा हे दर्शविले आहे. सदर प्रकरणात विसेरा रिपोर्ट रेकॉर्डवर दाखल करण्यात आलेला नसला तरी मृत्यूचे इतर कोणतेही कारण विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांचेकडून दाखविण्यात आलेले नाही त्यामुळे मृतक श्रीमती धूरपताबाई किसन सहारे यांचा मृत्यू हा सर्पदंशाने झालेला आहे हे तक्रारकर्ता यांचे म्हणणे स्विकारण्यास हरकत नाही.
8. तक्रारकर्ता यांच्या पत्नीचा मृत्यू हा दिनांक 18/10/2008 रोजी झालेला आहे. विरुध्दपक्ष क्रमांक 3 यांचेकडे दिनांक 30/04/2008 रोजी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा रक्कमेची मागणी करण्यात आली मात्र विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांना दिनांक 04/01/2010 रोजी पत्र लिहून तक्रारकर्ता यांच्या
..3..
..3..
विमादाव्यात काही त्रुटी काढल्या आहे व प्रथम माहीती अहवाल, इन्केवेस्ट पंचनामा, व्हिसेरा रिपोर्ट, राशन कार्ड हे कागदपत्रे नाहीत असे दर्शविले आहे. मात्र तक्रारकर्ता यांना या त्रुटीबद्दल कळविण्यात येवून त्यांचेकडून कागदपत्रे मागविण्यात आल्याचा कोणताही पुरावा रेकॉर्डवर नाही.
9. तक्रारकर्ता यांच्या पत्नी श्रीमती धूरपताबाई किसन सहारे यांचे नांव हे दिनांक 30/03/1998 नोंदीचा अनुक्रमांक 73, अन्वये गडेगांव, तालुका देवरी येथील शेतीच्या संदर्भात चढविण्यात आले आहे त्यावरुन या शेतकरी या संज्ञेअंतर्गत येतात.
10. विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी दिनांक 21/01/2010 च्या पत्रान्वये तक्रारकर्ता यांना आवश्यक ते दस्ताऐवज सादर न केल्यामुळे विमादावा हा बंद करण्यात येत असल्याचे कळविले आहे.
11. विमादावा हा दिनांक 30/04/2008 रोजी पाठविण्यात आलेला असून दोन वर्ष झाल्यानंतर विमादाव्यासंदर्भातील फाईल बंद करणे ही विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांच्या सेवेतील न्युनता आहे.
असे तथ्य व परीस्थिती असतांना खालिल आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
1. विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारकर्ता यांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत येणारी रक्कम रुपये 1,00,000/- ही दिनांक 21/01/2010 पासून तर ती रक्कम तक्रारकर्ता यांना प्राप्त होत पर्यंत 9% व्याजासह दयावी.
2. विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रासासाठी रुपये 3,000/- तर ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 1,000/- दयावेत.
3. विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी आदेशाचे पालन हे आदेशाच्या तारखेपासून एक महिण्याचे आत करावे.