निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 21/08/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 02/09/2013
तक्रार निकाल दिनांकः- 13/02/2014
कालावधी 05 महिने. 11 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
शितल भ्र.चंद्रभान पितळे, अर्जदार
वय 26 वर्षे. धंदा.घरकाम. अॅड.अरुण एम.राऊत.
रा.पडेगाव,ता.गंगाखेड,जि.परभणी.
विरुध्द
1 विभागीय व्यवस्थापक, गैरअर्जदार.
दि न्यु इंडिया एश्योरन्स कं.लि. अॅड.जी.एच.दोडीया.
विभागीय कार्यालय, 153400, सावरकर भवन,
शिवाजी नगर, कॉंग्रेस हाऊस रोड,पुणे 422005.
2 विभागीय व्यवस्थापक, स्वतः
डेक्कन इन्शुरंन्स अॅन्ड रि-इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि.
हारकडे भवन भानुदास नगर, बिग बाजारच्या पाठी मागे,
आकाशवाणी चौक, औरंगाबाद 431003.
3 तालुका कृषि अधिकारी,
तालुका कृषि कार्यालय,गंगाखेड.
ता.गंगाखेड जि.परभणी.
4 शाखा व्यवस्थापक,
न्यु इंडीया एश्योरंन्स कं.लि.
अॅड शर्मा यांचे घराचा वरचा मजला,
नानलपेठ, परभणी 431401.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदाराच्या मयत पतीचा शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमादावा मंजूर करण्याचे नाकारुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, ती मौजे पडेगाव ता.गंगाखेड जि.परभणी येथील रहिवाशी असून दिनांक 11/06/2012 रोजी तिचे पती नामे चंद्रभान सटवाजी पितळे यांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला.
अर्जदाराचे म्हणणे की, तिचे पती हयात असतांना मौजे पडेगांव ता.गंगाखेड येथील गट क्रमांक 115 (क) मधील त्यांच्या मालकीची 84 गुंठे शेतजमीन कसून खात व कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होते. याबद्दल अर्जदाराच्या पतीचे नाव 7/12 उतारा, गाव नमुना 8-अ, 6-ड, 6 क, इ. कागदपत्रावर आलेले आहे. तसेच 6-क वारस नोंदवही नुसार अर्जदार ही मयत चंद्रभान यांची कायदेशिर पत्नी व वारस आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, तिचे मयत पती शेती व्यवसाया बरोबरच शेळी पालन म्हणून जोडधंदा करत होते. तिचे पती दिनांक 11/06/2012 रोजी परळी-गंगाखेड जाणा-या रेल्वे मार्गावर असलेल्या स्वतःच्या शेतामध्ये शेळी चरण्यासाठी घेवुन गेले असता शेळया चरत चरत रेल्वे ट्रॅकवर गेल्याने शेळयांना हाकलुन देत असतांना त्या दरम्यान भरधाव वेगात अचानक रेल्वे आली व अर्जदाराच्या पतीस धडक दिली, त्यामुळे अर्जदाराच्या पतीचे शरीराचे दोन तुकडे पडले व अपघाताने जागीच मृत्यू झाला.
अर्जदाराचे म्हणणे की, तिच्या पतीचा सदर अपघाती मृत्यू नंतर अर्जदाराने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत लाभ मिळावा म्हणून गैरअर्जदार क्रमांक 3 कडे सर्व कागदपत्रांसह विमादावा दाखल केला. गैरअर्जदार क्रमांक 3 ने सदरचा विमादावा दिनांक 19/10/2012 रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी परभणी यांचेकडे पाठवला व त्यांनी तो दिनांक 22/10/2012 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 कडें पाठवला व गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी विमादावा मंजुरीसाठी गैरअर्जदार क्रमांक 4 मार्फत गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीकडे पाठविला.
अर्जदाराचे म्हणणे की, सदरच्या विमा दाव्याबाबत गैरअर्जदार क्रमांक 3 कडे चौकशी केली असता त्यांनी असे सांगीतले की, अर्जदाराचा विमादावा कंपनीने नामंजूर केला आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदार विमा कंपनीने 21/03/2013 च्या पत्राव्दारे अर्जदाराचा विमादावा “ मयत शेतक-याचा मृत्यू अत्यंत निष्काळजीपणे स्वतःचा जिव धोक्यात घालून रेल्वे ट्रॅक ओलांडतांना झाले असलेमुळे ” नामंजूर केला. अर्जदारास कळविले.
गैरअर्जदाराचे सदरचे कारण एकदम चुकीचे आहे व विमा कंपनीने विमादावा नाकारुन सेवेत त्रुटी दिली, म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले. व मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करावा. व गैरअर्जदारांना आदेश करावा की, त्यांने अर्जदारास शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत अर्जदारास तिच्या मयत पतीच्या विमादाव्यापोटी 1 लाख रु. द्यावेत सदरच्या रक्कमेवर दिनांक 11/06/2012 पासून 15 टक्के दराने द.सा.द.शे. व्याजदराने द्यावयाचा आदेश करावा. व तसेच तक्रार अर्ज खर्चापोटी 5,000/- अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.
अर्जदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 5 वर 13 कागदपत्राच्या प्रती दाखल केले आहेत, ज्यामध्ये रेप्युडेशन लेटर, क्लेम नाकारल्याची इंटरनेटकॉपी, गैरअर्जदार क्रमांक 3 चे कृषी अधीकारी, परभणी यास लिहिलेले पत्र, कृषी अधीकारी परभणीचे गैरअर्जदार क्रमांक 2 ला पत्र, क्लेमफॉर्म भाग-1, क्लेमफॉर्म भाग -2, क्लेमफॉर्म भाग-3, शपथपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, 7/12 उतारा, होल्डींग प्रमाणपत्र, गाव नमुना 6 क, 6 ड प्रमाणपत्राच्या प्रती दाखल केले आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदाराना नोटीसा काढण्यात आल्या.
गैरअर्जदार क्रमांक 1 व 4 विमा कंपनी वकिला मार्फत मंचासमोर
हजर व नि.क्रमांक 14 वर आपला लेखी जबाब सादर केला, त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे. व तसेच अर्जदार ही विमा कंपनीची ग्राहक नाही वा त्याने हप्त्यापोटी विमा कंपनीकडे रक्कम देखील भरलेली नाही, म्हणून ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत सदरची तक्रार मंचासमोर चालू शकत नाही व तसेच त्यांचे म्हणणे की, त्रिपक्षीय करारा प्रमाणे शेतक-यास विमा कंपनी विरुध्द सदरची तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही व ती खारीज होणे योग्य आहे.
विमा कंपनीचे म्हणणे की, विमा कंपनीने अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही, तसेच त्याने सदर विमादावा संपूर्ण कागदपत्रासह त्यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर सदर कागदपत्राची विमा कंपनीने पहाणी केल्यानंतर असे निदर्शनास आले की, अर्जदाराचे पती निष्काळजीपणे रेल्वे पटरी ओलांडत असतांना तिच्या पतीचा अपघातात मृत्यू झाला व पॉलिसीच्या नियमा प्रमाणे निष्काळजीपणाने मृत्यू झाल्यास विम्याचा फायदा देता येणार नाही वा विमा कंपनीस त्यास जबाबदार राहणार नाही. असे स्पष्टपणे म्हंटले आहे. म्हणून विमा कंपनीने 21/03/2013 रोजीच्या पत्राव्दारे गैरअर्जदार क्रमांक 2 तर्फे अर्जदारास त्याचा विमादावा सदरचे कारण दाखवुन नामंजूर केला, म्हणून कळविले ते योग्यच आहे. विमा कंपनीने अर्जदारास कसल्याली प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही, म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ विमा कंपनीने नि.क्रमांक 15 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 मंचासमोर हजर व नि.क्रमांक 11 वर आपला लेखी जबाब सादर केला, त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, आमची संस्था ही विमा
विनियामक आणि विकास प्राधीकरण मान्यता प्राप्त विमा सेवा देणारी संस्था आहे. आमच्या अशीलास विमा सेवा पुरविणे आणि विमा कंपनी आणि आमचे आशील यांचेत मध्यस्थ म्हणून काम करणे एवढेच मर्यादित काम आमची संस्था करते, अर्जदाराने सदरची तक्रार ही अपु-या माहितीवर गैरसमजाने व चुकीने केलेली आहे.
या नेमणुकीसाठी आमच्या संस्थेने महाराष्ट्र शासनास कोणत्याही प्रकारची फि अथवा आर्थिक मदत मागीतलेली नाही, वा स्विकारलेली नाही, आम्ही अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही, आम्ही आमचे काम केलेले आहे, म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदर प्रकरणात आम्हांस जबाबदार धरण्यात येवु नये.
गैरअर्जदार क्रमांक 2 ने लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 12 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 3 यास मंचाची नोटीस तामील होवुनही मंचासमोर हजर नाहीत, त्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार क्रमांक 1 व 4 विमा कंपनीने अर्जदाराचा
शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तिच्या मयत
पतीचा विमादावा नामंजूर करुन अर्जदारास सेवेत त्रुटी
दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराचे पती नामे चंद्रभान सटवाजी पितळे यांचा दिनांक 11/06/2012 रोजी त्याचे शेता जवळील रेल्वे पटरी ओलांडतांना रेल्वेची धडक बसून अपघात झाला व सदर अपघातात अर्जदाराच्या पतीचे दोन तुकडे पडले व त्यात त्यांचा अपघातात मृत्यू झाला, ही बाब नि.क्रमांक 5/15 वर दाखल केलेल्या पोलीस स्टेशन गंगाखेड येथील अकस्मात मृत्यू नंबर 22/12 ने अकस्मात मृत्यू खबरी रिपोर्टच्या कागदपत्रावरुन व तसेच नि.क्रमांक 5/16 वर दाखल केलेल्या जबाबाच्या प्रतीवरुन व नि.क्रमांक 5/17 वर दाखल केलेल्या मरणोत्तर पंचनामाच्या प्रतीवरुन सिध्द होते. तसेच सदरची बाब नि.क्रमांक 5/18 वर दाखल केलेल्या घटनास्थळ पंचनामच्या प्रतीवरुन व नि.क्रमांक 5/19 वर दाखल केलेल्या पी.एम. रिपोर्ट वरुन दिसून येते.
अर्जदार ही मयत चंद्रभान सटवाजी पितळे यांची पत्नी व वारस आहे. ही बाब नि.क्रमांक 5/6 वर दाखल केलेल्या क्लेमफॉर्म भाग -2 तलाठयाच्या प्रमाणपत्रावरुन सिध्द होते.
अर्जदाराने तिच्या पतीच्या मृत्यूनंतर गैरअर्जदार क्रमांक 3 कडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तिच्या मयत पतीचा विमादावा सर्व कागदपत्रांसह दाखल केला होता, ही बाब नि.क्रमांक 5/7 वर दाखल केलेल्या क्लेमफॉर्म भाग -3 व नि.क्रमांक 5/3 वरील कागदपत्रावरुन व नि.क्रमांक 5/4 वरील कागदपत्राच्या प्रतीवरुन दिसून येते, व तसेच अर्जदाराचा सदरचा विमा प्रस्ताव गैरअर्जदार विमा कंपनीने 21/03/2013 रोजीच्या पत्राव्दारे अर्जदाराचे मयत पती अत्यंत निष्काळजीपणे स्वतःचा जिव धोक्यात घालून रेल्वेट्रॅक ओलांडताना स्वतःच्या मृत्यूस कारणाभुत ठरल्यामुळे पॉलिसी नियमा प्रमाणे निष्काळजीपणे मृत्यू झाल्यास त्याला विमादावा देता येत नाही, असे कारण दाखवुन अर्जदाराच्या तिच्या मयत पतीचा विमादावा मंजूर करण्याचे नाकारले होते, ही बाब नि.क्रमांक 5/1 वर दाखल केलेल्या रेप्युडेशन लेटर वरुन सिध्द होते.
मुळातच राज्यातील सर्व खातेदार शेतक-यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे घेतलेल्या शेतकरी विमा पॉलीसीचा खर्च लाभार्थी शेतक-यांचा अकस्मात अपघाती मृत्यू झाल्यावर त्याच्या कुटूबांला आर्थिक हातभार मिळावा व कुटूंबावर उपासमारीची पाळी येवू नये या उदात्त हेतूने शेतकरी विम्याची कल्याणकारी योजना राबविली गेली आहे.
गैरअर्जदार विमा कंपनीचे विमादावा नाकारण्याचे सदरचे कारण मंचास योग्य वाटत नाही, कारण विमा कंपनीने याबाबत कोणताही कागदोपत्री ठोस पुरावा मंचासमोर आणला नाही, केवळ पोलीस पेपर वरुन विमा कंपनीने तसे म्हंटले आहे.ते चुकीचे आहे.
याबाबत मा.राज्य आयोग केरळ यानी 2013(1) CPR 292 (Ker) Appeal No. 761/2011 United India Insurance Co. V/s Mary and others या प्रकरणा मध्ये म्हंटले आहे की, “ Death claim con not be repudiated only on basis of false police report ” सदरचा निकाल प्रस्तुत प्रकरणास तंतोतंल लागु पडतो.
अर्जदाराच्या पतीचा दिनांक 11/06/2012 रोजी रेल्वे अपघातात शरीराचे दोन तुकडे पडून मृत्यू झाला, हे वरील चर्चेवरुन सिध्द होते. विमा कंपनीने अर्जदाराचे पती निष्काळजीपणे रेल्वेपटरी ओलांडत होते व रेल्वे अपघात होवुन मृत्यूस तेच स्वतः कारणीभुत आहेत, असा प्रत्यक्षदर्शी घटना पाहणारा पुरावा मंचासमोर आणले नाही वा त्याचे शपथपत्र देखील मंचासमोर आणला नाही. निश्चितच विमा कंपनीने सदरचे चुकीचे कारण दाखवुन अर्जदारास तिच्या मयत पतीचा विमादावा मंजूर करण्याचे नाकारुन
अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे. असे मंचाचे ठाम मत आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 1 व 4 विमा कंपनीने ( Jointly and severally) आदेश
तारखे पासून 30 दिवसाच्या आत शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत
अर्जदाराच्या मयत पतीच्या विमादाव्यापोटी अर्जदारास रु.1,00,000/- फक्त
( अक्षरी रु. एकलाख फक्त) द्यावेत.
3 गैरअर्जदाराने तक्रार अर्ज खर्चापोटी अर्जदारास रु. 1,000/- फक्त ( अक्षरी रु.
एकहजार फक्त ) आदेश मुदतीत द्यावेत.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.