निकाल
दिनांक- 20.01.2014
(द्वारा- श्री.विनायक लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार सिंधुबाई रघुनाथ नवले यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला क्र.2 इन्शुरन्स कंपनीने सेवेत त्रुटी ठेवली आहे, म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारदार हे मौजे पारनेर ता.पाटोदा जि.बीड येथे राहतात. तक्रारदार हया शेती व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करतात. तक्रारदार यांचे पती रघुनाथ दगडू नवले हे शेती व्यवसाय करत होते. त्यांचे नावे शेतजमीन नोंदलेली आहे. तक्रारदार यांचे पती दि.06.08.2009 रोजी हिरो होंडा मोटार सायकल बीड नगर राज्य रस्त्यावरुन जात होते. सदरील मोटार सायकल स्लीप होऊन अपघात झाला व त्यामध्ये तक्रारदार यांच्या पतीस गंभीर जखमी होऊन ते मयत झाले. सदरील अपघाताबाबत माहिती पाटोदा पोलीस स्टेशन यांना देण्यात आली. पोलीसांनी सदरील अपघाताची चौकशीकरुन तक्रारदार यांच्या पतीचे मृत्यूची नोंद घेतली. तक्रारदार यांच्या पतीचे शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत त्यांच्या ताब्यात देण्यात आले. तक्रारदार यांचे पती हे व्यवसायाने शेतकरी होते. महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शेतक-यांसाठी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत सामनेवाला क्र.2 यांच्याकडे विमा उतरविलेला आहे, याविमा योजनेची कार्यवाही तालुका कृषी अधिकारी यांचे मार्फत सामनेवाला क्र.1 मार्फत विमा कंपनीकडे प्रस्ताव पाठवला जातो. तक्रारदार यांनी सदरील योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी सामनेवाला क्र.1 व 3 यांच्याकडे रितसर प्रस्ताव दाखल केला सर्व कागदपत्राची पुर्तता केलेली आहे. सदरील प्रस्ताव इन्शुरन्स कंपनीला प्राप्त झाल्यानंतर इन्शुरन्स कंपनीने एक महिन्याच्या आत त्यावर निर्णय घेऊन तक्रारदार यांना नुकसान भरपाई द्यावयाची होती. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांचा क्लेम मिळूनही तो अद्याप पावेतो मंजूर केलेला नाही. सबब तक्रारदार यांची विनंती की, सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा क्लेम मंजूर न केल्यामुळे सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. सबब तक्रारदार यांना विमा रक्कम रु.1,00,000/- देण्याचे आदेश व्हावे. तसेच तक्रारीचा खर्च व मानसिक, शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- देण्याचे आदेश सामनेवाला विरुध्द व्हावेत.
सामनेवाला क्र.1 कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्विस प्रा.लि., हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे सादर केले. सामनेवाला क्र.1 यांचे कथन की, त्यांना तक्रारदार यांच्या पतीचा क्लेम दि.30.10.2009 रोजी मिळाला. क्लेम सोबत संपूर्ण कागदपत्र नसल्यामुळे त्याबाबत माहिती त्यांनी तालुका कृषी अधिकारी यांना दिलेली आहे. सदरील बाब तालुका कृषी अधिकारी यांना कळवूनही कागदपत्राची पुर्तता केलेली नाही. त्यामुळे तक्रारदार यांचा क्लेम पुढील कार्यवाहीसाठी पाठवता आला नाही.
सामनेवाला क्र.2 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे सादर केले. सामनेवाला क्र.2 यांचे कथन की, सदरील तक्रार ही मुदतबाहय असल्यामुळे या मंचासमोर चालण्यास पात्र नाही. सामनेवाला क्र.2 यांना तक्रारदार यांचा क्लेम मिळालेला नाही. त्यामुळे सामनेवाला यांनी क्लेम नाकारुन त्रुटी ठेवली आहे हे कथन बरोबर नाही. सामनेवाला क्र.2 यांचे कथन की, मयत हा स्वतःच्या मोटार सायकलवरुन जात होता. सदरील मोटार सायकल मयत याने भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवली व अपघात झाला. मयत हा स्वतःच्या निष्काळजीपणामुळे अपघातास कारणीभूत ठरला. सदरील घटना ही मयत यांच्या निष्काळजीपणामुळे घडलेली असल्यामुळे ते शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा रक्कम मिळण्यास पात्र नाही. सामनेवाला क्र.2 यांचे पुढे कथन की, तक्रारदार यांनी क्लेम हा पॉलीसी कालावधीमध्ये दाखल केलेला नाही. सदरील क्लेम हा पॉलीसीचा कालावधी संपल्यानंतर 90 दिवसाच्या आत दाखल केलेला नाही. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही. म्हणून सदरील क्लेम नाकारण्यात यावा व तक्रार रदद करण्यात यावी.
सामनेवाला क्र.3 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे सादर केले. सामनेवाला क्र.3 यांचे कथन की, तक्रारदार यांनी दाखल केलेला क्लेम त्यांच्या कार्यालयास दि.16.10.2009 रोजी प्राप्त झाला. सदरील प्रस्ताव दि.26.10.2009 रोजी विमा कंपनीस सादर केला असून त्यामध्ये त्रुटी काढण्यात आली. सामनेवाला क्र.3 यांनी त्रुटीची पुर्तता करुन दि.22.03.2010 रोजी क्लेम विमा कंपनीकडे पाठविलेला आहे. तक्रारदार यांचा कोणताही क्लेम सामनेवाला क्र.3 यांच्याकडे प्रलंबित नाही. सामनेवाला क्र.3 यांनी सेवेत त्रुटी ठेवलेली नाही.
तक्रारदार यांनी स्वतःचे शपथपत्र मंचासमोर हजर केले. तसेच तक्रारीसोबत कागदपत्राची सूची देऊन दस्तऐवज हजर केलेले आहेत. सामनेवाला क्र.2 यांनी लेखी निवेदनासोबत इन्क्वेस्ट पंचनामा व शासननिर्णय जोडलेला आहे. तक्रारदार यांचे वकील श्री.पावसे व सामनेवाला क्र.2 यांचे वकील श्री.कुलकर्णी यांचा युक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर 1) सामनेवाला यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या
सेवेत त्रुटी ठेऊन, नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली, ही बाब तक्रारदार यांनी
शाबीत केली आहे काय? नाही.
2) तक्रारदार हे तक्रारीत नमुद केलेली मागणी
मिळण्यास पात्र आहे काय? नाही. 3) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 ते 3 ः- तक्रारदार यांचे वकील श्री.पावसे यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांचे पती हे मोटार अपघातात मयत झाले. तक्रारदार यांचे पती हे व्यवसायाने शेतकरी होते. महाराष्ट्र शासनाने शेतकरी जनता व्यक्तीगत अपघात विमा योजनासुरु केली आहे व त्या अंतर्गत शेतक-यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना रक्कम रु.1,00,000/- विमा कंपनीकडून मिळावी म्हणून विमा कंपनीकडे हप्ते भरलेले आहेत.सामनेवाला क्र.2 यांच्याकडे महाराष्ट्र शासनाने सदरील अपघाताबाबत विमा काढलेला आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे संपूर्ण कागदपत्र जोडून क्लेम दाखल केला आहे, तो क्लेम सामनेवाला यांनी मंजूर केला नाही. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. सबब तक्रारदार हे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत सामनेवाला क्र.2 इन्शुरन्स कंपनीकडून रु.1,00,000/- मिळण्यास पात्र आहे.
तक्रारदार यांच्या वकीलानी आपल्या युक्तीवादाचे समर्थनार्थ खाली नमुद केलेल्या केसचा आधार घेतला आहे.
1) First Appeal No.A/10/947
ICICI LOMBARD GENERAL INSURANCE CO. V/s. RANGRAO KESHAV
PATIL
BEFORE THE HON’BLE STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL
COMMISSION, MAHARASHTRA, MUMBAI.
यांनी दि.30 जानेवारी 2013 रोजी दिलेला न्यायनिर्णय मंचाचे निदर्शनास आणले.सदरील नमुद केलेल्या केसमध्ये विमा कंपनीने तक्रारदार यांचा क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवली आहे. म्हणून तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे असा निर्णय दिलेला आहे व कोल्हापूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांनी दिलेला आदेश बरोबर असलेबाबत निर्देश दिलेले आहे. सदर केसमध्ये इन्शुरन्स कंपनीने मयत हा दारु पीवून गाडी चालवत होता असा बचाव घेतला होता. मयत हा दारुच्या नशेत गाडी चालवित होता ही बाब सिध्द झाली नाही असे निर्देशित केलेले आहे. तसेच मयत व्यक्तीचे ड्रायव्हिंग लायसन्स हे क्लेम मंजूर करण्यासाठी आवश्यक नाही असे निर्देशित केलेले आहे.
2) First Appeal No.A/10/1254
ICICI LOMBARD GENERAL INSURANCE CO. V/s. DHONDIBA R
BHOGULKAR.
BEFORE THE HON’BLE STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL
COMMISSION, MAHARASHTRA, MUMBAI.
सदर केसमध्ये मा.राज्य आयोग, मुंबई यांनी शेतकरी अपघात विमा योजना ही सर्व सामान्य लोक कल्याणकारी योजना आहे. क्लेम संबंधी कागदपत्र हे विमा कंपनीच्या एजंटकडे पाठविण्यात आली होती म्हणजेच, ते कागदपत्र विमा कंपनीला मिळाले आहे असे गृहीत धरता येईल असे नमुद केलेले आहे. त्यामुळे इन्शुरन्स कंपनीने सदरील शेतक-यास शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम देण्याचे जिल्हा ग्राहक मंचाचे आदेश बरोबर असल्याचे नमुद केलेले आहे.
वर नमुद केलेल्या केसेसचा आधार घेऊन तक्रारदार यांच्या वकीलांनी तक्रारदार यांनी मयत व्यक्तीचे लायसन्स हजर केले नाही, या कारणास्तव क्लेम नाकारता येणार नाही असा युक्तीवाद केला व तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे. तक्रारदार यांची तक्रार मंजूर करण्यात यावी अशी विनंती केली.
या उलट, सामनेवाला क्र.2 इन्शुरन्स कंपनी यांचे वकील श्री.कुलकर्णी यांनी असा युक्तीवाद केला की, सामनेवाला क्र.2 यांच्याकडे क्लेम बाबत कागदपत्र मिळाले नाही. त्यामुळे तक्रारदार यांचा क्लेम नाकारण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. श्री.कुलकर्णी वकील यांनी या मंचाचे लक्ष सामनेवाला क्र.1 यांनी दाखल केलेल्या लेखी निवेदनावर वेधले व तक्रारदार यांनी दाखल केलेल्या क्लेममध्ये कागदपत्राची अपुर्तता असल्यामुळे तो क्लेम कृषी अधिकारी यांच्याकडे पुर्तता करणेकामी पाठविला आहे, त्या कागदपत्राची पुर्तता होऊन क्लेम सामनेवाला क्र.2 यांना मिळाला नाही. तसेच तक्रारदार यांचे वकीलांनी या मंचाचे लक्ष तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पोलीस पेपरवर वेधले व सदरील अपघाताबाबत निवेदन केले की, तक्रारदार यांचे पती हे स्वतः मोटार सायकल चालवित होते. सदरील मोटार सायकलची पासींग झालेली नव्हती. तक्रारदार यांचे पती भरधाव वेगाने मोटार सायकल चालवित होते, त्यांना सदरील मोटार सायकलचा वेग ताब्यात ठेवता आला नाही, सदरील मोटार सायकल भरधाव वेगात स्लीप होऊन तक्रारदार यांचे पती खाली पडले व त्या अपघातात ते मरण पावले.
सामनेवाला क्र.2 यांचे वकीलांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांचे पती स्वतःच्या निष्काळजीपणामुळे स्वतः मृत्यूस कारणीभूत झाले आहे.त्यामुळे महाराष्ट्र शासन व विमा कंपनी यांच्यामध्ये झालेला करार व त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने व इन्शुरन्स कंपनीने ठरविलेल्या अटीनुसार तक्रारदार यांचा क्लेम मंजूर होऊ शकत नाही. सदरील युक्तीवादाचे प्रित्यर्थ तक्रारदार यांचे वकीलांनी महाराष्ट्र शासन, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, शासन निर्णयामध्ये क्र.शेअवि 2008/प्र.क्र.187/11अ, मंत्रालय मुंबई.06 सप्टेंबर 2008 चे शेतकरी अपघात विमा योजनेबाबत पत्र दाखवले, सदरील पत्रामध्ये पान-8 परिच्छेद-इ मधील मुददा क्र.5 यांचा आधार घेऊन तक्रारदार यांचे पती वाहन चालवित होते व त्यांच्या चुकीमुळे त्यांचा मृत्यू झाला. म्हणून तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही.
वर नमुद केलेला युक्तीवाद लक्षात घेतला, तसेच महाराष्ट्र शासन यांनी शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत वेळोवेळी प्रसिध्द केलेल्या पत्राचे अवलोकन केले. तसेच तक्रारदारांचे पती यांचा अपघात कसा झाला, याबाबत पोलीस पेपरचे अवलोकन केले असता असे लक्षात येते की, दि.06.08.2009 रोजी सकाळी 11.00 वाजता मयत रघुनाथ नवले हे लक्ष्मण दगडू दहिफळे यांची स्प्लेंडर मोटार सायकल चालवित होते. सदरील मोटार सायकल नगर बीड राज्य रस्त्यावर येवलवाडी गावाचे हददीत वळणावर आली असता, सदरील मोटार सायकलचा वेग जास्त असल्यामुळे मयत यांना सदरील मोटार सायकल कंट्रोल करता आली नाही, वळणावर मोटार सायकल स्लीप होऊन तक्रारदार यांचे पती खाली पडले व ते जागेवरच मृत्यू झाले. सर्व पोलीस पेपरचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांचे पती हे मोटार सायकल चालवित होते.सदरील मोआर सायकल ही अतिशय वेगाने व निष्काळजीपणाने चालविल्यामुळे मोटार सायकल स्लीप होऊन ते दगडावर पडले व त्यात जबर मार लागून त्याचा मृत्यू झाला. पोलीसांनी सदरील अपघाताबाबत चौकशी करुन मयत श्री.रघुनाथ नवले यांच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाला व ते स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरले असा निष्कर्ष काढलेला आहे.
वर नमुद केलेला महाराष्ट्र शासन निर्णय 06 सप्टेंबर 2008 दस्त चे अवलोकन केले असता अट क्रमांक 5 मध्ये अपघातग्रस्त वाहनचालकाचे चुकीमुळे शेतक-यांचा मृत्यू झाल्यास/अपंगत्व आल्यास दोषी वाहनचालक वगळता सर्व शेतक-यांना प्रपत्र- ड मध्ये नमुद केलेल्या बाबीमुळे मृत्यू/अपंगत्व आल्यास केवळ अपघात झाला या कारणास्तव नुकसान भरपाई दावेमंजूर करण्यात येतील. तसेच अट क्रमांक 6 मध्ये अनावश्यक धोका पत्करला या कारणावरुनही प्रकरण नाकारता येणार नाही असे नमुद केलेले आहे.
वर नमुद केलेल्या अटीचा विचार केला असता वाहन चालकाच्या चुकीमुळे अपघात झाल्यास, त्या वाहन चालकास नुकसान भरपाई मिळणार नाही. म्हणजेच दोषी वाहन चालक वगळता सर्व शेतक-यांना नुकसान भरपाई मिळेल असे नमुद केलेले आहे. सबब या मंचाचे मते तक्रारदार यांचे पती रघुनाथ नवले हे स्वतः मोटार सायकल भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवित होते, ती मोटार सायकल भरधाव वेगात चालविल्यामुळे त्यांना वळणावर ती आवरता आली नाही. मोटार सायकल स्लीप होऊन तक्रारदार यांचे पती दगडावर पडले व त्यांना गंभीर मार लागला व त्यात ते मरण पावले. तक्रारदार यांचे पतीचा स्वतःच्या चुकीमुळे अपघात झाला म्हणून तक्रारदार हे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही.
तकारदार यांच्या वकीलांचा युक्तीवाद जरी ग्राहय धरला तरी, तक्रारदार हे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई वर नमुद केलेल्या कारणामुळे मिळण्यास पात्रनाही. सबब या मंचाचे मते तक्रारदार यांची तक्रार रदद होण्यास पात्र आहे. म्हणून मुददा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश 1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2) खर्चाबददल आदेश नाही.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड