निकालपत्र :- (दि.28/04/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (01) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले आहे. उभय पक्षकारांचे वकीलांचा अंतिम युक्तीवाद ऐकला. सदरची तक्रार सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा योग्य व न्याय क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे दाखल करणेत आली आहे. (02) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) सामनेवाला कंपनी ही वित्तीय व्यवसाय करणारी विमा कंपनी असून यातील तक्रारदार यांचे पती मयत शंकर आप्पाजी कडुकर यांचा शासनामार्फत सामनेवालांकडे ‘’शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत पॉलीस उतरविलेली असून सदर पॉलीसीचा क्र.181200/47/2009/939असा आहे. सदर पॉलीसीच्या कालावधीच दि.20/06/2009 रोजी तक्रारदाराचे पती शंकर आप्पाजी कडुकर यांचा शेतामधील झाडावरुन पडून अपघाती मृत्यू झाला. तदनंतर तक्रारदारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन सामनेवालांकडे क्लेम दाखल केला असता सामनेवाला यांनी दि.22/03/2010 रोजी क्लेम कट ऑफ डेट नंतर आल्याने नाकारण्यात येत आहे. असे अतिशय चुकीचे तांत्रिक कारण देऊन तक्रारदाराचा न्याययोग्य क्लेम नाकारलेला आहे. (ब) तक्रारदार आपल्या तक्रारीत पुढे सांगतात, वास्तविक तक्रारदार या अडाणी, अशिक्षीत महिला असून पतीच्या आकस्मिक अपघाती मृत्यूमुळे त्यांचेवर फार मोठे संकट कोसळले होते तसेच मुदतीचे व क्लेम प्रक्रियेची योग्य ती माहिती तक्रारदारास नसून सदरचा क्लेम हा शासकीय ऑफिसमधून सामनेवालांकडे पाठविणेत आला आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदाराचा न्याययोग्य क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी केलेली आहे. त्यामुळे तक्रारदारास सदरची तक्रार मा. मंचासमोर दाखल करणे भाग पडले. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर होऊन विमा क्लेमची रक्कम रु.1,00,000/- द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह, तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/-व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.3,000/- सामनेवालांकडून मिळणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती सदर मंचास तक्रारदाराने केली आहे. (03) तक्रारदाराने तक्रारीच्या पुष्टीप्रित्यर्थ सामनेवाला यांचे क्लेम नाकारलेचे पत्र, इन्क्वेस्ट पंचनामा, शवपरिक्षेकरिता पोलीस अहवाल, वर्दी जबाब, पंचनामा, पोस्ट मार्टेम रिपोर्ट इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (04) सामनेवालांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार अ) तक्रार अर्ज खोडसाळ, लबाडीचा असून सकृतदर्शनी नामंजूर होणेस पात्र आहे. सामनेवालांनी तक्रारदाराची तक्रार परिच्छेद निहाय नाकारलेली आहे. तक्रारदाराने केलेला क्लेम हा शासनाने मंजूर केलेल्या अटीस धरुन पात्र नव्हता. शासनाने दिलेल्या अटीनुसार क्लेम मुदतीत दाखल केला नसल्याने तो सामनेवाला यांनी नामंजूर केला आहे. सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, तक्रार अर्जातील कलम 6 मधील तपशील खोटा व चुकीचा आहे. तक्रारदाराने मागणी केलेली रक्कम चुकीची आहे. सदरची रक्कम मागणेचा तक्रारदारास हक्क नाही. सबब सामनेवालांना विनाकारण खर्चात पाडलेबद्दल रक्कम रु.5,000/-तक्रारदाराकडून सामनेवालांना देणेबाबत आदेश व्हावा व सदरची तक्रार नामंजूर करण्यात यावी अशी विनंती सामनेवालांनी सदर मंचास केली आहे. (05) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ महाराष्ट्र शासनाचा जी.आर. दाखल केलेला आहे. (06) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवालांचे लेखी म्हणणे व उभय पक्षकारांच्या वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1) सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवली आहे काय? -- होय 2) काय आदेश? -- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- तक्रारदार यांचे पती मयत शंकर आप्पाजी कडुकर यांचा शासनामार्फत सामनेवालांकडे ‘’शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत सामनेवालांकडे पॉलीस उतरविलेली असून सदर पॉलीसीचा क्र.181200/47/2009/939असा आहे हे सामनेवाला यांनी मान्य केले आहे. सदर पॉलीसीच्या कालावधीच दि.20/06/2009 रोजी तक्रारदाराचे पती शंकर आप्पाजी कडुकर यांचा शेतामधील झाडावरुन पडून अपघाती मृत्यू झाला. तदनंतर तक्रारदारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन सामनेवालांकडे क्लेम दाखल केला असता सामनेवाला यांनी दि.22/03/2010 रोजी क्लेम “कट ऑफ डेट नंतर आल्याने ” अशा कारणाने क्लेम नाकारला आहे हे सामनेवालांचे पत्रावरुन निर्विवाद आहे. प्रस्तुतचा क्लेम सामनेवालांनी क्लेम कागदपत्रे ही cut off date निर्धारित तारखेनंतर म्हणजे दि.15/11/2009 नंतर पाठवलेने परिपत्रकाप्रमाणे प्रस्तुतचा क्लेम नाकारला आहे. सामनेवालांनी प्रस्तुत विमा योजनेचे दि.6 सप्टेंबर-2008 चे शासन निर्णय क्र.शेअवि2008/प्र.क्र.187/11अे दि.6सप्टेंबर-2008 प्रस्तुत प्रकरणी दाखल केले आहे. सदर परिपत्रकाचे अवलोकन केले असता कलम 6 प्रमाणे प्रस्तुत योजनेचा कालावधी हा दि.15/08/2008 ते 14/08/2009 एक वर्षाच्या कालावधीसाठी होता. सदर कालावधीतच तक्रारदाराचे पतीचा मृत्यू दि.20/06/2009 रोजी झाला आहे. परिपत्रकातील कलम 23 (इ) (3) पान नं.9 प्रमाणे - शेतक-यांचा विमा प्रस्ताव विहित कागदपत्रांसह विमा योजनेच्या कालावधीत कधीही प्राप्त झाला तरी तो विचारात घेणे विमा कंपनीला बंधनकारक राहील. अखेरच्या दिवसात झालेल्या अपघातासाठी योजनेचा कालावधी संपल्यापासून 90 दिवसांपर्यंत विमा प्रस्ताव स्विकारण्यात येतील. समर्थनीय कारणास्तव 90 दिवसानंतर प्राप्त दावे स्विकारण्यात यावेत, तथापि, अपघाताचे सुचनापत्र विमा कालावधी संपल्यानंतर 90 दिवसांपर्यंत घेणे बंधनकारक राहील व त्यानुसार सविस्तर प्रस्तावांवर कार्यवाही करणे कंपनीस बंधनकारक राहील. तक्रारदाराने प्रस्तुत विमा कालावधीनंतर 90 दिवस म्हणजे दि.14/08/2009 पासून 90 दिवस म्हणजे दि.15/11/2009 पूर्वी दावा दाखल करावयास हवा होता. सदर कट ऑफ डेट पर्यत दावा व कागदपत्रे दाखल न केलेने क्लेम नाकारला आहे. तक्रारदाराने प्रस्तुतचा दावा क्लेम नं.181200/48/2010/1813 अन्वये दाखल केलेचे दि.22/03/2010 चे सामनेवालांचे पत्रात नमुद केले आहे. याचा अर्थ सन 2010 मध्ये दावा दाखल केला तो विमा कंपनीने दि.22/03/2010 रोजी नाकारला आहे. याचा अर्थ सदर दावा जानेवारी अथवा फेब्रुवारी-2010 मध्ये दाखल केला असला पाहिजे. विमा पॉलीसीप्रमाणे 1 महिन्यांचे आत दावा रक्कम अदा करणे कंपनीवर कलम 15 प्रमाणे बंधनकारक आहे. तक्रारदाराचे वकीलांनी युक्तीवादाच्या वेळी कट ऑफ डेट ला 2 महिने विलंब झालेचे मान्य केले आहे. वर नमुद कलम 23 (इ) (3) प्रमाणे कट ऑफ डेट नंतरसुध्दा समर्थनीय कारणास्तव प्राप्त दावे स्विकारणेत यावे याबाबत स्पष्टपणे नमुद केले आहे. सामनेवाला विमा कंपनीचे अपघाताचे सुचनापत्र 90 दिवसांपर्यंत मिळाले नाही असे कुठेही प्रतिपादन केले नाही. सबब वर नमुद तरतुदीचा विचार करता विमा मागणीचा दावा दोन महिन्याचा विलंब हा प्रस्तुत तक्रारदार ही अडाणी विधवा स्त्री असून ती चंदगड तालूक्यातील हलकर्णी सारख्या दुर्गम व छोटया खेडयात राहते. एकंदरीत वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारदाराचे पतीचे मागे तिच्यावर तिच्या मुलांची असणारी जबाबदारी व मूळ पॉलीसीचा विचार करता प्रस्तुत विलंब माफ करणे सदर तरतुदीनुसार कंपनीस शक्य होते. तसेच तक्रारदारास पॉलीसीचा मूळ हेतू विचारात न घेता निव्वळ तांत्रिक कारणास्तव विमा दावा नाकारुन सामनेवालांनी सेवेत गंभीर त्रुटी ठेवलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 :- तक्रारदार नमुद पॉलीसीप्रमाणे रक्कम रु.1,00,000/- क्लेम नाकारले पासून व्याजासह मिळणेस पात्र आहे. तसेच सामनेवाला यांनी सेवेत ठेवलेल्या त्रुटीमुळे तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास पॉलीसीप्रमाणे असलेली रक्कम रु.1,00,000/-(रु.एक लाख फक्त) अदा करावी. सदर रक्कमेवर 22/03/2010 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे. 3) तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/-(रु. एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |