निकालपत्र
(द्वारा मा.सदस्या : श्रीमती.चारु विनोद डोंगरे)
१. तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.
२. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार सुमन नाथा निमसे ही नाथा मारूती निमसे यांची पत्नी आहे. तक्ररदार हिच्या मयत पतीचा दिनांक १९-१२-२०१५ रोजी मोटार अपघात झाला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी आनंदऋषीजी हॉस्पीटल येथे दाखल केले. त्यांच्यावर औषधोपचार चालु असतांना ते दिनांक २५-१२-२०१५ रोजी मयत झाले. सदरची घटना ही त्यांच्या चुलत भावाचा स्कुटरवर पाठीमागे बसुन, वाकोडी फाटा सोलापुर रोडने बांधकामासाठी साहीत्य खरेदी करण्यासाठी गेले होते व परत येतांना गावी जाणेसाठी दुसरे वाहन मिळते काय हे पाहण्यासाठी आले त्यावेळी रस्ता क्रॉस करतांना नगरहुन येतांना मोटारसायकलने धडक दिली व त्यामध्ये त्यांचा अपघात झाला. त्यानंतर उपचारानंतर त्यांचा मृत्यु झाला. याबाबतची खबर भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला देण्यात आली. त्यानंतर तक्रारदाराने संपुर्ण कागदपत्रांसह सामनेवाले यांच्याकडे विमा दावा सादर केला. तक्रारदार यांचे मयत पतीचा शेतकरी अपघात विमा सामनेवाले यांच्याकडे उतरविला होता. सदर विमा दावा तक्रारदाराने कृषी अधिकारी यांच्याकडे पाठविला व कृषी अधिकारी यांनी सामनेवाले यांना सादर केला. सामनेवाले यांनी सदर विमा दावा दिनांक ०९-०६-२०१६ रोजीचे पत्र देऊन दिनांक १९-१२-२०१५ रोजी चक्कर येऊन व त्यामध्ये त्यांचा मृत्यु झाला, असे चुकीचे कारण देऊन नाकारला आहे. अशा प्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदाराला विमा दावा मिळून दिला नसल्यामुळे सेवेत त्रुटी दिली, त्यामुळे तक्रारदाराने सदरची तक्रार मंचात दाखल करून परिच्छेद क्रमांक ५ मधील विनंतीनुसार मागणी केली.
३. सामनेवाले यांनी त्यांचे लेखी कथन नि.१३ नुसार दाखल केले. त्यामध्ये त्यांनी तक्रारदार हिच्या मयत पतीचा विमा उतरविला होता व विम्याचा कालावधी मान्य केलेला आहे. सदरील विमा हा रूपये २,००,०००/- रकमेचा शेतकरी अपघात विमा होता, ही बाबही मान्य केलेली आहे. तक्रारदाराने विमा दाव्यासोबत दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करून दिनांक १९-१२-२०१५ रोजी तक्रारदाराचे मयत पती आनंदऋषी हॉस्पीटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले ही बाब नमुद आहे. सामनेवाले यांनी पुढे असे कथन केले की, तक्रारदार हिचे मयत पतीला मोटारसायकल चालवीत असतांना चक्कर आली व ते चक्कर येऊन पडले. त्यामुळे त्यांना अॅडमीट करावे लागले व उपचारामध्ये दिनांक २५-१२-२०१५ रोजी मृत्यु झाला. सदर मृत्यु हा अपघात नसुन आजारपणामुळे झालेला आहे. त्यांनी पुढे असे कथन कले की, आनंदऋषी हॉस्पीटलमध्ये आणल्यानंतर तक्रारदार हिच्या मयत पतीला २.३० वाजता व ३.३० च्या सुमारास कॉर्डीओ रिस्पायरेटरी अॅरेस्ट झाल्यामुळे व श्वास घ्यायला त्रास झाल्यामुळे मृत्यु झाला. तक्रारदाराचा मृत्यु हा अपघात नाही. अपघात झाल्यानंतर १० दिवसानंतर तक्रारदाराच्या पुतण्याने तक्रार दिलेली आहे. परंतु इन्हेस्टीगेशन रिपोर्टनुसार व दाखल कागदपत्रांवरून तक्रारदाराचे पती हे आजारी होते व चक्कर येऊन पडले. त्यामुळे त्यांचा मृत्यु झाला. सदरचा मृत्यु हा अपघात झाला नाही, म्हणुन तक्रारदाराचा विमा दावा सामनेवाले यांनी नाकारला. सदरील बाब ही सामनेवाले यांनी दिलेली कोणतीही त्रुटी नाही, म्हणुन तक्रारदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी, अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे.
४. तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, त्यात दाखल केलेली कागदपत्रे, वकील श्री.बी.एम. वाळके यांनी केलेला युक्तिवाद सामनेवाले यांनी दाखल केलेली कागदपत्रे, वकील श्री.ए.के. बंग यांनी केलेला युक्तिवाद यावरून न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांचे उत्तर आम्ही सकारण खालील विवेचनाप्रमाणे देत आहोत.
अ.नं. | मुद्दे | निष्कर्ष |
(१) | तक्ररादार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | होय |
(२) | सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवेत त्रुटी दिली आहे काय ? | होय |
(३) | तक्रारदार नुकसान भरपाईची रक्कम मिळणेस पात्र आहे काय ? | होय |
(४) | आदेश काय | अंतिम आदेशा प्रमाणे |
कारणमिमांसा
५. मुद्दा क्र. (१) : तक्रारदार ही मुंडवे ता.जि. अहमदनगर येथील रहिवासी आहे. तिच्या मयत पती नाथा मारूती निमसे यांचा सामनेवाले यांच्याकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा उतरविला होता. तक्रारादार हिचे मयत पती हे मृत्युपुर्वी शेतकरी होते व त्यांची नावे फेरफार वरून नोंद केली, ही बाब स्पष्ट करण्यासाठी तक्रारदार हिने गाव क्र.६ ‘अ’ चा उतारा, दाखल केला आहे. तक्रारदार यांच्या मयत पतीचा विमा उतरविला होता, ही बाब सामनेवाले यांनी मान्य केली आहे. त्यामुळे ती निश्चीतच सामनेवाले यांची ग्राहक आहे. सबब मुददा क्र.१ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
६. मुद्दा क्र. (२ व ३) - तक्रारदार ही मुंडवे ता.जि. अहमदनगर येथील रहिवासी आहे. तिच्या मयत पती नाथा मारूती निमसे यांचा सामनेवाले यांच्याकडे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा उतरविला होता. तक्रारादार हिचे मयत पती हे मृत्युपुर्वी शेतकरी होते व त्यांची नावे फेरफार वरून नोंद केली, ही बाब स्पष्ट करण्यासाठी तक्रारदार हिने गाव क्र.६ ‘अ’ चा उतारा, दाखल केला आहे. तक्रारदार यांच्या मयत पतीचा विमा उतरविला होता, ही बाब सामनेवाले यांनी मान्य केली आहे. दिनांक १९-१२-२०१५ रोजी तक्रारदाराचे मयत पती आनंदऋषी हॉस्पीटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले ही बाब नमुद आहे. सामनेवाले यांनी पुढे असे कथन केले की, तक्रारदार हिचे मयत पतीला मोटारसायकल चालवीत असतांना चक्कर आली व ते चक्कर येऊन पडले. त्यामुळे त्यांना अॅडमीट करावे लागले व उपचारामध्ये दिनांक २५-१२-२०१५ रोजी मृत्यु झाला. सदर मृत्यु हा अपघात नसुन आजारपणामुळे झालेला आहे. त्यांनी पुढे असे कथन कले की आनंदऋषी हॉस्पीटलमध्ये आणल्यानंतर तक्रारदार हिच्या मयत पतीला २.३० वाजता व ३.३० च्या सुमारास कॉर्डीओ रिस्पायरेटरी अॅरेस्ट झाल्यामुळे व श्वास घ्यायला त्रास झाल्यामुळे मृत्यु झाला. तक्रारदाराचा मृत्यु हा अपघात नाही. अपघात झाल्यानंतर १० दिवसानंतर तक्रारदाराच्या पुतण्याने तक्रार दिलेली आहे. परंतु इन्हेस्टीगेशन रिपोर्टनुसार व दाखल कागदपत्रांवरून तक्रारदाराचे पती हे आजारी होते व चक्कर येऊन पडले. त्यामुळे त्यांचा मृत्यु झाला. सदरचा मृत्यु हा अपघातामुळे झाला नाही, या कारणावरून तक्रारदाराचा विमा दावा सामनेवाले यांनी नाकारला.
परंतु प्रकरणात दाखल असलेले पोलीस पेपर त्यावर नमुद आहे की, तक्रारदारचा अपघाती मृत्यु झाला. तसेच त्याचा मृत्यु हा चक्कर येऊन पडले व डोक्याला मार लागला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी आनंदऋषी हॉस्पीटलमध्ये दाखल केल्यानंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला, ही बाब दाखल कागदपत्रांवरून स्पष्ट होते. त्यामुळे सामनेवाले यांनी घेतलेला बचाव हा संयुक्तिक नाही. तक्रारदार हिचे पतीचा शेतकरी अपघात विमा उतरविला होता. परंतु सामनेवाले यांनी कैफीयीमध्ये बचाव घेतला की, सदरचा मृत्यु अपघाती नाही नैसर्गिक आहे, अपघाती मृत्युसाठी पॉलिसीच्या अटी व शर्ती बांधील असतात. मृतकाचा मृत्यु झाला परंतु पॉलिसीच्या अटीची बाधा येते व ती अट नमुद केली आहे की, ‘ A policy to provide compensation to all farmers as defined in policy who sustains any bodily injury resulting solely and directly from accidental caused by external violent and visible means resulting in specified contingencies such as dealth, permannae disablement or loss of limb.’ परंतु तक्रारदार हिचे मयत पतीला डोक्याला मार लागुन गंभीर जखमी झाले व ते उपचार घेत होते, ही बाब हॉस्पीटलच्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाल्यामुळे सदरची अट ही ग्राह्य धरता येणार नाही. तक्रारदार हिने तिच्या मयत पतीचा चक्कर येऊन गाडीवरून पडले व डोक्याला मार लागला, त्यावर उपचार घेत असतांना त्यांचा मृत्यु झाला, ही बाब स्पष्ट करण्यासाठी पोलीस पेपर्स व हॉस्पीटलचे कागदपत्र दाखल केले आहेत. या संपुर्ण दस्तऐवजावरुन तक्रारदार हिने सिध्द केले आहे. त्यामुळे सामनेवाले यांनी घेतलेला बचाव ग्राह्य धरता येत नाही. सबब मुद्दा क्र.१ व २ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
तक्रारदार हिला सदरची तक्रार सामनेवाले यांनी चुकीच्या कारणने विमा दावा नाकारला म्हणुन मंचात तक्रार दाखल करावी लागली. त्यासाठी तिला मानसिक व शारीरिक त्रासही सहन करावा लागला, या त्रासापोटी काही रक्कम तक्रारदार हिस देणे न्यायाचे ठरेल.
७ मुद्दा क्र. (३) : मुद्दा क्रमांक १, २ व ३ वरील विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
१. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. |
२. सामनेवाले यांनी तक्रारदारास विमा दाव्याची रक्कम रूपये २,००,०००/- (अक्षरी दोन लाख मात्र) व त्यावर दिनांक ०९-०६-२०१६ पासून संपुर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. ९ टक्के दराने व्याज द्यावे. |
३. सामनेवाले यांनी तक्रारदार हिस शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रूपये ५,०००/- (अक्षरी पाच हजार) व सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये ३,०००/- (अक्षरी तीन हजार) द्यावा. |
४. वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत मिळण्यापासून ३० दिवसाच्या आत करावी |
५. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी. |
६. तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी. |