(मंचाचा निर्णय: श्रीमती जयश्री येंडे - सदस्या यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 01/06/2012)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दि.01.06.2011 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. प्रस्तुत प्रकरणातील तक्रारकर्त्याचे म्हणण्यानुसार तो स्वतःच्या उपजिवीका व कुटूंबीयांच्या उदरनिर्वाहाकरीता ट्रक वाहतुकीचा व्यवसाय करतो. त्याने त्याचे मालकीच्या ट्रक क्र.एमएच-31/एपी-2729 चा विमा गैरअर्जदार कंपनीकडे काढलेला असुन त्याचा पॉलिसी क्र.281107/31/08/6300003968 असुन कालावधी दि.29.01.2009 ते 28.01.2010 असा होता. दि. 01.06.2009 रोजी गोंदीया जिल्ह्याच्या दुग्गीपार पोलिस स्टेशनच्या हद्दीत सदर वाहनाचा अपघात झाला, त्याची सुचना संबंधीत पोलिस स्टेशनला देऊन एफ.आय.आर. नोंदविण्यांत आला होता व सदर अपघाताची सुचना गैरअर्जदारांना देण्यांत आली. त्यानंतर तक्रारकर्त्याने सदरचे वाहन दि.13.06.2009 रोजी मॉं अंबे बॉडी वर्क्स, भंडारा रोड, नागपूर येथे दुरुस्तीकरीता टाकले, सदर वाहनाला दुरुस्तीपोटी रु.1,62,870/- एवढा खर्च आला. तक्रारकर्त्याची उपजिवीका ही ट्रकवर असल्याने त्याने सदरची रक्कम अदा केली. गैरअर्जदार विमा कंपनीला वारंवार विनंती करुनही व नोटीस पाठवुनही त्यांनी तक्रारकर्त्याच्या दाव्याचे निराकरण केले नाही व विम्याची रक्कमही परत केली नाही, ही त्यांचे सेवेतील कमतरता असल्यामुळे तक्रारकर्त्याने ट्रक दुरुस्तीच्या रक्कम रु.1,62,000/- मिळावी या मागणी करता सदरची तक्रार मंचाकडे दाखल केलेली आहे.
3. तक्रारकर्त्यानी प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र. 3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात दस्तावेज क्र.1 ते 8 च्या छायांकीत प्रती दाखल केलेल्या आहेत.
4. गैरअर्जदारांना प्रस्तुत प्रकरणात नोटीस बजावला असता मंचात हजर झाले असुन त्यांनी आपल्या जबाब खालिल प्रमाणे दाखल केलेला आहे...
गैरअर्जदारांचे कथनानुसार सदरच्या तक्रारीस व्यावसायीक तत्वाची बाधा येते, तसेच तक्रारकर्ता हा ‘ग्राहक’, या संज्ञेत येत नसल्यामुळे सदरची तक्रार या मंचाचे कार्यक्षेत्रात नाही. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याने सदरची पॉलिसी काढल्याचे म्हणणे मान्य केलेले आहे, परंतु इतर म्हणणे अमान्य केले आहे. गैरअर्जदारांचे कथनानुसार तक्रारकर्त्याचे दाव्याची योग्य छाननी व पडताळणी करुन तक्रारकत्याचा दावा त्वरीत निकाली काढला व तज्ञांनी केलेल्या मुल्यांकनाप्रमाणे प्रत्यक्षा नुकसान भरपाई तक्राराकर्त्यास दिली. मात्र गैरअर्जदारांनी मागणी केल्याप्रमाणे आवश्यक दस्तावेज तक्रारकर्त्याने सादर न केल्यामुळे सदरची रक्कम तक्रारकर्त्यास निर्गमीत करण्यांत आलेली नाही व सदर दाव्याचे विलंबाकरता तक्रारकर्ता हा स्वतःच जबाबदार आहे.
5. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास आवश्यक दस्तावेजांची मागणी करुनही आजपर्यंत पूर्तता केलेली नाही, त्यामुळे तक्रारकर्त्यास सदरच्या मुल्यांकनाप्रमाणे ठरवलेली रक्कम देता आली नाही. तक्रारकर्त्याने जरी सदरचे दस्तावेज गैरअर्जदारांकडे सादर केला नाही तरी ते सर्वेअरने केलेल्या मुल्यांकनाप्रमाणे पात्र रक्कम ` 47,700/- तक्रारकर्त्यास देण्यांस तयार आहे.
वरील सर्व बाबी लक्षात घेता गैरअर्जदारांनी दिलेल्या सेवेत कुठलीही कमतरता नसल्यामुळे तक्रारकर्त्याने सदरची तक्रार केवळ लाभ घेण्याचे हेतुने दाखल केली असल्यामुळे ती खारिज करण्यांत यावी अशी मंचास विनंती केलेली आहे.
6. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.11.05.2012 रोजी आली असता दोन्ही पक्ष हजर मंचाने त्यांचा युक्तिवाद ऐकला. तसेच तक्रारीसोबत दाखल दस्तावेजांचे व युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले.
- // नि ष्क र्ष // -
7. वरीष्ठ न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निकालांचा विचार करता तक्रारकर्ती ही गैरअर्जदारांनी ‘ग्राहक’, आहे व सदरची तक्रार चालविण्यास या मंचाला अधिकार आहे.
8. सदर प्रकरणातील एकंदर वस्तुस्थिती व दाखल दस्तावेज पाहता निर्वीवादपणे तक्रारकर्त्याने त्याचे मालकीचा ट्रक क्र.एमएच-31/एपी-2729 या वाहनाचा विमा गैरअर्जदारांकडे काढला होता. त्याच प्रमाणे दाखल दस्तावेजांवरुन असेही दिसुन येते की, सदरचा अपघात वैध कालावधीमधे दि.01.06.2009 रोजीह गोंदीया जिल्ह्यात दुग्गीपार पोलिस स्टेशनच्या हद्दीत झाला, तसेच दाखल दस्तावेजांवरुन हेही दिसुन येते की, तक्रारकर्त्याने संबंधीत वाहनाचा विमा दावा गैरअर्जदारांकडे सादर केला होता. गैरअर्जदारांचे शपथपत्रावरील कथन तसेच दाखाल दस्तावेजांमधील सर्वेअरचा अहवाल पाहता वाहनाचे मुल्यांकन `.47,700/- एवढे काढल्याचे दिसुन येते. गैरअर्जदारांच्या मते तक्रारकर्त्याने आवश्यक दस्तावेज सादर न केल्यामुळे सदरची रक्कम त्यास अदा करण्यांत आलेली नाही. दस्तावेजांवरील दि.10.01.2012 रोजीचे तक्रारकत्याचे शपथपत्र पाहता त्यांनी सदरची गैरअर्जदारांची मागणी केलेले दस्तावेज त्यांना दिल्याचे शपथपत्रात नमुद केलेला आहे. तक्रारकर्त्याचे म्हणणे की, त्यांनी वाहन दुरुस्तीपोटी रु.1,62,870/- एवढी रक्कम मॉं अंबे बॉडी वर्क्स, भंडारा रोड, नागपूर यांना दिलेली आहे, परंतु रक्कम दिल्याचा कुठलाही पुरावा सादर केला नाही. त्याच प्रमाणे सर्वेअरचा अहवालाप्रमाणे काढलेली रक्कम चुकीची आहे असेही तक्रारकर्त्याचे म्हणणे नाही, त्यामुळे सर्वेअरने काढलेली रक्कम रु.47,700/- मिळण्यांस तक्रारकर्ता पात्र आहे असे या मंचाचे मत आहे.
सबब हे मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. गैरअर्जदाराला आदेश देण्यांत येतो की, त्याने तक्रारकर्त्यास वाहनाच्या विमा दाव्यापोटी नुकसान भरपाई म्हणून रु.47,700/- एवढी रक्कम अदा करावी.
3. गैरअर्जदाराला आदेश देण्यांत येतो की, त्याने तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, शारीरिक व आर्थीक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.3,000/- अदा करावे.
4. वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.