निकाल
दिनांक- 25.06.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार ग्यानोबा विठोबा मुसळे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत क्लेम न देऊन सेवेत त्रुटी ठेवली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारदार हे मौजे रामपूरी तालुका गेवराई जिल्हा बीड येथील रहिवाशी आहे. तक्रारदार रामपूरी हे शेती व्यवसाय करुन आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. तक्रारदार यांचा मुलगा नामे गणेश हा दि.23.11.2010 रोजी विहीरीमध्ये पडून पाण्यात बुडून मयत झाला. तक्रारदार यांनी सदरील घटनेबाबत माहिती तलवडा पोलीस स्टेशनला दिली. पोलीसांनी घटनास्थळावर येऊन पंचनामा तयार केला व तक्रारदार यांच्या मुलाचे प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविले. मयत गणेश यांचे नावावर गट नं.119/अ मौजे रामपूरी येथे शेतजमीन नोंदलेली आहे. मयत हा व्यवसायाने शेतकरी होता.
महाराष्ट्र शासनाने सर्व शेतक-यांकरता शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना लागू केलेली आहे. या विमा योजनेअंतर्गत शेतक-यांचा अपघाती मृत्यू झाल्यास रक्कम रु.1,00,000/- देण्याची तरतूद केलेली आहे. महाराष्ट्र शासनाने सामनेवाला क्र.2 इन्शुरन्स कंपनीकडे विमा हप्त्याची रक्कम भरलेली आहे. तक्रारदार यांनी त्यांचा मुलगा मृत्यू झाल्यानंतर शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा रक्कम मिळावी म्हणून रितसर अर्ज सामनेवाला क्र.3 यांच्याकडे केला. सोबत तक्रारदार यांनी सर्व दस्त हजर केले. सामनेवाला यांना क्लेम व आवश्यक ते दस्त मिळाल्यानंतर क्लेम मंजूर करणे आवश्यक होते. सामनेवाला यांना प्रस्ताव मिळूनही त्यांनी तो आजपावेतो मंजूर केलेला नाही. सामनेवाला यांनी द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. सबब तक्रारदार यांची विनंती की, सामनेवाला यांच्याकडून तक्रारदार यांना विमा रक्कम रु.1,00,000/- व त्यावरील व्याज देण्याचा आदेश व्हावा. तसेच तक्रारदार यांना झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळावी व तक्रारीचा खर्च मिळावा.
सामनेवाला क्र.1 डेक्कन इन्शुरन्स व ब्रोकर्स लिमिटेड हे या मंचासमोर हजर झाले व त्यांनी निशाणी 8 अन्वये आपले लेखी म्हणणे सादर केले. सामनेवाला क्र.1 यांचे कथन की, सामनेवाला ही संस्था विमा विनियामक आणि विकास प्राधिकरण मान्यता प्राप्त विमा सेवा देणारी संस्था आहे. सदरील संस्था विमा सेवा पुरविण्याचे काम करते. तसेच विमा कंपनीचे मध्यस्थ म्हणून काम पाहते. सामनेवाला यांना मर्यादित कामी सल्लागार म्हणून नेमणूक केलेली आहे. त्यांच्याकडे आलेले प्रस्ताव हे इन्शुरन्स कंपनीकडे पाठविण्याचे काम करतात, त्याबददल त्यांना कोणताही मोबदला मिळत नाही. सामनेवाला क्र.1 यांनी सेवेत त्रुटी ठेवलेली नाही, त्यांच्याविरुध्द तक्रार रदद करण्यात यावी.
सामनेवाला क्र.2 हे या मंचासमोर हजर झाले व त्यांनी निशाणी 16 अन्वये आपले लेखी म्हणणे सादर केले. सामनेवाला क्र.2 यांचे कथन की, तक्रारदार यांनी तलवडा पोलीस स्टेशन येथे दिलेली खबर व त्यासंबंधी कागदपत्र हजर केले नाही. तक्रारदार यांच्या मुलाचा मृत्यू अपघाताने झालेला नाही, तक्रारदार यांनी तालुका कृषी अधिका-यांमार्फत क्लेम दाखल केला नाही, तक्रारदार यांनी स्वतः विमा हप्ता भरलेला नाही, तक्रारदार हे ग्राहक नाही, तक्रारदार यांनी त्यांचा क्लेम जिल्हा कमिटी समोर सादर केला नाही, अपघाताबाबत तक्रारदाराने कोणतेही दस्त हजर केले नाही, सबब तक्रारदार यांचा क्लेम नाकारण्यात यावा.
सामनेवाला क्र.3 हे या मंचासमोर हजर झाले व त्यांनी निशाणी 6 सोबत आपले लेखी म्हणणे सादर केले. सामनेवाला क्र.3 यांचे कथन की, तक्रारदार यांचा क्लेम दि.25.04.2011 रोजी सामनेवाला क्र.1 यांच्याकडे पुढील कारवाईसाठी सादर केलेला आहे. सामनेवाला क्र.3 यांनी द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवलेली नाही.
तक्रारदार यांनी स्वतःचे शपथपत्र निशाणी 19 अन्वये दाखल केले आहे. सामनेवाला क्र.2 यांनी सक्षम अधिका-यांचे शपथपत्र निशाणी 17 अन्वये दाखल केले आहे. तक्रारदार व सामनेवाला यांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1) सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांचा क्लेम प्रलंबित
ठेवून सेवेत त्रुटी ठेवली आहे, ही बाब तक्रारदार यांनी
शाबीत केली आहे काय ? नाही.
2) तक्रारदार हे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा
योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास पात्र आहे काय? नाही.
3) आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 3 ः- तक्रारदार यांचे वकील श्री.पावसे यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांचा मुलगा गणेश हा दि.23.10.2010 रोजी पाण्यात पडून मृत्यू पावला. सदरील घटनेबाबत तक्रारदार यांनी पोलीस स्टेशनला खबर दिली, पोलीसांनी घटनास्थळावर येऊन घटनास्थळ पंचनामा तयार केला व प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविले. तक्रारदार यांनी क्लेम मिळणेकामी दस्त सामनेवाला यांच्याकडे पाठविले, ते दस्त सामनेवाला यांना मिळूनही सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा क्लेम मंजूर केला नाही. तक्रारदार हे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास पात्र आहे. मयत कणेश हा व्यवसायाने शेतकरी होता. सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा क्लेम मंजूर करण्यात अनावश्यक दिरंगाई केली आहे. तक्रारदार यांचा क्लेम मंजूर करण्यात यावा.
सामनेवाला क्र.2 यांचे वकील श्री.साळवे यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांनी त्यांचा क्लेम रिलायन्स कंपनीकडे पाठविल्याबाबत दस्त हजर केलेले आहे, तो प्रस्ताव कृषी अधिका-यांमार्फत सामनेवाला कंपनीस मिळालेला नाही, तसा कोणताही पुरावा तक्रारदार यांनी दाखल केलेला नाही. त्यामुळे सदरील क्लेम सामनेवाला क्र.2 यांना मिळाला आहे व त्यावर निर्णय घेण्यास सामनेवाला यांनी टाळाटाळ केली आहे असा निष्कर्ष काढता येणार नाही. तसेच सामनेवाला क्र.2 यांचे वकील श्री.साळवे यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार यांनी जे दस्त हजर केले त्याबाबत तक्रारदार यांच्या मुलाचा मृत्यू पाण्यात बुडून झाला नाही. याबाबत पोलीसात दिलेली खबर दाखल केलेली नाही. तसेच मृत्यूचे कारण ही स्पष्ट होत नाही. अपघात कसा झाला याबाबत तक्रारीमध्ये स्पष्ट नमुद केलेले नाही. तक्रारदार यांनी प्रपोजल विमा कंपनीकडे न पाठविल्यामुळे त्याबाबत सामनेवाला क्र.2 यांना कोणताही निर्णय घेता आला नाही. सामनेवाला क्र.2 यांनी द्यावयाच्या सेवेत कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही.
तक्रारदार यांनी दाखल केलेले दस्त याचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत क्लेम फॉर्म रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी यांच्याकउे दाखल केल्याचे दिसते, तो क्लेम फॉर्म कृषी अधिका-यामार्फत पाठविल्याबाबत कोणताही दस्त तक्रारदार यांनी हजर केला नाही. तक्रारदार यांनी क्लेम हा कृषी अधिका-यामार्फत दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडे ब्रोकर्स डेक्कन इन्शुरन्स अँड रिइन्शुरन्स कंपनी यांचेमार्फत पाठविणे आवश्यक होते. सामनेवाला क्र.1 यांनी दाखल केलेले म्हणणे व शपथपत्र लक्षात घेता त्यामध्ये तक्रारदार यांचा क्लेम त्यांना प्राप्त झाल्याबाबत कुठेही उल्लेख नाही तसेच तो क्लेम सामनेवाला क्र.2 यांच्याकडे पाठविल्याबाबत योग्य खुलासा होत नाही. सामनेवाला क्र.3 यांची कैफियत लक्षात घेता त्यांनी तो क्लेम सामनेवाला क्र.1 कडे पाठविला आहे असे नमुद केले आहे, परंतू तो क्लेम हा रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी यांच्याकडे पाठविण्यासाठी दाखल केल्याचे दिसते. तो क्लेम सामनेवाला क्र.2 यांच्याकडे पाठविला गेला नाही. तक्रारदार यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत क्लेम मिळण्यासाठी क्लेम फॉर्म ज्या कंपनीचा विमा आहे, त्या कंपनीकडे नामनिर्देश करणे गरजेचे होते. तक्रारदार यांनी चुकीच्या इन्शुरन्स कंपनीकडे तो क्लेम फॉर्म भरुन पाठविला आहे , तो क्लेम सामनेवाला क्र.2 यांना प्राप्त झाल्याबाबत कोणताही पुरावा हजर केलेला नाही. सबब सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांचा क्लेम देण्यास टाळाटाळ केली अगर विलंब केला असे म्हणता येणार नाही. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांचेकडे क्लेम दाखल केल्यावरच सामनेवाला क्र.2 हे त्यावर उचित निर्णय घेऊ शकतात. तक्रारदार यांनी चुकीच्या इन्शुरन्स कंपनीच्या नावे क्लेम फॉर्म भरलेला आहे त्यामुळे सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवलेली आहे असा निष्कर्ष काढता येणार नाही. तक्रारदार यांनी महाराष्ट्र शासनाने मौजे रामपूरी तालुका गेवराई जिल्हा बीड या भागात रहिवाशी असलेल्या शेतक-यांसाठी ज्या कंपनीचा विमा काढलेला आहे त्या कंपनीतच क्लेम दाखल करणे गरजेचे आहे. तो क्लेम तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकउे दाखल केला नाही. तक्रारदार यांनी स्वतःच्या चुकीमूळे रिलायन्स जनरल इनशुरन्स कंपनीकडे क्लेम पाठविलेला आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांच्याकडे क्लेम पाठविण्यासाठी कोणतीही तजवीज केलेली नाही. सबब सामनेवाला इन्शुरन्स कंपनी यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे असा निष्कर्ष काढता येणार नाही. सबब तक्रारदाराची तक्रार रदद होण्यास पात्र आहे. म्हणून मुददा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदार यांची तक्रार रदद करण्यात येत आहे.
2) खर्चाबददल आदेश नाही.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर, श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड