निकालपत्र
निकाल दिनांक – २२/०१/२०२०
(द्वारा मा.सदस्य : श्री.महेश निळकंठ ढाके)
___________________________________________________________
1. तक्रारदार यांनी सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केली आहे.
2. तक्रारदाराची तक्रार अशी की, तक्रारदार हे व्यवसायाने शेतकरी असुन शेतीच्या उत्पन्नावर स्वतःचा व कुटुंबाचा चरितार्थ चालवतो, तक्रारदाराची शेतमिळकत मौजे चांदेकसारे तालुका कोपरगाव जि.अहमदनगर येथे सर्व्हे नंबर 143/4 क्षेत्र 0.91 आर आकार रूपये 2.90 पैसे असा असुन त्यात खरीब व रब्बर अशा दोन हंगामात पिके घेतो. सन 2017-18 च्या महसुली वर्षामध्ये खरीपाकरीता वर नमुद क्षेत्रामध्ये सोयाबीन पिकाची लागवड करण्याचे ठरविले त्यानुसार दिनांक 12-06-2017 रोजी श्री.व्यंकटेश कृषी उद्योग चांदेकसारे या बियाणे विक्रीचे दुकानातुन बिल क्रमांक 467 नुसार शासनाचे अधिकृत महाबिज कंपनीचे सोयाबीन 335 हे 30 किलो वजनाचे दोन सिलबंद बॅग त्याचा लॉट नंबर 07524 व प्रत्येकी नगाचा दर 1550 असे एकुण दोन बॅगची खरेदी किंमत रूपये 3100 खरेदी करून दिनांक 20-06-2017 रोजी पेरणी केलेली होती व आहे.
सदर पुर्व हंगाम 2017-18 या वर्षाकरीता सन 2016-2017 मधील पंतप्रधान विमा योजनेनुसार स्किमप्रमाणे संपुर्ण जिल्हातील शेतक-यांनी पुर्व खरीब हंगाम पिकांचा विमा उतरविला होता. तक्रारदार यांनीही त्यांचे वर नमुद जमीनीतील पिकाकरीता बँक ऑफ इंडिया शाखा चांदेकसारे या शाखेमधुन त्यांचे बचत खाते क्रमाक 066310100002696 या खात्यामधुन सामनेवाले क्र.3 व 4 यांचे खात्यावर पुर्व हंगाम सन 2017-18 खरीप सोयाबीन या पिकाकरीता दिनांक 31-07-2017 रोजी पिक विम्याच्या वैध कालावधीमध्ये पिकाचा विमा उतरविला होता. पेरणीनंतरच्या काळात सोयाबीन या पिकाची योग्य ती काळजी घेऊनही दुष्काळ, किड व रोग यामुळे नमुद पिकाचे कालावधीमध्ये अपुर्ण पाऊस व किरकोळ सरी यामुळे सोयाबीन पिकास योग्य हवामान मिळाले नाही व सदर पिकावर ह्युमीनी अळी/ किडीचा प्रादुर्भाव होऊन शेंगा जळाल्या. सदरील बाबत तक्रारदाराने दिनांक 06-09-2017 रोजी सामनेवाले क्र. 3 व 4 यांना सविस्तर लेखी कळविले होते तसेच जिल्हाधिकारी अहमदनगर तसेच व्यवस्थापक युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. श्रीरामपुर यांना लेखी तक्रार अर्जाने कळविले होते. तसेच कामगार तलाठी, चांदेकसारे यांना सविस्तर लेखी अर्जाने झालेल्या नुकसानीची पाहणी करणेबाबत कळविले होते. लेखी तक्रार करूनही सामनेवाले क्र.1 ते 4 पैकी कोणीही तक्रारीची दखल घेतली नाही व कोणताही पंनामा नुकसान भरपाईची मदत केली नाही. त्यामुळे सोयाबीन पिक 100 टक्के फेल होऊन पिकाचे खालीलप्रमाणे नुकसान झाले आहे.
अ.नं. | तपशिल | खर्च रक्कम |
1 | पुर्व हंगाम खरीप नांगरट प्रतिएकर रूपये 1400/- प्रमाणे | रू. 3200/- |
2 | पुर्व हंगाम खरीप जमीन सपाटीकरण प्रतिएकर रूपये 700/- प्रमाणे | रू.1050/- |
3 | पुर्व हंगाम खरीप १८ इंच पेरणी प्रतिएकर रूपये 1200/- प्रमाणे | रू.2700/- |
4 | पुर्व हंगाम खरीप दांड पाडणे प्रतिएकर रूपये 400/- प्रमाणे | रू.900/- |
5 | पेरणीकरिता लागणारे प्रमाणित बी, सायाबीन रू.335/- कंपनी महाबीज लॉट नं.07524, 30 किलो वजनाची एक बॅग अशी एकुण दोन बॅग त्याची प्रत्येक किंमत रूपये 1550/- प्रमाणे | |
6 | त्यानंतर दोन फवारणी खर्च व रासायनिक खते अंदाजे | रू.4000/- |
| एकूण नुकसानी दाखल भरपाईची रक्कम | रू.14,950/- |
ब) सदर पिक उभे करणेकरिता तक्रारदाराने घेतलेल्या कर्ज रकमेचा तपशिल
अ.नं. | तपशिल | खर्च रक्कम |
1 | बॅंक ऑफ इंडिया, शाखा चांदेकसारे यांचेकडून घेतलेले पिक कर्ज | रू.50,000/- |
2 | ता.23/07/2017 अखेर व्याजासह | रू.50,866/- |
3 | सदर पंतप्रधान पिक योजने अंतर्गत प्रस्थापित विम्याची रक्कम | रू.32,760/- |
4 | सदरचे पिकाचे नुकसान होवुनही शासकिय अधिकारी म्हणुन 1 व 2 यांनी कुठलीही दखल घेतली नाही त्या करिता अर्ज, रजि.पोष्ट, टायपिंग इ. खर्च अंदाजे | रू.1000/- |
5 | वरील नं.1 ते 4 यांनी त्यांची वैयक्तिक व संयुक्तिक कोणतीही जबाबदारी पार पाडली नाही म्हणुन त्याकरिता तक्रारदाराने मारलेले हेलपाटे त्याकरिताचे बस भाडे व मानसिक त्रास असा एकूण | रू.10,000/- |
6 | या अर्जाचा खर्च | रू.2000/- |
3. अशी एकुण 1,11,576 रूपये प्रमाणेची रक्कम मंजुरीकरीता सामनेवाले क्र.1 ते 4 यांचेकडे लेखी व तोंडी पाठपुरावा करूनही तक्रारीची दखल घेतली नाही. सामनेवाले क्र.3 व 4 यांनी पिक विमा मंजुर केला नाही व लेखी नोटीस देऊनही तसेच योग्य मुदतीत क्लेम अर्ज भरूनही सदरचा अर्जबाबत कोणताही लेखी खुलासा तक्रारदारास केला नाही. अशाप्रकारे सन 2016-17 प्रंतप्रधान पिक विमा योजनेअंर्गत तक्रारदारास विमा मंजुर केला नाही, नुकसान भरपाई मंजुर केली नाही, तसेच सामनेवाले यांना लेखी, तोंडी कळवूनही सदर पिकाची कोणत्याही स्वरूपाची पाहणी केली नाही. त्यामुळे सामनेवाले क्र.3 व 4 यांनी तक्रारदाराचेबाबत अनफेअर ट्रेड प्रॅक्टीस करून तसेच डिफीशीयन्सी इन सर्व्हीस करून तक्रारदाराचे नुकसान झाले आहे. सबब सामनेवाले क्रमांक 1 ते 4 यांनी तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी दिली असुन नुकसान भरपाई देणेकरीता त्यांची वैयक्तीक व संयुक्तिक जबाबदारी आहे, तक्रारदाराला नुकसान भरपाई व रक्कम देण्याचे आदेश व्हावे. तसेच मानसिक त्रासापोटी खर्च व या तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे. तक्रारदाराने निशाणी 6 सोबत पुढीलप्रमाणे कागदपत्र दाखल केले आहे.
मौजे चांदेकसारे येथील खाते नं.५७० चा खाते उतारा, मौजे चांदेकसारे येथील गट नं.143/4 चा सातबारा उतारा, महाराष्ट्र शासन पंतप्रधान विमा योजनेचे परिपत्रक, तक्रारदाराचे बॅंक पासबुकची छायांकीत प्रत, तक्रारदाराचे बॅंक कर्ज खात्याचा उतारा, व्यंकटेश कृषी उद्योग यांचेकडील तक्रारदाराचे सोयाबीन बियाण्याचे बिल, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला तक्रारदाराने वकिलामार्फत दिलेली नोटीस, तालुका कृषी अधिकारी कोपरगांव यांना व युनायटेड इन्शुरन्स कंपनीला तक्रारदाराने दिलेले अर्ज, जिल्हाधिकारी अहमदनगर यांची रजिस्टर पोहोच पावती, तक्रारदाराने मे.जिल्हाधिकारी यांना दिलेला अर्ज, जिल्हाधिकारी अहमदनगर यांची रजिस्टर पोहोच पावती, युनायटेड इन्शुरन्स कंपनी यांनी तक्रारदारास दिलेली विमा पावती, मा.जिल्हाधिकारी, टंचाई शाखा यांना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी दिलेले पत्र दाखल केलेले आहे.
तक्रारदाराची तक्रार दाखल करण्यात येऊन सामनेवाले यांना मे.मंचातर्फे नोटीस काढण्यात आली त्यानुसार सामनेवाले क्र.3 व 4 हे मे.मंचात हजर झाले व त्यांनी निशाणी 17 वर कैफीयत दाखल केलेली आहे. सामनेवाले यांनी तक्रारदाराचे तक्रारीतील म्हणणे खोडुन काढून सत्य परिस्थिती नमूद केली आहे, ती पुढीलप्रमाणे. - सदर सामनेवाले युनायटेड इंडीया इन्शुरन्स कंपनी ही केंन्द्रीय कृषी मंत्रालयाचे वतीने प्रधानमंत्री फसल विमा योजना खरीब 2017 ही राज्यात गट क्रमांक 6 मध्ये राबवत आहे. त्यामध्ये तक्रारदार याची शेतजमीन असलेले चांदेकसारे गावदेखील समाविष्ट आहे. सदर पिक विमा योजना शासकीय असून तिची अंमलबजावणी ही शासनाच्या 20 जुन 2017 चे अधिसुचनेनुसार केली जाते. या योजनेअंतर्गत शासनाने नमुद केलेल्या आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याबाबत विमा संरक्षण दिलेले असुन सदर जोखीम व नुकसानीचा प्रकार यानुसार हानिमुल्यांकन पध्दत व देय प्रक्रिया निश्चीत केली आहे. संबंधीत विमा दावे देय असल्यास ते थेट मंजुर करण्यात येतात. सदर योजनेमध्ये नियम निश्चीत करण्यात आलेले आहे. त्यात चक्री वादळ, अवेळी पाऊस यामुळे कापनीनंतर सुकविण्यासाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसुचीत पिकांचे नुकसान झाल्यास पंचनामे करून नुकसान भरपाई निश्चीत केली जाते. हंगामातील पुर, पावसातील खंड, दुष्काळ इत्यादी बाबींमुळे अपेक्षीत उंबरठा उत्पन्नाच्या 50 टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षीत असेल तर विमा संरक्षण देय राहील. तसेच आपत्तीमुळे उत्पन्नामध्ये घट असेल तर स्थानीक तालुका कृषी अधिका-यांमार्फत क्षेत्राची पाहणी केली जाते. वरीष्ठ अधिका-यांमार्फत अहवाल कारवाईसाठी पाठविले जातात. पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई ठरविण्याचे सुत्र निश्चीत करण्यात आले आहे. ते पुढीलप्रमाणे. _
नुकसान भरपाई (रूपये) …. उंबरठा उत्पन्न - चालु वर्षाचे सरासरी उत्पन्न ____________________________________ x विमा संरक्षीत रक्कम उंबरठा उत्पन्न |
नुकसान निश्चीत व अहवाल सादर करण्याची कालमर्यादा व संबंधीत बाबी करीता महत्वाच्या अटी व शर्ती या सविस्तरपणे नमुद केलेल्या आहेत.
सदर अधिसुचनेनुसार सोयाबिन पिकाकरीता विमा संरक्षीत रक्कम प्रति हेक्टर रूपये 40000 निश्चीत केली आहे. तक्रारदार यांनी दि.20.09.17 रोजी सामनेवाले विमा कंपनीचे श्रीरामपुर कार्यालयात तक्रार अर्ज पाठविला. सदरहु योजनेची अंमलबजावणी शासकीय अधिका-यांनी करावयाची असल्याचे तक्रारदाराचे निदर्शनास आणुन दिले होते संबंधीत समितीने सोयाबीन पिकाची पाहणी करून सोयाबीनचे सरासरी उत्पन्न 1420.8 किलो प्रतिहेक्टरी म्हणजे मागील पाच वर्षाचे सरासरी उत्पन्न 840 किलो प्रतिहेक्टर पेक्षा जास्त असल्याचे याचाच अर्थ 70 टक्केपेक्षा जास्त असल्याचे दिसुन आले व त्या पध्दतीन सदर समितीने अहवाल शासनाकडे सादर केला.
वरील सर्व हकीकत ही विचारात घेता प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत तक्रारदार ही पिक मिळण्यास पात्र नाही, ही बाब स्पष्ट होते. तक्रारदाराने विनाकारण त्रास देण्याच्या हेतुने तक्रार दाखल केली आहे असे सामनेवाले क्र.3 व 4 यांनी म्हटले आहे. सामनेवाले यांनी नि.19 सोबत प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीब हंगामाचे संपुर्ण बुकलेट दाखल केले आहे. तक्रारदार हे नि.20 रिजॉईंडर दाखल केले आहे. तसेच तक्रारदाराने नि.21 सोबत मौजे चांदेकसारे येथील खाते नं.570 चा खाते उतारा दि.07.12.2017, मौजे चांदेकसारे येथील सर्व्हे नंबर 143/4 चा सातबारा उतारा दि.07.12.2017, महाशय कार्यकारी दंडाधिकारी कोपरगाव यांचे अल्पभुधारक शेतकरी प्रमाणपत्राची छायांकीत प्रत दि.09.10.2015, शासनाकडे भरणा केलेल्या पाणीपट्टी रकमांची छायांकीत प्रत दाखल केलेली दिनांक 18.08.2018 इत्यादी कागदपत्र दाखल केले आहे. निशाणी 22 सोबत तक्रारदाराने लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. सामनेवाले क्र.1 हे नोटीस प्राप्त होऊनही मे.मंचात हजर झाले नाही म्हणुन त्यांचेविरूध्द तक्रार एकतर्फा चालविण्याचा तसेच सामनेवाले क्र.2 यांनी हजर होऊनसुध्दा कैफीयत दाखल करूनही त्यांचेविरूध्द विना कैफीयत चालविण्याचा आदेश नि.1 वर केलेला आहे.
5. तक्रारदार यांची दाखल तक्रार, सोबत दाखल केलेल दस्तऐवज त्यांनी दाखल केलेले रिजॉईंडर, दाखल केलेला लेखी युक्तिवाद, तसेच सामनेवाले क्र.3 व 4 यांनी दाखल केलेला खुलासा त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे तसेच उभयपक्षांनी केलेला तोंडी युक्तिवाद यांचे बारकाईने अवलोकन केले असता न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.नं. | मुद्दे | निष्कर्ष |
(1) | सामनेवाले यांनी तक्रारदाराप्रती सेवेत त्रुटी दिली आहे काय ? | होय |
(2) | तक्रारदार हा पिक विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण रक्कम मिळणेस पात्रा आहे काय ? होय | होय |
(3) | आदेश काय | अंतिम आदेशा प्रमाणे |
कारणमिमांसा
6. मुद्दा क्र. (1) : तक्रारदाराने त्याचे शेतमिळकतीत सोयाबीन पिक पेरले होते. सदरील पिकाचे तक्रारदाराने काळजी घेऊनही अपुरा पाऊस तसेच पिकास योग्य हवामान मिळाले नाही म्हणुन दुष्काळ व किड रोगाने अळी/ किडीचा सोयाबीन पिकावर प्रादुर्भाव होऊन शेंगा गळ्याला त्यामुळे त्याचे 100 टक्के नुकसान झाले असे तक्रारदारातर्फे त्यांचे वकील श्री. जपे यांनी युक्तिवादात सांगितले. तक्रारदाराने त्याचे शेतमिळकतीत सोयाबीन पेरले असल्याबद्दल सोयाबीन 335 महाबिज कंपनीचे बियाणे व्यंकटेश कृषी उद्योग यांचेकडुन खरेदी केले असल्याबद्दल नि.6/7, 6/8 येथील पावत्यावरून खरेदी केल्याचे दिसते. तसेच तक्रारदाराने बँक पासबुक दाखल केले आहे त्यात प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन पिकासाठी पिक विमा घेतला असुन त्यात 728 रूपये कपात झाले असल्याचे दिसत आहे. तसेच तक्रारदाराने कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी कोपरगाव, जिल्हाधिकारी अहमदनगर तसेच युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी अहमदनगर यांचे शाखा व्यवस्थापकांना नुकसान पाहणीविषयी अर्ज दिला आहे. सदरील तक्रार अर्जाची छायांकीत प्रत तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत दाखल केली आहे. सामनेवाले कंपनीने हमी मुल्यांकनाकरीता ज्या अटी निर्धारीत केल्या आहेत त्या विमा हप्ता स्विकारणेचे वेळी प्रसिध्दीस दिल्या नाहीत. तसेच नुकसान भरपाईचा दरही दिला नाही. खोट्या सबबी देऊन केवळ विमा रक्कम देणे लागु नये म्हणुन सामनेवाले क्रमांक 3 व 4 यांनी कोर्टाची दिशाभुल केलेली आहे, असे तक्रारदाराने त्याचे लेखी युक्तीवाद नमुद केले असुन तोंडी युक्तिवादातही सांगितले आहे. सामनेवाले क्र.3 व 4 यांनी तक्रारदाराचे गाव हे पोहेगाव मंडळ तालुका कोपरगाव यांचे कक्षेत येत त्याप्रमाणे पिक विमा योजनेअंतर्गत समितीन सद गटातील सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष पाहणी करून सरासरी उत्पन्न 70 टक्केपेक्षा जास्त असल्याचे दिसुन आली व त्या संदर्भात सविस्तर अहवाल शासनाकडे सादर केला आहे असे म्हटले आहे परंतु सामनेवालेने त्याच्या या म्हणण्याचे पुष्टयर्थ कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. याउलट तक्रारदाराने त्याचे तक्रारीसोबत निशाणी 1, 2 , 3 वर नमुना आठ अ तसेच सातबारा उतारा दाखल केला आहे तसेच प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे परिपत्रक दाखल केले आहे. त्या परिपत्रकात 6.1 या पिक विम्याचे वैशिटयात 6.1 ड यामध्ये कीड व रोग या संदर्भात स्पष्टीकरण आहे. तसेच विमा संरक्षीत रक्कम व प्रतिहेक्टरी विमा हप्ता याचे कोष्टक दिलेले असुन त्यात पिकाचे नाव सोयाबीन विमा संरक्षीत रक्कम प्रतिहेक्टर 36000 रूपये तसेच विमा हप्ता रक्कम रूपये 720 असे त्यात नमुद आहे. तक्रारदाराने सोयाबीन पिकाची पेरणी ही 0.91 आर. मध्ये केल्याचे नमुद केले आहे.
सामनेवाले क्र.1 व 2 हे जिल्हा कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी असुन त्यांचेविरूध्द तक्रारीत ठोस मागणी नसल्याने व त्यांचे नाव सामनेवाले म्हणुन फॉर्मल पार्टी असल्याने तसेच तक्रारदार हा त्यांचा ग्राहक नाही, त्यामुळे त्यांनी सेवेत त्रुटी दिली नाही, असे मंचाचे मत आहे. सामनेवाले क्र.3 हे कंपनीचे विभागीय कार्यालय असुन सामनेवाले क्र.4 हे विमा कंपनीची अहमदनगर जिल्हा शाखा आहे. सामनेवाले क्र.3 व 4 यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जाची दखल न घेऊन पिक विमा पाहणीसाठी योग्य पाऊले उचलेले नाहीत. तसेच तक्रारदारास विमा संरक्षीत रक्कम न देऊन सेवेत त्रुटी दिली आहे, हे सिध्द झाले आहे. म्हणुन मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
7. मुद्दा क्र. (2) : तक्रारदाराने तक्रारीतील परिच्छेद क्रमांम ५ - अ व ब प्रमाणे नुकसान भरपाई रकमेचा तपशील व कर्ज रकमेचा तपशील दिला आहे. परंतु परिच्छेद ५ – ब (३) पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत विम्याचे कागदपत्रांव्यतिरीक्त कुठलाही कागदोपत्री पुरावा दिलेला नाही. त्यामुळे नुकसानभरपाई मिळणेस तक्रारदार पात्र नाही. मुद्दा क्र.1 चे विवेचनावरून तक्रारदार हा 0.91 आर या त्याच्या तक्रारीत नमुद शेतजमीनीमधील सोयाबीन पिकाचे नुकसानीबाबत विमा संरक्षीत रक्कम व्याजासह मिळणेस पात्र आहे, असे मंचाचे मत आहे. म्हणुन मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
8. मुद्दा क्र. (3) : मुद्दा क्रमांक 1 व 2 वरील विवेचनावरून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. |
2. सामनेवाले क्र.3 व 4 यांनी वैयक्तिकपणे किंवा एकत्रितपणे तक्रारदारास त्याचे सोयाबीन पिकाचे नुकसान म्हणुन तक्रारीत नमुद गट क्रमांक 143/4 क्षेत्र 0.91 आर. वर विमा संरक्षीत रकमेपोटी रक्कम रूपये 32,760 (बत्तीस हजार सातशे साठ मात्र) व त्यावर दिनांक 31-07-2017 पासून संपुर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज द्यावे. |
3. सामनेवाले क्र.3 व 4 यांनी वैयक्तिकपणे किंवा एकत्रितपणे तक्रारदार यांना सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये 2,000/- (अक्षरी दोन हजार) द्यावा. |
4. सामनेवाले क्र.1 व 2 यांचेविरूध्द कोणतेही आदेश नाही. |
5. वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत मिळण्यापासून 30 दिवसाच्या आत करावी. 6. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी. 7. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी. |