(घोषित दि. 28.07.2011 व्दारा सौ.माधूरी विश्वरुपे, सदस्या) तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदाराचे पती श्री. जनार्धन शामराव शिंदे हे शेतकरी असुन, त्यांची व कुटूंबाची उपजिविका शेती व्यवसायातून करतात. दुर्देवाने दिनांक 17.09.2010 रोजी शेतात जात असताना सर्पदंश झाला. त्यांना जालना हॉस्पीटल येथे प्रथमोपचार केल्यानंतर डॉ.हेगडेवार रुग्णालय औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी दाखल केले. परंतू डॉ.हेगडेवार रुग्णालयात उपचार चालू असताना दिनांक 27.09.2010 रोजी मृत्यू पावले. तक्रारदाराने तिच्या मयत पतीच्या अपघाती मृत्यूची नुकसान भरपाई मिळण्याकरीता शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत प्रस्ताव योग्य त्या कागदपत्रांसहीत दिनांक 15.11.2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 तालूका कृषी अधिकारी बदनापूर यांचेकडे दाखल केला. परंतू प्रस्ताव दाखल केल्यानंतर दोन महिन्यात या संदर्भात कोणतीही माहिती न मिळाल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे दिनांक 17.01.2011 रोजी गैरअर्जदार मार्फत विनंती अर्ज दिला. सदर अर्जाच्या प्रती मा.आयुक्त (महसुल व कृषी) औरंगाबाद तसेच मा.जिल्हाधिकारी जालना यांना पाठविल्या आहेत. तरीही अद्याप पर्यंत नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही, अशी तक्रारदाराची तक्रार आहे. तक्रारदार छायाबाई जनार्धन शिंदे यांनी सदरची तक्रार त्यांचे नातेवाईक श्री. परमेश्वर अंबादास कूबेर यांनी मुख्त्यारपत्रान्वये दाखल केली आहे. सदर प्रकरणात गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी दिनांक 02.06.2011 रोजी न्यामंचात लेखी म्हणणे दाखल केले. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्या लेखी म्हणण्यानुसार तक्रारदाराच्या प्रस्तावावर मृत्यूची तारीख अस्पष्ट असल्याने सदरचा प्रस्ताव दिनांक 06.12.2010 रोजी गैरअर्जदार 2 यांचेकडे पाठविला. गैरअर्जदार 2 यांनी दुरुस्ती करुन प्रस्ताव परत गैरअर्जदार 1 यांचेकडे दिनांक 13.12.2010 रोजी पाठविला. त्यानंतर दिनांक 01.02.2011 रोजी गैरअर्जदार 3 यांचे जिल्हा प्रतिनिधी श्री. जोशी यांनी सदरच्या प्रस्तावाची तपासणी केली असता त्यामध्ये एफ.आय.आर, स्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, 6 क चे प्रमाणपत्र या कागदपत्रांची त्रुटी असल्यामुळे परत केला. सदर कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी तक्रारदारास दिनांक 15.02.2011 व 17.03.2011 पत्रान्वये गैरअर्जदार 2 यांचे मार्फत कळविले. परंतू तक्रारदाराने सदर कागदपत्रांची पुर्तता केली नाही. त्यामुळे दिनांक 28.03.2011 रोजी परत केला. तक्रारदाराने पुन्हा दिनांक 06.06.2011 रोजी गैरअर्जदार 2 यांचे मार्फत गैरअर्जदार 1 यांचेकडे दाखल केलेला प्रस्ताव गैरअर्जदार 3 यांचेकडे दिनांक 09.06.2011 रोजी दाखल केला आहे. गैरअर्जदार 3 यांनी दिनांक 25.07.2011 रोजी दाखल केलेल्या लेखी म्हणण्यानुसार तक्रारदाराचा प्रस्ताव दिनांक 09.06.2011 रोजी प्राप्त झालेला असुन सदर प्रस्ताव पूर्ण तपासणी करुन शिफारसीसह दिनांक 17.06.2011 रोजी गैरअर्जदार 4 विमा कंपनीकडे पाठविण्यात आला आहे. सदर प्रकरणात गैरअर्जदार 4 यांना नोटीस मिळूनही गैरहजर असल्यामुळे दिनांक 25.07.2011 रोजी त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश न्यायमंचाने घेतला. तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्र, लेखी युक्तीवाद गैरअर्जदार 1, 2 व 3 यांचे लेखी म्हणणे, दाखल कागदपत्र यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारातर्फे त्यांचे मुख्त्यार श्री. परमेश्वर अंबादास कूबेर यांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारीतील कागदपत्र पाहता तक्रारदाराचा परीपुर्ण विमा प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसहीत गैरअर्जदार 2 यांनी दिनांक 06.06.2011 रोजी गैरअर्जदार 3 यांचेकडे पाठविला असून दिनांक 09.06.2011 रोजी प्राप्त झाला आहे, तसेच गैरअर्जदार 3 यांनी दिनांक 18.06.2011 रोजी गैरअर्जदार 4 यांचेकडे पाठविल्याचे दिसून येते. तक्रारदाराचा प्रस्ताव गैरअर्जदार विमा कंपनीकडे दिनांक 18.06.2011 रोजी पाठविलेला असूनही गैरअर्जदार 4 विमा कंपनीने सदर प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. गैरअर्जदार 4 सदर प्रकरणात गैरहजर असल्यामुळे विलंबाबातचा खुलासा होत नाही. तक्रारीतील कागदपत्र म्हणजेच गैरअर्जदार 2 यांनी गैरअर्जदार 1 यांचेकडे दिनांक 06.06.2011 रोजी तक्रारदाराचा प्रस्ताव पाठविल्याबाबतच्या पत्राचे अवलोकन केले असता सदर योजने अंतर्गत प्रस्तावाबाबतची आवश्यक कागदपत्र 7/12, 8 अ, 6 क, मयताचे व तक्रारदाराचे ओळखपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र, डॉ.हेगडेवार रुग्णालयाचे मृत्यू प्रमाणपत्र व इतर 3 कागदपत्र पाठविण्यात आल्याचे स्पष्ट होते. तसेच सदरचा परिपूर्ण प्रस्ताव गैरअर्जदार 3 यांचेकडे प्राप्त झाल्यानंतर प्रस्तावाची तपासणी करुन शिफारशीसह गैरअर्जदार 4 यांचेकडे दिनांक 18.06.2011 रोजी पाठविल्याचे स्पष्ट होते. तक्रारदाराचे पतीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे तक्रारीत दाखल केलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रावरुन दिसून येते. सदर प्रकरणात शवविच्छेदन अहवाल दाखल नाही. परंतू डॉ.हेगडेवार रुग्णालयाच्या उपचारासंबंधीच्या कागदपत्रांवरुन व मृत्यू प्रमाणपत्रावरुन तक्रारदाराचे पती श्री.जनार्धन शिंदे यांचा मृत्यू संर्पदंशाने झाल्याचे स्पष्ट होते. तसेच शासनाने सदर योजने अंतर्गत काढलेल्या परिपत्रकातील (शासन निर्णय क्र.शेअवि-201/प्र.क्र.172/11- ऐ दिनांक 10.08.2010) परिच्छेद क्र. 7 नुसार विमा प्रस्ताव विहित कागदपत्रांसहित ज्या दिनांकास तालूका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात प्राप्त होईल त्या दिनांकासच तो विमा कंपनीस प्राप्त झालेला आहे असे समजण्यात येईल, हे स्पष्ट होते. वरील परिस्थितीचे अवलोकन केले असता तक्रारदाराच्या पतीचा मृत्यू दिनांक 27.09.2010 रोजी विमा कालावधीत (दिनांक 15.08.2010 ते 14.08.2011) झालेला असुन, तक्रारदार शेतकरी आहे. अशा परिस्थितीत तक्रारदार सदर योजने अंतर्गत लाभ घेण्यास पात्र असूनही गैरअर्जदार 4 यांनी विमा प्रस्ताव प्रलंबित ठेवला हे स्पष्ट होते. गैरअर्जदार 4 यांची सदरची कृती सेवेत त्रुटी केल्याचे स्पष्ट होते. असे न्याय मंचाचे मत आहे. सेवेतील त्रुटी स्पष्ट असल्यामुळे गैरअर्जदार 4 यांनी तक्रारदारांना सदर योजने अंतर्गत देय असलेली नुकसान भरपाईची रक्कम रुपये 1,00,000/- देणे उचित होईल. असे न्याय मंचाचे मत आहे. सबब न्याय मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे. आदेश - गैरअर्जदार 4 यांना आदेश देण्यात येतो की, शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम रुपये 1,00,000/- (रुपये एक लाख फक्त) आदेश मिळाल्यापासून एक महिन्याचे आत द्यावी.
- वरील रक्कम विहित मुदतीत अदा न केल्यास तक्रार दाखल तारखेपासून पूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 8 % व्याज दाराने द्यावी.
- खर्चा बाबत आदेश नाही.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.
| | HONABLE MRS. Sow. Madhuri Vishwarupe, MEMBER | HONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT | , | |