जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 79/2011 तक्रार दाखल तारीख –09/07/2011
सागरबाई भ्र.मधुकर घोळवे
वय 42 वर्षे धंदा शेती .तक्रारदार
रा.पिंपळगव्हाण ता.केज जि.बीड
विरुध्द
1. महाराष्ट्र शासन, मार्फत जिल्हाधिकारी,
जिल्हाधिकारी कार्यालय,नगर रोड, बीड
2. तहसीलदार,
तहसील कार्यालय, केज ता.केज जि.बीड
3. अध्यक्ष,
कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीस प्रा.लि.
शॉप नं.29 राज अपार्टमेंट, सिडको,औरंगाबाद. .सामनेवाला
4. विभागीय व्यवस्थापक,
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि.
हजारी चेंबर्स, स्टेशन रोड, औरंगाबाद
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.एस.आर.राजपुत
सामनेवाला 1 तर्फे :- स्वतः
सामनेवाला 2 तर्फे ः- स्वतः
सामनेवाला क्र.3 तर्फे ः- स्वतः
सामनेवाला क्र.4 तर्फे ः- अँड.एन.पी.वाघमारे
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराचे पती मधुकर बापुराव घोळवे हे शेतकरी होते. ते शेतात ट्रॅक्टर मध्ये ऊस भरीत होते ऊसाने भरलेला ट्रॅंक्टर उलटल्यामुळै त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना त्यांचे नातेवाईकांनी विडा येथील सरकारी दवाखान्यात शरीक केले. परंतु त्यांची शारीरिक अवस्था गंभीर स्वरुपाची असल्यामुळे विडा येथील डॉक्टरने त्यांना बीड येथील दवाखान्यात घेऊन जाण्याचा सल्ला दिला व त्यांना रेफरल स्लिप दिली व दि.16.5.2007 रोजीच त्यांना बीडला घेऊन जात असताना ते येळंबघाट गावाजवळ आले असता ते मयत झाले.
तक्रारदारांनी तहसील कार्यालय केज येथे शेतकरी अपघात विमा रक्कम मिळणेकामी दि.6.6.2007 रोजी क्लेम दाखल केला. सदरचा दावा दि.16.7.2007 रोजी तक्रारदारांनी शपथपत्र नॅशनल इन्शुरन्स कंपनी मुंबई सामनेवाला क्र.4 यांना पाठविले. त्यामध्ये अपघाता बाबतचे कथन करुन पीएम, प्रथम खबर , इनक्वेस्ट पंचनामा, घटनास्थळ पंचनामा कागदपत्र नाहीत म्हणून कळविले. कारण त्यांनीच पोलिस स्टेशनला खबर पण दिली नाही. सामनेवाला क्र.4 चे पत्र तक्रारदारांना दि.10.6.2008 रोजी आले. काही कागदपत्राची मागणी केली. तक्रारदारांनी कागदपत्र उपलब्ध नसल्याचे कळविले. दि.20.03.2009 रोजीचे पत्राने प्रस्ताव नामंजूरीचे पत्र सामनेवाला क्र.4 यांनी तक्रारदारांना पाठविले.
सामनेवाला क्र.2 यांना तक्रारदारांनी पुर्नअवलोकनाकामी सामनेवाला क्र.4 कडे तक्रार पाठवावी म्हणून तोंडी विनंती एप्रिल 2009 मध्ये केली असता त्यांनी तक्रारदारांना आश्वासन देऊन समाधान करीत राहीले. शेवटी दि.07.11.2011रोजी सामनेवाला यांनी तक्रारदारांना योग्य त्या न्यायालयात दाद मागणेकामी सांगितले. अशा प्रकारे सामनेवाला यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केलेला आहे.
विनंती की, तक्रारदारांना नूकसान भरपाई रु.1,00,000/- सामनेवालाकडून दाखल केल्यापासून प्रचलित व्याजासह देण्यात यावी. मानसिक शारीरिक त्रास प्रवास वगैरे बाबतचा खर्च देण्याचा आदेश व्हावा.
सामनेवाला क्र.1 तर्फे सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचा लेखी जवाब दि.29.08.2011रोजी दाखल केला. खुलाशात सर्व आक्षेप नाकारलेले आहेत. तक्रारदाराने सामनेवाला क्र.2 कडे दाखल केलेले कागदपत्र सामनेवाला क्र.3 कडे वेळोवेळी पाठविलेले आहेत.सामनेवाला क्र.3 मार्फत सामनेवाला क्र.4 कडे दावा पाठविला आहे. सदरचा दावा सामनेवाला क्र.4 ने मयताचे वय 80 वर्ष असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाल्याने 7/12 उता-यावर मयताचे नांव नसल्याचे कारण देऊन नामंजूर केला. सामनेवाला क्र.2 हे नूकसान भरपाई मिळण्यास जबाबदार नाहीत त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करावी.
सामनेवाला क्र.3 यांनी त्यांचा खुलासा दि.29.08.2011 रोजी दाखल केला. श्री.मधुकर बापूरारव घोवळे रा. पिंपळगांव ता.केज यांचा अपघात दि.16.5.2007 रोजी झाला. त्यांचा दावा दि.19.06.2007 रोजी मिळाला आणि सदरचा दावा सामनेवाला क्र.4 कडे पाठविला. सामनेवाला क्र.4 ने सदरचा दावा नामंजूर केला आणि त्यांचे पत्र तक्रारदारांना दि.20.03.2009 रोजी पाठविले.
सामनेवाला क्र.4 यांनी त्यांचा खुलासा दि.04.11.2011रोजी दाखल केला आहे. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप नाकारलेले आहेत. तक्रारदाराचे पती कूठल्याही अपघातात मयत झालेला नाही. त्यांचा मृत्यू नैसर्गिक झालेला आहे परंतु केवळ योजनेचा लाभ घेण्याकरिता तक्रारदारांनी तक्रारीत ट्रॅक्टर मध्ये ऊस भरीत असताना ट्रॅक्टर उलटल्यामुळे मयत झाल्या बाबतचे म्हटले आहे.
तक्रारदाराच्या पतीला विडा सरकारी दवाखान्यात शरीक केले होते त्यांनी बीड येथे उपचारार्थ घेऊन जाण्यास सांगितले या बाबतची तक्रारदाराची कळविल्याची कागदपत्राची कोणतीही नोंद नाही. पोलिस स्टेशनला गून्हयाची नोंद झालेली नाही. तक्रारदारांनी खोटीच रेफरल स्लिप तयार केलेली आहे. मयताचा मृत्यू अपघात असल्या बददलचे कोणतेही कागदपत्र नसल्याने विमा कंपनीने योग्य रितीने त्यांचा दावा नाकारलेला आहे. त्यात सेवेत कोणत्याही प्रकारे कसूर केलेला नाही. त्यामुळे तक्रार खर्चासह रदद करण्यात यावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला क्र. 2,3 व 4 यांचा खुलासा,सामनेवाला क्र.4 चे शपथपत्र, यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.राजपूत व सामनेवाला क्र.4 यांचे विद्वान वकील श्री.एन.पी.वाघमारे यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता सामनेवाला क्र.2 यांनी प्रस्ताव अर्ज सामनेवाला क्र.3 कडे पाठविला आहे व सदरचा प्रस्ताव अर्ज सामनेवाला क्र.3 कडे पाठविला आहे परंतु सामनेवाला क्र.4 यांनी त्यात असलेल्या अपूर्ण कागदपत्राची मागणी केलेली आहे व त्यांची पूर्तता तक्रारदारांनी केलेली नाही.
मयताचा मृत्यू अपघाताने झालेला आहे ही शाबीतीची जबाबदारी तक्रारदाराची आहे व त्यासाठी पोलिस फिर्याद, पंचनामा, मयताचे मयत झाल्याबाबतचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र किंवा शवविच्छेदन अहवाल इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. परंतु तक्रारदारांनी तक्रारीतच नमूद केले आहे की,तक्रारीची कागदपत्रे तक्रारदाराकडे नाहीत.त्यामुळे सामनेवाला क्र.4 यांनी सदरचा दावा नामंजूर केलेला आहे. यात सामनेवाला क्र.4 ने तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब कूठेही स्पष्ट होत नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार रदद करण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड