सौ. जयश्री येंडे, मा. सदस्य यांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 01/11/2011)
1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून त्यांच्या तक्रारीचा आशय असा आहे की, त्यांच्या मुलाने अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळण्याच्या पूर्व परिक्षेच्या तयारीकरीता 2008-2009 चे पहिल्या सत्रासाठी गैरअर्जदार संस्थेत प्रवेश घेतला. त्याकरीता तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराने मागितल्यानुसार रु.35,393/- रक्कम धनादेशाद्वारे गैरअर्जदाराकडे जमा केले व तशी पावती क्र. 2090/903 दि.24.04.2008 ची गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यास दिली. याशिवाय तक्रारकर्त्याने गैरअर्जदार संस्थेच्या प्रवेश परिक्षेची फी रु.500/- दि.02.05.2008 रोजी भरली. तक्रारकर्त्याचे मते त्यांचा मुलगा हा हुशार असून तो अभ्यासात नियमित आहे. गैरअर्जदाराने संस्थेच्या शिक्षकांची शिकविण्याची पध्दत स्पष्ट, घाईची व सदोष असल्यामुळे, तक्रारकर्त्यांचा मुलगा हुशार असूनही त्याला शिकविलेला भाग अवगत होत नव्हता. याशिवाय दंडाच्या भितीची टांगती तलवार मुलावर राहायची. गैरअर्जदाराचे शिकविण्याच्या पध्दतीमुळे मुलामध्ये नैराश्य निर्माण झाले. तशाही मानसि अवस्थेत त्याने दोन महिन्यापर्यंत वर्ग चालू ठेवले. शेवटी तका्ररकर्त्याच्या मुलाने दुस-या ख्यातनाम संस्थेत प्रवेश घेतला व त्याला त्या ठिकाणी योग्य ते मार्गदर्शन मिळून तो AIEEE व State SEEE या दोन्ही परिक्षेत उत्तम गुण मिळून उत्तीर्ण झाला. त्यामुळे तक्रारकर्त्याने गैरअर्जदारास वर्ग बंद करुन भरलेली फी परत करण्याची विनंती केली. गैरअर्जदाराचे सुचनेनुसार तक्रारकर्त्याने दि.20.11.2008 रोजी तसा अर्ज दिला व रु.400/- फी सोडून इतर रु.35,393/- परत करण्याची मागणी केली.
2. तक्रारकर्त्याचे म्हणणे की, मुलाने वर्ग बंद केल्यामुळे त्याची परिक्षा होण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे गैरअर्जदाराने रु.11,500/- अवाजवी घेतले आहे. तसेच सर्व्हीस टॅक्स म्हणून रु.3,893/- हेसुध्दा जास्तीचे घेतलेले आहे. अशा त-हेने मागणी करुनही गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याची फी परत न करुन सेवेतील कमतरता दिलेली आहे. म्हणून भरलेली फी परत करण्याकरीता, नुकसान भरपाई मिळण्याकरीता तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचाल दाखल केलेली आहे.
3. सदर तक्रार दाखल झाल्यानंतर मंचाने गैरअर्जदारांना नोटीस पाठविली. गैरअर्जदारांनी सदर तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले व मान्य केले की, तक्रारकर्त्याच्या मुलाने दि.12.06.2008 ते 15.11.2008 या कालावधीतील अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घेतला होता व तो सर्व वर्गाला उपस्थित होता. तसेच त्याने 20.11.2008 रोजी भरलेल्या शुल्काचा उर्वरित भाग परत मिळावा म्हणून अर्ज केला.
4. परंतू गैरअर्जदाराने प्राथमिक आक्षेप घेतला की, ही तक्रार ग्राहक मंचाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही व त्यामुळे ही तक्रार चालविण्याचा या मंचाला अधिकार नाही. गैरअर्जदाराने आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रीय आयोग व इतर वरिष्ठ न्यायालयाचे काही निवाडे दाखल केलेले आहेत.
5. याशिवाय गैरअर्जदाराचे म्हणण्यानुसार गैरअर्जदाराने घेतलेले शुल्क पूर्ण सेमिस्टरकरीता घेतलेले आहे व ते विभागता येणार नाही. तसेच तक्रारकर्त्याच्या मुलाने साडेनऊ महिन्याचे कालावधीत 5 महिने 3 दिवस वर्गाला उपस्थिती लावली होती व स्वेच्छेने 20.11.2008 रोजी शुल्काचा उर्वरित भाग परत मिळावा, म्हणून अर्ज केला. त्यालाही त्याने व्यक्तीगत आणि आरोग्याच्या कारणास्तव वर्गात उपस्थित राहू शकणार नाही हे नमूद केले होते. एकूण 225 जागांसाठी 1500 अर्ज आले होते, त्यामुळे गैरअर्जदार संस्थेमध्ये प्रवेश फार कठीण असतो व अशावेळेस मध्येच अभ्यासक्रम सोडून गेल्यामुळे संस्थेची जागा रिकामी राहिली. तसेच गैरअर्जदाराचे नियमानुसार एकदा भरलेले शुल्क परत मिळणार नाही ही अट स्पष्ट केलेली आहे. तक्रारकर्त्याचा मुलगा वर्गात घेतलेल्या वेगवेगळया परिक्षांना बसला. त्याचा तपशिल गैरअर्जदाराने आपल्या जवाबात सादर केला. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदाराने केलेली आहे.
6. सदर प्रकरण युक्तीवादाकरीता मंचासमोर आले असता तक्रारकर्त्याने लेखी युक्तीवाद दाखल केला. गैरअर्जदारांचा युक्तीवाद त्यांच्या वकिलांमार्फत ऐकण्यात आला. तसेच सदर प्रकरण दाखल शपथपत्रे व दस्तऐवज यांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले.
-निष्कर्ष-
7. गैरअर्जदाराने सदर प्रकरणात प्राथमिक मुद्दा उपस्थित केला आहे की, ही तक्रार चालविण्याचा ग्राहक मंचाला अधिकार नाही व गैरअर्जदाराची कृती ही सेवेतील कमतरता नाही. आपल्या म्हणण्याचे पुष्टयर्थ गैरअर्जदाराने काही निवाडे सादर केलेले आहेत.
8. गैरअर्जदाराने सादर केलेल्या ब्रिलीयेंट क्लासेस वि. श्री. अशबेल साम (N.C.) 29th January 2010 या निवाडयात राष्ट्रीय आयोगाने स्पष्ट म्हटले आहे की, एखाद्या उमेदवाराने स्वेच्छेने अभ्यासक्रमाचे शुल्क भरल्यानंतर तो आपल्या मर्जीने केव्हाही अभ्यासक्रम सोडून वर्ग अनियमित आहेत किंवा शिकवणे कमी दर्जाचे आहे या कारणास्तव शुल्क परत मागू शकत नाही. शुल्क भरावयाचे आधी त्याने संबंधित माहिती घ्यावयास पाहिजे होती. गैरअर्जदाराने सादर केलेल्या रामदेवबाबा इंजिनियरींग कॉलेज वि. सुशांत युवराज रोडे व इतर III (1994) CPJ 160 (NC)
1] Islamic Academy of Education v/s. State of Karnataka (2003) 6 SCC 697
2] Bharathi Knitting Company v/s DHL Worldwide Express Courier 1996 (4) SCC 704
3] Manish Gautam Sharma v/s P.T.Education & Training Services Ltd. (Appeal No.333/2009) Rajasthan State Commission
या प्रकरणातील वस्तूस्थिती पाहता असे दिसते की, तक्रारकर्त्याच्या मुलाने गैरअर्जदार संस्थेत प्रवेश घेतला होता. परंतू स्वच्छेने तो प्रवेश रद्द करुन शुल्क परत करण्याची मागणी केली. या प्रकरणातील वस्तूस्थिती व वरील निवाडयातील वस्तूस्थिती ही सारखीच असल्यामुळे वरील निवाडयातील आशय या प्रकरणास लागू होतो.
9. सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय आयोगांनी दिलेल्या निवाडयातील आशय लक्षात घेता, तक्रारकर्त्यांनी दाखल केलेली तक्रार या ग्राहक मंचाचे अधिकार क्षेत्रात येत नाही, त्यामुळे सदर तक्रार गुणवत्तेच्या आधारावर न काढता प्राथमिक मुद्यावरच वरील निरीक्षणासह निकाली काढण्यात येत आहे. तक्रारकर्ता योग्य त्या न्यायालयाकडे आपल्या तक्रारी संदर्भात दाद मागू शकतो. सबब आदेश.
-आदेश-
वरील निरीक्षणासह सदर तक्रार निकाली काढण्यात येते. दोन्ही पक्षांनी आप-आपला खर्च सोसावा.